Nov 30, 2020

टोळंभट्टाची गोष्ट -

 टोळंभट्ट साधा तरुण असतो. इतका, की लोक त्याला बावळट समजतात अनेकदा. पण तसा तो बावळट नसतो. फक्त त्याला व्यावहारिक शहाणपण नसतं इतकंच. 

टोळंभट्टाचं लग्न होतं. बायको लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाते. आणि तिला आणायला टोळंभट्टाला जावे लागते. टोळंभट्टाच्या आईला काळजी वाटते. आपला मुलगा तिथे साधेपणाने वागेल नि त्याच्या सासुरवाडीचे लोक त्याला बावळट समजतील. 

ती टोळंभट्टाला सल्ला देते. ती म्हणते, 'हे बघ, बाळा, तू सासुरवाडीला चाललायस तुझ्या. तिथं नीट शहाणपणाने वागायचं. आपला मान राखण्यासाठी तिथं उच्चासनावर बसायचं. खाली बसायचं नाही. बोलायचं कमी, नि ऐकायचं, बघायचं जास्त. जास्त बोलायचं नाही. फक्त निरीक्षण करायचं नि जेवढ्यास तेवढं बोलायचं.'

टोळंभट्ट तिची आज्ञा शीरसावंद्य मानून सासूरवाडीला जायला निघतो.
सासरी गेल्यावर बाहेर ओटीवरच भाताच्या गवताची गंज रचलेली असते. टोळंभट्ट त्यावर टुणकन उडी मारून बसतो. कारण आईने सांगितलेलं असतं, उच्चासनावर बसायचं. खाली बसायचं नाही. टोळंभट्टाची सासूरवाडीही गरीबच असते. खुर्च्या वगैरे नसतात बसायला. त्याला बसायला सासरच्या लोकांनी सतरंजी अंथरलेली असते घरात. पण टोळंभट्ट जाम पेंडीवरून उतरायला तयार नाही. कारण आईची आज्ञा. खाली बसलो तर आपण बावळट ठरू. शेवटी सासू सासरे आग्रह सोडून देतात. बसू दे त्याला तिथेच म्हणून. 

आणि सासू आत सैपाकाला लागते. सैपाकघराची छोटीशी खिडकी बाहेरच्या ओटीवरच उघडत असते. तिथून सैपाकघरातले सगळे आवाज, हालचाली टोळंभट्टाला कळत असतात. त्याला आईचा दुसरा सल्ला आठवतो. निरीक्षण करायचं. बोलायचं नाही. 
सासू आतमध्ये जावयासाठी घावन-घाटलं बनवायला घेते. घावन घालताना चुर्र आवाज येतो. असे ३२ आवाज येतात. टोळंभट्टाचं लक्ष असतं. 
जेवण झाल्यावर भटाला आत जेवायला बोलावतात. तो जेवायला बसतो. निरीक्षण करत राहतो. कोणाला किती घावनं वाढली जातायत. तो मनातल्या मनात मोजतो. शेवटचं ३२ वं घावन त्याला वाढायला सासू येताच तो सासूला म्हणतो, 'अहो आई, हे तुमच्यासाठी राहू द्या. आता हे एकच उरलंय तर.'
सासू अवाक् होते. याला कसं कळलं ? तिला कौतुक वाटतं. तिला वाटतं आपला जावई चांगला ज्योतिषी आहे. ती गावभर, शेजारी पाजारी ही गोष्ट सांगत फिरते. 
झालं, वदंता सगळीकडे पसरते. एक माणूस टोळंभट्टाकडे येतो, 'अहो, जावईबापू माझं गाढव सकाळपासून हरवलंय. कुठे असेल बरं जरा ज्योतिष बघून सांगता का?'
टोळंभट्ट विचारात पडतो. नाही म्हणावं तर आपल्याला बावळट म्हणतील, हो म्हणावं तर आपल्याला कुठं माहीत आहे गाढव कुठे आहे ते..
पण तो फार न बोलता संध्याकाळी सांगेन म्हणून वेळ निभावून नेतो. तो माणूस बरं म्हणून घरी जातो.
इकडे जेवून, एक झोप काढून टोळंभट्ट गावात चक्कर मारायला निघतो. गाढवाचं काय सांगावं या विचारात फिरता फिरता गावाबाहेर  खूप लांब निघून येतो, माळावर. तिथे एक गाढव चरत असलेले त्याला दिसते. तो त्या गाढवाला तिथे एका झाडाशी बांधून ठेवतो.
घरी येतो, तर तो गाढवाचा मालका येऊनच बसलेला असतो, त्याला टोळंभट्ट सांगतो, 'माळावर अमुक अमुक दिशेला त्याला कोणीतरी बांधून ठेवलेले आहे.'.  
गाढव सापडते, लोक टौळंभट्टाचं कौतुक करतात. म्हणता म्हणता त्याची ही किर्ती तिथल्या राजापर्यंत जाते. त्याला दरबारात बोलावण्यात येते. राजा त्याला विचारतो, 'तू म्हणे हुशार ज्योतिषी आहेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. खरा ज्यातिषी असलास तर, नाहीतर लोकांना उल्लू बनवतोस हे कबूल कर आणि शीरच्छेदाला तयार हो.'
राजाने एक छोटा पक्षी प्रधानाच्या हातात लपवून ठेवलेला असतो. मुठीत. राजा टोळंभट्टाला सांगतो, 'प्रधानाच्या हातात कोणता पक्षी आहे ते न बघता सांग. तर तू खरा ज्योतिषी.'
आता आली पंचाईत. टोळंभट्ट घाबरतो, खूप विचार करतो, राजा त्याला पुन्हा विचारतो. तेव्हा भट घाबरून म्हणतो, 'आता कुठं जाशील, टोळंभट्टा?'
आणि काय आश्चर्य की राजा खूप खूश होतो. दरबारी सगळे खूश होतात. कारण प्रधानाच्या हातात लपवलेला पक्षी म्हणजे योगायोगाने टोळ असतो. राजाला वाटते की टोळंभट्टाने पक्षी ओळखला. तो त्याला दरबारात नोकरी देतो, वस्त्रालंकार देऊन सन्मान करतो. आणि अशारीतीने टोळंभट्ट सासूरवाडीत मानाचे स्थान मिळवून त्याच शहरात स्थायिक होतो. 
असे टोळंभट्ट जागोजागी दिसतील. विशेषतः बाबा-बुवांच्या स्वरूपात गाद्या स्थापून बसलेले आणि लोक त्यांच्या चमत्कारावर भुललेले. 

Nov 29, 2020

कोण अल्पसंख्य.. कोण बहुसंख्य..

कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य-

माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळी आणि मुस्लिम मोहल्ला, गुजराती व्यापारी घरे अशी व्यवस्थित पारंपरीक रचना असलेलं हे गाव. 
पन्नास साठ वर्षात हळूहळू मोहल्ला वाढत गेला. इतका की बाकीच्या सगळ्या आळ्या नष्ट झाल्या. हिंदू गाव सोडून गावाबाहेर वसले. 
कसे?
मी अनेकदा लिहिलेय, मुस्लिम परिस्थितीने गरीब असतात हे केवळ मी इथं वाचत आलेय. प्रत्यक्षात मी पाहिलेले मुस्लिम सर्व हिंदूंपेक्षा चांगले श्रीमंत होते. आहेत. 
कोकणातील बहुतांश मुस्लिम हे सधन आहेत. बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये पूर्वापर नोकऱ्या करणारे आहेत. त्यातून भरपूर पैसा कमवून गावात पक्की टोलेजंग घरे बांधणारे आहेत. त्यांच्या तुलनेत पर्यायाने अशा गाव खेड्यातले हिंदू गरीब आहेत. 
माझ्या गावात वाढत्या मुस्लिम संख्येला घरं कमी पडू लागली नि त्यांनी गरीब हिंदूच्या घरांवर सरळसरळ डोळा ठेवला, तो पैशाच्या जोरावर. 
गरीब हिंदूना आपल्या घराला लाखालाखात रकमा मिळू लागल्यावर जेमतेम खाऊन पिऊन किंवा तेही वांधे असलेले बरेच लोक आपली घरं मुस्लिमांना सोपवून रोख रकमा घेते झाले आणि त्यांनी गावाबाहेरच्या माळावर, सरकारी जागेत आपल्या झोपड्या, कच्ची घरे उभी केली. गावातून आता जवळपास नव्वद टक्के हिंदू गाव सोडून माळावर, टेकडीवर अशा प्रकारची जेमतेम घरे बांधून राहतायत. (ते पाहून शहरात अशाच जागांवर वसणाऱ्या झोपडपट्ट्याच डोळ्यासमोर येतात.) तसं पाहता हे सरकारी जागेवर अतिक्रमणच होतं. परंतु ते मोठ्या प्रमाणावर होत असताना शेवटी सरकारनेही त्यांना मान्यता दिली. 
गाव कोकणातलं, आजुबाजूला जंगल, झाडं, नदी सगळं आहे. मात्र गावात एकही झाड दिसत नाही मोठं. कारण अगदी सिटीप्रमाणेच इंच न इंच जागा बळकावणे हा प्रकार चालू आहे. त्यात झाडांना जागा नाही. हिंदू होते तोपर्यंत त्यांच्या घराच्या मागेपुढे विस्तृत अंगणं आणि त्यात बऱ्यापैकी झाडं होती. विहीरी होत्या. गोठे होते, ते सगळं गेलं. 
कोकणात अशी मुस्लिमबहुल गावे भरपूर आहेत. रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातल्या किनारपट्टीपासून पंचवीस तीस किमी परिसरात अशी भरपूर सधन गावे आहेत. 
या मुस्लिमांच्या केवळ गावातच नव्हे, तर तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या गावी देखील भरपूर प्रॉपर्ट्या आहेत. तिथे त्यांनी जमिनी घेऊन घरे, ईमारती, चाळी बांधून ठेवल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी भाड्याने राहणारे हिंदू आहेत. हे मुस्लिम आपली गावे सोडून शहरात रहायला शक्यतो येत नाहीत. मात्र जमिनी घेऊन ठेवतात. 
हिंदूंची पुढची पिढी शहराकडे स्थलांतरीत होते. हे देखील गावांतून त्यांची संख्या कमी होण्याचे एक कारण आहे.
थोडक्यात अल्पसंख्य, बहुसंख्य या सापेक्ष कल्पना आहेत, त्या स्थलकालपरिस्थितीप्रमाणे बदलत असतात. 
असं म्हणतात, की कश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्य होते, पण श्रीमंत होते. तरी तिथे ते विस्थापित झाले. 
माझ्या गावात हिंदू अल्पसंख्य होते आणि गरीबही... तरी ते तिथून विस्थापित झाले...
 

Nov 25, 2020

गिल्ट-

 पाप-पुण्य, नीती-अनीती या संकल्पना माणसाने केवळ माणुसकीने वागावं, दुर्बळ मनुष्यालाही बऱ्यापैकी जगता यावं, सबलांकडून त्यांचे शोषण होऊ नये यासाठी तयार केलेल्या आहेत.

प्रत्यक्षात करावे तसे भरावे ही बाळबोध संकल्पना आहे. जंगलातला सिंह हरणाला मारून खातो, म्हणून त्याला कुणी मारून खात नाही, किंवा या पापामुळे तो हाल हाल होऊन मरतो असलं काही घडत नाही. कारण सिंहाला गिल्ट नसतो.

माणसाला त्याचा गिल्ट मारतो. कुरतडतो. आणि तो खंगून मरतो. दोन हजार माणसांना मारूनही, किंवा दरोडा घालूनही गिल्ट नसेल, तर त्या व्यक्तीला असल्या कोणत्याही संकल्पनांमुळे वाईट आयुष्य किंवा वाईट मरण येत नसतं. वाल्या कोळ्यालाही त्या वाटसरूने गिल्ट दिला. पापाचा. म्हणून त्याने चोरी सोडली. अन्यथा काही कारण नव्हते. (तो चोरच राहिला असता, तर बरं होतं. हे रामायण आपल्या माथी मारले गेले नसते.ते वेगळं.😄)
अनेक गुन्हेगार लोक पापभीरू माणसाहून चांगले आयुष्य जगत असतात. (आणि त्यांचं चांगलं आयुष्य पाहून इतर जळत असतात, चीडत असतात😂
हा गिल्ट आणण्याचं काम धार्मिक कल्पना करतात. पाप-पुण्य, नीती-अनीती, स्वर्ग-नरक इत्यादी. आणि शेकडा नव्वद टक्के तरी लोक त्याला बळी पडून माणुसकीने वागण्याचा प्रयत्न करतात.
लोक भिकाऱ्याला भीक देतात, संस्थांना दान देतात तेही या गिल्टमधूनच. आपण पैसा कमवलाय म्हणजे काहीतरी वाईट केलंय, आणि याला त्यातला काही वाटा दिला नाही, तर उद्या त्याची हाय लागून आपल्यावरही याच्यासारखी पाळी येईल हा गिल्ट माणसाला घाबरवतो. आणि तो शेअरींग करू लागतो. करुणा वगैरे भावना देखील संताबिंतांनी प्रवचनांतून सातत्याने जागृत केलेल्या भावना आहेत. त्या उपजतच सगळ्यांमध्ये असतात असं नाही.
ही भावना इतकी प्रबळ आहे, की माझ्या ओळखीत काही लोक असे आहेत, जे सर्रास काळा पैसा कमवतात आणि अमुक इतकं दान केलं की पाप राहात नाही असं मानतात.😆😆इतके पापभीरू लोक असल्यामुळेच माणसातल्या दुर्बल जमातीही टिकून राहतात.
मार्क्सवाद हा अतिरेकी धर्म आहे. तो सिंहालाही उंदीर करू पाहतो. कारण उंदरांना नीट जगता यावं. तो उंदराला सिंह बनवत नाही. कारण ते शक्य नसतं. सिंहाला गिल्ट देऊन उंदीर करता येईल. उंदराला सिंह कसं बनवणार?
हाच गिल्ट स्त्रियांना दिला जातो. प्रत्यक्षात देहविक्रय करणाऱ्या (वेश्याच नव्हे, तर मॉडेल्स, अभिनेत्री इत्यादी हाय प्रोफाईल स्त्रिया, ज्या आपल्या दैहीक माध्यमातूनच पैसा कमवतात.) अशा हाय प्रोफाईल स्त्रिया अधिक स्वतंत्र, अधिक चांगले आयुष्य जगत असतात. जगू शकतात. परंतु इतर (वड पुजणाऱ्या) स्त्रियांना त्याचा गिल्ट देण्यात येतो. पावित्र्य-चारित्र्य इत्यादी. आणि त्या हाच गिल्ट आयुष्यभर बाळगून दैहीक एकनिष्ठता, योनिशुचिता, पडदा इत्यादीलाच चारित्र्य मानून मन मारून जगत असतात. कारण यात पितृप्रधान समाजाचा स्वार्थ असतो.
एकपत्नी वा एकपती हा नियम देखील खोल विचार करता, समाजातील प्रत्येकाला किमान एकतरी जोडीदार मिळावा यासाठीच केलेला दिसेल. अन्यथा जे बलवान पुरुष असतील (सत्ता, संपत्ती, बळ इत्यादी सर्व असलेले) तेच अधिकाधिक बायका मिळवतील आणि समाजातील दुर्बळ पुरुष लग्नाविना (किंवा जोडीदाराविना) राहून जातील. व्हाईस वर्सा ज्या सुंदर, उपजाऊ, स्त्रिया असतील, त्यांनाच अधिक आणि चांगले पुरुष मिळतील आणि बाकीच्या राहून जातील. पण हा नियम देखील पूर्वी चारित्र्याच्या नावावर तर आता कायद्याच्या जोरावर गिल्ट देऊनच अधिक राबवला जातो.
हा गिल्ट दुधारी शस्त्र आहे. तो योग्य प्रमाणात असेल, तर त्यातून माणूस घडतो. अती झाला तर खंगतो, मन मारून अनैसर्गिक जगतो आणि अजिबात नसला, तर तो माणूसकीला, मानवी समाजाला घातक ठरतो. मानवी समाजात पुरुषापेक्षा स्त्रियांना अधिक गिल्ट देण्यात येतात. सर्व सामान्य पुरुषाला दिलेले गिल्ट तर यात येतातच. शिवाय स्त्री असल्याचे अनेक इतर गिल्टही हेतूपुरस्सर देऊन ठेवलेले असतात.

-अलका गांधी-असेरकर

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...