टोळंभट्ट साधा तरुण असतो. इतका, की लोक त्याला बावळट समजतात अनेकदा. पण तसा तो बावळट नसतो. फक्त त्याला व्यावहारिक शहाणपण नसतं इतकंच.
टोळंभट्टाचं लग्न होतं. बायको लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी जाते. आणि तिला आणायला टोळंभट्टाला जावे लागते. टोळंभट्टाच्या आईला काळजी वाटते. आपला मुलगा तिथे साधेपणाने वागेल नि त्याच्या सासुरवाडीचे लोक त्याला बावळट समजतील.
ती टोळंभट्टाला सल्ला देते. ती म्हणते, 'हे बघ, बाळा, तू सासुरवाडीला चाललायस तुझ्या. तिथं नीट शहाणपणाने वागायचं. आपला मान राखण्यासाठी तिथं उच्चासनावर बसायचं. खाली बसायचं नाही. बोलायचं कमी, नि ऐकायचं, बघायचं जास्त. जास्त बोलायचं नाही. फक्त निरीक्षण करायचं नि जेवढ्यास तेवढं बोलायचं.'
टोळंभट्ट तिची आज्ञा शीरसावंद्य मानून सासूरवाडीला जायला निघतो.
सासरी गेल्यावर बाहेर ओटीवरच भाताच्या गवताची गंज रचलेली असते. टोळंभट्ट त्यावर टुणकन उडी मारून बसतो. कारण आईने सांगितलेलं असतं, उच्चासनावर बसायचं. खाली बसायचं नाही. टोळंभट्टाची सासूरवाडीही गरीबच असते. खुर्च्या वगैरे नसतात बसायला. त्याला बसायला सासरच्या लोकांनी सतरंजी अंथरलेली असते घरात. पण टोळंभट्ट जाम पेंडीवरून उतरायला तयार नाही. कारण आईची आज्ञा. खाली बसलो तर आपण बावळट ठरू. शेवटी सासू सासरे आग्रह सोडून देतात. बसू दे त्याला तिथेच म्हणून.
आणि सासू आत सैपाकाला लागते. सैपाकघराची छोटीशी खिडकी बाहेरच्या ओटीवरच उघडत असते. तिथून सैपाकघरातले सगळे आवाज, हालचाली टोळंभट्टाला कळत असतात. त्याला आईचा दुसरा सल्ला आठवतो. निरीक्षण करायचं. बोलायचं नाही.
सासू आतमध्ये जावयासाठी घावन-घाटलं बनवायला घेते. घावन घालताना चुर्र आवाज येतो. असे ३२ आवाज येतात. टोळंभट्टाचं लक्ष असतं.
जेवण झाल्यावर भटाला आत जेवायला बोलावतात. तो जेवायला बसतो. निरीक्षण करत राहतो. कोणाला किती घावनं वाढली जातायत. तो मनातल्या मनात मोजतो. शेवटचं ३२ वं घावन त्याला वाढायला सासू येताच तो सासूला म्हणतो, 'अहो आई, हे तुमच्यासाठी राहू द्या. आता हे एकच उरलंय तर.'
सासू अवाक् होते. याला कसं कळलं ? तिला कौतुक वाटतं. तिला वाटतं आपला जावई चांगला ज्योतिषी आहे. ती गावभर, शेजारी पाजारी ही गोष्ट सांगत फिरते.
झालं, वदंता सगळीकडे पसरते. एक माणूस टोळंभट्टाकडे येतो, 'अहो, जावईबापू माझं गाढव सकाळपासून हरवलंय. कुठे असेल बरं जरा ज्योतिष बघून सांगता का?'
टोळंभट्ट विचारात पडतो. नाही म्हणावं तर आपल्याला बावळट म्हणतील, हो म्हणावं तर आपल्याला कुठं माहीत आहे गाढव कुठे आहे ते..
पण तो फार न बोलता संध्याकाळी सांगेन म्हणून वेळ निभावून नेतो. तो माणूस बरं म्हणून घरी जातो.
इकडे जेवून, एक झोप काढून टोळंभट्ट गावात चक्कर मारायला निघतो. गाढवाचं काय सांगावं या विचारात फिरता फिरता गावाबाहेर खूप लांब निघून येतो, माळावर. तिथे एक गाढव चरत असलेले त्याला दिसते. तो त्या गाढवाला तिथे एका झाडाशी बांधून ठेवतो.
घरी येतो, तर तो गाढवाचा मालका येऊनच बसलेला असतो, त्याला टोळंभट्ट सांगतो, 'माळावर अमुक अमुक दिशेला त्याला कोणीतरी बांधून ठेवलेले आहे.'.
गाढव सापडते, लोक टौळंभट्टाचं कौतुक करतात. म्हणता म्हणता त्याची ही किर्ती तिथल्या राजापर्यंत जाते. त्याला दरबारात बोलावण्यात येते. राजा त्याला विचारतो, 'तू म्हणे हुशार ज्योतिषी आहेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. खरा ज्यातिषी असलास तर, नाहीतर लोकांना उल्लू बनवतोस हे कबूल कर आणि शीरच्छेदाला तयार हो.'
राजाने एक छोटा पक्षी प्रधानाच्या हातात लपवून ठेवलेला असतो. मुठीत. राजा टोळंभट्टाला सांगतो, 'प्रधानाच्या हातात कोणता पक्षी आहे ते न बघता सांग. तर तू खरा ज्योतिषी.'
आता आली पंचाईत. टोळंभट्ट घाबरतो, खूप विचार करतो, राजा त्याला पुन्हा विचारतो. तेव्हा भट घाबरून म्हणतो, 'आता कुठं जाशील, टोळंभट्टा?'
आणि काय आश्चर्य की राजा खूप खूश होतो. दरबारी सगळे खूश होतात. कारण प्रधानाच्या हातात लपवलेला पक्षी म्हणजे योगायोगाने टोळ असतो. राजाला वाटते की टोळंभट्टाने पक्षी ओळखला. तो त्याला दरबारात नोकरी देतो, वस्त्रालंकार देऊन सन्मान करतो. आणि अशारीतीने टोळंभट्ट सासूरवाडीत मानाचे स्थान मिळवून त्याच शहरात स्थायिक होतो.
असे टोळंभट्ट जागोजागी दिसतील. विशेषतः बाबा-बुवांच्या स्वरूपात गाद्या स्थापून बसलेले आणि लोक त्यांच्या चमत्कारावर भुललेले.