Showing posts with label भवताल. Show all posts
Showing posts with label भवताल. Show all posts

Jul 8, 2025

साईवाल्या रसिकशेटची मुलगी -

 


ज्या गावात माझा जन्म झाला, आणि जिथे मी पहिली पंधरा-अठरा वर्षे वाढले, त्या माझ्या गावाचे नाव 'साई' आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील हे अगदी छोटेसे गांव. या गावाचे नाव 'साई' का आणि कसे पडले असेल असा प्रश्नही कोणाला पडला नाही, आणि उत्तरही कुणाला माहीत नाही. साईबाबामधील साईचा आणि याचा दुरान्वयानेही संबंध आढळत नाही. ना तिथे त्यांचे कोणते मंदीर आहे, ना त्यांची कोणती दंतकथा त्या परिसरात ऐकायला मिळते.

गुजरातमधील तशाच एका खेड्यातून पंचवीस एक कुटुंबे महाराष्ट्रात व्यवसाय शोधत साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी स्थलांतरित झाली, त्यातली एक दोन नाही, तर चांगली आठदहा कुटुंबे त्या इवल्याशा साई गावात येऊन राहिली. आणि एक दोन नव्हे, तर चांगली पाच-सहा पिढ्या नांदली.

नांदली हाच शब्द बरोबर आहे. ही कुटुंबे नुसती तिथे राहिली नाही, तर तिथल्या मातीशी एकरुप झाली. तिथल्या भाषेशी, आहारविहाराशी तादात्म्य पावली. त्या मातीवर प्रेम करू लागली. त्यांनी तिथे ऐसपैस कोकणी पद्धतीची, मागे पुढे अंगण, झाडे, विहिरी असलेली घरे बांधली.
काय म्हणून तिथे इतक्या आडनीड ठिकाणी, अगदी खेड्यावर ती आली देव जाणे. सगळ्यांचा एकजात किराणा मालाचा व्यवसाय. तो तिथे भरभरून चालावा अशी काही परिस्थिती नव्हती. पोटापुरतं मिळेल एवढंच होतं. तरी हे लोक तिथे वर्षानुवर्ष राहिले. गुजराती माध्यमाच्या शाळा असण्याचा प्रश्नच नव्हता तिथं. पण इंग्रजीचाही जमाना नव्हता. त्यामुळे सगळ्या पिढ्या मराठी शाळेत शिकल्या. त्यात पुन्हा गावात मुस्लिम बहुसंख्य. हिंदू कमी. कांदा लसूणही वर्ज्य असणारी ही कुटुंबे पूर्ण मांसाहारी, मासेखाऊ गावात पिढ्यानपिढ्या राहिली.


मात्र गुजरातशी धागा जोडून राहिली. मुलामुलींची लग्ने करण्यासाठी गुजरातच गाठायचं.


या कोकणात आणि विशेषतः रायगड जिल्ह्यात या कुटुंबांच्या आधीही मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेली गुजराती कुटुंबे होती. ती दोन टप्प्यांत तिथे आली. आम्ही तिसऱ्या टप्प्यात. आमची अजून गुजरातशी नाळ तुटलेली नव्हती. मात्र या पहिल्या दोन टप्प्यांत आलेली कुटुंबे गुजरातपासून पूर्णपणे तुटलेली होती. त्यांचे तिथे जाणे-येणे तर नव्हतेच. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना गुजरातमधील आपली गावे पण माहीत नव्हती. आपण नेमके कुठून आलो हे माहीत नव्हते.

त्यातील पहिल्या टप्प्यात आलेला गट हा इथं पूर्णपणे मराठी झाला होता. त्यांना गुजराती जराही बोलता येत नव्हते. फक्त मराठी बोलत. मात्र मागच्या पिढीपर्यंत स्त्रिया गुजराती पद्धतीने साडी नेसत. लग्न कार्याचे बरेच रित रिवाज गुजराती पद्धतीचे. आम्ही शिवाजी महाराजांच्या काळात आलो असे ते म्हणतात. तर दुसऱ्या टप्प्यात आलेला गट अजून तोडकं मोडकं गुजराती बोलत होता. मात्र सगळ्याच टप्प्यांतले सारेच लोक बहुतांश किराणा मालाच्या आणि इतर काही जोडधंद्यात होते. आणि सगळेच एकाच जातीतले, वाणिया समाजातले होते. विशेष म्हणजे हे दोन्ही टप्पे इतक्या मोठ्या संख्येत इथे आले की त्यांना आपल्या मुलाबाळांची लग्ने जमवण्यासाठीही गुजरातकडे जावे लागले नाही. इथल्या इथे लग्ने जुळतील इतकी त्यांची संख्या पुरेशी होती. मात्र आमचा तिसरा टप्पा मर्यादित संख्येत होता आणि तो दोन-तीन कुटुंबातून शाखा फुटत गेलेला असा असल्याने लग्नांसाठी मुंबई-गुजरातवर अवलंबून होता.  

तरी या तिन टप्प्यांत आपसात लग्ने फारशी होत नव्हती. जात एक असली, तरी या तिघांच्या पोटशाखा वेगळ्या होत्या म्हणून केवळ!

तर या छोट्याशा साई गावाची नोंद अगदी गुजरातमधील आमच्या समाजात ठळकपणे घेतली गेली आणि जाते. कुठले ऋणानुबंध कुठे जोडले जातात. आमची ही आठ दहा कुटुंबे आणि त्यांची मुलेबाळे ही समाजात साईवाली कुटुंबे म्हणून गावावरून ओळखली जातात. अगदी सुरुवातीला आम्हाला दख्खणी म्हटले जायचे. आमचा उपहासही केला जायचा. याला प्रमुख कारण एक तर इथे राहून आम्ही काही म्हणावा तसा पैसा कमावला नाही, त्यामुळे पैशामुळे येणारी पतही आमच्याजवळ नव्हती, जी प्रामुख्याने गुजराती वाणी समाजात महत्त्वाची असते. शिवाय आम्ही अर्धे मराठळलेले होतो. भाषेत, खाण्यापिण्यात, वर्तनात सगळीकडे मराठीपण ठळकपणे डोकावत होतं. त्यामुळे दख्खणी मुलींवर गुजराती संस्कार नसतात. म्हणून पसंतीसाठी त्या अग्रक्रमावर नसायच्या. तरीही मुलींची लग्ने सहज व्हायची. मात्र मुलांना कुणी इतक्या लांब दख्खनमध्ये मुली द्यायला तयार नसायचे.
हळू हळू पुढच्या पिढीतली मुले शिक्षण घेऊन बाहेर पडली. मुंबईकडे सरकली. साई या गावातला गुजराती टक्का शून्य झाला. हिंदू टक्काही जवळपास संपत आला. कारण गाव हे हळू हळू मुस्लिमबहुल झाले.
शिक्षणाचेही वांधे होते. कोकणात तेव्हा महाविद्यालये संपूर्ण जिल्ह्यात मिळून दोन पाच असायची फारतर. साईला शाळा फक्त सातवीपर्यंत. पुढे पंचाईत. कुणी आपल्या मुलांना गुजरातच्या नातेवाईकांकडे पुढील शिक्षणासाठी पाठवत. कुणी तालुक्याला असणाऱ्या इतर गुजराती समाजात. गुजरातला गेलेल्या मुलांचे साहजिकच अर्धे शिक्षण मराठी तर अर्धे गुजराती माध्यमांत झाले. थोडक्यात फरपटच. मी तालुक्याला राहणाऱ्या माझ्या मामाकडे राहून आठवी ते दहावी शिकले. माझा भाऊ एका गुजराती कुटुंबात पेईंग गेस्ट राहून चार वर्षे शिकला. एक चुलत भाऊ एका मराठी ब्राम्हण कुटुंबात चार वर्षे राहून शिकला. बऱ्याच मुली तेव्हा तशा तालुक्यात असलेल्या आपल्या काकामामांकडे राहून शिकत होत्या. आपल्या भाचरापुतण्यांना सांभाळणे हे त्या काळी कर्तव्यच समजले जात असे. आज एक पाहुणा कुणाच्या घरात चार दिवस सहन होत नाही लोकांना. तेव्हा अशी सख्खी-चुलत भाचरे पुतणे इतकेच नव्हे, तर ओळखीतले लोकही हक्काने येऊन राहत. महीने-वर्षे... कितीही..
 काळ बदलला होता. शिक्षण महत्त्वाचे होते. खेडं सोडणे गरजेचे होते.
काहींनी साईहून जवळच्या तालुक्याच्या गावी स्थलांतर केले. तिथे आता दहावीच्या पुढे शाळा कॉलेज होऊ लागले होते. तालुक्याच्या गावी देखील आम्ही साईवाले गुजराती म्हणूनच ओळखले गेलो. तिथे स्थलांतरित झालेले बहुतेक गुजराती आजुबाजूच्या खेड्यावरूनच आलेले होते आमच्याप्रमाणेच. माझे मामा पळसगाववाले, दुसरे एक लोणशीवाले, आम्ही साईवाले गुजराती म्हणून लोक ओळखू लागले. अजून तसेच ओळखतात. मला तिथे गेल्यावर साईवाल्या रसिकशेटची मुलगी म्हणून ओळख दिली की लोक लगेच ओळखतात.
हे गाव माझ्या नाळेत रुजलेले आहे. खरेतर पुढची तारूण्यातली वर्षे जिथे घालवली ते तालुक्याचे गाव मला अजूनही परकेच वाटते. मात्र साई अजून माझ्या रक्तातून वाहत असते. मी तर नंतर पूर्ण मराठी झाले. पण जी सख्खी-चुलत भावंडे साईहून सरकून मुंबई अहमदाबादकडे जाऊन पुढे पूर्ण गुजराती झाली, त्यांनाही साई अजून हाकारत असते. एवढेच नाही, तर जी आतेमामे भावंडे लहानपणी गुजरातहून सुट्ट्यांमध्ये आजोळी म्हणून यायची त्यांनाही साईची ओढ आहे. आठवणी आहेत. भेटी झाल्या नि साईच्या आठवणी निघाल्या नाहीत, असे कध्धीच होत नाही. एकदा जाऊ या म्हणून ठरते. जाणे मात्र फक्त माझे होते आताशा. मध्ये वीस वर्षांचा मोठा काळ मीही गेले नव्हते.
गाव फार सुंदर होते अशातला भाग नाही. पण भवताल खास कोकणी होता. चारी बाजूला टेकड्या, छोटे डोंगर, लहानशी नदी, विहिरी यांनी वेढलेले. कुठेही जायचे असले तरी एखादी टेकडी पार केल्याशिवाय जाता येत नव्हते. पहिल्या तीन पिढ्यांपर्यंत तर वाहनेच नव्हती. बैलगाडी किंवा पायी. सामान आणायला बैलगाडी. पुरुष तर पायीच चालून जायचे सहज पाच पंधरा मैल. अगदी लहान मुलेही चालत जात. माझा भाऊ तालुक्याहून दर शनीवारी चालत यायचा आणि सोमवारी परत चालून जायचा. कारण पावसाळ्यात चार सहा महिने एसटी बंद. माझ्या वेळी एसटीबसेस पावसाळ्यातही सुरू झाल्या. त्यामुळे मला कधी चालावे लागले नाही.
आता तिथे पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील गुजराती लोक देखील किराणा व्यवसायात फार उरले नाहीत. पुढची पिढी वेगळ्या नोकरी व्यवसायांत शिरली. त्यांच्या जागी आता मारवाडी लोक मोठ्या संख्येने आलेत. मात्र ते आमच्याप्रमाणे इथे रुजतील असे वाटत नाही. कारण आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा झाल्या. हिंदी बोलले तरी निभावून जाते आता. मराठीच बोलण्याची गरज राहिली नाही. इथेच राहून इथल्याच लोकांना तुच्छ लेखत अलिप्त राहण्याची कला आता पुढील गुजराती मारवाडी स्थलांतरितांनी शिकून घेतलेय.
मराठी टक्का मात्र कुठल्या व्यवसायात वाढला नाही तिथेही. कोकण्यांनाही मुंबई प्रिय आहे. गावात पन्नास कलमे असतील हापूसची आणि ऐसपैस जमीन. पण ती नेपाळी, बिहारी मुलांच्या हाती देऊन यांना मुंबई हवी. हळू हळू कोकण परकीयांच्या हाती जातंय नक्की.!

 

Jun 18, 2024

 नॉस्टेल्जिया...


सहज मनात आलं की आजोळचे गाव बघून यावे. कोकणातले. रायगडाच्या अगदी पायथ्याशी असलेले हे पळसगाव. अगदी छोटे खेडे. ज्याचा उच्चार तिथले लोक फलसगाव आणि आम्ही गुजरातीत फलसगाम करत असू. आता तिथे कुणीच नाही. पडके घर आहे फक्त. 

गाडी काढली आणि मी, माझा मोठा भाऊ आणि चुलत बहीण असे तिघे गेलो. रस्त्यापासूनच बदल जाणवू लागला. एक काळ होता, जेव्हा इकडे गाडीतूनच येत होतो. पण बैलगाडीतून. तेही प्रचंड धक्के खात, हिंदकळत, कंबरेचे टाके ढिले होत पोचत घरी. वाटेत मोठा दगड, चढ आला की पुरुष माणसे बैलगाडीतून उतरून पायी चालू लागत तितकी वाट. शिवाय लाल माती प्रचंड उडून कपडे आणि शरीर या दोन्हींचा अवतार होऊन जात असे. 
आता मात्र पक्की गुळगुळीत सडक झालीय. मोटारगाड्या सुळकन जात येत असतात. गावात पोचल्यावर तर हेच का ते गाव असे आश्चर्यचकीत झालो. ओळखूच येईना. एके काळचे पाच पन्नास घरांचे ते वाडीवजा गाव आता चांगले वाढलेय. पक्की, टुमदार घरे बांधलीयत लोकांनी. 

आम्ही अनेक पिढ्या कोकणात राहिलो. त्यामुळे आजोळ, काका, मावश्या यांची गावे पण इथंच. भवताली. छोट्या छोट्या कोकणी खेड्यांवर. कोकणी पद्धतीचे मोठाली घरे, परसदार, झाडे, विहीर असा सगळा बारदाना होता. तर आईचे माहेर हे पळसगाव. आई माहेरची सधन होती. सासरी फार आर्थिक हाल काढले तिने. तिचे बाबा दिलदार होते. माहेरच्या सधनतेच्या आठवणी आणि किस्से ती नेहमी सांगत असे. आमच्या गावाहून देखील हे पळसगाव छोटे. एखाद्या वाडीसारखे. इथे मुस्लिम नव्हते. एकही घर नव्हते त्यांचे. त्यामुळे आमच्या गावापेक्षा इथले वातावरण वेगळे होते. आमच्या गावात चहलपहल होती. माणसांचे आवाज होते. इथे आजुबाजूला गर्द जंगल, झाडी. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत तिथे विजेचा पत्ता नव्हता. रात्र झाली की मामा पेट्रोमॅक्सची बत्ती लावत. त्याचा उजेड भरपूर पडत असे. पण बाहेर मात्र किर्रर्र...

या मामाच्या घरी जायची इच्छा व्हायची. पण हौसेने गेल्यावर मात्र कुठून आलो.. इतका कंटाळा यायचा. इतके लहान खेडे. त्यात संध्याकाळ झाली की अजून उदास, कंटाळवाणे व्हायचे. वीज नसल्याने. मामाची मुलं सरावलेली होती. त्यांना तिथे करमत असे. जरी ती मुले देखील तालुक्यालाच शिक्षणासाठी राहत असली, तरी सुट्टीत त्यांना तिथे करमे. 

अंगणात बसले,की समोर रायगड किल्ला दिसत असे. त्यावरचा दिवा देखील.  आजुबाजूला अगदी गरीब, मातीची पण बऱ्यापैकी पक्की असलेली सुटी सुटी घरे , प्रत्येकाच्या अंगणार भरपूर झाडे. त्यात प्रामुख्याने आंबा आणि फणस. जरा दूर गेले की करवंदांच्या जाळी, काजूची, जांभळाची झाडे.  एक छोटी नदी. तिथे हुंदडायला दिवसा जरा बरे वाटे. पण रात्र झाली की ती एक रात्र युगाची वाटे. बाहेर बाथरूमला जायची पण प्रचंड भीती वाटे. मिट्ट काळोख भवताली. मामे बहीण मात्र अंधार पडल्यावर देखील हातात छोटा रॉकेलचा दिवा घेऊन आजुबाजूच्या घरातल्या मैत्रीणींना भेटायला, गप्पा मारायला जायची. तिथल्या कुणबी, मराठा घरात तिचे मायेचे बंध होते. तिथल्या आया बाया तिच्यावर खूप माया करत. इतकी की तेव्हा मला हेवा वाटे. मला मग तिथे अजूनच परके परके वाटू लागे.  

एकदा असाच मामा सुट्टीत मला आणि भावाला घेऊन गेला. दोन दिवस बरे वाटले, पण नंतर जाम करमेना. परत जायचं होतं घरी. पण मामा जाऊ देईना. आणि जोपर्यंत तो गाडी जोतून देत नाही कुणाची तोपर्यंत आम्ही एकटे जाऊ शकत नाही असे किशोरावस्थेतले. आम्ही रोज मामाच्या विनंत्या करत होतो. पण तो आणखीच चिडवायचा. आता इथेच राहायचे. आता नाही परत जायचे. ते ऐकून मला त्याचे खरेच वाटायचे आणि रडू यायचे. भाऊ जरा मोठा कळता होता. तो माझे मन रमवण्याचा प्रयत्न करे. काहीतरी खेळ, कोडी इत्यादी खेळून. काळ असा की ना रेडीओ, ना टीव्ही, ना तिथे पुस्तके... फोनचा तर प्रश्नच नव्हता. त्यात मामी वारलेली. मामा एकटा राहात होता. 

नंतर काहीच वर्षात एसटी पण चालू झाली. प्रचंड लाल धुरळा उडवत एसटी गावात शिरायची. वीजही आली. मग मात्र कधीतरी जात असू. कारण आता जाणंयेणं मामावर अवलंबून नव्हतं. मनात आलं तर गेलं, मनात येईल तितकं राहीलं. की एसटीने परत. तरीही फार काही कधी आजोळी जाणं झालं नाही. आठवणीत पाचसहा वेळा गेलो असू. बास. पण आज स्मरणात मात्र ते जसंच्या तसं येतंय.

आता मामा नाही, त्याची मुलंही तिथे नाहीत. घर बेवारस, पार पडलेले एक दोन खोल्या पडक्या झडक्या शिल्लक आहेत फक्त. अनेक, जवळपास चाळीसेक वर्षांपूर्वी मामाने लावलेले चिकूचे झाड मात्र बहरलेले होते अजून. आम्ही गेल्यावर आजुबाजूचे गोळा झाले. त्यांनी अर्थात ओळखले नाही. त्यांना ओळख दिली. मग काही म्हाताऱ्या कोताऱ्यांना ओळख लागली. येत जा म्हणाले. 

काळ सरकतो, बदलतो, जे दिवस आणि जो परीसर तेव्हा कंटाळवाणा वाटत होता, तशाच परीसरात आज रिसॉर्ट शोधत काही हजार रुपये देऊन दोन दिवस घालवायला जातो... शहरी धकाधकीपासून दूर. 

ते खऱ्या अर्थाने मामाचे गाव होते. 



May 3, 2023

बाबा बुवा नेते गुरू इत्यादी...

 लोक बाबा, बुवा, अम्मा, दिदी, महाराज, गुरू, नेते यांच्या इतके भजनी कसे काय लागतात? यात बहुसंख्य जनता सामील असते हे विशेष.
इतक्या बहुसंख्येत लोक तर्कहीन वागत असतात? स्वतःच्या  अकलेचा वापर जराही करू शकत नाहीत... इतका बाबा वाक्यं प्रमाणमच्या आहारी जातात..

जीवनाची साधी साधी तत्वे समजायला कोणत्याही बाबा, बुवा, अम्मा दिदीची गरज का भासावी? अगदी निरक्षर माणसे देखील अनेकदा इतका तर्काने विचार करतात की आपण थक्क होतो, याऊलट अगदी डॉक्टर इंजिनिअर झालेले लोक या बाबा बुवांच्या नादी लागताना दिसतात तेव्हाही थक्कच होतो. 

याचा फायदा हे तमाम बाबा न उचलते तरच नवल.. प्रसिद्धी कुणाला नकोय? पुरस्कार कुणाला नकोत? 

दोन महिन्यापूर्वी नाशकात होते. फ्लॅटचा दरवाजा उघडाच असतो. तीन बाया शिरल्या घरात. टिपिकल पेहेराव. साडी. कनिष्ठ मध्यमवर्गीय चेहरे. 

काय हवं विचारलं. काही नको. आम्ही आज एकादशी म्हणून सहज भेटीला आलोय. स्वाध्याय परिवारातर्फे. तसे आम्हाला आदेश असतात. लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या...
पण कशाला?

कशाला नाही. असंच. सहज. 

बरं चहा पाणी काही?

नाही कुणाकडे काही घ्यायचं नाही अशी पद्धत आहे आमची. थोडं पाणी चालेल फार तर..

ठिक. पण मी जवळपास नास्तिक आहे. बाबा बुवा वगैरेंवर माझा विश्वास नाही. तूच आहेस तुझा सांगातीवरही माझा विश्वास नाही, कारण मीच आहे माझी सांगाती.

चालेल. ते तुमचे विचार आहेत. मग काही श्लोकांची छापील कागदे दिली. ते कॉमन श्लोक होते. जे साधारण ब्राम्हणी घरांमध्ये सकाळ संध्याकाळ बोलले जातात. 

जवळपास माझा अर्धा पाऊण तास खाऊन गेल्या.

मी विसरले देखील.

दोन महिन्यांनी मी परवा नाशकात परत आले.

तर काल ही तिगोळी परत हजर. शिरल्या घरात. 

तोच प्रकार. 

मी पुन्हा सांगितलं. मी नास्तिक आहे. बाबा महाराज वगैरे मला मानवत नाहीत. 

चालेल. 

मी माझे महत्त्वाचे काम संगणकावर करत होते. त्यांनी विचारलं देखील काम चालू आहे का. मी हो म्हटलं. तरी बसूनच.

मग मला राहवलं नाही. मी विचारलं. तिघीही साडीतच का? हा पेहेराव तुम्हाला कम्फरटेबल वाटतो का? यात पळता, धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत. पोहता येत नाही. सायकल चालवता येत नाही. 

आम्हाला साडीच कम्पलसरीली आहे. विशेषतः बैठकीची कामे करताना. 

का.. असं का... 

ते आपले ट्रॅडीशनल पेहेराव हवा, आपली संस्कृती...

अच्छा.. पण ही साडी आपली परंपरा नाहीए. हे तुम्हाला ठाऊक नाही का? नऊ वारी साडी ही आपली परंपरा आहे. ती कम्फर्टेबल देखील आहे. तुम्ही नऊ वारी नेसून घोड्यावर सायकलीवर बसू शकता. धावू शकता. पोहू शकता.

हो पण सध्या हीच साडी चलतीत आहे ना मग हीच नेसायची.

अहो, सध्या सुटसुटीत ड्रेस चलतीत आहेत. त्याच्याशी तुमच्या संस्थेला का वाकडं आहे. 

आम्हीही करतो एरव्ही फॅशन. पण संस्थेत जाण्यासाठी एक तासापुरती नेसायला काय हरकत आहे. आम्हाला आवडते. आमची काही हरकत नाही.

पण का? याचे बंधन का? असा प्रश्न तुम्हाला पडत नाही? एक तास तरी अनकम्फर्टेबल कपड्यांत का वावरायचंय तुम्हाला? आणि मी फॅशन म्हणून सांगतच नाही. सुटसुटीतपणा, सर्व तऱ्हेच्या हालचाली नीट करता येणं ह्यासाठी सांगतेय...


वाद वाढत गेला. भडकल्या. मला म्हणे सगळीकडे क्रांती, विद्रोह करायचा नसतो... 


आता यांनी मला शिकवावं क्रांती वगैरे... ज्या स्वतःच गुलाम आहेत दुसऱ्यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या... अक्कल गहाण ठेवून. 

मग विचारलं पुरुषांना काय नेसायला सांगतात. 

त्यांना पॅन्ट शर्ट चालते. 

मग ती पारंपरिक आहे का? त्यांना धोतर का नाही? धोतर ही आपली संस्कृती नाही?

मला ठाऊक होतं. यांच्या मठ्ठ डोक्यात काहीही फरक पडणार नाही.

पण मला न विचारता माझ्या घरात शिरून माझ्या वेळेवर अतिक्रमण करत असतील, तर मीही त्यांची उलटतपासणी घेणं माझा अधिकार आहेच..........
नंतर उठल्या. गेल्या.

परत येणार नाहीत नक्कीच. मलाही तेच हवं होतं. नाहीतर दर एकादशीला मंडळ माझ्या दारी... असं झालं असतं.

आश्चर्य हे वाटले की दोन्ही वेळेस माझ्याच घरात शिरल्या. शेजारणीचं घर उघडं असूनही तिथे नाही शिरल्या. शेजारीण चांगली पारंपरिक आहे. पण कदाचित माझे कपडे पाहून मलाच सुधारावं या हेतून माझ्याच घरात शिरत असाव्यात. 

बाबा बुवा अम्मा देखील परंपरेच्या विरोधात विद्रोह, बंड करायला शिकवू शकत नाहीत. तेवढी त्यांची क्षमता नसते. साडी नेसा म्हटलं की समाज खुश असतो. रांगोळ्या काढा म्हटलं की बाया हिरीरीने तयार होतात. हे अम्मा बाबांनाही ठाऊक असतं. 

तू भी खुश, मै भी खुश......

और संस्कृती काकू तर खुशच खुश.

Nov 7, 2021

भवताल -

 धार्मिक मंदपणा आणि पिडीत जनता -

विजेच्या काळात वाऱ्यावर लगेच विझणाऱ्या तेलाच्या पणत्या लावून तेल वाया घालवणे आणि दगडी मूर्तीवर दूधाचे अभिषेक करून दूध वाया घालवणे हे धार्मिक मतीमंदत्वाचे लक्षण आहे.
असे सावरकर म्हणून गेले. पण सावरकरांच्या भक्तांनाच ते पटत नसावे. 
नेते सोयीने वापरायचे असतात.

मग सणासुदीला तरी तेलाचे दिवे लावावे म्हणणाऱ्यांनी सणासुदीला तरी गॅस आणि लायटर्सचा वापर न करता दगडावर दगड घासून चकमकीने तीन दगडांची चूल पेटवून कंदमुळे शिजवून खावावीत. पाळायच्या तर सर्वच परंपरा आणि मूळापासून पाळाव्या. अशा अर्धवट कशाला?

असो.
यावरून एक गोष्ट आठवली लहानपणी ऐकलेली.


एका गावात एक सासुरवाशिण राहत होती. तीची सासू तिचा फार छळ करी. पोटभर खाऊपिऊ देत नसे. काम खूप करून घेई.
एके दिवशी सण असतो म्हणून घरात घारगे तळले जातात. मात्र सासू हिला खायला देत नाही. ही त्या घारग्यांच्या पीठातलं थोडं पीठ चोरून आपल्या पदरात लपवून ठेवते. कपडे धुवायला नदी किनारी जाताना नेहमीसारखी गावच्या वेशीवरील मारूतीच्या मंदिरात विश्रांतीला घटकाभर टेकते. 

त्या काळी मंदिरं निवांत असायची. लोक दिवसभर रांगा लावून देवाला निष्कारण त्रास देत नसत. एकदा सकाळी दिवा लावून गुरव गेला की देव निवांत निजायला मोकळा असायचा.
ही देवळात जाते. मारूतीसमोर एक मोठा दगडी दिवा पेटत असतो. तेल चांगले तापलेले असते. ही चोरून आणलेल्या पीठाचे चार वडे त्या दगडी पात्रातील तापलेल्या दिव्यात तळून खाते. 

हे पाहून मारूती राया अचंबित होतो. इतका की त्याचे बोट तोंडात जाते आणि तो चकीत होऊन तिच्याकडे वाकून पाहतो. 
हीचे मारूतीकडे लक्ष नसते. खाऊन झाल्यावर ही निघते. 
दुसऱ्या दिवशी गुरव देवळात येतो. तर त्या भव्य दगडी मारुतीचे बोट तोंडात आणि चेहरा चकीत होऊन खाली बघतोय. तो घाबरला. गावात येऊन त्याने हा चमत्कार सगळ्यांना सांगितला. लोक जमा झाले. हे असं कसं झालं. गावाचं पाप पाहून मारूतीने तोंडात बोट घातलं हे नक्की. कुणीतरी पाप्याने देवळात पाप केलं असणार. आता गावावर संकटं येणार.
 लोक मारूतीची माफी मागतात. पण त्याचं बोट तसंच. नि चेहरा चकीतच!
शेवटी गाववाले बैठक घेतात. ठरवतात की उद्या सकाळी बऱ्या बोलाने ज्याने पाप केलं असेल त्याने मारूतीसमोर जाऊन माफी मागावी. नाहीतर प्रत्येकाने एकेकटं जाऊन माफी मागावी. 
ही सासुरवाशिण घाबरते. पाप तर आपणच केलंय. आता लोकांना आणि मुख्य म्हणजे सासूला कळणार. ती अर्ध्या रात्री उठून लपत छपत देवळात जाते. मारुतीचा सोटा पडलेला असतो त्याच्या पायाशी. तो उचलते आणि मारूतीवर उगारून म्हणते, "मेल्या, मला माझी सासू खायला देत नाही, म्हणून मी दोन वडे तुझ्या तेलात तळून खाल्ले, तर त्यात तुला इतकं आश्चर्य वाटायला काय झालं? बऱ्या बोलाने बोट खाली घेतोस की हाणू हा सोटा तुझ्या डोक्यात?"
तिचे ते बोल ऐकून मारूती दचकतो, घाबरतो आणि पटकन आपले बोट तोंडातून काढून साळसूदासारखा वर पाहू लागतो. 
दुसऱ्या दिवशी लोक पुन्हा देवळात गोळा होतात. तर मारूती आपला निरागस. नेहमीसारखा. लोक हुश्श करतात. चला गावावरची अलाबला टळली.

थोडक्यात काय, अत्याचाराने पिडीत स्त्री मारूतीला सिधा करू शकते, तर महिलांनो आपण काय करू शकत नाही? सोचो... सोचो....

असो
विषय तेल वाया घालवायचा होता. पण कधी कधी मंद लोकांमुळे पिडीत लोकांचा फायदाही होतो. त्यामुळे मंद लोक स्वतःवरच खुश असतात. 

Nov 5, 2021

भवताल -

 गुजरातमध्ये वाणी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांच्यात जैन वाणी आणि वैष्णव वाणी असे दोन प्रकार आहेत. दोन्ही समाज व्यापार उद्योगात मोठ्या प्रमाणात आहे. या व्यापार उद्योगाच्या निमित्ताने ते भारतभरच नव्हे, तर जगभरही पसरलेले आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भटाबामणांचा उल्लेख केला जातो तसाच गुजरातमध्ये वाणियाबामण असा केला जातो. कारण गुजरातमधील वाणी समाज हिंदू धर्माप्रमाणे वैश्य या तिसऱ्या वर्णात मोडत असला, तरी पैशाने ब्राम्हणांपेक्षाही समृद्ध असल्या कारणाने इथं बामणाच्याही आधी वाणीया लोकांचे नाव येते. पैसा बोलता है म्हणतात ते असं. (हे सर्व जातीवर्णांनी लक्षात घेणं योग्य ठरेल. सध्याचे युग हे पैशांचे. पैशाची जात सर्वात श्रेष्ठ. पैसा कमवा. मग तुम्हाला तुमची जात, धर्म विचारून कुणी तुच्छ लेखणार नाही.)
या वाणी, किंवा तिथे म्हटले जाते त्याप्रमाणे वाणिया समाजात बरेच गट आहेत. साधारण तालुका, जिल्हा, प्रांत याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण होते आणि बरेच गट पडतात. पूर्वी सगळे व्यवहार गटागटातच होत. विशेषतः बेटी व्यवहार. मात्र आता दुसऱ्या गटातही सर्रास होऊ लागलेत. त्यात जैन आणि वैष्णव या दोघांमध्ये पूर्वीपासून बेटीव्यवहार होतात. जरी दोन्ही धर्म वेगळे असले तरी. ज्याप्रमाणे पंजाबमध्ये सिख आणि हिंदूमध्ये बेटीव्यवहार होतो तसेच. जैन वाणिया हे प्रमाणात वैष्णव वाणियांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. हिऱ्यांच्या व्यापारात जैन वाणिया मोठ्या प्रमाणात आहेत.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वारकरी समाज आहे, तो शाकाहारी आहे आणि तुळसीमाळ गळ्यात घालतो तसेच श्रीकृष्णाचे विठोबा हे पंढरपूरचे एकमेव दैवत पुज्यनीय मानतो त्याचप्रमाणे गुजरातमधील वैष्णव वाणिया हे तुळसीमाळ घालणारे, शाकाहारी आणि राजस्थानमधील श्रीनाथजी हे श्रीकृष्णाचे एकमेव दैवत पुजणारे. 
या वैष्णवांमध्ये पुन्हा पुष्टिमार्गीय वैष्णव हा एक पंथ आहे. हा पुष्टिमार्ग स्वामी श्री वल्लभाचार्य यांनी पाचेकशे वर्षांमागे स्थापन केलेला आहे. उपरोक्त राजस्थानमधील श्रीनाथजी ही श्रीकृष्णाची मूर्ती जी आहे, ती गोवर्धन पर्वतावर एका गवळ्याला पाचेकशे वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण अकबराच्या काळात सापडलेली मुर्ती आहे. ही तीन ते चार फूट उंचीची काळ्याभोर पाषाणातली मूर्ती आहे. ती श्रीकृष्णाची आहे असं फक्त समजायचं. रादर समजलं गेलं. नेहमीच्या श्रीकृष्णात आणि हिच्यात साम्य नाही. मात्र ती गोकुळ आणि मथुरेजवळील गोवर्धन पर्वतावर खोदकाम करताना सापडली म्हणून ती श्रीकृष्णाचीच मानली गेली असावी. ती मूर्ती सापडली तेव्हा तिची तिथे स्थापना केली. मात्र तेव्हा इस्लामच्या आक्रमणात मंदिरं मोठ्या प्रमाणावर तोडली जात होती. मुर्त्या फोडल्या जात होत्या म्हणून ती मूर्ती घेऊन एका बैलगाडीत घालून मोगली सरदारांपासून लपत छपत राजस्थानपर्यंत आणली गेली आणि उदयपूरजवळच्या एका गावात तिची स्थापना केली. ते गाव आज श्रीनाथद्वारा म्हणून ओळखले जाते. आणि तिथले हे मंदिर भारतातील अतीश्रीमंत मंदिरांपैकी एक समजले जाते. ती बैलगाडी अजूनही मंदिराच्या प्रांगणात उभी आहे.

तेव्हा या मंदिरात श्रीनाथजीबावांचे पुजारी किंवा सेवेकरी म्हणून वल्लभाचार्य सोबत होते. त्यांनी पुष्टीमार्ग या संप्रदायाची स्थापना केली. भक्तांना नियम आखून दिले. पुजेची पद्धत आखून दिली. ती या काळात आचरणे कठीण आहे, तरी अनेक भक्त ती आचरण्याचा प्रयत्न करतात. या संप्रदायाची भजनं तयार झाली. नैवेद्याचे प्रकार तयार झाले. दंतकथाही भरपूर आहेत या मूर्तीशी जोडलेल्या. वल्लभाचार्यांशी प्रभू स्वतः वार्तालाप करत होते असे भक्त मानतात. मुंबई युनिव्हर्सिटीत या पुष्टी संप्रदायाचा अभ्यासक्रम भारतीय तत्वज्ञान शाखे अंतर्गत समाविष्ट केलेला आहे. 
वल्लभाचार्यांनी देखील तेव्हा शंकराचार्यांप्रमाणे भारतभ्रमण केले. गावोगावी फिरून पुष्टिसंप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. अशी चौऱ्यांशी ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिली. त्या चौऱ्याऐंशी ठिकाणाना चौऱ्याऐंशी बैठका म्हटलं जातं. भक्त त्या त्या ठिकाणच्या यात्रा करतात. वल्लभाचार्यांच्या नंतर त्यांच्या वारसांना भारतातील चार ठिकाणच्या प्रमुख मंदिराचे आचार्य बनवण्यात आले. वल्लभाचार्यांचे हे वारस अजूनही वेगवेगळ्या ठिकाणच्या हवेल्यांचे आचार्य म्हणून विराजमान असतात. ते तिथे राहत नाहीत. मुंबईसारख्या शहरांत आलिशान जीवन जगतात. मात्र तिथे जाऊन येऊन असतात. यांना बावाश्री म्हटले जाते. त्यांच्याकडून पुष्टीमार्गाची दिक्षा घेतली जाते. मंत्र घेतला जातो. हा मंत्र म्हणजे एक श्रीनाथजी सोडून मी इतर कोणत्याही देवाचे स्वामित्व मानणार नाही अशा अर्थाचा असतो. एकप्रकारे अनेक देवदेवतांचा बुजबुजाट झालेल्या काळात एका दैवताच्या अधिष्ठानाखाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा, अहिंसेचं तत्वज्ञान शिकवण्याचा तो स्तुत्य प्रकार होता असं म्हणता येईल.
 जरी ते मंदिर राजस्थानात असले तरी श्रीनाथजींचे भक्त हे अधिकतर गुजराती आहेत. ते तिथे सढळ हस्ताने दान करत असतात. प्रत्यक्ष राजस्थानमध्ये जैन अधिक आहेत ते श्रीनाथजींचे भक्त नाहीत. आणि राजस्थानातील इतर क्षत्रीय इत्यादी हिंदू समाज आहे तो शिवभक्त आहे.
म्हणजेच राजस्थानमधील हे मंदिर श्रीमंत झाले आहे ते गुजराती वैष्णव वाणियांमुळे. तिथे पुरुष पुरुष खोलीच्या चार संगमरवरी टाक्या आहेत त्या सदैव देशी तुपाने भरलेल्या असतात. त्यातून रोजचा नैवेद्य रांधला जातो. या मंदिराबाहेरचे भिकारी देखील हे तुपाचे पदार्थ खाऊन माजलेले तगडे माजलेले असतात. कारण तिथे जाणाऱ्या गुजराती भक्तांना वाटतं की या भिकाऱ्यांना मंदिराचा प्रसाद विकत घेऊन खायला घातला की आपली दोन नंबरची सारी पापं धुवून निघणार... अर्थात सर्वच श्रीमंत मंदिरातील देवांच्या भक्तांच्या ह्याच धारणा असतात. एकेकाळी माझीही अशी होती. 
असो.
हे मंदिर फार जुने आहे. मुख्य म्हणजे याला भारतातील इतर मंदिराशी कोणतेही साम्य नाही. कळस, गाभारा, सभागृह, ओवरी आदी काही नाही. ते मंदिर म्हणजे राजस्थानातील एक जुनी मोठी हवेली आहे. त्यात श्रीनाथजींची स्थापना आहे. त्यामुळेच असेल, की श्रीनाथजींच्या त्या निवासस्थानाला मंदिर म्हटलं जात नाही. हवेली म्हटलं जातं. आणि मग श्रीनाथजींची इतर कुठेही मंदिरं असली, तरी त्यांना हवेलीच म्हणण्याची प्रथा आहे.  मूर्तीला भक्त अभिषेक, गंध, फुलं, नैवेद्या इत्यादी काहीही वाहू शकत नाहीत. इतकंच काय पण मूर्तीच्या जवळही जाऊ शकत नाहीत. पण त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी झालीय, की ती मूर्ती अजूनही जैसे थे स्थितीत जशीच्या तशी आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीप्रमाणे तिची झीज झालेली नाही. जे द्यायचे असेल ते मंदिराच्या व्यवस्थापनाकडे जमा करायचे. प्रसाद हवा असेल तर पैसे भरून प्रसाद घ्यायचा. चिमुटभर प्रसाद देखील फुकट मिळत नाही. मात्र भक्त पाच पाच हजाराचे दान करून भरपूर करंड्या भरभरून असली तूपाच्या मिठाया प्रसाद म्हणून घेऊन जातात. 

या मंदिराला पारंपरिक, प्राचीन मंदिराचे स्वरूप नसल्याने आणि आता ती हवेली देखील फार जुनी झालेली असल्याने तिथे भव्य मंदिर बांधावे असे भक्तांना नक्कीच वाटते. अंबाणी उद्योगपती हे वैष्णव वाणिया आणि या श्रीनाथजींचे भक्त. अंबाणी भाभीने आपल्या मुलीच्या लग्नात या मंंदिराची प्रतिकृती आपल्या  घरी मुंबईत उभी करून तिथे वैष्णव भजनांवर डान्स करून आपली हौस भागवून घेतली. (युट्यूबवर हे डान्स बघायला मिळतील.)
गांधीजी देखील वैष्णव वाणिया होते. म्हणूनच त्यांना नरसिंह मेहतांचे वैष्णव जन तो ... हे भजन प्रिय होते. गांधीजी हे कच्छी गुजराती होते. गुजरातमधील कच्छ प्रांतात राहणारे लोक कच्छी म्हणून ओळखले जातात. त्यांची कच्छी ही बोली भाषा सिंधी बोलीभाषेशी साम्य दर्शवणारी आहे. दोन्ही प्रांत जवळ असल्याने हे असेल. मात्र कच्छी ही आपल्या इथल्या मालवणीप्रमाणे किंवा अहिराणीप्रमाणे बोलीभाषा आहे. लिखित नाही. 

असे ऐकले की अंबाणी बंधूंनी म्हणे ऑफर दिली, की श्रीनाथजीचे नवीन भव्य मंदिर आम्ही बांधून देऊ, पण त्या मंदिराला नाव श्रीमती कोकीलाबेन धीरूभाई अंबाणी मंदिर असे लावले जाईल. साहजिकच ट्रस्टींनी नकार दिला. म्हणून श्रीनाथजीबावा अजून त्या जुन्या हवेलीतच आहेत. 
मला धोंडो केशव कर्वेंची आठवण झाली. त्यांच्या शाळेला ठाकरसी या श्रीमंत गुजरात्याने मोठी देणगी दिली आणि विद्यालय मोठं करू म्हणून शब्द दिला, मात्र या विद्यालयाला नाव आमच्या आईचे लागेल, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. कर्वे हे खरे त्यागी. त्यांनी आपल्या नावाला महत्त्व दिले नाही. विद्यालय मोठे होणे महत्त्वाचे. नाव कोणाचे का असेना. आज हे विद्यापीठ नाथीबाई ठाकरसी नावाने ओळखले जाते. त्यामागे कर्वेंचे कष्ट होते हे कुणाला ठाऊकही नाही. 
तद्वतच मंदिर श्रीनाथजींचे राहावे, कोकीलाबेनचे होऊ नये अशी भावना अजून तरी ट्रस्टींची असावी. खरे खोटे श्रीनाथ जाणे.


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...