Jul 31, 2021

डोंगरातील वस्त्या..

 

दर पावसाळ्यात दरडी कोसळून डोंगरकुशीतली गावं धराशायी होण्याच्या बातम्या येत असतात.

मग छोट्या टेकड्या, छोटे डोंगर यांच्या उतारावर का रहात असतील लोक?
दरड कोसळण्याच्या शक्यता असून?
त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रत्येकवेळी सरकारची असते का? 

लोकसंख्या जबाबदार असते का? गरीबी जबाबदार असते का?

माझे गाव कोकणातील एक लहानसे गाव. चारी बाजूने डोंगर आणि मध्ये असलेल्या सपाटीवर शे-सव्वाशे घरांचे गाव. पक्क्या घरांचे. गरीब-श्रीमंत सगळ्यांची घरे जवळपास पक्की. पारंपरिक. 
कोकणातील इतर गावांप्रमाणेच जातीनिहाय विभाग.  ही गवळआळी, ही जंगमआळी, हा कुंभारवाडा, हा महारवाडा, हा मुस्लिम मोहल्ला. असं पारंपरिक गाव. 

माझ्या लहानपणापासून, किंवा त्याही आधीपासून गावात मुस्लिम लोकवस्ती थोडी अधिक होती. यातले मुस्लिम सगळे बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीला. भरपूर पैसा कमवणारे, सधन. हिंदू पारंपरिक व्यवसाय-शेती इत्यादी करत गावातच राहणारे. प्रमाणात हाता तोंडाची जेमतेम गाठ. शिक्षणाचे प्रमाण दोन्ही समाजात कमीच होते. दोन्ही समाजासाठी गावात सातवीपर्यंतच्याच शाळा होत्या. त्यांची उर्दू, यांची मराठी.
मुस्लिम वस्ती वाढत गेली आणि त्यांचा पैसाही. त्यांच्या वाढत्या वस्तीला जागा, घरं गावात कमी पडू लागली आणि त्यांनी हिंदूंना रग्गड पैशांची ऑफर देत त्यांची घरं खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यात जबरदस्ती अजिबात नव्हती. पण आर्थिक ताकद काम करत होती. 
लाखालाखाच्या किंमतीत आपली घरं जातायत हे पाहून गरजू हिंदूंनी आपली घरं त्यांच्या हवाली केली. मिळालेले पैसे कनवटीला लावले आणि गावाजवळच्या डोंगराची वाट धरली. डोंगरावरची जमीन माळरान. सरकारी मालकीचे. तिथं त्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करत त्यांनी तिथे पुन्हा कच्ची पक्की घरं बांधली. आणि गाव सोडून जवळपास ऐंशी टक्के हिंदू डोंगरपठारावर राह्यला निघून गेले. 
आता हा डोंगर कधी घसरला, दरड बिरड कोसळली तर दोष कुणाचा? किती? कसा? हा प्रश्न उभा राहतो. 

एकाच गावात हे हिंदूच गरीब का राहिले? मुसलमानांप्रमाणे ते गल्फला का गेले नाहीत? कारण एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला हाताला धरून तिथे नोकरी मिळवून देत होता. तसा तो हिंदू माणसाला नेत नव्हता. हे एक. नेलं असतं तरी हे हिंदू किती गेले असते आणि तिथल्या कष्टाच्या नोकऱ्या त्यांना किती झेपल्या असत्या हे दुसरं. इथं कौशल्य, गट्स, परदेशात टिकून राहण्याची, पडेल ते काम करण्याची क्षमता हे सर्व जर एका समाजाचे वैशिष्ट्य असेल, आणि दुसऱ्या समाजात नसेल, तर समता आणि समानता यांची अपेक्षा कशी धरायची?

जेही असो.
यात सरकाचा दोष किती? सरकारने त्यांना मदत करायला हवी का? का? कशी?

प्रत्येक ठिकाणी डोंगराच्या कुशीत अशा वस्त्या दिसतात. त्यांचीही कारणं अशीच काहीबाही असतील ना?

एकाच परीसरात राहून एक समाज प्रगती करतो. तर दुसरा अधोगती. गावातले स्थान, आपली पक्की घरं, पारंपरिक विरासत सोडून सगळे हिंदू डोंगराकडे परागंदा झाले त्याचं वाईटही वाटतं. रागही येतो आणि ज्याची जशी लायकी तसे त्याचे स्थान असेही वाटते. 

Jul 10, 2021

सायकल -

 

सायकल –

 

शिवा रोज ती सायकल बघायचा आणि त्याचा जीव खालीवर व्हायचा. रोज त्याच्या स्वप्नात ती छोटीशी, नाजूक, सुंदर सायकल यायची. आपण त्या सायकलवर बसून वाऱ्याच्या वेगाने ती सुसाट चालवतोय हे एकच स्वप्न तो रोज बघत होता. एखाद्या भुकेल्या माणसाला पंचपक्वान्न पाहून जसं होईल, तसंच त्याला होत होतं म्हणाना, ती सायकल पाहून. बाजूच्याच दोन सोसायटी सोडून तिसऱ्या सोसायटीतला त्याच्याएवढाच एक गोरापान, स्वच्छ, सुंदर मुलगा ती सायकल चालवत त्याच्या चहाच्या टपरीसमोरून अनेकदा जात होता. आणि त्या सायकलला पाहून शिवा कासावीस होत होता.

खरंतर शिवाला सायकल चालवताही येत नव्हती अजून. पण एकदा मिळाली, तर शिकायला असा काय वेळ लागणार? आपण ती सहज आणि लगेच शिकू असा त्याला आत्मविश्वासच होता.
आजही तो गोरा मुलगा ती सायकल चालवत त्याच्या समोरून गेला आणि शिवा जागेपणीच स्वप्नात हरवला. त्या सायकलवर बसला आणि सुसाट निघाला रस्त्यामागून रस्ते टाकत लांब.. लांब... कदाचित आपल्या गावापर्यंत.. जिथून तो आला होता. जिथून त्याच्या आईबापाने त्याला इतक्या लांब कमवण्यासाठी चहाच्या टपरीवर पाठवून दिलं होतं.
तेवढ्यात हाक आली, ‘शिवा, क्या कर रहा है उधर? चाय कौन तेरा बाप ले कर जाएगा क्या साले?’
तसा तो दचकला, भानावर आला आणि चहाचा क्रेट उचलून धावला.
त्याची चहाची टपरी म्हणजे तो ज्या चहाच्या टपरीवर पोऱ्या म्हणून काम करत होता ती.

शिवा फारतर आठदहा वर्षांचा असेल. काळासावळा, वयापेक्षा थोडा बुटका पण अंगाने भरलेला, अंगावर जुने विटके कपडे. कधी हाफ पॅन्ट तर कधी फुलपॅन्टही असायची. पण जुनेरीच.

चहाच्या टपरीवरून चहाचे भरलेले पेले असलेला जाळीचा ट्रे घेऊन तो आजुबाजूच्या दुकानवाल्यांना, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना त्यांच्या ऑर्डरचा चहा नेऊन द्यायचा. रस्त्याच्या अलिकडे-पलिकडे दोन्ही ठिकाणी त्याच्या फेऱ्या चालू असायच्या. मधला वाहता रस्ता सुसाट वाहनांची वर्दळ असलेला. त्याच्याएवढ्या एखाद्या चांगल्या घरच्या मुलाला त्याची आई अशा रस्त्यावर एकटाही पाठवणार नाही कदाचित, रस्ता क्रॉस करून जायचं असेल तर.
पण शिवा सरावला होता.
त्याला त्या कामाचाही सराव झाला होता. चहाचे पेलेच तर पोचवायचे असत. रस्त्यावरची किती गंमत पाहायला मिळायची. भरलेला बाजार, वर्दळ, रंगीबेरंगी माणसं. त्यात त्याला ते काम काही फार जड वाटत नव्हतं. शिवाय मालक त्याचा पगार त्याच्या आईबाबांना पोचवत होता आणि दोन्ही वेळ त्याला पोटभर जेवायलाही घालत होता. दुकानातच रात्रीचा इतर दोन कामगारांसोबत झोपायचीही सोय होती.
तरीही, समोरून त्याच्याच वयाची स्वच्छ, सुंदर मुलं पाठीवर स्कूल बॅग अडकवून मस्ती करत जाताना दिसली की तो त्यांच्याकडे एकटक पाहात राहायचा. रस्त्याच्या पुढच्याच वळणावर अनेक शाळांच्या विविध बसेस थांबायच्या. त्यातून चिवचिवाट करत लहान-मोठी मुलं चढता उतरताना दिसायची. तेव्हा मनातल्या मनात तोही त्या बसमध्ये जाऊन बसायचा.

कधी कधी स्वप्नांत तो पाठीला बॅग लावून सायकलवरून शाळेपर्यंत पोचायचा. तेव्हा ती शाळा त्याच्या गावातली त्याला अंधूक आठवणारी छोटीशी प्राथमिक शाळा असायची. त्या शाळेतली मुलं सगळी त्याच्या ओळखीची होती. त्याच्याच आजुबाजूला राहणारी, त्याच्यासोबत खेळणारी. ती सगळी मुलं त्याच्या त्या सायकलीभोवती गोळा होत. कौतुकाने बघत राहत. काही जण त्यावरून हात फिरवून बघत. शिवाला ते पाहून अजून आनंद होई. अशी सायकल त्या गावात कुणापाशीच नव्हती.
आता इथून पुन्हा त्या चहाच्या दुकानात जाणार नाही असं तो आईबाबांना सांगायचं ठरवून टाकी. आपण रोज ही सायकल घेऊन आपल्या या शाळेत जाऊ. पाठीला दप्तर लावून.

हे स्वप्नं पूर्ण होईपर्यंत पहाट व्हायची. पाच वाजल्यापासूनच दुकानात वर्दळ सुरू व्हायची. चहाचा मोठा स्टोव्ह ढणाढणा पेटायचा. मालक त्याच्या अंगावरची चादर ओढून, एखादी शीवी देतच त्याला उठायला भाग पाडायचा. शिवा स्वप्नं बाजूला सारून उठायचा आणि तोंडावर पाणी मारून कामाला लागायचा.


एकदा शिवा चहाचे पेले घेऊन रस्त्याकडेला असलेल्या दोन सोसायट्या सोडून तिसऱ्या सोसायटीत गेला. खरं तर चहाच्या टपरीवरून चहा मागवणारं त्या सोसायटीत कोणी नव्हतं. सगळी सोसायटी रहिवाशांची होती. तिथं कोणतंही दुकान नव्हतं. पण बहुधा सोसायटीची काही कामं चालू होती. ती कामं करणाऱ्या कामगारांसाठी तो चहा घेऊन आलेला होता. चहाचे पेले त्या कामगारांच्या हातात एकेक करून दिल्यावर त्यांचा चहा पिऊन होईपर्यंत तो इकडे तिकडे बघत तिथेच फिरत होता.

तेवढ्यात... त्याची दृष्टी एका कोपऱ्यात गेली. तीच सायकल! तिथं उभी होती. आणि तिला साखळी वगैरे काहीही बांधलेली नव्हती. शिवाचे डोळे लकाकले. दिवसरात्र या सायकलीनेच तर त्याचा पिच्छा पुरवला होता. म्हणजे तो गोरापान मुलगा याच इमारतीत राहात होता तर. शिवाला अगदी राहवत नव्हतं. त्याने भराभर चहाचे रिकामे पेले गोळा केले. धावत जाऊन दुकानात ठेवले आणि मालकाचा डोळा चुकवून तसाच सुसाट पळत तो पुन्हा त्या सोसायटीत आला. सगळ्यांची नजर चुकवून त्याने ती सायकल हळूच बाहेर काढली, त्याचे दोन्ही हॅंडल धरून तो हळू हळू सोसायटीच्या बाहेर पडू लागला. तो ती सायकल नेण्यात इतका तल्लीन झाला होता की तो जराही इकडे तिकडेही बघत नव्हता. अगदी आपलीच नेहमीची सायकल असल्यागत सराईतपणे तो गेटच्या बाहेर पडायला जाणार, इतक्यात,
‘ए मुला, सायकल घेऊन कुठं चाललास? ठेव ती सायकल जाग्यावर. सायकल चोरतोस काय?’ अशी बाजूच्याच खिडकीतून हाक आली.
तो दचकला, कावराबावरा झाला. थोडा घाबरला. खिडकीतली बाई फार जोरात ओरडत नव्हती. किंवा फार रागाने बोलत नव्हती. पण तरीही त्याला काय बोलावं ते सुचेना.

खिडकीतली ती गोरीपान बाई, ती त्या मुलासारखीच दिसत होती चेहऱ्याने. म्हणजे त्या मुलाची आईच असणार ती. ती पुन्हा म्हणाली, ‘ठेव ती सायकल तिथे. सायकल चोरतोस का? सांगू का तुझ्या मालकाला येऊन?’

तेव्हा मात्र तो घाबरला. सायकल तिथेच भींतीला लावली आणि तो गेटबाहेर पळत सुटला.
-

-

-

शिवा पळून गेला.

पण इकडे खिडकीतल्या बाईचा जीव कासावीस झाला. अगदी योगायोगाने ती खिडकीत यायला आणि त्याचवेळी शिवाच्या हातात आपल्या मुलाची सायकल दिसायला एकच गाठ पडली होती. क्षणभर तर तिला त्या मुलाला काय बोलावं तेच कळलं नाही. त्या मुलाला तिने जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर अनेकदा पाहिलं होतं. कारण त्या टपरीच्याच बाजूला त्यांचा नेहमीचा किराणावाला होता. असं कधी कुठल्या चोराला हटकायचं कारण पडलं नव्हतं, जो आपल्या डोळ्यासमोर चोरी करून जाईल. त्यामुळे तीही गोंधळली. पण लगेच तिने हाक मारली,
‘ए मुला, सायकल चोरतोस काय? ठेव ती जाग्यावर.’
तो मुलगा पळून गेला. पण नंतर तिच्या मनात कालवाकालव झाली. जाऊ द्यायला हवं होतं का आपण त्याला सायकल घेऊन. तशीही ती दोनेक वर्ष जुनीच तर झाली होती. एवढुसं पोर, इतकं धाडस करून सायकल नेतंय म्हणजे त्याचा किती जीव अडकला असेल त्या सायकलीत? आणि आपण नेमकं त्याचवेळेला खिडकीत नसतो आलो, तर गेलीच असती ना सायकल चोरीला. मग आपण थोडंसं हळहळलो असतो फारतर. अजून काय मोठं होणार होतं? 

पण त्याने ती सायकल नेऊन कुठं ठेवली असती? त्याला त्याच्या चहाच्या टपरीवाल्या मालकाने हटकलं नसतं? ही सायकल कुठून आणली म्हणून? कुठे लपवून ठेवू शकणार होता तो ती सायकल? आणि कुठे, कशी, कधी चालवू शकणार होता?
अनेक वर्ष झाली. पण अजूनही बाईंना ती सायकल त्याला घेऊन जाऊ दिली नाही याचा पश्चात्ताप होतोय. पण त्या आपल्याच मनाला समजावतात, की अशा चोराला इतर कुणी पाहिलं असतं तर धरून चोपलं असतं, हंगामा केला असता, शिवीगाळ केली असती. आपण निदान त्याला तसं काही केलं नाही.

आणि शिवा.... तो कुठे आणि कसा असेल आता देवच जाणे....

- अलका गांधी-असेरकर

Jul 2, 2021

चिमण्या

 सैपाकघराच्या खिडकीत चिमण्यांसाठी फिडर लावलं. पण फिडर लावलं की लगेच चिमण्या येत नसतात. कधी कधी तर दोन दोन महिने येत नाहीत. त्या अदमास घेतात. घाबरतात. पण धीर ठेवून वाट पाहात राहिलो की एक दिवस दबकत दबकत हळूच एखादी चिमणी येते. मग दुसरी येते. 
मग बरेच दिवस या दोघीच येतात. यांना रोज बिनधास्त दाणे टिपताना पाहून मग बरेच दिवसांनी तिसरी येते. पण या दोघी तिला येऊ देत नाहीत. एकच कल्ला करतात आणि तिला हाकलून लावतात. त्यांचंही बरोबरच असतं. पहिली रिस्क त्यांनी घेतलेली असते, हे धान्याचं कोठार शोधून तिथे येण्याची. बसण्याची आणि जीवाला घाबरत घाबरत दाणे खाऊन बघण्याची. आता या मेल्या आयत्यावर रायतं करायला येणार का? हॅट आम्ही नाही येऊ देणार..
पण हळू हळू बाकीच्याही येतातच. भांडणं चालूच राहतात. आणि संधी मिळेल तसं एकमेकींना हुसकावत दाणे टिपणंही. अखंड चिवचिवाट... 
सैपाकघरातील ओट्याच्या अगदी समोर दोन फुटावर तो फिडर असल्याने सुरुवातीला माझी चाहूल ओट्यापाशी लागली की त्या भूर्रकन उडून जायच्या. जोपर्यंत आपण तिथून दूर होत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. नंतर मात्र हळू हळू त्या आपल्या उपस्थितीला सरावतात. इथं धोका नाही याची त्यांना हळू हळू खात्री वाटू लागते. 
पण अजून एक वेगळीच गंमत आहे. 

मी जर खाली मान घालून माझं काम करत असेन ओट्यापाशी तरी त्या बिनधास्त चरत राहतात. येतात जातात भांडतात. पण मी त्यांच्याकडे नजर उचलून पाहिलं रे पाहिलं की लगेच भूर्रकन उडून जातात. मला फार आश्चर्य वाटायचं. हा काय प्रकार. अशा येतात. पण मी पाहिलं तर निघून जातात. फोटो देखील लपून छपून काढावे लागतात. जोपर्यंत मी नजर वर उचलून पाहत नाही तोपर्यंत त्या बिनधास्त असतात. मग मला असं लक्षात आलं की कदाचित माणसांचे डोळे पाहिल्यावर त्या घाबरत असतील. माणसाचे आणि त्यातही माझे ते भले मोठे काळे काळे डोळे पाहिले की त्या बिचकत असतील. कदाचित माणसांच्या डोळ्यांकडे त्यांचे लक्ष लवकर वेधले जात असेल. 

पण मला खात्री आहे, हळू हळू त्या माझ्या डोळ्यांनाही सरावतील. आणि मी त्यांच्याकडे एकटक बघत राहिले, तरी त्या बिनधास्त चरत बसतील. कारण, 
माझ्या माहेरी कोकणातल्या त्या मोठ्या घराच्या ओटीवर आजोबांनी एक मोठा, जवळपास दोन फुटाचा पत्र्याचा झोपाळा टांगला होता. चिमण्यांसाठी धान्य टाकायला म्हणून. चिमण्यांसाठीच स्वस्तातल्या भाताची एक दोन पोती घेऊन ठेवली जायची. त्यातले धान्य मूठमूठभर जाता येता घरातले कुणी ना कुणी टाकत राहायचे त्या झोपाळ्यात. आणि असंख्य चिमण्या यायच्या. आमची ओटी चिवचिवाटाने गजबजलेलीच असायची. जरा कुणी जवळ आले, ओटीपुढच्या अंगणातून कुणी जात असले, तर उडाल्यासारखं करून दुसऱ्याच सेकंदाला पुन्हा येऊन बसायच्या. तो झोपाळा चिमण्यांनी फुलून गेलेला असायचा. फक्त चार महिने. पावसाळ्यातले. पावसाळा संपला की त्या कुठे गायब व्हायच्या कोण जाणे. धान्य टाकलं तरी यायच्या नाही. आजोबा म्हणायचे आता त्यांना शेतात पडलेले दाणे मिळतात खायला. पावसात मिळत नाहीत. खरं खोटं कोण जाणे. 
दिवसभर चिमण्यांना भात, फक्त सकाळी एकदा छपरावर कबूतरांना ज्वारी, आणि समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पथिकांसाठी ओटीवर, किंवा दुकानात भरून ठेवलेला पाण्याचा माठ ह्या आजोबांच्या पुण्याच्या कल्पना होत्या तेव्हा...!   



किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...