Showing posts with label योग आणि आरोग्य. Show all posts
Showing posts with label योग आणि आरोग्य. Show all posts

Dec 2, 2020

भारतीय दांभिक, उपाशी, वखवखलेली विकृत संस्कृती-

 भारतीय संस्कृतीचा डांगोरा मोठा पिटला जातो. 
पण ही संस्कृती अतिशय विसंगत, दांभिक आणि विकृत संस्कृती आहे.
इथं अध्यात्म, नीती-अनीती, पाप-पुण्य याच्या कल्पना विचित्र आहेत. 
विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांबाबत ही संस्कृती गंडलेली आहे. 
इथं मंदिरांवर संभोगशिल्पे आहेत. त्यात ऍनिमल पॉर्नपासून गॅंगबॅंगपर्यंतच्या सर्व सेक्स कल्पना आणि भावना चित्रीत आहेत. 
मात्र तरीही इथं सेक्सकडे गलिच्छ नजरेने पाहिलं जातं. 
मुलं तिशी-चाळीशीत आली तरी लग्नाआधी सेक्स करण्याला जाहीर मान्यता नाही. त्यांना चोरूनच भेटावे लागते. लग्न होईपर्यंत मुलीला सेक्सबद्दल काहीही माहिती नसणं हे तिच्या मुर्खपणाचं द्योतक असायला हवं, परंतु तसं न होता अशा मुलीला पवित्र, निरागस इत्यादी समजून खुश होणारे तिच्यासारखेच मुर्ख तरूण अजूनही या देशात बहुसंख्येत आहेत.
भारतात सेक्स म्हणजे फक्त पोरं काढण्याचं माध्यम समजलं जातं. त्यातही मुलं झाली, की निदान महिलेला तरी सेक्स कशाला हवा, किंबहुना तिला तो नकोच असतो, किंवा नसावाच अशा फुल टू अपेक्षा भारतीय समाजात असतात. 

मध्यंतरी स्टेशन परीसरातून मी एकदा जात होते. तिथे एक चाळीशीतली तरुणी आणि तिचा बारावीतला मुलगा, हे दोघे मिळून तीन चार पंचविशीतल्या तरुणांशी भांडताना दिसले. भांडण हमरीतुमरीवर आले होते. मी स्कूटरवर होते. मला वाटले की त्या बाईला ते तरूण त्रास देत आहेत. मी स्कूटर एका बाजूला लावून उतरले. भवताली गर्दी होती. पण कोणीही मध्ये पडत नव्हते. ती बाई धावून धावून त्या मुलांपैकी एकाला मारायला जात होती. बडबड करत होती. अर्थात मी तिच्या बाजूनेच होते. काही माहीत नसल्याने. मी तिला जरा एका बाजूला धरून विचारले. काय झालं?
आता हतबुद्ध होण्याची पाळी माझी होती. मला ती बाई म्हणाली, हा एका मुलीला स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर किस करत होता. सगळ्यांच्या समोर. यांना काही लाजा नाहीत का? लहान मुलं वगैरे बघतात इत्यादी इत्यादी..
मी म्हटलं ते जर राजीखुशीने करत असतील, तर त्यात आपला काय संबंध? तो जर त्या मुलीवर जबरदस्ती करत असेल, तर मध्ये पडणं ठिक. पण जर ती मुलगीही त्याची गर्लफ्रेन्ड असेल, नि राजी खुशीने त्याच्याबरोबर असेल, तर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ती बाई संस्कृतीच्या नावाने पेटली होती. शेवटी तो मुलगा आणि त्याचे दोन मित्र हे मारामारीवर उतरले. रिक्षातून रॉड काढू लागले. मी त्या मुलाला समजावलं. त्याच्या रिक्षात बसलेल्या मित्राला समजावलं, की याला घेऊन निघून जा. त्या बाईच्या नादाला लागू नका.
आईशप्पथ सांगते, जर मी मध्ये पडले नसते, तर त्या बाईने नि तिच्या बारावीतल्या मुलाने त्या दिवशी मार खाल्ला असता. शिवाय लोक तिच्याच बाजून राहिले असते. कारण एक मुलगा आणि मुलगी राजीखुशीने सार्वजनिक जागी किस करत असतील, तरी यांची संस्कृती बुडते. 
हीच बाई आणि हाच तिचा मुलगा, रस्त्यात कुणाला थुंकताना पाहून, कचरा टाकताना पाहून त्याला जाब विचारते झाले नसते. गपगुमान तिथून गेले असते. 
कारण भारताच्या रस्त्यावर हगणं, मुतणं, कचरा टाकणं, थुंकणं हे सगळं केलेलं चालतं. मात्र कुणी प्रेम केलेलं चालत नाही. इथं बलात्कार आए दिन होतात. तशी पार्श्वभूमी घरात असते. वर्चस्वाची. तेव्हाच तिथे बलात्कारी पैदा होतात. मात्र प्रेमाची पार्श्वभूमी कोणत्याच घरात सहसा नसते. मुलीशी बोलायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. हे असले संस्कार चांगले संस्कार म्हणून ओळखले जातात. 
आजही मी जेव्हा माझा मित्र म्हणून मी एखाद्याचा जाहीर उल्लेख करते, तेव्हा शेकडा नव्वद टक्के लोकांच्या, त्यातही महिलांच्या नजरा अधिक बदलतात. बाईला मित्र कसा काय असू शकतो? त्यातही माझ्याएवढ्या मोठ्या बाईला?.. मी काय आता कॉलेजला जाणारी मुलगी आहे का मला मित्र असायला? 
ही परिस्थिती मुंबईसारख्या शहरात आहे. तर भारताच्या इतर राज्यांत आणि छोट्या गावांमध्ये तर विचारायलाच नको. 
स्त्री पुरुष, तरुण-तरुणी प्रेमासाठी, सेक्ससाठी इथं चोरून भेटतात. घरांमधून जागा नसतात.  बाहेर भेटलं की समाजाला चालत नाही. अनेकदा अशा गावाबाहेर, एकांत जागी चोरून भेटणाऱ्या तरुणतरुणींना, स्त्री-पुरुषांना इतर उपाशी, वखवखलेले तरूणच मागावर राहून त्रास देतात. ब्लॅकमेल करतात. कारण इथं प्रत्येक तरुण उपाशी आहे. त्याला प्रेम करायला, भिन्नलिंगी मैत्री करायला, त्यांच्याबरोबर जाहीर रित्या भटकायला, परवानगी नाही. किंवा  त्याची स्वतःचीच एखाद्या मुलीबरोबर निखळ मैत्री असण्याएवढी त्याची लायकी नाही. पात्रता नाही. कारण पुन्हा तेच. घरीदारी असलेल्या स्त्रीपुरुष मैत्रीबाबतच्या दांभिक कल्पना. एखाद्या मुलीबरोबर एखादा तरुण दिसला, किंवा उलटही तर लगेच त्याच्या घरी जाऊन सांगण्याचे परमपुण्य काम मागच्या पिढीतले उपाशी ढुढ्ढाचार्य करत असतात. पोलिस देखील अशा तरुणतरुणींना त्रास करतात. दंड करतात. 

थोडक्यात इथली तरुण पिढी देखीलउपाशी आहे, नि प्रौढ पिढी देखील. पण बोलू शकत नाही. कारण त्याच्यावरही संस्कार नावाच्या च्युतियापाचे ओझे असते. मग इथला पुरुष बलात्कार करतो, ते जमलं नाही तर गर्दीत सापडलेल्या बाईच्या अंगाला नको तिथे स्पर्श करतो, धक्के मारतो, चिमटे काढतो. एखादी बरी बाई दिसली की तिच्याकडे एकटक उपाशी नजरेने बघत बसतो. इथं लहान लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात, शरीरविक्रयाचे पाच रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंतचे सौदे होणारे बाजार भरभरून वाहतात. तिथं पोरी पळवून आणल्या जातात, विकल्या जातात, या उपाशी भारतीय पुरुषांची वखवख शमवण्यासाठी त्या मुलींवर अमानुष अत्याचार केले जातात. त्याचं वैषम्य वरील उदाहरणातील बाईपासून कोणालाच वाटत नसते. त्यावर कुणी बोलत नसते. कारण देवदासीसारख्या प्रथा या आपल्याकडे धर्म आणि संस्कृतीच्या नावावर जाणीवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.

इथं अजूनही बाई म्हणजे, 'माझ्या घरची ठेवायची झाकून, नि दुसऱ्याची बघायची वाकून' अशी वस्तू समजली जाते.

मला असा प्रश्न पडला, की वरील उदाहरणातील बाईचा मुलगा आता कॉलेजला जाईल, उद्या शिकण्यासाठी अमेरिका, युरोपला जाईल. तिथे तर सर्रास खुलेआम तरुण तरुणी एकमेकांच्यात हरवून बसलेले दिसतात. ठायी ठायी. अगदी एकमेकांच्या मांडीवर बसलेले असतात, एकमेकांच्या अंगावर पडलेले असतात. हगिंग, किसिंग सर्वांच्या समोर, सर्वांना विसरून सुरू असते. तिथे लहान मुलेही असतात. तरुणींच्या अंगावर वीतभर चड्डी नि अर्धा वीत कुडता असतो. पण या जोडप्यांकडे कुणीही ढुंकून बघत नाही. त्यांना त्रास करण्याचे तर दूरच. पण त्यांच्याकडे बघत बसणे हे देखील तिथे मॅनरलेस समजले जाते. तिथे तर जागांचेही प्रॉब्लेम नसतात त्यांना. बहुतेक तरुणतरुणी एकत्र लिव्ह इनमध्ये राहत असतात. तरीही जाहीर ठिकाणीही ते एकमेकांच्यात हरवून बसू शकतात. तेव्हा हा मुलगा त्या मुलांना मारायला धावेल का? याची ती संस्कृतीपुजक आई देखील त्या लोकांना मारायला धावेल का, जेव्हा ती आपल्या मुलाकडे तिथे जाईल तेव्हा? 
आपल्याकडे तर नवराबायकोही हातात हात घेऊन फिरणं पाप समजतात, वाईट समजतात. 
लोक म्हणतील, प्रेमाचं प्रदर्शन कशाला? ठिक मग, रस्त्यात हगून, थुंकून, कचरा टाकून घाणींचं प्रदर्शन मात्र चालतं का तुम्हाला? प्रेमाचं नको, घाणीचं प्रदर्शन चालतंय तुम्हाला. 

आणि आपल्याकडे अजूनही मुलींच्या तोकड्या कपड्यांवर निरर्थक चर्चा झडतात. बलात्कारासारख्या घटनांचे समर्थन करत मुलींच्या कपड्यांवर आरोप केले जातात. मात्र आपल्या इथल्या मंदिरात, लेण्यांमध्ये सर्व शिल्प हे अत्यल्पवस्त्रांकीत तरुणींचे असतात. म्हणूनच भारतीय समाज दांभिक आहे. तो नीतीमान नाही, तर विकृत आहे. गंडलेला आहे. 
आपल्याकडे (नीतीमान)पुरुष इतके वखवखलेले आहेत, की ते केवळ अल्पवस्त्रांकीत गोऱ्या युवती बघायला गोव्याला जातात. गोव्याचे सौंदर्य बघायला नाही. आणि घरच्या बाईला पूर्ण कपड्याची संस्कृती शिकवतात. भारतीय लोकांची डोकी इतकी बधीर झालेली आहेत की त्यांना साडी ही संस्कृती वाटते. त्यातून दिसणारं उघडं अंगं हे असंस्कृत वाटत नाही. मात्र पॅन्ट शर्ट घातलेली बाई दिसली की यांची संस्कृती बुडते. इतका मुर्ख समाज अजून कुठे असेल. 
हे तर दूरचं झालं. इथं सोशल मिडीयावर देखील स्त्रियांना कपड्यांवरून, त्यांच्या लेखनावरून, त्यांच्या वयावरून, जज केलं जातं. त्यांना उपलब्ध समजलं जातं. इथं नवराबायको दोघेही सोशल मिडीयावर असले, तरी एकमेकांवर पहारा ठेवून राहतात. एकमेकांना स्पेस देत नाहीत. बहुसंख्य लोकांजवळ स्वतःचं असं सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं काहीच नसतं. तेवढी वैचारीक समज नसते, क्षमता नसते. त्यामुळे इथं केवळ हा काय करतोय, ती काय करतेय, हा कुणाशी बोलतोय, ती कुणाबरोबर दिसतेय हेच गॉसिपिंग अधिक केलं जातं. त्यावरून त्या त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधले जातात. आणि हे करणारे अधिकतर पुरुष असतात.
पण पुरुषांनाच का नावं ठेवा, इथं स्त्रिया देखील प्रेमाच्या नावावर लांबच लांब पोष्टी टाकतील. हिंदी इंग्रजी सिनेमे, त्यातील नायकनायिकांचे प्रेम, प्रेमाची गाणी यावर लळूलळून लिहितील. त्यावर शेपाचशे प्रतिक्रिया पडतील. हजार बाराशे लाईक्स उठतील. पण हेच लोक एखादी वास्तवातली प्रेमकहाणी समोर आली तर तिला भरभरून शिव्या देतील. इथं प्रेम म्हणजे लग्न, प्रेम म्हणजे एकमेकांना खेकड्यासारखं अडकवून ठेवणं, प्रेम म्हणजे जबाबदाऱ्या, प्रेम म्हणजे पाप, प्रेम म्हणजे प्रदर्शन, प्रेम म्हणजे वंशाला वारस अशा आपणच आपल्या दांभिक मनाच्या सोयीसाठी तयार करून ठेवलेल्या व्याख्या आहेत. 
अरे यार, प्रेम म्हणजे फक्त प्रेम. ते क्षणाचं असेल, महिन्याचं असेल, वर्षाचं किंवा जन्माचं. तुमच्या व्याख्या तुम्ही त्याला का लावताय? जे करतायत ते त्यांचं बघून घेतील. क्षणाचं करायचं की जन्माचं ते...

प्रेम आणि सेक्स म्हणजे उदात्त, मंगल, पवित्र असलं काही नसतंय. इतर अनेक भावनांप्रमाणेच ती एक भावना आहे. गरज आहे. बास्स. इतकंच. माणसाला साधी पाणीपुरी खाताना सारं शरीर सुखमय, हवंहवं वाटत राहण्यासारखं होतं. भैय्या, और एक दो ना, एक तिख्खा दो, एक मिठा दो, चटणी जरा और डालो असं म्हणत एका प्लेटच्या जागी चार प्लेट हादडल्या जातात. मग पाणीपुरी खाणं हे उदात्त, मंगल, पवित्र, अध्यात्मिक वगैरे वगैरे वाटायला हवं का? प्रेम, सेक्स या उदात्त, मंगल, पवित्र इत्यादी नसून आनंद देणारी गोष्ट आहे. स्वतः आनंदी रहा, दुसऱ्याला राहू द्या. तुमची गळणारी नाकं तिथं नका खुपसू. बस इतनी सी बात है. 

भारतात अजून दोनशे वर्षे तरी स्त्रीपुरुष निखळ संबंध, प्रेम-सेक्स इत्यादीबद्दलच्या भोंगळ कल्पना, समज गैरसमज बदलणार नाहीत.

बरं मनमर्जीने प्रेम आणि सेक्स सोडा, इथं लग्नं तरी प्रेमाने होऊ दिली जातात का? तर तेही नाही. पोरांची लग्नं हा पालकांचा स्वार्थ असतो. त्यांना त्यांची जात, धर्म, गोत्र, कुळ इत्यादी जपायचे असतात. पोरांना लवकरात लवकर पोरं होऊन वारस हवे असतात. इथल्या भिकाऱ्याला देखील खानदानाचा अभिमान असतो, नि वंशाला पोर हवं असतं. आपण पोरं काढली तितक्यावर लोकांचं समाधान नसतं. इथं पोरांनी पण पोरं काढून पालकांना कृतकृत्य करायचं असतं. नि तरी हे म्हातारे जिवंत राहिले, तर नातवंडांनीही पतवंडं देऊन यांना उपकृत करायचं असतं. सोन्याची फुलं उधळायची असतात. 
थोडक्यात इथं प्रेम आणि सेक्स म्हणजे पोरं काढण्याचं माध्यम.  ती पोरं पण आपल्या जातीची हवीत. धर्माची हवीत. तर ती गोड असतात. तशी ती नसली तर कडूच. पण ते माध्यपणम वाईट समजायचं. त्याची निंदा करायची. 
म्हणूनच हा समाज विकृत समाज आहे. हा माणसाला नैसर्गिक जगू देत नाही. स्वतः जगत नाही.

Nov 29, 2020

कोण अल्पसंख्य.. कोण बहुसंख्य..

कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य-

माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळी आणि मुस्लिम मोहल्ला, गुजराती व्यापारी घरे अशी व्यवस्थित पारंपरीक रचना असलेलं हे गाव. 
पन्नास साठ वर्षात हळूहळू मोहल्ला वाढत गेला. इतका की बाकीच्या सगळ्या आळ्या नष्ट झाल्या. हिंदू गाव सोडून गावाबाहेर वसले. 
कसे?
मी अनेकदा लिहिलेय, मुस्लिम परिस्थितीने गरीब असतात हे केवळ मी इथं वाचत आलेय. प्रत्यक्षात मी पाहिलेले मुस्लिम सर्व हिंदूंपेक्षा चांगले श्रीमंत होते. आहेत. 
कोकणातील बहुतांश मुस्लिम हे सधन आहेत. बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये पूर्वापर नोकऱ्या करणारे आहेत. त्यातून भरपूर पैसा कमवून गावात पक्की टोलेजंग घरे बांधणारे आहेत. त्यांच्या तुलनेत पर्यायाने अशा गाव खेड्यातले हिंदू गरीब आहेत. 
माझ्या गावात वाढत्या मुस्लिम संख्येला घरं कमी पडू लागली नि त्यांनी गरीब हिंदूच्या घरांवर सरळसरळ डोळा ठेवला, तो पैशाच्या जोरावर. 
गरीब हिंदूना आपल्या घराला लाखालाखात रकमा मिळू लागल्यावर जेमतेम खाऊन पिऊन किंवा तेही वांधे असलेले बरेच लोक आपली घरं मुस्लिमांना सोपवून रोख रकमा घेते झाले आणि त्यांनी गावाबाहेरच्या माळावर, सरकारी जागेत आपल्या झोपड्या, कच्ची घरे उभी केली. गावातून आता जवळपास नव्वद टक्के हिंदू गाव सोडून माळावर, टेकडीवर अशा प्रकारची जेमतेम घरे बांधून राहतायत. (ते पाहून शहरात अशाच जागांवर वसणाऱ्या झोपडपट्ट्याच डोळ्यासमोर येतात.) तसं पाहता हे सरकारी जागेवर अतिक्रमणच होतं. परंतु ते मोठ्या प्रमाणावर होत असताना शेवटी सरकारनेही त्यांना मान्यता दिली. 
गाव कोकणातलं, आजुबाजूला जंगल, झाडं, नदी सगळं आहे. मात्र गावात एकही झाड दिसत नाही मोठं. कारण अगदी सिटीप्रमाणेच इंच न इंच जागा बळकावणे हा प्रकार चालू आहे. त्यात झाडांना जागा नाही. हिंदू होते तोपर्यंत त्यांच्या घराच्या मागेपुढे विस्तृत अंगणं आणि त्यात बऱ्यापैकी झाडं होती. विहीरी होत्या. गोठे होते, ते सगळं गेलं. 
कोकणात अशी मुस्लिमबहुल गावे भरपूर आहेत. रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातल्या किनारपट्टीपासून पंचवीस तीस किमी परिसरात अशी भरपूर सधन गावे आहेत. 
या मुस्लिमांच्या केवळ गावातच नव्हे, तर तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या गावी देखील भरपूर प्रॉपर्ट्या आहेत. तिथे त्यांनी जमिनी घेऊन घरे, ईमारती, चाळी बांधून ठेवल्या आहेत. मात्र त्या ठिकाणी भाड्याने राहणारे हिंदू आहेत. हे मुस्लिम आपली गावे सोडून शहरात रहायला शक्यतो येत नाहीत. मात्र जमिनी घेऊन ठेवतात. 
हिंदूंची पुढची पिढी शहराकडे स्थलांतरीत होते. हे देखील गावांतून त्यांची संख्या कमी होण्याचे एक कारण आहे.
थोडक्यात अल्पसंख्य, बहुसंख्य या सापेक्ष कल्पना आहेत, त्या स्थलकालपरिस्थितीप्रमाणे बदलत असतात. 
असं म्हणतात, की कश्मीरमध्ये हिंदू अल्पसंख्य होते, पण श्रीमंत होते. तरी तिथे ते विस्थापित झाले. 
माझ्या गावात हिंदू अल्पसंख्य होते आणि गरीबही... तरी ते तिथून विस्थापित झाले...
 

Nov 25, 2020

गिल्ट-

 पाप-पुण्य, नीती-अनीती या संकल्पना माणसाने केवळ माणुसकीने वागावं, दुर्बळ मनुष्यालाही बऱ्यापैकी जगता यावं, सबलांकडून त्यांचे शोषण होऊ नये यासाठी तयार केलेल्या आहेत.

प्रत्यक्षात करावे तसे भरावे ही बाळबोध संकल्पना आहे. जंगलातला सिंह हरणाला मारून खातो, म्हणून त्याला कुणी मारून खात नाही, किंवा या पापामुळे तो हाल हाल होऊन मरतो असलं काही घडत नाही. कारण सिंहाला गिल्ट नसतो.

माणसाला त्याचा गिल्ट मारतो. कुरतडतो. आणि तो खंगून मरतो. दोन हजार माणसांना मारूनही, किंवा दरोडा घालूनही गिल्ट नसेल, तर त्या व्यक्तीला असल्या कोणत्याही संकल्पनांमुळे वाईट आयुष्य किंवा वाईट मरण येत नसतं. वाल्या कोळ्यालाही त्या वाटसरूने गिल्ट दिला. पापाचा. म्हणून त्याने चोरी सोडली. अन्यथा काही कारण नव्हते. (तो चोरच राहिला असता, तर बरं होतं. हे रामायण आपल्या माथी मारले गेले नसते.ते वेगळं.😄)
अनेक गुन्हेगार लोक पापभीरू माणसाहून चांगले आयुष्य जगत असतात. (आणि त्यांचं चांगलं आयुष्य पाहून इतर जळत असतात, चीडत असतात😂
हा गिल्ट आणण्याचं काम धार्मिक कल्पना करतात. पाप-पुण्य, नीती-अनीती, स्वर्ग-नरक इत्यादी. आणि शेकडा नव्वद टक्के तरी लोक त्याला बळी पडून माणुसकीने वागण्याचा प्रयत्न करतात.
लोक भिकाऱ्याला भीक देतात, संस्थांना दान देतात तेही या गिल्टमधूनच. आपण पैसा कमवलाय म्हणजे काहीतरी वाईट केलंय, आणि याला त्यातला काही वाटा दिला नाही, तर उद्या त्याची हाय लागून आपल्यावरही याच्यासारखी पाळी येईल हा गिल्ट माणसाला घाबरवतो. आणि तो शेअरींग करू लागतो. करुणा वगैरे भावना देखील संताबिंतांनी प्रवचनांतून सातत्याने जागृत केलेल्या भावना आहेत. त्या उपजतच सगळ्यांमध्ये असतात असं नाही.
ही भावना इतकी प्रबळ आहे, की माझ्या ओळखीत काही लोक असे आहेत, जे सर्रास काळा पैसा कमवतात आणि अमुक इतकं दान केलं की पाप राहात नाही असं मानतात.😆😆इतके पापभीरू लोक असल्यामुळेच माणसातल्या दुर्बल जमातीही टिकून राहतात.
मार्क्सवाद हा अतिरेकी धर्म आहे. तो सिंहालाही उंदीर करू पाहतो. कारण उंदरांना नीट जगता यावं. तो उंदराला सिंह बनवत नाही. कारण ते शक्य नसतं. सिंहाला गिल्ट देऊन उंदीर करता येईल. उंदराला सिंह कसं बनवणार?
हाच गिल्ट स्त्रियांना दिला जातो. प्रत्यक्षात देहविक्रय करणाऱ्या (वेश्याच नव्हे, तर मॉडेल्स, अभिनेत्री इत्यादी हाय प्रोफाईल स्त्रिया, ज्या आपल्या दैहीक माध्यमातूनच पैसा कमवतात.) अशा हाय प्रोफाईल स्त्रिया अधिक स्वतंत्र, अधिक चांगले आयुष्य जगत असतात. जगू शकतात. परंतु इतर (वड पुजणाऱ्या) स्त्रियांना त्याचा गिल्ट देण्यात येतो. पावित्र्य-चारित्र्य इत्यादी. आणि त्या हाच गिल्ट आयुष्यभर बाळगून दैहीक एकनिष्ठता, योनिशुचिता, पडदा इत्यादीलाच चारित्र्य मानून मन मारून जगत असतात. कारण यात पितृप्रधान समाजाचा स्वार्थ असतो.
एकपत्नी वा एकपती हा नियम देखील खोल विचार करता, समाजातील प्रत्येकाला किमान एकतरी जोडीदार मिळावा यासाठीच केलेला दिसेल. अन्यथा जे बलवान पुरुष असतील (सत्ता, संपत्ती, बळ इत्यादी सर्व असलेले) तेच अधिकाधिक बायका मिळवतील आणि समाजातील दुर्बळ पुरुष लग्नाविना (किंवा जोडीदाराविना) राहून जातील. व्हाईस वर्सा ज्या सुंदर, उपजाऊ, स्त्रिया असतील, त्यांनाच अधिक आणि चांगले पुरुष मिळतील आणि बाकीच्या राहून जातील. पण हा नियम देखील पूर्वी चारित्र्याच्या नावावर तर आता कायद्याच्या जोरावर गिल्ट देऊनच अधिक राबवला जातो.
हा गिल्ट दुधारी शस्त्र आहे. तो योग्य प्रमाणात असेल, तर त्यातून माणूस घडतो. अती झाला तर खंगतो, मन मारून अनैसर्गिक जगतो आणि अजिबात नसला, तर तो माणूसकीला, मानवी समाजाला घातक ठरतो. मानवी समाजात पुरुषापेक्षा स्त्रियांना अधिक गिल्ट देण्यात येतात. सर्व सामान्य पुरुषाला दिलेले गिल्ट तर यात येतातच. शिवाय स्त्री असल्याचे अनेक इतर गिल्टही हेतूपुरस्सर देऊन ठेवलेले असतात.

-अलका गांधी-असेरकर

Jun 20, 2020

योगाला पर्याय नाही - २

योगपरिचय -

योग आणि व्यायाम यात फरक -

योग असो वा व्यायाम, आधी तर तुम्हाला फिटनेसची आवड हवी. आपलं स्वतःवर प्रेम हवं. prevention is better than cure या उक्तीवर विश्वास हवा. हे जात्याच नसेल, तर जबरदस्तीने किंवा तात्पुरतं यातील काहीही केल्याने एक परसेंटही फायदा होणार नाही. 
तहान लागली म्हणून विहीर खणायला घेत नसतात, तद्वतच काहीतरी आजार झाला, समस्या झाली म्हणून लगेच योग किंवा व्यायाम यापैकी काहीही केल्याने लगेच फायदा मिळणार नसतो. तरीदेखील काही किरकोळ आजार, उदा. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादींवर योगाने त्वरीत आराम मिळतोही अनेकदा. 
परंतु योग असो वा व्यायाम यांना आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या आन्हीकांप्रमाणे किंवा दिनचर्येप्रमाणे स्थान दिले तरच तुम्हाला त्याचा सर्वांगीण फायदा मिळू शकतो. 
थोडक्यात 'तुरंत दान महापुण्य' असे हे प्रकार नाहीत. 

दोन्हीतला फरक जाणून घेण्याआधी आपण दोन्हीचे महत्त्व पाहू या. 
योग आणि व्यायाम या दोन्ही संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. मात्र त्यातील साम्य बघितलं तर ते एकच आहे ते म्हणजे दोन्हींची आपल्या जीवनात नितांत गरज आहे. योग केला म्हणजे व्यायामाची गरज नाही असं नाही, आणि व्यायाम केला म्हणजे योग करण्याची गरज नाही असंही नाही. दोन्ही आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या पण आरोग्यासाठीच फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. 

योग, व्यायाम, चालणं आणि प्राणायाम या चारी गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि चारी आपापल्या जागी महत्त्वाच्या आणि फायदेशीर आहेत. त्यामुळे या चारी गोष्टींचा आपल्या दिनचर्येत सहभाग हवा. यासाठी दिवसभरातून आपल्या सोयीने कमीत कमी एक ते सव्वा तास काढला तरी पुरेसा ठरतो. मात्र ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळात करू नये. सकाळी योग आणि प्राणायाम तर संध्याकाळी चालणँ आणि व्यायाम असं अर्धा अर्धा तास विभागणी करू शकतो. 

योग आणि व्यायाम यातील फरक -

१. योग केल्याने शरीरातील स्नायू लवचिक होतात. तर व्यायामाने ते स्नायू मजबूत होतात. 

२. योगाने चपळता वाढते, तर व्यायामाने स्टॅमिना वाढतो. 

३. योग शरीराबरोबरच मनस्वास्थ्यही देते. किंबहुना योग मनस्वास्थ्यावरच अधिक भर देतो. तर व्यायामाचा आणि मनस्वास्थ्याचा तसा काही थेट संबंध नसतो. 

४. योग करत असताना मन एकाग्र करण्यावर अधिक भर असतो. तर व्यायाम करताना आपलं शरीर सगळ्या हालचाली करत असतं, पण तेव्हा मन स्थिर असेलच असं नाही. व्यायाम शिकवणारे देखील तुम्हाला मन केंद्रित करा असं सांगत नाहीत सहसा. त्यामुळे तुम्ही एका बाजूला वेट ट्रेनिंग करत असाल मात्र मन तेव्हा सैरभैर इकडे तिकडे फिरत असेल. त्यामुळे तुमचे ताणतणाव, अस्वस्थता हे तसेच राहतील.

५. योग हा संथ, सावकाश आणि स्थिर प्रकार आहे. तर व्यायाम हा जलदगती आणि न थांबता करण्याचा प्रकार आहे. 

६. योग करताना मध्ये मध्ये विश्रांती आवश्यक असते. शरीराला पूर्ण विश्रांती देऊनच दुसरं, पुढचं योगासन केलं जातं. व्यायामात मात्र मध्ये अशी विश्रांती फारशी घेतली जात नाही. एकदा का शरीर वॉर्म अप झालं की एका मागोमाग एक व्यायाम जलदगतीने केले जातात.

७. संथ आणि स्थिर गतीने केल्यामुळे योग हा प्रकार दुर्बल, वृद्ध, आजारी, स्त्रिया अशा सगळ्या व्यक्ती करू शकतात. नव्याने शिकू शकतात. मात्र व्यायाम करताना दुर्बल, वृद्ध, स्त्रिया, आजारी यांच्यावर बंधनं येतात. त्यांना सगळ्यांना व्यायाम झेपेलच असं नाही. योग मात्र लहान मुलं सोडल्यास कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. अगदी ऐंशीच्या घरातील व्यक्तीही योग शिकू शकतात. अर्थात त्यांनी करण्याचे वा नव्याने शिकण्याचे प्रकार वेगळे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असतात.

योगदर्शनात श्लोकच आहे - 
युवावृद्धोतीवृद्धो वा, व्याधितो दुर्बलोsपि वा |
अभ्यासात्सिदधिमाप्नोती सर्वयोगेष्वतंद्रितः || 

म्हणजेच, तरुण, वृद्ध, अतीवृद्ध, व्याधीग्रस्त, दुर्बल असे सर्व लोक प्रयत्नांनी योग साध्य करू शकतात असे 'हठप्रदिपिका' या योगसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या ग्रंथात स्पष्ट सांगितलेले आहे. 

८. योग हा शब्द 'युज्' या धातूपासून आलेला आहे. युज् म्हणजे जोडणे. योग जोडण्याचे काम करतो. हे मूळ जोडणे आत्म्याशी परमात्म्याला स्वरुपातले आहे. अर्थात त्यासाठी आधी माणसाने माणसाशी जोडून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग माणसामाणसाला जवळ आणतो. व्यायामात तसा काही हेतू नसतो. उलट स्नायू बलवान झाले की अहंकार आणि इतरांवर ताकदीचे प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते. 

९. व्यायाम केल्यानंतर थकवा येतो. आरामाची गरज भासते. तर योग केल्यानंतर थकवा न येता अजून ताजेतवाने वाटते. योग केल्यानंतर आरामाची गरज नसते. तुम्ही लगेच आपल्या कामाला लागू शकता.

वरील फरकातून व्यायामाला कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही. मी वरती आधीच सांगितलेले आहे, की व्यायामही शरीराला तितकाच गरजेचा आहे. मात्र व्यायाम आणि योग हे दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत, दोन्हीचे फायदे वेगळे आहेत. हे समजून घ्यायला हवे. 

अर्थात योग असो वा व्यायाम, या दोन्ही गोष्टी दैनंदिन जीवनात जीवनावश्यक गोष्टी म्हणून त्यांचा कायमसाठी स्वीकार केल्यासच निरामय जीवनाचा आनंद मिळू शकतो. या कधीतरी सवडीने करण्याच्या गोष्टी नव्हेत.

तरीदेखील मनुष्यस्वभाव म्हटल्यावर आपल्याला या गोष्टींचा आळस येतोच. कंटाळा येतो. आज नको उद्या करू असेही होते. मानवी प्रवृत्ती पाहता ही गोष्ट अशी नाहीच, की एकदम उत्साह येईल आणि आपण ती करायला सदैव तयार असू. त्यासाठी मानसिक तयारी करत राहावी लागते. मनाला बजावत राहावं लागतं. हे नाही केलं तर शरीर लवकर साथ सोडू लागेल हे चित्र डोळयासमोर येत राहायला हवं. आज उठता बसताना त्रास होतोय, उद्या चालायला होईल, परवा अंथरुण धरून बसावं लागेल. असे चित्र (ज्यात बऱ्यापैकी वास्तवही आहेच) डोळ्यासमोर आणले की लगेच आपण मॅट टाकून तयारी करतो हा माझा स्वानुभव आहे. आज तर चाळीशीतच लोकांना अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. 
त्यामुळे या आळसावर आणि नकारात्मकतेवर प्रत्येकाने आपापल्या परीने उपाय शोधून काढायचा आहे.

काही गोष्टी मी सुचवते. त्या केल्यास बऱ्यापैकी खंड न पडता या गोष्टी केल्या जातात.

उदा. 
  • सकाळी उठल्यापासूनच मनाला एकदोनदा बजावून ठेवायचे की सकाळी (किंवा संध्याकाळी, सोयीनुसार) व्यायाम/योग करायचा आहे. 
  • दोन तीन वेळा जाता येता घरातल्यांशी बोलायचे, 'अजून योग/व्यायाम राहिलाय. करायचाय.'
  • योग मॅट/सतरंजी जे असेल ते टाकून ठेवायचे. ते जाता येता दिसल्याने सवड झाली की लगेच करण्याची इच्छा होते. 
  • एखाद दिवस खंड पडल्यास दुसऱ्या दिवशी मनाला बजावायचे. काल राहिलं, आज चालणार नाही. करायलाच हवं.
  • कधी वेळ कमी असेल, तर रोजची सगळी आसने किंवा प्रकार न करता मोजकेच काही प्रकार का होईना पण करून घ्यायचे. संपूर्ण सुट्टी मारायची नाही. 
अशाप्रकारे मानसिक तयारी केली तर आठवड्यातून चार दिवस तरी व्यायाम/योग हे केले जातातच. ते केले नाही तर अस्वस्थ वाटेल त्या दिवशी आपण जिंकलो असं समजायचं. योग/व्यायाम यांच्यावर प्रेम बसलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रेमाची व्यक्ती क्षणभरही आपल्या मनातून दूर होत नाही, तसंच हे प्रकार आपल्या मनात ठाण मांडून बसले पाहिजेत. किंवा ज्याप्रमाणे बीपीची गोळी एकदा लागली की आयुष्यभर नाईलाजाने, आठवणीने घेत राहावी लागते. सोडून चालत नाही, त्याचप्रमाणे एकदा योग स्वीकारला की तो सोडायचा नाही असे ठरवून टाकले की होतेच. बाय द वे, योगसाधनेने बीपी शंभर टक्के बरा होतो आणि बीपीची गोळी सुटते. डायबेटीस कंट्रोल मध्ये राहतो. दम्याच्या विकारात आराम मिळतो, थायरॉईड बरा होतो. थायरॉईडची गोळीही सुटते. हे सत्य आहे. 
त्यामुळे स्वतः योग करा आणि स्वतः त्याची प्रचिती घ्या. 

हे बिनपैशाचे औषध आहे. सुखी निरामय जीवनासाठी. व्यायामासाठी तरी जिम लागते, जिमचे पैसे भरावे लागतात मात्र योगसाधनेसाठी लागते ती फक्त एक मॅट किंवा सतरंजी आणि थोडा आपला वेळ. बाकी पाच पैसेही लागत नाहीत.

जिस को खुद से हो प्यार... वो योग से कैसे करे इन्कार...?


Jun 19, 2020

योगाला पर्याय नाही.


योगपरिचय - थोडक्यात.

आपण भारतीयांना योग हा शब्द सुपरिचित असतो. साधारण गेल्या वीसेक वर्षांपासून तर योग हा शब्द अगदी सर्वसामान्यांनाही माहीत झालेला आहे. आणि त्याला कारणीभूत म्हणजे रामदेवबाबांसारखे काही योगप्रचारक.
रामदेवबाबांच्या कार्याबाबत मतभेद असले, तरी त्यांनी योग हा घरोघरी पोचवला हे त्यांचे मोठे कार्य  आहे यात दुमत नाही. 
तोपर्यंत योगसाधना म्हणजे कुणी ऋषीमुनी, साधक, तापसी यांनीच करायची गोष्ट अशी समजूत असायची. 
आजही आणि अजूनही योग म्हणजे फार कठीण गोष्ट, ते आपलं काम नव्हे असे म्हणून हात झटकणारे लोकच अधिक पहावयास मिळतात.
 
त्याला कारणही तसेच होते. पूर्वी योग म्हणजे साधक, तपस्वी, ऋषी-मुनी यांनी करण्याचीच गोष्ट होती. 
याला कारण म्हणजे, योग हा मोक्षप्राप्तीकडे नेणारा मार्ग म्हणूनच त्याची आध्यात्मिक ओळख होती. त्याच हेतूने योग शिकला जायचा. आणि त्यासाठी संसाराकडे दुर्लक्ष करणे किंवा संसाराच्या भानगडीतच न पडणे, दूर हिमालयात किंवा जंगलात कुठेतरी एकांतवासात जाऊन गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करणे आणि त्यातून खडतर तपश्चर्या करत मोक्षाची आस लावून बसणे हाच योगाचा हेतू असायचा. त्यामुळे अजूनही लोकांचा तसा ग्रह असल्यास नवल नाही. 
मात्र आता विज्ञानयुगात तसे फारसे राहिलेले नाही. म्हणजे हिमालयात योगसाधना, तपश्चर्या करणारे साधूमुनी अजूनही बरेच आहेत. पण याचा अर्थ असा नाही की योग ही फक्त मोक्षाच्याच हेतूने करण्याची साधना आहे.
उलट आता विज्ञानयुगात योगविद्येकडे वेगळ्या, आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जात आहे. आणि या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांना रोजचे आयुष्य सुखकारक करण्यासाठी केला जात आहे.  लोक अधिकाधिक योगविद्येकडे वळू लागले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर याचा प्रसार आणि अंगीकार मोठ्या जोरात चालू आहे. 

-----

मोक्ष, अध्यात्म, साधना इत्यादी जडजंबाल हेतूकडून योग सर्वसामान्यांकडे कसा आला?

वर सांगितल्याप्रमाणे हे खरंच आहे, की योगमार्ग हा मोक्षाचा, आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रवास करणारा मार्ग म्हणून भारतीय दर्शनशास्त्रात महत्त्वाचा होता. मात्र या प्रवासात योगाचा मधला टप्पा जो येतो, तो मानवी शरीराला निरोगी, सुडौल, चपळ, तरतरीत ठेवणारा आहे. एवढेच नव्हे, तर शरीराच्या जोडीला मनालाही स्वास्थ्य़ मिळवून देणारा आहे. मोक्षाच्या दिशेने वाटचाल ही मनावर नियंत्रण ठेवण्यापासून सुरू होते. आणि मोक्ष हा जरी हेतू नाही ठेवला तरी आताच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या, स्पर्धेच्या युगात मनावर नियंत्रण हेच अधिक महत्त्वाचे झालेले आहे. 
आपण पाहतोय, की आज मानसोपचारतज्ज्ञांची गरज समाजात किती निर्माण झाली आहे ते? आणि हा मार्गही माणसाला पूर्ण मानसिक शांतता देऊ शकत नाही. गोळ्या औषधे, काऊन्सिलिंग इत्यादींनी तात्पुरते बरे वाटते. मात्र मनाचे स्वास्थ्य पूर्ण मिळत नाहीच. 
म्हणूनच योग आणि प्राणायाम हे शिकून घेऊन प्रत्येक व्यक्ती आपली आपण मनावर नियंत्रण ठेवायला आपोआप शिकू लागते. आणि ताणतणावांपासून मुक्त होते इतकंच नव्हे, तर चांगलं सुदृढ आयुष्य जगू लागते. आपल्याला ठाऊकच आहे, की बहुतेक शारीरिक व्याधी या आपल्या मनस्वास्थ्याशी निगडीत असतात. उदा. नव्या युगातील डायबेटीस, बीपी, कॉलेस्ट्रोल, थायरॉईड, कॅन्सर इत्यादीसारखे अनेक जीवघेणे आजार हे थेट आपल्या मनाशी, मानसिक ताणतणावांशी निगडीत आहेत. आधुनिक औषधांनीही ते नियंत्रणात राहतात मात्र पूर्ण बरे होत नाहीत. अशावेळी योग हाच एकमेव मार्ग तुम्हाला यातून सुटका मिळवून देऊ शकतो. अर्थात हे आजार होण्याआधीच ते होऊ नयेत म्हणून वेळीच योगमार्ग स्वीकारा आणि अशा आजारांना दूर ठेवा.

योगाचा हा शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळवून देणारा टप्पाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण तेवढ्यापुरताच त्याचा विचार करायचा आहे. म्हणूनच यात देव, धर्म, श्रद्धा, आस्तिकता इत्यादी काहीही मध्ये न आणता सर्व जातीधर्मातल्या लोकांनी योगविद्येची कास धरायला हवी. 

----

योगाबद्दलचे गैरसमज -
आपण योगासने बघतो, ती तज्ज्ञांनी केलेली. यु ट्यूब, इतर कार्यक्रम यांतून आपण अवघड अवघड आसनं करणाऱ्या व्यक्ती पाहतो आणि आपण घाबरतो. हे आपल्याला जमणार नाही असे आपण मनाशीच ठरवतो. आणि योगविद्येबद्दल अनेक गैरसमज मनाशी बाळगून बसतो.

१. योग म्हटले की काहीतरी अवघड काम, शरीराला त्रास, शरीराला वेडेवाकडे वळवणे असा समज अनेकांचा असतो.
 (योग हे सोप्याकडून अवघडाकडे नेणारे शास्त्र आहे. सुरूवातीला अगदी सोपी सोपी आसने शिकवली जातात. ज्याप्रमाणे लहान बालकाला आधी पहिलीत घातले जाते. मग हळू हळू अभ्यास, मेहनत, परीक्षा याने तो पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पोचतो. तसंच यातही आहे. आणि आपल्याला योग्य तेवढेच, आणि तितकेच यातून हवं ते घेऊ शकतो. ज्याप्रमाणे सगळे विद्यार्थी सायन्स, कॉमर्स आर्ट्स ह्या सगळ्या शाखातले ज्ञान घेत नाहीत. आणि सगळेच उच्चशिक्षणापर्यंत पोचत नाहीत. गरजेपुरतंच घेतात. तसंच यातही आपल्या गरजेपुरती आसनं शिकून त्याचाच सराव करू शकतो आणि स्वतःला फिट ठेवू शकतो. योग हा एक मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. सागर आहे. त्यातच मास्टरी करायची म्हटली तरी एक जन्म पुरणार नाही. पण म्हणून आपल्याला ते सगळंच करायचं आहे असं नाही. आपल्याला फक्त आपल्या गरजेपुरतं पाणी त्यातून शेंदून घ्यायचं आहे.)

२. योग म्हटलं की बारीक, तरुण, सडसडीत लोकांचे काम, आपल्यासारख्या जाड्या लोकांचे, वय झालेल्यांचे ते काम नाही असे वाटणे.
 (कोणत्याही वयातली व्यक्ती आणि कितीही वजन असलेली व्यक्ती योग करू शकते. अगदी लहान मुले आणि गरोदर स्त्रिया, नुकतेच ऑपरेशन झालेल्या, आजारातून उठलेल्या व्यक्ती या सोडून बाकी अगदी ८० वर्षांची व्यक्तीही नव्याने योग शिकायला सुरूवात करू शकते.)

३. योग म्हणजे संसार सोडून, विरागी भाव अंगीकारणे असा एक गैरसमज. 
(आज तर संसारी माणसालाच योगविद्येची गरज अधिक आहे.)

४. योग म्हणजे खाण्यापिण्यावर बंधने, चमचमीत खाणंपिणं सोडून द्यावं लागणार असा एक गैरसमज.
(योग खाण्यापिण्यावर बंधने घालत नाही. तुम्हाला जर काही आजार नसतील, आणि त्या आजाराची पथ्य नसतील, तर योग हे खाऊ नका, ते खाऊ नका असलं काहीही सांगत नाही. अर्थात तुम्ही स्वतः होऊनच जर योग्य आहारविहार जपलात तर योगाचे फायदे अधिक मिळतील एवढंच.)

५. योग म्हणजे दूर कुठेतरी एकांतात राहून साधना करणे हा एक गैरसमज.
 (एक रुमच्या घरातही तुम्ही नित्यनेमाने योग करू शकता. 

६. योग म्हणजे खूप वेळ दयायला हवा, नोकरी व्यवसाय करणाऱ्या, मुलंबाळात व्यस्त असणाऱ्या गृहस्थी लोकांना वेळ कसा मिळणार असा एक गैरसमज बाळगणे.
(असा विचार केला तर आंघोळ, ब्रश करणे, आन्हिके उरकणे, घरातली साफसफाई करणे, शांतपणे बसून जेवणे ह्यातलेही काही करायला नको. हे सगळं जितकं महत्त्वाचं आणि दैनंदिन आहे तितका नि तेवढाच वेळ दैनंदिन योगाला दिला की झालं. त्यासाठी तासंतास काढायची गरज नाही.)

७. योगासाठी अमुकच प्रकारचे कपडे घालावे लागणार असं वाटणे.
 (अगदी साडीतही योग केला जाऊ शकतो.)

८. योग म्हणजे वजन कमी करण्याचा मार्ग - ( हा त्याचा एक परिणाम असू शकतो. मात्र वजन कमी करण्यासाठी योगविद्येचा उपयोग थेट आणि त्वरीत होत नाही.)

आज एवढं पुरे. पुढच्या लेखात भारतातील योगविद्येचा इतिहास, मागोवा, त्यांचे कर्ते, ग्रंथ इत्यादींचा थोडक्यात आढावा घेऊ. 
आणि त्याच्या पुढच्या लेखात योग आणि व्यायाम यातील फरक समजावून घेऊ.
आणि त्यापुढील लेखात भारतात योगविद्या शिकवणाऱ्या संस्था आणि वर्ग यांच्याबद्दल जुजबी माहीत घेऊ.

अलका गांधी-असेरकर.


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...