Oct 30, 2022

खंती...!

कॉमन गॅलरी असलेल्या मुंबईतील एका चाळीतल्या गॅलरीच्या कठड्याला टेकून ती खाली बसली होती. तिथून कठड्याच्या जाळीतून खालचा वाहता रस्ता दिसत होता. दूपारपासून ती त्या रस्त्याकडे अगदी डोळ्यांत प्राण आणून भाईची वाट पाहात होती. शेकडो माणसं जात होती नि येत होती त्या रस्त्यावर. पण भाई काही येताना दिसत नव्हता. 
ती आज मुंबईला येणार हे भाईला कळवलं होतं. तो तिला तिथे घ्यायला येणार होता. 
मुंबईला यायचं तर एका दूरच्या चुलत काकांकडे. दूरचे असले, तरी बऱ्यापैकी चांगले संबंध होते. मुंबईला अनेक कारणांनी यावं लागायचं. लग्नप्रसंग, अहमदाबादला जाताना वाटेवरचा थांबा म्हणून, स्थळं बघायला आणि बरीच कारणे...

भाईचंही लग्न व्हायचं होतं अजून. त्यामुळे तोही स्थिरावलेला नव्हता. कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून, किंवा मित्र मित्र असे राहत होते. मुंबईला आलं की भाई त्या काकांकडे सोडून यायचा. तिथे रोज भेटायला यायचा. आला की फिरायला न्यायचा, सिनेमाला न्यायचा. भरपूर गप्पा मारायचा. नवनवीन माहिती सांगायचा. क्वचित काही खरेदीला. कारण  त्याच्याकडेही खरेदी वगैरे करण्याइतके पैसे नसायचे. 

सकाळपासून वाट पाहूनही भाई आला नव्हता. मुंबईला येताना बहुतेकवेळा ती एकटीच यायची सरळ त्या काकांकडे. परंतु कधी कधी कुणा नातेवाईकांसोबत यायचं झालं तर आधी त्यांच्या सोबत ते जिथे जातील तिथे उतरावं लागायचं. तिथे भाई घ्यायला यायचा नि काकांकडे घेऊन जायचा. यावेळीही असंच झालं होतं. एका दूरच्या मावशीसोबत आली होती ती. ती मावशी देखील आपल्या मुंबईच्या भावाकडे, भावाच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून आली होती. तिच्याबरोबर ही आली होती. 

आता झालं असं होतं, की लग्नघरी ती अनाहूत पाहुणी झाली होती. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न घर, तेही चाळीतलं त्यामुळे दोन खणांच्या त्या खोलीत फार गर्दी, वेगवेगळे हळद मेहंदीसारखे काहीबाही विधी चालू होते. सगळं घर लग्नाच्या रेशीम कपड्यांत सळसळत होतं. दागिन्यांनी चमकत होतं. घर म्हणायला चाळीतलं होतं, तरी ते व्यापारी माणसाचं घर होतं. बऱ्यापैकी सधन मंडळी होती.मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे चाळीतली घरंही धरून राहणारी माणसं तेव्हा होती. चाळीत राहत असली तरी सहज लखपती करोडपती असायचे. 

मात्र हिच्याजवळ लग्नाचे जाऊच दे. साधेही कपडे नव्हते जरा चांगले म्हणावे असे. साधीशी मॅक्सी अंगावर होती. एक दोन स्कर्ट ब्लाऊज. आईने एक कॉटन साडी दिली होती. कधी वेळ पडली तर आईची साडी नेसायची ती. तेव्हा अठरा विशीच्या वयात मुली साडी सर्रास नेसत. पण आईने दिलेली ती कॉटनची साडीही नवीन असली तरी अगदीच साधी होती. लग्नात नेसायसारखी अजिबातच नव्हती. दागिने वगैरे तर दूरच. 

खेड्यावर कुठे काही आर्टीफिशिअल ज्वेलरी सुद्धा मिळत होती तेव्हा?

'भाई अजून का येत नाही?' ती फार  वैतागली होती. 

त्या घरातल्या कुणीही मुली, स्त्रिया तिच्याशी फार बोलत नव्हत्या. कुणाचं तिच्याकडे फार लक्षही नव्हतं. जो तो लगीनघाईत होता. तिला मात्र फार कानकोंड्यासारखं झालं होतं. 'रात्री तरी येईल उशीरा भाई, काम आटपून.' असं वाटत होतं तिला. या घरातून तिला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. बरं एकटं निघून जावं, तर भाई इकडे यायचा. चुकामूक व्हायची शक्यता. मावशीही जाऊ देत नव्हती.

'तुला काय घाई आहे? थांब. उद्या लग्न आहे. ते करून जा. भाई तिथेच येईल तुझा.'


तिला कशी सांगू माझी कुचंबणा?
थांबलं की दुसऱ्या दिवशी सकाळच्या लग्नात सामील व्हावं लागणार होतं. अनेक दूरदूरचे आणि जवळचेही नातेवाईक तिथे दिसणार होते, भेटणार होते. आणि लग्नात नेसण्यासारखा एकही कपडा अंगावर नव्हता. जवळ नव्हता. ना ड्रेस होता, ना साडी होती. ना दागिने होते.
आधीच लग्न वगैरेसारखे सोहळे, त्यातील ती गर्दी, निरर्थक हाहाहीहीहूहू, हे तिला नेहमीच कंटाळवाणं फार वाटायचं. ती आपल्या आपल्यातच असायची. सदैव डोक्यात विचारचक्रं सुरू असायची. काही भेदभाव तर तेव्हापासून ठळक जाणवायचे. लग्नात केलं जाणारं संपत्तीचं प्रदर्शन उबग आणायचं. आपल्या हिनपणाची जाणीव अधिकच व्हायची.

फार राग येत होता मनात भाईचा. 
रस्ता पाहून पाहून डोळे दुखले. इतकी वाट त्यानंतर आयुष्यात तिने कधी कुणाची पाहिली नसेल, तितकी वाट पाहिली भाईची त्या दिवशी. फार परावलंबी झाल्यासारखं वाटू लागलं होतं.

पण भाई नाहीच आला. रात्र झाली. त्या दिड खणाच्या खोलीत रात्री झोपायलाही जागा नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी हॉलवर निघायच्या तयारीत सारं घर रात्रभर जागं होतं. लाईटच्या प्रकाशात आणि आवाजांत झोपही येत नव्हती. दिवसभराचा एसटीचा प्रवास. थकलेपण. चीडचीड होत होती.

सकाळ झाली आणि सगळी प्रमुख मंडळी पटापट आंघोळी आवरून हॉलवर जायला रवाना होऊ लागली. मावशी अजून थांबली होती. कुणीतरी आपल्याला एखादी बऱ्यापैकी साडी नेसायला द्यावी असं चक्क वाटू लागलं होतं. मावशीला विचारलं.

 
'मावशी, तुझ्याजवळ एखादी साडी असेल तर दे मला नेसायला. मी तर काही आणलं नाही. काय नेसू?'


 मावशीजवळही काही नव्हतं फारसं. ती म्हणजे उघड्यापाशी दिगडं गेलं अशीच दोघींची परिस्थिती होती. त्यामुळे त्या लग्न घरी तिचे स्वागतही काही फार जोमाचे नव्हतेच. फक्त ती नवऱ्या मुलीची सख्खी आत्या होती. त्या घरातली एक तरूण सून फक्त कालपासून प्रेमाने थोडंतरी तिच्याशी बोलत होती. तिने सकाळी हॉलवर जाताना आपली आधीची साडी बदलून ती वरच्या दांडीवर टाकून दिली होती. ती साडी साधीच, प्लेन पण जॉर्जेटची होती. तिला जरीचे काठ होेते. हिची नजर सारखी त्या साडीकडे जात होती. 'सांगावं का तिला, मी नेसू का ती साडी म्हणून?' पण जीभ उचलत नव्हती. फार लाजिरवाणं वाटत होतं. 


सगळे निघून गेल्यावर मावशी म्हणाली, 'आटप, आंघोळ कर तूही आता. आपणही जाऊ या हॉलवर.' ती उठली. नाईलाजाने बॅग उघडून आईने दिलेली राणी कलरची प्लेन, निळ्या रंगाचे काठ असलेली सुती साडी काढून आंघोळ करून ती नेसली.
फार लाज वाटत होती. लग्नात अशी साडी कोण नेसतं? कामवाल्या बाईसारखं वाटू लागलं होतं तिला.  सगळ्यांच्या अंगावर भरजरी साड्या, दागिने होते. तिथून पळून जावं असं वाटत होतं. लग्न लागल्यानंतरही फार उशीरा भाई आला. थेट हॉलवर. त्याला काही कपड्या बिपड्याचं पडलं नव्हतं. असंही पुरुषांच्या कपड्यांकडे कोण पाहतं?  त्याला तिथून निघायची घाई नव्हती. 

'थांब गं, आता मस्त जेवूनच जाऊ. सगळ्यांना भेटून जाऊ.' तो सगळ्यांशी मस्त गप्पा मारत होता. लोकही त्याच्याशी बोलत होते. तो बोलका होता. आत्मविश्वास दांडगा होता त्याच्याजवळ. नातेवाईकांमध्ये लोकप्रिय होता. देखणा आणि बोलण्यात चतुर असल्याने (शिवाय होतकरू लग्नाळू मुलगाही असल्याने...) सगळे त्याला समोर होऊन बोलत होते. पण तिच्याकडे ढुंकून बघत नव्हते. 
---
किती वर्षे झाली या गोष्टीला..!
ती दांडीवरची साडी, आणि ती अंगावरची साडी...! दोन्ही तिच्या नजरेसमोर तरळू लागल्या.

 तिला अगदी रंग,पोतासह लख्ख आठवतात अजूनही त्या दोन साड्या. डोळ्यांसमोर दिसू लागतात. तारुण्याची उमेदीची वर्षे असताना मैत्रिणी, चुलत- मावस- मामे बहिणी यांचे विविध प्रकारचे कपडे, प्रसंगानुसार वेगवेगळे पाहून फार वाईट वाटायचं. लग्नादी प्रसंगात लाजिरवाणं वाटाचयं. मिटल्यासारखं व्हायचं. क्वचित चार पैसे हातात असले, तरी खरेदीची अक्कल नव्हती. नेमकं काय घ्यायचं? कुठून घ्यायचं? ते कळायचं नाही. कळलं तर खरेदीला सोबत कुणी असायचं नाही. शिवाय दागिन्यांची, खाण्यापिण्याची नव्हती, पण कपड्यांची फार आवड होती.
 
आज दहा वीस हजाराची साडी घ्यायची म्हटलं तरी पटकन घेऊ शकण्याइतकी ऐपत आली. पण ती उमेदीची, तारूण्यात मिरवण्याची वर्षे निघून गेली. त्यामुळे आता घेतली तरी दहा हजाराच्या साडीचं कौतुक काही वाटत तर नाहीच, पण आज  पैशाची नसली तरी, अगदी साधे कपडे नेसूनही टेचात कोणत्याही प्रसंगात कुणाच्याही घरी जाण्याइतकी वैचारिक श्रीमंती वाढली. 

तरी सुद्धा ... त्या त्या वयाच्या गरजा असतात.. मानसिकही आणि शारिरीकही. आणि वय असतं परावलंबी.
आणि हो! गरिबी आणि लाचारी ही कुठल्या जातीची मक्तेदारी नसते. ती सगळीकडे असते.

- अलका गांधी-असेरकर




Oct 17, 2022

सौ. मंगळसूत्र साडी इत्यादी....

 सौ. लावणे, मंगळसूत्र घालणे, साडी नेसणे, सण-वार पाळणे...

फेमिनिझममध्ये हे सगळं मागास समजले जाते. ते योग्यही आहे. त्यासाठी कधीतरी टोचेल असं बोलून स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न जरूर करावा. परंतु प्रत्येक स्त्री ही बदलाच्या कुठल्या ना कुठल्या पायरीवर असते. सगळ्याच स्त्रियांना एकाच वेळी हे सगळं त्यागून बंधमुक्त होणं कठीण आहे.

 
साधं पोशाखाचं बंधन देखील स्त्रियांना त्यागणं फार कठीण होतं. ब्रिटीशांचं पाहून शंभर वर्षांपूर्वीच पुरुषांनी धोतरं सोडून पॅंटी चढवल्या. मात्र स्त्रियांना नऊवारीतून पॅंन्टीत नि पॅन्टीतून हाफ पॅन्टीत यायला तब्बल सहा पिढ्या लागल्या...नऊवारीला पाचवारीसाठी संघर्ष करावा लागला. टोमणे ऐकावे लागले. पाचवारीला सलवार कमीजसाठी तेच करावं लागलं. सलवारीला पॅन्टसाठी संघर्ष करावा लागला नि पॅन्टवालीला गुडघ्यापर्यंतचा प्रवास करायला एक पिढी लागली. म्हणूनच आजही समाजात एकाच वेळी एकाच शहरात स्त्रिया अजून नऊवारी ते हाफ पॅन्ट या सर्व प्रकारच्या कपड्यांत दिसत असतात... मात्र धोतरवाले पुरुष फार म्हणजे फारच विरळा झाले. 
महाराष्ट्रीयन समाजात मंगळसूत्राचे महत्त्व अतिशयोक्त इतके पहिल्यापासून आहे... त्यामुळे ते अजूनही टाकण्याची स्त्रियांची मानसिकता तयार होत नाही. यात हिंदू वगैरे असण्याचा काडीचा संबंध नाही. हिंदू म्हणून सौभाग्याची लक्षणे प्रत्येक राज्यात वेगळी आहेत. कुठे सिंदूर आहे, तर कुठे मंगळसूत्र आहे.. तर पंजाबसारख्या राज्यात काहीच नाही. कुंकू सुद्धा लावत नाहीत अनेक पंजाबी सरदार बायका. कदाचित तिथे मोगली सत्तेचा प्रभावामुळे कुंकू कमी झालं असू शकेल. तरी बाया सौभाग्याची चिन्हे कवटाळून बसतायत अजून हे खरं आहे. कधी कधी लोकांच्या प्रश्नांना उत्तर नको म्हणून, कधी सामाजिक प्रतिमा अबाधित राहावी म्हणून, कधी सासरच्यांचा धाक म्हणून...

तरी देखील बदलाची ही धीमी गती पुढच्या पिढीत जलद होताना दिसते. अशावेळी बदलाच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पायरीवर असलेल्या स्त्रीचे स्वागत करायला हवे. तिला स्वीकारायला हवे. समोरच्याचा बदल बघून कदाचित ती बदलणार नाही, पण पुढच्या पिढीसाठी तरी ती सौम्य होईल.

हीच गोष्ट सणावाराची... आज ज्या स्त्रिया, 'मी नाही बाई काही करत असलं..' म्हणत स्वतःतील सुधारणा किंवा वैचारिकता मिरवत असतात, त्या देखील या ना त्या कारणाने पाच पंचवीस वर्षांपूर्वी हे सगळं करतच होत्या. त्यांना लवकर जाग आली, लवकर स्वातंत्र्य मिळालं, घरात तशी पार्श्वभूमी मिळाली हे देखील बदलासाठी तेवढंच कारणीभूत आहे. सर्वांना तशी पार्श्वभूमी, तसे कुटुंब, तसे शहर, सुबत्ता मिळतेच असं नाही... साधं उदाहरण घ्यायचं तर सर्वांनाच तयार फराळ परवडत नाही. त्यांनी घरी केलं तर त्या फुकट राबताहेत म्हणणं कितपत योग्य आहे..? त्यांनी आपल्या मुलाबाळांना करून खायला घालायचे नाही का? अनेक घरात सणावाराची साफसफाई, फराळ, खरेदी यात घरचे पुरुषही भरपूर मदत करत असतात.... 

संविधान हाच धर्म माना... सावित्रीबाईंनी तुम्हाला शिकवलं, त्यानाच पुजा..नवरात्रीत नऊरंग नेसू नका... ह्यॅव नि त्यॅव... अनेक उपदेश बायांना केले जातात. ते जरूर केले जावेत... परंतु त्यासाठी त्यांना हिणवले जाऊ नये.. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांच्या घरातही शंभर टक्के याचे पालन होत नसते. कुठेतरी परंपराशरणता असतेच असते...त्याला वेगवेगळ्या रितीने ते समर्थन करू शकतात, इतकंच.

नटणं, सजणं, चांगलं दिसणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पुरुष देखील याला अपवाद नाहीत. नाहीतर नैसर्गिक दाढ्या वाढू न देता विविध प्रकारे त्या कोरण्याची पद्धत त्यांनीही स्वीकारली नसती... बाया भुवया कोरतात म्हणून त्यांना हिणवणारे हे बघत नाहीत, की ते दाढ्या का कोरतात मग? का जंगली माणसाप्रमाणे केस, दाढ्या वाढू देत नाहीत?

सजायचं नाही, मेकअप करायचा नाही, लाजायचं नाही, नैसर्गिक राहायचं... ही आधुनिक बंधनं तर टाकली जात नाहीत ना स्त्रियांवर पुन्हा?

त्यामुळेच, प्रत्येक छोट्या बदलाचे देखील स्वागत व्हावे.. ज्यांनी या गोष्टी टाकल्या त्यांचे कौतुक जरूर व्हावे, पण ज्या टाकू शकल्या नाहीत, त्यांना बदलायला वेळ लागतोय, एवढे तरी समजून घ्यायला हवे. कारण आपणही एका रात्रीत बदललेलो नाही... आपल्या एकेका पिढीला बदलत आणलंय स्त्रीवादी चळवळीने... पण ही धीम्या गतीची असली तरी शंभर टक्के पुढे जाणारी चळवळ आहे हे नक्की... तिला आता मागे फिरवता कुणालाच येणार नाही... अगदी कुठल्याच धर्माच्या सनातनी प्रवृत्तीलाही नाही... कारण ईराणसारख्या देशातही स्त्रिया बुरखा जाळू लागल्या.... ही केवढी मोठी गोष्ट आहे..........

स्त्रियांना त्यांच्या गतीने बदलू द्या......पुरुषांत देखील सर्व स्तरावरची विविधता दिसते की... ते तरी कुठे सगळेच्या सगळे पुरोगामी आहेत........

जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला ते देखील बायस्ड वागताना दिसतात.... पुरोगामींना देखील इस्लामचे नाव घ्यायला भीती वाटते, मग स्त्रियांना सासरच्यांची वाटणार नाही ....? हाहाहाहा........!

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...