Oct 12, 2021

भटकंती - लॉकडाऊन अनुभव

 ....रत्नागिरीहून कास पठारला जाण्यासाठी निघालो. नि वाटेत एक दिवस महाबळेश्वरला थांबलो.
खूप पाऊस, प्रचंड धुकं. या अशा ऋतुमध्ये महाबळेश्वरला दुसऱ्यांदा येत होते. दहा पावलांवरचं दिसेना इतकं धुकं. खरंतर ते धुकं नसून ढग असतात. 

उन असो, ढग असो वा पाऊस.. महाबळेश्वरला आल्यावर शॉपिंग हे मस्ट आहे. तिथलं मार्केट भुलावतंच आपल्याला. चपला, शाली, स्वेटर्स, रजया, बॅगा, चिक्की, टॉफीज्, मसाला चणे नि काय काय. एकही वस्तू न घेता तिथून परत जाणारा माणूस योगीच असू शकतो. त्यामुळे यथासांग खरेदी झाली. मका पॅटीस, स्ट्रॉबेरी शेक सगळं खाऊन झालं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस जरासा कमी झाला, किंचित उघडीप दिसू लागली नि हत्ती पॉइंटवर जाता आलं. छान स्वच्छ वातावरण मिळालं. थोडं सूर्यदर्शनही झालं. त्यामुळे पॉइंट्सवरच्या सगळ्या  ऍक्टीव्हीटीज करता आल्या.  अगदी घोडेस्वारीपासून माकडांच्या त्रासापर्यंत सगळं.

महाबळेश्वर हे सर्व ऋतुत  अनुभवण्याचं ठिकाण आहे. प्रचंड जंगल, लिंगमळा, तिथले धबधबे, विविध पक्षी, विविध पॉइंट्स, शॉपिंग. शिवाय महाबळेश्वर सुरक्षित आहे. तुम्ही एकट्यानेही तिथं भटकंती करू शकता. अगदी स्त्रिया देखील. अर्थात स्त्रियांना सदासर्वकाळ सगळीकडेच जसं एक सिक्स्थ सेन्स वापरतच जगावं लागतं तो वापरून अखंड सावध राहूनच कुठंही वावरणं श्रेयस्कर!

माझ्या मते स्त्रियांनी सोलो ट्रीप्स करायला हव्या. एकट्याने बाहेर निघायला हवं. थोडी भटकंती करायला हवी. मला तर अगदी सोळा सतराच्या वयापासून एकटीने प्रवास करण्याची सवय आहे. भटकंती मी कोणत्याही प्रकारे करू शकते. एकटीने, नवऱ्यासोबत, मित्रमैत्रिणींसोबत अथवा टूर कंपनीच्या ग्रुपसोबतही. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. मी कुठेही कंटाळत नाही सहसा. सगळ्यांत राहूनही अलिप्त राहण्याचा स्वभाव मुळचाच आहे. त्यामुळे माझा प्रवास हा माणसात असला तरी सोलोच असतो. तसं तर प्रत्येक व्यक्तिचा प्रवास हा सोलोच असतो. "कहने को साथ अपने दुनिया चलती है.. पर चुपके इस दिल में तनहाई पलती है".............या ओळी प्रत्येकालाच लागू पडतील. 

भटकंती आवडत असली, तरी मी भटकी नाही. मला स्थैर्य पसंत आहे. मी मनाने आणि सवयीनेही अगदी शहरी आणि घर प्रिय असणारी बाई आहे. पण थोडंफार भटकण्याने तुम्ही अनुभवसमृद्ध होता, फ्रेश होता, आपल्या विहिरीबाहेरही अफाट जग आहे याची आपल्या बेडूकमनाला थोडी तरी जाणीव होते. त्यातही एकटं फिरून पहा. मजा असते. 

गेल्या वर्षीची गंमत सांगते. कर्नाटकातील कूर्गचं प्लॅनिंग केलं होतं. मी आणि नवरा. दोघेच. (आम्ही दोघे दोघेच अधिक फिरलोय. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय.) पण नवऱ्याचा नंबर विपश्यना कोर्समध्ये लागला (जो लागायला अनेकदा बराच काळ लागतो.) आणि तो तिकडे गेला. मी रेल्वे, हॉटेल बुकींग करून ठेवलं होतं. (मीच. कारण आम्ही दोघं फिरत असलो, तरी सारं प्लॅनिंग, बुकींग हे मीच करत असते. फार तर मुलाची मदत घेऊन. नवरा फक्त ममं म्हणत निर्धास्त ट्रिप एन्जॉय करत असतो. माझ्यावर विसंबून.)
नवऱ्याला म्हटलं. तू जा विपश्यनेला. मी सगळी तिकीटं रद्द करून घेते कूर्गला नंतर जाऊ पुन्हा कधीतरी. ही गोष्ट मार्च २०२०ची.  नवरा गेला. मी तिकीटं रद्द करणार, एवढ्यात माझा मुलगा म्हणाला, 'आई रद्द कशाला करतेस. तू जा की फिरून ये.' मी दुविधेत पडले. जावंसं तर वाटत होतं. पण नवरा परतेल, तेव्हा त्याला काय वाटेल? त्यालाही यायचं होतं. नि आपण एकटीनेच मजा करून यायचं? पण मोह जिंकला नि मी फक्त त्याचं तिकीट रद्द करून मी एकटीच निघाले. कूर्गला जायला. काहीतरी तेरा मार्च वगैरे होती. आसपास.  कल्याण टू मॅंगलोर ट्रेनचं बुकींग होतं. तिथून कूर्गला टॅक्सी करून जाणार होतो. 

पण त्याच सुमारास कोविडचा प्रसार वाढत होता. अजून इथं सुरूवात होती. बातम्या येत होत्या. मास्क बांधा, सॅनिटायझर लावा, लोकांपासून लांब राहा. मी म्हटलं, अशा परीस्थितीत कसं जायचं रे, पण मुलगा म्हणे, त्याला काय होतंय. जा. 
ठिक आहे, चला तर मग. 

तोपर्यंत अजून जागोजागी मास्क मिळत नव्हते. मुलाचा ट्रेकमास्क होता. तो सोबत घेतला. सॅनिटायझर घेतलं. 

ट्रेनमध्येच पुढील परिस्थितीची चुणूक आली. ट्रेन बहुतांश रिकामी होती. लोकांनी आपली रिझर्वेशन्स रद्द करून घेतली असावीत.  पण तरी फार काही वाटलं नाही. सकाळी मॅंगलोरला उतरले. हॉटेल मॅंगलोर शहराबाहेर दहा किमीवर होतं. रिसॉर्ट बुक केलं होतं दोन दिवसांसाठी. रिक्शा करून गेले. तर ते एका उंच टेकडीवजा जागी पार जंगलातच होतं. त्यात माझं कॉटेज अगदी एका बाजूला. भवतीने झाडी. सामान टाकलं नि रिसेप्शन काऊन्टरला विचारलं, गावात कसं जायचं? तिने पर्याय सांगितले. त्यात एक भाड्याने स्कूटर मिळते हेही सांगितलं. हे कधी केलं नव्हतं. म्हटलं, चला स्कूटर घेऊन आपलं आपण फिरू. स्वस्तही पडेल नि मस्तही. 
काय बघायचं? इथे सगळंच बंद आहे कोविडमुळे. झू, पार्क सगळंच. गावात फिरा.

कॉटेजच्या बाहेर येऊन तिथून रिक्शा करून स्कूटरच्या दुकानात गेले. तिथे स्कूटर भाड्याने घेतली. दोनशे रुपये भाडं काहीतरी दिवसभराचं.  विचारत विचारत निघाले. पण गाव फारच लांब होतं. तिथे पोचून ठरवलेली ठिकाणे पाहू म्हटलं, तर एक मंदिर, दोन रेस्टॉरंट्स एवढंच पाहता आलं. तोवरच संध्याकाळ होत आली. परतायला हवं म्हणत आल्या रस्त्याने गुगल मॅप लावून निघाले. वाटेतच काळोख झाला. नि जसं जसं गावाच्या बाहेर आले तसं सगळं सुनसान होत गेलं. रस्त्यावर काळोख. आणि मंजिल काही येईचना. असं वाटत होतं की अंतहीन चालत राहिलोय आपण आणि कुठेतरी भरकटलोय. थोडी घाबरले. मध्ये कुणीतरी भेटायचं चुकून त्यांना विचारत गेले. शेवटी एकदाच आलं स्कूटरचं दुकान. स्कूटर जमा केली. पण रिसॉर्टपर्यंत जायला रिक्शा गरजेची होती. ती बराच वेळ सापडेना. एकदाची सापडली. बिचारा भला होता. किमान पैशात पोचवलं. त्या जंगलात आल्यावर त्या कॉटेजमध्ये एकटं राहायला भीती वाटू लागली. जनावरं, भूतं, हडळी आठवू लागल्या. रिसॉर्टवाल्याला म्हटलं, बाबा रे रिसेप्शनच्या इथेच दे ना एखादी रूम जवळ. तर नाहीए म्हणाला. तिथे भीतीसारखं काही नाही म्हणाला. काही वाटलं तर आम्हाला फोन करा. आम्ही जागेच आहोत. 

मग दारं खिडक्या आतून घट्ट लावून झोपले. काही फोन केले. दुसऱ्या दिवशी इथे राहायचं नाही ठरवलं. शिफ्ट व्हायचं गावातल्या हॉटेलमध्ये. सकाळी उठून नाश्ता करून गावात आले. चौकशा करून एक हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी शोधून काढले. कोविडची भीती वाटत होतीच. माझ्याजवळच्या सॅनिटायझरने मीच रूम क्लीन करून घेतली. बेड चादरी ब्लॅंकेट सगळ्यावर मारून घेतले. उडपी रेस्टॉरन्ट शोधून तिथे जेवून घेतले. दुसऱ्या दिवशी कूर्गला जायचं होतं त्यासाठी बस सोयीची पडणार होती. एकटीने टॅक्सी करून जाण्यापेक्षा. थोडा आराम करून राहिलेली ठिकाणं बघू नि बस स्टॅन्डवर जाऊन बसची चौकशी करू म्हणून निघाले. मॅंगलोर तसं मोठं शहर आहे. एक एक ठिकाण बरंच लांब होतं. एसटी स्टॅन्डवर जाऊन बसची चौकशी केली. तिथून बीचवर जायला निघाले.
मध्ये मध्ये कोविडसंबधित बातम्या येतच होत्या. मेसेजमध्ये, फोनवर. लॉकडाऊनच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. बीचवर गेल्यावर कोविडची खरी चुणूक जाणवली. बीच बंद केला होता. पोलिस कुठूनही आत जाऊ देत नव्हते. 

बीचवर जाण्यासाठी देखील एका मोटरबोटमधून जावे लागत होते. तिकीट काऊन्टरवरची म्हणाली की तिथे जाऊ देत नाहीत. तरी माझ्या सारख्या अजून काही प्रवाशांनी बोटीची तिकीटं हट्टाने मागितली. तिने ती वैतागून दिली. तिकडे गेलो खरे पण पोलिसांनी उतरूच दिलं नाही. आल्या पावली परत. तेव्हा कोविडचं गांभीर्य जाणवू लागलं. तिथेच दोन मित्रांचे फोन आले. की रेल्वे देखील बंद होणार आहेत. तू काळजी घे. तरी वाटत होतं, छे.. एवढ्या रेल्वे कशा बंद करतील? पण एका मित्राने कोणत्या गाड्या बंद केल्यात त्याची यादीच पाठवली. मग मी हबकले. मॅंगलोरमधले मॉल वगैरे बंद होते ते कळले. संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर वेगात हालचाली केल्या. कूर्गवाल्याला फोन करून विचारले, तिकडे परिस्थिती कशी आहे? तोही म्हणाला सार्वजनिक ठिकाणं बंद केलीत कालपासून. मग लगेच दुसऱ्या दिवसाची परतीची एखादी ट्रेन सापडते का पाहिले. सुदैवाने दुपारी एकची सापडली. लगेच तिचं परतीचं रिझर्वेशन करून टाकलं. ते मिळाल्यावर हायसं वाटलं. मग आधीचं परतीचं रद्द केलं. 

मग मात्र निवांत झाले. आरामात झोपले. दुसऱ्या दिवशी गावातल्या प्रसिद्ध उडपी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन भरपेट खाल्लं. आणि स्वारी गाशा गुंडाळून बॅक टू पॅव्हिलियन. आल्यावर मुलावर जरा रागावून घेतलं. भलत्याच परिस्थितीत मी नाही म्हणत असताना मला जा जा करून पाठवलं म्हणून. काहीतरी सतरा की अठरा मार्चला परत आले नि २१ पासून कडक लॉकडाऊन लागला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती माझ्याबाबतीत हेच खरं. हाहाहा....

अंगावर जरा काटा आला होता. जर अजून बेसावध राहिले असते नि सगळ्या ट्रेन, गाड्या, हॉटेलं बंद झाल्या असत्या, तर मी तिकडे काय केलं असतं?  तरीही कानाला खडा वगैरे लावण्याइतकी मी भ्यायले नव्हते. मी काही ना काही मार्ग काढलाच असता. शेवटी भारतातच तर होतो. मॅंगलोर असं कोणतं परग्रहावर आहे बा?

इकडे नवराही तर अडकलाच सेंटरवर. त्याला घ्यायलाही  मीच ऑनलाईन परवानग्या वगैरे काढून गाडी घेऊन गेलेच की तिथून आल्यावर. हाय काय नि नाय काय...
मै क्या हिरकणी से कम हुं के......आपण साऱ्याच हिरकण्या आहोत. संकटात, अडचणीत अधिक उजळून निघणाऱ्या. संकटात हतबल व्हायला आपण काय पुरुषोत्तम थोड्याच आहोत..
हेच तर अनुभव असतात जीवनाचे. यातूनच तर आत्मविश्वास दृग्गोच्चर होत जातो. कुणावर अवलंबून राहण्याची भित्री वृत्ती कमी होत जाते. म्हणूनच, बायांनो एकट्या फिरा. झोला उठाओ, और निकल पडो....डर के आगेही जीत है........

अरे, पण... कास पठारला जाता जाता मी कूर्गचाच अनुभव सांगत बसले की..... आता कास पठार पुन्हा केव्हातरी...!


Oct 7, 2021

भटकंती -

 अधुनमधून थोडी भटकंती केली की आत्मा फ्रेश होतो. त्यातही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल, तर दोन चार महिन्यांतून तिथून पळून कुठेतरी निवांत, शुद्ध हवेच्या ठिकाणी चार आठ दिवस जाऊन डिटॉक्स होऊन येणं हे पुढील जगण्यासाठी आवश्यक असतं.

कोकणची भटकंती ही काही कुणाला नवीन सांगण्याची गोष्ट नाही. तरीही माझं कोकणावर प्रेम आहे. मी अजूनही मनाने केशवसूत, पेंडसे, दळवी यांच्या कोकणात वावरत असते. आणि तसं पाहायला गेलं तर अजूनही कोकण तसंच आहे. फार फरक पडलेला नाही. 
तिथली हिरवाई, डोंगर, झरे, समुद्र, खाड्या, बारमास वाहणाऱ्या नद्या, देवळं, लाल माती, माड अजून तशीच सुशेगाद आहेत. स्वच्छ आहेत. निवांत आहेत. 

कास पठारला जायचं होतं. मित्राने सांगितलं आधी माझ्याकडे रत्नागिरीत या. तिथून जाऊ पुढे. म्हणून आधी रत्नागिरीला गेलो. बरेच वर्षांनंतर. तिथला भगवतीचा किल्ला, भाट्येचा किनारा, गणपती पुळे, आरे-वारेचा किनारा हे सगळं भटकलो, भरपूर फोटो काढले, व्हिडिओज काढले, मस्ती केली. 
दुसऱ्या दिवशी मार्लेश्वरला गेलो. डोंगरातला प्रचंड धबधबा आणि डोंगरातल्या गुहेत असलेलं मार्लेश्वराचं वास्तव्य. मंदिर असं नाहीच.  गेलो तेव्हाच नेमकी आरती सुरू झाली. नि केशवसुतांच्या ओळी आठवल्या -

उंच नाहीत देवळे मुळी तेथे
परी डोंगर आहेत मोठ मोठे

देवळी त्या देवास बळे आणा
परी राही तो सृष्टीमध्ये राणा

उंच डोंगर ते उंच कडे भारी
पडे धो धो ज्यांचियावरून वारी........ 

देव बिव न मानणारे मन देखील नकळत नतमस्तक होतं सृष्टीचे ते रूप पाहून.

माझे आजोबा म्हणायचे, 'कोकणात जितके दगड तितके देव, जितका झाडोरा तितक्या भाज्या नि जितकी झाडं तितकी भूतं.'
कोकणी माणूस देवाला भिऊन असतो. नि भूतालाही. त्यामुळेच की काय कदाचित कोकण हे गुन्हेगारीच्या बातम्यात कमीच असतं. 
मला आठवतंय, माझ्या बाबांचं किराणा दुकान होतं. तेलाचा ट्रक आला होता. आजुबाजूच्या प्रत्येक दुकानदारांनी आपल्याला हवे असलेले तेलाचे डबे विक्रीसाठी म्हणून घेतले. ट्रक निघून गेल्यानंतर बाबांनी आपण घेतलेल्या डब्यांपैकी दोन डबे उचलून दुकानात आणले. तिसरा घ्यायला गेले, तर तिथे डबा नाही. गायब! पंधरा किलो तेलाचा डबा गायब? ते हैराण झाले. त्यांचा संशय तिथल्याच समोरच्या टग्या दुकानदारावर होता. नक्की त्यानेच उचललाय. त्याला विचारलं तर त्याने सरळ कानावर हात ठेवले. एवढं नुकसान झालं म्हणून बाबा निराश झाले. आधीच छोटंसं दुकान. 
आम्ही तिथे भाड्याने दुकान घेतलं होतं. त्या दुकानाच्या मालकीणबाई होत्या खमक्या. त्या म्हणाल्या. तुम्ही सर्वांना मोठ्याने जाहीर करून सांगा, 'माझा तेलाचा डबा ज्यांनी घेतलाय, त्यांनी मुकाट आणून द्यावा. नाहीतर मी वाकडाईला जाऊन नारळ देतो. तीच काय ते चोराचं बघून घेईल.'
वाकडाई म्हणजे ग्रामदैवत.. गावच्या वेशीवर गावाचं रक्षण करत सगळ्यांवर नजर ठेवून बसलेली.
ही कल्पना फलद्रूप झाली. बाबांनी आजुबाजूच्या सर्व दुकानदारांना जाऊन सांगितलं. मुख्यत्वे शंका असलेल्याच दुकानदाराला सांगितलं. बाकीच्यांना फक्त तोंडदेखलंच. पण अर्ध्या तासात तो दुकानदार डबा घेऊन आला बाबांकडे आणि म्हणू लागला, 'काय तुम्ही पण, लगेच देवीला नारळ बिरळ द्यायला निघालात? मी मस्करी करत होतो तुमची.'

थोडक्यात काय, तर पठ्ठ्या घाबरला नि माल चुपचाप आणून दिला. तर असे कोकणातले लोक बरेचसे पापभीरू...

आमच्याकडे पूर्वी एक राष्ट्र्रीय किर्तनकार यायचे. ते म्हणायचे, 'कोकणात भिकारी नाही, कुष्ठरोगी नाही. पण वेडे भरपूर.'
त्याचे प्रत्यंतर आजही येते. 
मार्लेश्वर असो, कर्णेश्वर असो, रत्नागिरीतलं ग्रामदैवत भैरीचं देऊळ असो. कुठेही नावालाही भिकारी दिसला नाही. निवांत, प्रशस्त प्रांगण, झाडंमाडं, सुंदर, देखण्या दिपमाळा  आणि प्रत्येक मंदिरासमोर असलंच पाहिजे असं एक छानसं देखणं तळं. 
मार्लेश्वरला अवघ्या पन्नास रुपयात तांदुळाची गरमागरम भाकरी, पिठलं, मटकीची उसळ, डाळ-भात, ताक असं जेवण जेवलो. त्यांना आवर्जून सांगितलं, की 'बाई हे बरं नाही. इतक्या स्वस्तात जेवण देऊ नका. शहरात दोन वडापाव खायलाच इतके पैसे घेतात. उडपी दोन इडल्यांचेच इतके घेतात.' तर म्हणाली, 'तो वर बसलाय, मार्लेश्वर. त्याच्या कृपेने काही कमी नाही. विनाकारण भाव वाढवणार नाही.' 
मला सांगा, कुठल्या देशात पन्नास रुपयात इतकं भरपेट जेवण मिळेल?
एमपी, राजस्थान, उत्तराखंड सगळीकडे पन्नास रुपयात असंच ताजं, चविष्ट जेवण मिळालंय. एमपी आणि राजस्थानात तर पोळीवर साजूक तुपाची धार होती. याच रेटमध्ये. 
पण आपण बोलत होतो भिकारींबद्दल. नॉर्थमधील सर्व देवळांच्या बाहेर भरपूर भिकारी. अगदी तगडे भिकारी. पूर्वी नेहमी राजस्थानच्या नाथद्वारा मंदिराला जात असू. एकदा एका भिकारी बाईला दहा रुपये दिले. फार चिकटली होती. भूक लागली, खायला घेऊन द्या म्हणून. आणि अरे बाप रे! लगेच भिकारणींची झुंडच चालून आली माझ्यावर. सगळ्या हात पुढे करून दबाव आणू लागल्या. मी पर्स काखेत दाबून पळाले तिथून. इतके त्यांचे वर्चस्व होते. सगळ्या तगड्या बाया होत्या. माझ्यापेक्षा ताकदवर. हातातली पर्स ओढून घेतायत की काय इतका जोर करत होत्या. नि या भिकारणी. काय म्हणायचं आता...
कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. जगण्याला चिवट आहे. त्याची भूक कमी आहे. संतुष्ट आहे. तो मुंबईत चाकरमनी म्हणून काम करेल, हॉटेलात कपबशा विसळायचं काम करेल, पण हात पसरणार नाही शक्यतो. अपवाद असू शकतील. 
तिथून गेलो कर्णेश्वरला. संगमेश्वरजवळीत कसबा येथे. तिथे शिलाहारकालीन प्राचीन मंदिर आहे. कर्णेश्वराचं. तिथंच आपल्या संभाजीराजेंना  शेवटचं पकडलं होतं औरंगजेबाने. दगाफटक्याने. त्यांनी तिथल्या त्या प्राचीन मंदिरात अभिषेक केला, नंतर तिथल्या देसायांच्या वाड्यात काही बैठकीसाठी गेले. तिथेच पकडले गेले. ती सगळी ठिकाणं पाहताना गलबलून आलं. 

पुढचे प्रवासवर्णन पुढील पोष्टीत......









किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...