May 3, 2024
जा जरा उत्तरेकडे...
May 3, 2023
बाबा बुवा नेते गुरू इत्यादी...
लोक बाबा, बुवा, अम्मा, दिदी, महाराज, गुरू, नेते यांच्या इतके भजनी कसे काय लागतात? यात बहुसंख्य जनता सामील असते हे विशेष.
इतक्या बहुसंख्येत लोक तर्कहीन वागत असतात? स्वतःच्या अकलेचा वापर जराही करू शकत नाहीत... इतका बाबा वाक्यं प्रमाणमच्या आहारी जातात..
जीवनाची साधी साधी तत्वे समजायला कोणत्याही बाबा, बुवा, अम्मा दिदीची गरज का भासावी? अगदी निरक्षर माणसे देखील अनेकदा इतका तर्काने विचार करतात की आपण थक्क होतो, याऊलट अगदी डॉक्टर इंजिनिअर झालेले लोक या बाबा बुवांच्या नादी लागताना दिसतात तेव्हाही थक्कच होतो.
याचा फायदा हे तमाम बाबा न उचलते तरच नवल.. प्रसिद्धी कुणाला नकोय? पुरस्कार कुणाला नकोत?
दोन महिन्यापूर्वी नाशकात होते. फ्लॅटचा दरवाजा उघडाच असतो. तीन बाया शिरल्या घरात. टिपिकल पेहेराव. साडी. कनिष्ठ मध्यमवर्गीय चेहरे.
काय हवं विचारलं. काही नको. आम्ही आज एकादशी म्हणून सहज भेटीला आलोय. स्वाध्याय परिवारातर्फे. तसे आम्हाला आदेश असतात. लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या...
पण कशाला?
कशाला नाही. असंच. सहज.
बरं चहा पाणी काही?
नाही कुणाकडे काही घ्यायचं नाही अशी पद्धत आहे आमची. थोडं पाणी चालेल फार तर..
ठिक. पण मी जवळपास नास्तिक आहे. बाबा बुवा वगैरेंवर माझा विश्वास नाही. तूच आहेस तुझा सांगातीवरही माझा विश्वास नाही, कारण मीच आहे माझी सांगाती.
चालेल. ते तुमचे विचार आहेत. मग काही श्लोकांची छापील कागदे दिली. ते कॉमन श्लोक होते. जे साधारण ब्राम्हणी घरांमध्ये सकाळ संध्याकाळ बोलले जातात.
जवळपास माझा अर्धा पाऊण तास खाऊन गेल्या.
मी विसरले देखील.
दोन महिन्यांनी मी परवा नाशकात परत आले.
तर काल ही तिगोळी परत हजर. शिरल्या घरात.
तोच प्रकार.
मी पुन्हा सांगितलं. मी नास्तिक आहे. बाबा महाराज वगैरे मला मानवत नाहीत.
चालेल.
मी माझे महत्त्वाचे काम संगणकावर करत होते. त्यांनी विचारलं देखील काम चालू आहे का. मी हो म्हटलं. तरी बसूनच.
मग मला राहवलं नाही. मी विचारलं. तिघीही साडीतच का? हा पेहेराव तुम्हाला कम्फरटेबल वाटतो का? यात पळता, धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत. पोहता येत नाही. सायकल चालवता येत नाही.
आम्हाला साडीच कम्पलसरीली आहे. विशेषतः बैठकीची कामे करताना.
का.. असं का...
ते आपले ट्रॅडीशनल पेहेराव हवा, आपली संस्कृती...
अच्छा.. पण ही साडी आपली परंपरा नाहीए. हे तुम्हाला ठाऊक नाही का? नऊ वारी साडी ही आपली परंपरा आहे. ती कम्फर्टेबल देखील आहे. तुम्ही नऊ वारी नेसून घोड्यावर सायकलीवर बसू शकता. धावू शकता. पोहू शकता.
हो पण सध्या हीच साडी चलतीत आहे ना मग हीच नेसायची.
अहो, सध्या सुटसुटीत ड्रेस चलतीत आहेत. त्याच्याशी तुमच्या संस्थेला का वाकडं आहे.
आम्हीही करतो एरव्ही फॅशन. पण संस्थेत जाण्यासाठी एक तासापुरती नेसायला काय हरकत आहे. आम्हाला आवडते. आमची काही हरकत नाही.
पण का? याचे बंधन का? असा प्रश्न तुम्हाला पडत नाही? एक तास तरी अनकम्फर्टेबल कपड्यांत का वावरायचंय तुम्हाला? आणि मी फॅशन म्हणून सांगतच नाही. सुटसुटीतपणा, सर्व तऱ्हेच्या हालचाली नीट करता येणं ह्यासाठी सांगतेय...
वाद वाढत गेला. भडकल्या. मला म्हणे सगळीकडे क्रांती, विद्रोह करायचा नसतो...
आता यांनी मला शिकवावं क्रांती वगैरे... ज्या स्वतःच गुलाम आहेत दुसऱ्यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या... अक्कल गहाण ठेवून.
मग विचारलं पुरुषांना काय नेसायला सांगतात.
त्यांना पॅन्ट शर्ट चालते.
मग ती पारंपरिक आहे का? त्यांना धोतर का नाही? धोतर ही आपली संस्कृती नाही?
मला ठाऊक होतं. यांच्या मठ्ठ डोक्यात काहीही फरक पडणार नाही.
पण मला न विचारता माझ्या घरात शिरून माझ्या वेळेवर अतिक्रमण करत असतील, तर मीही त्यांची उलटतपासणी घेणं माझा अधिकार आहेच..........
नंतर उठल्या. गेल्या.
परत येणार नाहीत नक्कीच. मलाही तेच हवं होतं. नाहीतर दर एकादशीला मंडळ माझ्या दारी... असं झालं असतं.
आश्चर्य हे वाटले की दोन्ही वेळेस माझ्याच घरात शिरल्या. शेजारणीचं घर उघडं असूनही तिथे नाही शिरल्या. शेजारीण चांगली पारंपरिक आहे. पण कदाचित माझे कपडे पाहून मलाच सुधारावं या हेतून माझ्याच घरात शिरत असाव्यात.
बाबा बुवा अम्मा देखील परंपरेच्या विरोधात विद्रोह, बंड करायला शिकवू शकत नाहीत. तेवढी त्यांची क्षमता नसते. साडी नेसा म्हटलं की समाज खुश असतो. रांगोळ्या काढा म्हटलं की बाया हिरीरीने तयार होतात. हे अम्मा बाबांनाही ठाऊक असतं.
तू भी खुश, मै भी खुश......
और संस्कृती काकू तर खुशच खुश.
Apr 24, 2023
कोकणी मुस्लिम आणि उर्दू
कोकणात मुस्लिम संख्येने खूप आहेत. विशेषतः समुद्रकिनाऱ्यानजिकच्या गावांत त्यांची बहुसंख्या आहे. अशाच एका गावात माझा जन्म आणि साधारण अठरा वीस वयापर्यंत वास्तव्य झालेलं आहे.
माझ्याही जन्माच्या आधीपासून गावात उर्दू शाळा होती. मुस्लिम बहुसंख्या असलेल्या बहुतांश, नव्हे जवळपास सर्वच गावांत त्यांच्यासाठी उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. हिंदूंसाठी मराठी माध्यम, तर मुस्लिम लोकांसाठी उर्दू माध्यमाची शाळा.
या दोन वेगळ्या शाळांमुळे असे झाले, की आमच्या वर्गात एकही मुस्लिम विद्यार्थी नसे आणि त्यांच्या शाळेत एकही हिंदू विद्यार्थी नसे. त्यामुळे एकत्र खेळणे, अभ्यास करणे, एकत्र मिळून शाळेत जाणे, गप्पा टप्पा, एकमेकाचं विश्व जाणून घेणे, हे कधी घडतच नव्हते. अजूनही तसेच आहे. बरं शाळाही दोन वेगळ्या टोकाला. त्यांची मोहल्ल्यात तर आमची दुसरीकडे.
आम्हीही काही मराठी नव्हतो. घरात गुजराती बोलणारे आम्ही, परंतु बाहेर गुजराती माध्यमाच्या शाळा नसल्याने आम्ही गेली सहा पिढ्यांपासून मराठी माध्यमांच्या शाळेतच शिकत होतो. त्याच्या परिणामी मराठी संस्कृती, खान-पान, साहित्य, प्रादेशिकता इत्यादींशी आमची नाळ आपोआप जुळत गेली. गुजराती घरी बोलण्यापुरती, तर मराठी भाषा ही व्यवहाराची, ज्ञानाची, माहितीची, मनोरंजनाची भाषा झाली. मातृभाषेपेक्षा ती अधिक जवळची झाली.
मात्र मुस्लिम मुलांची हालत अशी झाली, जशी आता इंग्रजी माध्यमातील ग्रामीण मुलांची होते. त्यांची मातृभाषा कोकणी-मराठी बोलीभाषा. पण शिक्षण उर्दूत. त्यामुळे ना मराठी सुधारली, ना उर्दू धड आली. मी कधीही गावातल्या कुठल्या मुस्लिम लोकांना आपसांत उत्तम उर्दूत संभाषण करताना पाहिलेले, ऐकलेले नाही. त्यांच्या कोकणी-मराठीतच ते बोलतात. या कारणाने ते आजही मुख्य धारेपासून वेगळे राहिलेत. ना उत्तम मराठी बोलत, ना उत्तम उर्दू. उर्दू माध्यमात शिकूनही ना तिथे कुणी उर्दू साहित्यिक झाले, ना शायर झाले, ना कधी गजल मुशायरे ऐकले.
शिवाय शाळा उर्दू माध्यमातील असल्या तरी कॉलेजेस उर्दू माध्यमातील नाहीत. तेव्हा तरी नव्हते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी मराठी, किंवा इंग्रजीच घ्यावे लागे. त्या काळात उच्च शिक्षण घेतच नव्हते कुणी. आता घेत असतील, त्यांचे काय हाल असतील, ते त्यांनाच ठावे.
आता मुस्लिम मराठी साहित्य संमेलने होतात. मी अशा एकाच संमेलनाला हजर होते. त्यात साहित्यावर कमी आणि मुस्लिम म्हणून काय परिस्थिती आहे याची रडगाणीच अधिक होती. त्यात कोकणाबाहेरील साहित्यिक अधिक होते. कारण कोकणाबाहेरील मराठी मुस्लिम बऱ्यापैकी मराठी माध्यमांत शिकणारे आहेत. उदा. सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी.
माझे ते वेगळे या घेट्टो प्रवृत्तीमुळेही मुख्य धारेत सगळे येत नाहीत. त्याला सामाजिक मानसिकता ही अशी कारणीभूत ठरते. जर हे मुस्लिम मराठी मुस्लिम आहेत, तर त्यांचा नि उर्दूचा खरंतर काय संबंध? उर्दू कुठली पश्चिम उत्तरेकडची भाषा. महाराष्ट्रात काही संबंधच नाही खरं तर... त्यांनी मराठी माध्यमांतूनच शिकायला हवे. तर सामाजिक सलोखा, एकरुपता येण्यास अधिक मदत होऊ शकते. पण तसे झाले नाही, आणि होतही नाही.
२४-४-२३
Mar 1, 2023
टवाळक्या -
खूपदा, "मला बोलायचंय तुमच्याशी. कधी भेटाल, किंवा कधी कॉल करू?"
असे लोक विचारत असतात.
मग आपण देखील मनात असताना, किंवा नसतानाही, उगाच समोरच्याला आपण भाव खातो असं वाटायला नको म्हणून आपण आपल्या तंद्रितला अमूल्य वेळ काढून त्याला "ये बाबा" म्हणतो.
आणि आल्यानंतर, प्रत्यक्ष किंवा कॉलवरही, ती व्यक्ती काहीच बोलत नाही. घुम्यासारखी एक दोन वाक्ये बोलते. आपल्याकडे बघत बसते.
तो वेळ, ते क्षण फार इरिटेटींग असतात.
मनात चरफडत, "आरे बाबा, बोलायचं होतं ना? मग बोल की तोंड उचकटून भडाभडा..काय ते?"
पण नाही, तो/ती आपल्याकडूनच अपेक्षा ठेवून चुळबुळत बसून राहतात. फोनवर असतील, तर आपल्यालाच म्हणतात, "बोला."
हे तर अजून डोक्यात जातं.
म्हणजे आपणच यांना आपल्या कामासाठी बोलावलंय अशी लाचारीची भावना मनात दाटून येते.
कदाचित त्यांना वाटत असेल, ही बाई रोजच्या रोज फेसबूकवर मनोरंजन पिरसत असते, तशी आज खास फक्त आपल्यासाठी शो करेल काही. समोरासमोर. अगदी आमने सामने.
किंवा ही परकाया प्रवेश करून जशा कविता लिहिते, लोकांच्या मनातलं ओळखते, तसं आपण न बोलताच आपल्या मनातलं सगळं ओळखेल, आणि आपले काऊन्सेलिंग करेल, किंवा न जाणो कविताही करेल आपल्यावर. खरंतर त्यांच्या मनातलं सग्गळं मी ओळखलेलं असतंच. पण ते फुकट का म्हणून सांगायचं मी त्याला? काऊन्सेलर हजार पंधराशे घेतो एका सिटींगचे. हे दळभद्री मला चहाही पाजत नसतात. मीच शेवटी कंटाळून उठून बिल भरते. अनेकदा बिअरचे देखील.
आता बोला.
पुन्हा त्या व्यक्तिशी काहीही संवाद ठेवण्याच्या मूडमध्ये मी राहत नाही. टाळते.
Feb 23, 2023
टवाळक्या -
किसी पिछले जनम की बात...
मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय... तेव्हा टीव्हीवर दिलीप क...
-
शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच ति...
-
कोण अल्पसंख्य, कोण बहुसंख्य- माझं गाव हे कोकणातलं एक मुस्लिमबहुल गाव. एकेकाळी तिथं संमिश्र वस्ती होती. गवळ आळी, कुंभारवाडा, महारवाडा, जंगमआळ...
-
सकाळचं ऊन माझ्या घरात कोवळ्या बाळपावलांनी रांगत येतं..किलकिल्या उघड्या फटीतून डोकावतं. अगदी तस्संच, जसं एखादं नवीन आलेल्या शेजा-याचं तान्हं ...