नॉस्टेल्जिया...
सहज मनात आलं की आजोळचे गाव बघून यावे. कोकणातले. रायगडाच्या अगदी पायथ्याशी असलेले हे पळसगाव. अगदी छोटे खेडे. ज्याचा उच्चार तिथले लोक फलसगाव आणि आम्ही गुजरातीत फलसगाम करत असू. आता तिथे कुणीच नाही. पडके घर आहे फक्त.
गाडी काढली आणि मी, माझा मोठा भाऊ आणि चुलत बहीण असे तिघे गेलो. रस्त्यापासूनच बदल जाणवू लागला. एक काळ होता, जेव्हा इकडे गाडीतूनच येत होतो. पण बैलगाडीतून. तेही प्रचंड धक्के खात, हिंदकळत, कंबरेचे टाके ढिले होत पोचत घरी. वाटेत मोठा दगड, चढ आला की पुरुष माणसे बैलगाडीतून उतरून पायी चालू लागत तितकी वाट. शिवाय लाल माती प्रचंड उडून कपडे आणि शरीर या दोन्हींचा अवतार होऊन जात असे.
आता मात्र पक्की गुळगुळीत सडक झालीय. मोटारगाड्या सुळकन जात येत असतात. गावात पोचल्यावर तर हेच का ते गाव असे आश्चर्यचकीत झालो. ओळखूच येईना. एके काळचे पाच पन्नास घरांचे ते वाडीवजा गाव आता चांगले वाढलेय. पक्की, टुमदार घरे बांधलीयत लोकांनी.
आम्ही अनेक पिढ्या कोकणात राहिलो. त्यामुळे आजोळ, काका, मावश्या यांची गावे पण इथंच. भवताली. छोट्या छोट्या कोकणी खेड्यांवर. कोकणी पद्धतीचे मोठाली घरे, परसदार, झाडे, विहीर असा सगळा बारदाना होता. तर आईचे माहेर हे पळसगाव. आई माहेरची सधन होती. सासरी फार आर्थिक हाल काढले तिने. तिचे बाबा दिलदार होते. माहेरच्या सधनतेच्या आठवणी आणि किस्से ती नेहमी सांगत असे. आमच्या गावाहून देखील हे पळसगाव छोटे. एखाद्या वाडीसारखे. इथे मुस्लिम नव्हते. एकही घर नव्हते त्यांचे. त्यामुळे आमच्या गावापेक्षा इथले वातावरण वेगळे होते. आमच्या गावात चहलपहल होती. माणसांचे आवाज होते. इथे आजुबाजूला गर्द जंगल, झाडी. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत तिथे विजेचा पत्ता नव्हता. रात्र झाली की मामा पेट्रोमॅक्सची बत्ती लावत. त्याचा उजेड भरपूर पडत असे. पण बाहेर मात्र किर्रर्र...
या मामाच्या घरी जायची इच्छा व्हायची. पण हौसेने गेल्यावर मात्र कुठून आलो.. इतका कंटाळा यायचा. इतके लहान खेडे. त्यात संध्याकाळ झाली की अजून उदास, कंटाळवाणे व्हायचे. वीज नसल्याने. मामाची मुलं सरावलेली होती. त्यांना तिथे करमत असे. जरी ती मुले देखील तालुक्यालाच शिक्षणासाठी राहत असली, तरी सुट्टीत त्यांना तिथे करमे.
अंगणात बसले,की समोर रायगड किल्ला दिसत असे. त्यावरचा दिवा देखील. आजुबाजूला अगदी गरीब, मातीची पण बऱ्यापैकी पक्की असलेली सुटी सुटी घरे , प्रत्येकाच्या अंगणार भरपूर झाडे. त्यात प्रामुख्याने आंबा आणि फणस. जरा दूर गेले की करवंदांच्या जाळी, काजूची, जांभळाची झाडे. एक छोटी नदी. तिथे हुंदडायला दिवसा जरा बरे वाटे. पण रात्र झाली की ती एक रात्र युगाची वाटे. बाहेर बाथरूमला जायची पण प्रचंड भीती वाटे. मिट्ट काळोख भवताली. मामे बहीण मात्र अंधार पडल्यावर देखील हातात छोटा रॉकेलचा दिवा घेऊन आजुबाजूच्या घरातल्या मैत्रीणींना भेटायला, गप्पा मारायला जायची. तिथल्या कुणबी, मराठा घरात तिचे मायेचे बंध होते. तिथल्या आया बाया तिच्यावर खूप माया करत. इतकी की तेव्हा मला हेवा वाटे. मला मग तिथे अजूनच परके परके वाटू लागे.
एकदा असाच मामा सुट्टीत मला आणि भावाला घेऊन गेला. दोन दिवस बरे वाटले, पण नंतर जाम करमेना. परत जायचं होतं घरी. पण मामा जाऊ देईना. आणि जोपर्यंत तो गाडी जोतून देत नाही कुणाची तोपर्यंत आम्ही एकटे जाऊ शकत नाही असे किशोरावस्थेतले. आम्ही रोज मामाच्या विनंत्या करत होतो. पण तो आणखीच चिडवायचा. आता इथेच राहायचे. आता नाही परत जायचे. ते ऐकून मला त्याचे खरेच वाटायचे आणि रडू यायचे. भाऊ जरा मोठा कळता होता. तो माझे मन रमवण्याचा प्रयत्न करे. काहीतरी खेळ, कोडी इत्यादी खेळून. काळ असा की ना रेडीओ, ना टीव्ही, ना तिथे पुस्तके... फोनचा तर प्रश्नच नव्हता. त्यात मामी वारलेली. मामा एकटा राहात होता.
नंतर काहीच वर्षात एसटी पण चालू झाली. प्रचंड लाल धुरळा उडवत एसटी गावात शिरायची. वीजही आली. मग मात्र कधीतरी जात असू. कारण आता जाणंयेणं मामावर अवलंबून नव्हतं. मनात आलं तर गेलं, मनात येईल तितकं राहीलं. की एसटीने परत. तरीही फार काही कधी आजोळी जाणं झालं नाही. आठवणीत पाचसहा वेळा गेलो असू. बास. पण आज स्मरणात मात्र ते जसंच्या तसं येतंय.
आता मामा नाही, त्याची मुलंही तिथे नाहीत. घर बेवारस, पार पडलेले एक दोन खोल्या पडक्या झडक्या शिल्लक आहेत फक्त. अनेक, जवळपास चाळीसेक वर्षांपूर्वी मामाने लावलेले चिकूचे झाड मात्र बहरलेले होते अजून. आम्ही गेल्यावर आजुबाजूचे गोळा झाले. त्यांनी अर्थात ओळखले नाही. त्यांना ओळख दिली. मग काही म्हाताऱ्या कोताऱ्यांना ओळख लागली. येत जा म्हणाले.
काळ सरकतो, बदलतो, जे दिवस आणि जो परीसर तेव्हा कंटाळवाणा वाटत होता, तशाच परीसरात आज रिसॉर्ट शोधत काही हजार रुपये देऊन दोन दिवस घालवायला जातो... शहरी धकाधकीपासून दूर.
ते खऱ्या अर्थाने मामाचे गाव होते.