Dec 3, 2020

समाजवादी कावा -

महाराष्ट्रातले अनेक शेतकरी शेती कायद्यातल्या बदलावर खुश आहेत. त्यांना शेती समाजवादी कचाट्यातून पूर्ण मुक्त व्हावी असेच वाटतेय. ते कायदे रद्द व्हावेत म्हणून ते धडपडतायत.
आणि लेखक, विचारवंत विरोधात 🤦‍♀️ खरंतर यांना विचारवंत कितपत म्हणायचं हा प्रश्नच आहे.
ही पुरस्कारवापसी गॅंग पुन्हा सक्रीय झालेय. शेतकऱ्यांच्या विरोधात.
यांना मोदी विरोध करायचाय.. शेतीशी काही देणं घेणं नाही नि शेतकऱ्यांशी नाही. नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ही यांची वृत्ती.
पंजाब मधील शेतकऱ्यांवर ( की दलालांवर?) थंड पाण्याचा मारा झाला म्हणून यांच्या लेखण्यांना कापरं भरलंय. पण आये दिन शेतकरी आत्महत्या करतो त्याची कारणे शोधायची नाहीत.. कमीत कमी शेतकी कायदे, याच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे, विचार ऐकून घेणे, समजून घेणे एवढं करून मग हे विरोध करू लागले असते, तर समजू तरी शकतो. पण केवळ मोदीविरोधात जायला मिळतंय म्हणून एकही संधी सोडायची नाही नि भांडवलशाहीविरोधात गळे काढायचे. त्यात शेतकरी मेला तरी यांना सोयरसुतक नाही.
यांना शेतीमालाचे भाव वाढतील याची काळजी पडलेय. शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील याचा आनंद नाही..यांना स्वस्त धान्य मिळावे म्हणून शेतीचे भांडवलीकरण नकोय यांना.. यातल्या कितीजणांना अर्थकारण कळतंय? किती जणांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न कळलेत?त्यांच्या समस्या माहीत आहेत? लेखणी चालवता येते नि चार पुस्तकं प्रकाशित झालीत एवढ्याच जोरावर राजकारण करत सुटायचं? सरकारी धोरणांचा विरोध जरूर करावा. मला बीजेपी नि कॉंग्रेस की अजून कोणता पक्ष, त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. पण विरोध करताना त्यातलं भलंबुरं काही बघावं की केवळ आपलंच रेटावं? कोणत्याही शेतकऱ्याला ठराविक एकराच्या वर जमीन घेता येत नाही, शेती करायची नसेल, तरी विकता येत नाही असे कायदे आहेत, याचा तरी यापैकी किती जणांना पत्ता आहे?
गरीब शेतकऱ्यांची शेतीतून सुटका होऊ नये, तो तिथेच पिचून मरावा यासाठी हे संघटित होत आहेत. राजकारण करायला.
शेतीचा शही जाणून ना घेता केवळ आपला समाजवादी मुखवटा सतेज रहावा म्हणून ते शेतकऱ्यांच्याच विरोधात लेखण्या परजू लागलेत.. यात मग 'मला कवी म्हणा, 'मला सााहित्यिक म्हणा' वाले हौशे, नवशे, गवशे देखील सामील होऊन जातात. समाजवादी यात्रेत मिरवायला. कारण साहित्याच्या जगतात टिकून राहायचं तर सगळ्यांनाच हा समाजवादी मुखवटा चेहऱ्यावर बांधूनच राहावं लागतं. तो नाही धारण केला, तर तुम्ही जातीयवादी, धर्मवादी, भांडवलशाहीवादी, मानवताविरोधी, भक्त, संघी वगैरे वगैरे म्हणून शिताफीने तुम्हाला वाळीत टाकलं जाऊ शकतं. घरात हे लोक कामवाल्या बाईचेही खाडे कापतील. पण बाहेर गोरगरीबांबाबत कळवळे दाखवतील. लिहायला काय जातंय ? दांभिक वृत्ती असली की लेखन एक आणि कृृती एक सहजपणे करता येऊ शकते. ---
शेतीमालाचे भाव वाढायलाच हवेत. देशात सर्वात काय स्वस्त असेल तर तो शेतीमालच आहे. परवडत नसेल, तर मुलं, पुढची पिढी जन्माला घालताना विचार करा. लाखो रुपयांची शिक्षणं परवडतात, लाखो रुपयांची घरं परवडतात, गाड्या परवडतात, मोबाईल नि त्यातले नेट परवडते, नि कांदा दहा रुपयांनी वाढला तर परवडत नाही? आज घरकाम करणाऱ्या बायांकडेही टिव्ही असतो, फ्रिज असतो, मोबाईल असतात. नि सोसायटीचा केर काढणाऱ्या लोकांकडेही. पण त्यांना कांदा परवडत नाही? समजा नसेलही परवडत तर दोन, चार किंवा एक मुलही जन्माला घालताना विचार करावा लागेल त्यांना. तेवढं न कळण्याइतपत अडाणी आता कुणीच राहिलं नाही. केवळ अन्नधान्य स्वस्ताई आहे, रेशनिंगवरही मिळतं म्हणूनच मुलं जन्माला घातली जातात बिनधास्त. वर चोच देतो तो चारा देतो ही शिकवण. चोच देतो तो चारा देत नाही. इथले समाजवादी कायदे शेतकऱ्याची अडवणूक करून तुम्हाला चारा देतात. शेतकरी तुमची मुलं फुकटात पोसण्यासाठी नाहीत.
चार मुलं मलाही आवडत होती. पण त्यांना चांगलं जीवन देऊ शकणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी जन्माला घातली नाही. हे जे शेतकी कायदे रद्द करण्याला विरोध करतात, त्यांनीही नाही घातली. त्यांनी एकच मूल जन्माला घालावं नि अमेरिकेला पाठवावं. शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पोराबाळांनी मात्र इथं गरीबांची मुलं पोसण्यासाठी शेतीत मरावं. अशी अपेक्षा. ---- जाता जाता - बिल्कीस दादी इतक्या म्हातारपणातही मोर्च्यात सामील झाली म्हणून तिचं कौतुक ? आणि मोदीची आई बँकेच्या रांगेत उभी राहीली तर मोदी नालायक?
आता म्हातारपणाचं भांडवल कोण करतंय आपल्या स्वार्थासाठी? तुमच्यात नि त्यांच्यात रत्तीभर फरक नाही. असता तर सर्वसामान्य तुमच्या पाठीशी उभे राहिले असते.

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...