Jan 15, 2021

सरस्वती -

 समजा, उद्या माझं कवितांचं पुस्तक लैच गाजलं 😜 आणि त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांसोबत एखाद्या मुस्लिम गटाकडून देखील पुरस्कार मिळाला 😝आणि त्या पुरस्कारावर उर्दूत (किंवा अरेबीत) 'अल्लाह' असं लिहिलेलं असेल, तर मी पुरस्कार स्वीकारावा की नाही?

काळजीने झोप येत नाहीए... काय निर्णय घ्यावा मी अशावेळी?
-
-
-
सध्या सरस्वतीवर गंडांतर आलंय.
या देशात सरस्वती विद्येची, लक्ष्मी धनाची आणि दुर्गा शक्तीची प्रतिक मानली गेली, पुजली गेली, तरी मध्यंतरीच्या शेकडो वर्षांच्या काळात स्त्रियांनाच (सर्वच वर्णजातीच्या) शिक्षण नाकारलं गेलं, आर्थिक स्वावलंबन नाकारलं गेलं, आणि अबला म्हणून हिणवलं गेलं...
मान्य...
पण त्यात या तिघींचा काय दोष... त्या स्वतःच बिचाऱ्या कैद केल्या गेल्या अंधाऱ्या गाभाऱ्यात.. दागदागिन्यांनी मढवून गोठवल्या गेल्या.
त्यांनी तर सांगितलं नव्हतं की माझी विद्या, माझी शक्ती, माझी संपत्ती कुणाला देऊ नका म्हणून?
कुणाला सोडा... त्यांच्याचकडून या तीन गोष्टी हिरावल्या गेल्या.
त्या बिचाऱ्यांचा राग करून काय उपयोग? अडाणी, निरक्षर बहिणाबाईही म्हणतात - माझी माय सरसोती, मला शिकवते बोली | लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली||
छोडो कल की बातें...
सरस्वतीच्या मांडीवर छान वीणा आहे... हातात पुस्तक आहे.. बाजूला मोर आहे, हंस आहे... लोभस आहे हे सगळं...
प्रतिकं चांगली असतात, माणसं त्यांचा गैरफायदा घेतात. गैरवापर करतात.
असो...
हिंदूंची सर्वच प्रतिकं नाकारायची, तर हिंदूंच्या कुठल्याच कार्यक्रमात सामील होता येणार नाही, आप्तस्वकीयांच्याही नाही.
उद्या तुमच्या घरात हिंदू मुलगी सून म्हणून आली, तर तुम्ही तिच्या श्रद्धांना नाकारणार? तिला नाकारायची सक्ती करणार?
होय कदाचित. भाऊ कदमने गणपती बसवल्याचा किस्सा आठवला. त्याची बायको जर हिंदू असेल, तर तिने आपल्या प्रथा परंपरा सणवार सोडून देण्याचा आग्रह तुम्ही कराल?
मग उद्या तुमची मुलगी हिंदू घरात गेली, तर तिलाही तिच्या प्रथा बाजूला ठेवायला सांगितले जाईल...
शेवटी तुम्हीही पितृसत्ताक धर्म, विचार यांची बाजू घेणार. अमलात आणणार...
असो - No issues.... थोडा विचार करता मनात आलं, की कदाचित रामाच्या नावाने मला पुरस्कार दिला, किंवा अगदी पुरस्काराच्या कागदावर रामाचं चित्र असेल, तर मीही नाकारेनच कदाचित....पिढ्यानपिढ्या सोसलेले, भोगलेले दुःख बंड करून उठतेच असे... पण पुन्हा मी विचार करेन, की रामावरच टिका केलेल्या माझ्या कविता जर रामभक्त वाचून मला पुरस्कार द्यायला तयार झाले असतील, तर काय हरकत आहे? माझ्याच विचारांचा तो विजय आहे.
पण..
या निमित्ताने माझी एक जुनी कविता -
आदिशक्ती -
त्याने दुर्गेची अमाप, अफाट शक्ती पाहिली
आणि तो घाबरला
त्याने सरस्वतीची अमाप, अचाट बुद्धी पाहिली
आणि तो हतबुद्ध झाला
त्याने लक्ष्मीची अमाप, अमर्याद सत्ता पाहिली
आणि तो हादरलाच..

मग त्याने सुरू केली स्तुती
त्या तिघींच्या
तनुतील सौंदर्याची, उरातील वात्सल्याची, अन्
करातील कार्यक्षमतेची..
अन् बहाल करून टाकलं त्यांना देवत्व...

तेव्हापासून
त्या विसरल्या आपली शक्ती, बुद्धी, संपत्ती
आणि पडल्या प्रेमात
आपल्याच तनुतील सौंदर्याच्या,
उरातल्या वात्सल्याच्या अन् करातल्या कार्यकुशलतेच्या

घडलं हे त्याच्या मनाप्रमाणेच
उचलला याचा अचुक फायदा त्याने
आणि पटकावला ताबा त्यांच्या
शक्ती, बुद्धी, संपत्तीचा

नंतर तर हळू हळू
त्यांचा या गोष्टींवरील
हक्कही नाकारण्याइतपत मजल गेली त्याची

आणि त्या...
त्या आहेत अजूनही खुश
आपल्याला बहाल केलेल्या देवत्वावर
आणि वरून चिकटवण्यात आलेल्या गुणांवर.......... -अलका गांधी-असेरकर
·



Comments

3 comments:

  1. अचूक ! छान मांडणी!

    ReplyDelete
  2. When i read your post it boost my confidence that some one is there who thiks same who express it ..keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. Its my pleaure Madhumeeta.... Thank you very much.

      Delete

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...