कोकणात बैल आहेत
पण पोळा नाही ..संपला विषय ( हायला इथे माणसाला खायला पुरणपोळी नाही. गहू नाही. बैलाला कुठून घालायची ?)
दिवाळी झाली की घाटावरून नंदी बैल घेऊन लोक कोकणात उतरायचे.
आमच्या ऑफिस मधला एक सहकारी ऑफिसमधल्या एका घाटी कलिगला फार चिडवत असे. "दिवाळी संपली. आता तुमचा घाट उतरेल खाली गुबु गुबू करत."
तो काळ भावना दुखावून घेणारा पोचट काळ नव्हता. आणि कोकणात तर जाता येता भावनेच्या पाठीत धपाटे घालणारे अंतू बरवा गावोगावी असल्याने लोकांच्या भावना घट्ट बनलेल्या असत. आपल्यावरचे विनोद देखील ते हसून साजरे करत.
एक राष्ट्रीय कीर्तनकार (पक्षी: संघी) येत.
ते म्हणायचे कोकणात भिकारी नाही. (दारिद्र्य असून) कोकणात महारोगी नाहीत. मात्र कोकणात वेडे फार. ( आणि वेड्या पण) प्रत्येक गावात सापडतील.
हे खरं होतं. पंचक्रोशीत प्रत्येक गावात एक दोन तरी दिसत. (आरशात दिसत का हे विचारू नका)
नंतर बरेच वर्षांनी जयवंत दळवी यांच्या लेखनात हे वाचले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत वेडी पात्रे असतात.
असो
आम्ही आपले समाधान मानून घ्यायचो की वेड असणं केव्हाही चांगलं...
कारण या जगात वेड्या माणसांनीच परिवर्तन घडवलंय...
माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा...हे गाणं लिहिणारे वामनराव जोशी कोकणीच असणार ??
पण चांगला कवी लेखक कालातीत कसा लिहितो ते हे गाणं वाचून तुम्हाला कळेल.. शंभर वर्षापू्र्विचे हे गाणे आजच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत जुळते बघा..
जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा !!
कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ।
*कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या, नशेने धुंदली भारी ।*
अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी
- अलका
No comments:
Post a Comment