Jan 7, 2021

घर आणि गृहिणी -

 काल मी फेसबूकवर 'घर' ही माझी कविता पोस्ट केली. माझ्या 'कन्या-रास' या आगामी कवितासंग्रहातील ही कविता आहे. याच संग्रहात एक 'गृहीणी' या नावाची कविता देखील आहे. 
मला स्वतःला गृहीणी हे पद आणि ही संकल्पना मान्य आहे. या पदाचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या पदाचं केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रिय महत्त्व देखील मोठंच आहे. 
"स्त्रियांचे कष्ट मोजले जातील, तेव्हा मानवी समाजाची सर्वात मोठी चोरी पकडली जाईल" असं कुणाचं तरी वाक्य आहे. 
स्त्रिया जे घराकरता, कुटुंबाकरता राबतात त्या कष्टाचे पैशात मोल होत नाही. त्या घरात खाऊनपिऊन राबतात. कुटुंबाचा कर्ता श्रीमंत असेल, तर समाज त्या गृहीणीलाही श्रीमंत म्हणतो आणि तिला चांगलंचुंगलं खायला ल्यायला मिळू शकतं. याउलट जर कर्ता गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल तर त्या प्रमाणातच तिला खायला ल्यायला राहायला मिळू शकतं. इथं तिच्या हातात चॉइस नाही. जोपर्यंत ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत तिला स्वतःची गरीबी, श्रीमंती नाही. घरातील कर्त्या माणसाची जी आर्थिक स्थिती, तीच तिचीही. 

अर्थात सामाजिक रचना आणि व्यवस्था अशा आहेत की यात कुणालाही काही वावगं वाटत नाही. ना त्या स्त्रीला, ना कुटुंबियांना, ना समाजाला. नवरा राखेल तसंच गृहीणीने राहावं. कमी पगार असेल, तर काटकसर करावी नि अधिक असेल, तर मिरवावं हे अगदी सर्वमान्य आहे, नव्हे तशीच सामाजिक अपेक्षा आहे. 
इथपर्यंत ठिकही आहे. मात्र यात स्त्री ही पूर्णपणे परावलंबी आहे याची जाणीव फार कमी वेळा आणि कमी लोकांना होते. अगदी सगळा पगार जरी घरातला कर्ता पुरुष त्या स्त्रीच्या हातात आणून देत असेल, तिला खर्चाचे, निर्णयाचे स्वातंत्र्य देत असेल, तरीही .. तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा त्या पैशांवर काडीचाही हक्क नसतो. ती असते केवळ खजिनदार. एक जबाबदार खजिनदार.!

जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते, त्या घरातल्या इतर व्यक्तींशी, विशेषतः घरातल्या कर्त्या व्यक्तीशी उर्फ नवऱ्याशी तिचं पटेनासं होतं, वादावादी होते तेव्हा तिला या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार असतं. ते खजिनदाराचं पदही सोडावं लागणार असतं. किंबहुना प्रत्यक्ष घर सोडायचं नसेल, किंवा घटस्फोटही घ्यायचा नसेल, केवळ भांडणाच्या वेळी रागात बोलायचं असेल, की मला नाही राहायचं तुझ्याबरोबर... तेव्हा खरंतर त्या स्त्रीलाही माहीत असतं की नाही राहायचं हे खरं, पण एक रात्रही जायचं असेल रागवून तर जायचं कुठं? माहेरी? त्या घरावर तिचा कितपत हक्क असतो हे साऱ्यानाच ठाऊक आहे. माहेरी जायचं ते केवळ पाहुणी म्हणून असा समज आजही पक्का आहे. तेव्हा तिथं जाऊन राहाणं हे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असते हे प्रत्येक स्त्री जाणून असते. त्यात माहेरी फक्त आईबाबा असतील तर जरा तरी राहणं सोपं असतं. पण तिथे भावाचे कुटुंब असेल, तर पुन्हा तेही कठीणच. अगदी पाहुणी म्हणूनही तिथं राहणं किती अवघडलेपणाचं असतं ते एक स्त्रीच सांगू शकते. 
राहिला कायदेशीर हक्काचा प्रश्न. माहेर, सासर किंवा नवऱ्याचे घर यात कायदेशीर हक्क जरूर आहेत पण ते मिळवायचे म्हणजे संघर्ष आला. ते मिळवायचे म्हणजे शेवटचं तोडण्याचं टोक आलं. यात सहज हिस्सा असा कुठं आहे?
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यातल्या त्यात घरावर तिचंही नाव असतं. किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तिच्या नावावरही काही मालमत्ता असते. पण त्या मालमत्तेची माहिती, कागदपत्रे इत्यादीचीही किती गृहीणींना माहिती असते आणि त्याचा उपभोग त्या नेमका किती घेतात हा प्रश्नच आहे. 
अनेकदा श्रीमंत घर पाहून मुलींची लग्नं केली जातात. पण ते सासरचं घर तिचं तर सोडाच, तिच्या नवऱ्याच्या नावावरही नसतं. ते असतं सासऱ्याच्या, चुलत सासऱ्याच्या, किंवा आजेसासऱ्यांच्या नावावर. आणि अशी कुटुंबे भारतात आजही बहुसंख्येने आहेत. तिथे तर ती अगदीच परावलंबी जीव असते. 
काल पोस्ट केलेली कविता होती.. 'घर'
या कवितेत प्रामुख्याने रोख होता तो अशा स्त्रियांवर. स्त्रियांना पुरुषांपेक्षा घर अधिक प्रिय असतं. घराची स्वप्नं पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक मोहवत असतात. घर हे केवळ तिचं स्वप्नं नसतं. तिची सुरक्षितता असते. तिचं स्थैर्य असतं. असं असूनही स्त्रीला स्वतःचं, स्वतःच्या पैशांचं, स्वतःच्या नावावरचं घर असावं असं का वाटत नसेल? वयात आलेल्या प्रत्येक लग्नाळू मुलाच्या घराचा विचार केला जातो. एकतर त्याला त्याचे पालक घर घेण्यास मदत करतात, शक्य असेल, तर त्याला त्याच्या नावाचं स्वतंत्र घर करून देतात. नसेल, तर त्याला त्याच्या कमाईतून, कर्ज काढूनही एक घर घेण्यास अतीआग्रह केला जातो. आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र  मुलीच्या बाबतीत आजही हे होत नाही. आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित असावं, तिच्या नावाचं स्वतंत्र घर असावं, तिने ते आपल्या कमाईतून घेण्याचा प्रयत्न करावा असं क्वचितच कुणा पालकांना वाटताना दिसलंय. 
तिच्या लग्नाचा विचार तिच्या लहानपणापासून केला जातो. त्यासाठी पैसे बाजूला काढले जातात. अगदी लाखो रुपये. लग्नाच्या एका दिवसात उडवले जातात. गरीबातला गरीब माणूस पण जास्तीतजास्त पैसे मुलींच्या लग्नावर खर्च करायला तयार असतात. ऋण काढूनही. पण त्याऐवजी त्याच पैशातून तिचं पूर्ण भवितव्य सुरक्षित होईल अशा विचाराने तिच्या नावाने छोटंसंही घर घेतलं जात नाही. अपवाद असतील. आणि यात कुणालाही काही खटकत नाही याचं वाईट अधिक वाटतं. 
माझ्या या संग्रहात तीनचार कविता या विषयावरच्या आहेत. दुसरी 'गृहीणी' या नावाची जी कविता आहे त्याचा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला. गृहीणीला तिच्या नावावर तिच्या नवऱ्याने, किंवा कर्त्या पुरुषाने घर घेऊन दिलं तरच ते होऊ शकतं. अन्यथा तिला तिच्या नावावर घरासाठी कर्ज मिळत नाही. तिला कोणत्याच कारणासाठी कर्ज मिळत नाही. इथंच स्त्रीचे गृहीणी या नात्याने असलेले पद पोकळ ठरते. तिच्या कष्टाला मोल नाही हे तेव्हा कळते. ती परावलंबी आहे हे तेव्हा कळते. 
परवाचीच गोष्ट आहे. एके ठिकाणी एक छोटंसं घर बुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये हक्काचं घर विकत घेण्यासाठी धडपड त्या कुटुंबातील स्त्रियाच अधिक करतात. त्यासाठी काटकसर करतात, प्लॅनिंग करतात. घरातल्या पुरुषाचा पिच्छा पुरवतात. पण आर्थिक नाड्या तिच्या हातात नसतात. कर्ज इत्यादी घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावरच मिळणार असतं. 
मी देखील हक्काचं घर व्हावं म्हणून नवऱ्यापेक्षा अधिक प्रयत्न केले नेहमी. म्हणून हे स्थैर्य कुटुंबाला मिळाले. पैसे जरी नवऱ्याने दिले तरी सारे आयोजन माझेच अधिक होते. धडपड माझीच राहीली. त्यासाठी त्याचं मन वळवणं हे माझंच (अतिशय मानसिक संघर्ष) होतं. आणि घर तर त्याच्याच नावावर झालं. पण मी त्याला नेहमी बोलते, की घर हे केवळ पैशानी होत नाही. हे घर उभं करण्यात माझा वाटा अधिक आहे. पण हे बोलणं व्यावहारिक दृष्ट्या निरर्थक आहे. हे मलाही माहीत आहे.
त्याप्रमाणेच आताही झालं. एके ठिकाणी सेकंड होम म्हणून घर घेण्याच्या इच्छेने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मुलाला कर्ज घ्यायला सांगितले आहे. पण त्यात पैसे माझा नवराही टाकणार आहे. साहजिकच आता हे घर माझ्या नावावर असावं असं मला वाटतंय. त्यासाठी फार पूर्वी नवऱ्याने माझ्या नावावर (तेही नाईलाजाने.. कारण काही कारणाने कागदोपत्री त्याला तो प्लॉट त्याच्या नावावर घेणं शक्य नव्हतं म्हणून.) एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता. तो विकून त्याचे पैसेही मी या फ्लॅटमध्ये गुंतवायचे ठरवले. पण आता गोची अशी झाली आहे, की जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा घर घेईल तिला पंतप्रधान योजनेतून दोन लाख साठ हजार रुपये मदत मिळते. आता योजनेत अशी तरतूद आहे की त्यासाठी ते घर त्या व्यक्तीच्या नावावर असावं किंवा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं चालेल. मात्र आईचं चालणार नाही. कारण आईच्या नवऱ्याचं जे घर आहे तेच तिचंही पहिलं घर आहे. त्यावर तिचं नाव असो की नसो. जर माझं नाव त्या घरावर लावलं तर माझ्या मुलाला ते अडीच लाख रुपये मदत मिळणार नाहीत. अडीच लाखाची रक्कम आमच्या सारख्या मध्यमवर्गीय, ईमानदारीने पगार एके पगारावर आयुष्य काढलेल्या, लाचलुचपतीने पैसा न कमवलेल्या कुटुंबाला मोठीच वाटत आहे. त्यावर पाणी सोडायला मन होत नाही. मात्र तसे केले तर घर हे फक्त मुलाच्या नावाने होणार. माझ्या नाही. 
म्हणजे मला सरकार कर्जही देणार नाही. मदतही देणार नाही. मुल्य कुणाला आहे? तर रोख कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त. गृहीणी आयुष्यभर झिजत असेल, समाज उभारण्यात, पर्यायाने देश उभारणीसाठी स्थिर कुटुंब देण्यात ती कितीही मोलाचे काम करत असेल, तरी तिची आर्थिक किंमत शून्य आहे. हीच खंत माझ्या या 'गृहीणी' या कवितेत उतरलेली आहे. 
साहजिकच माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी केली ती चूक पुढील पिढीतल्या मुलींनी करू नये. स्वतःचं हक्काचं घर करावं. नोकरी व्यवसाय करावा. फक्त नवऱ्याच्या घराची स्वप्नं आपण पाहू नये. नवरा लाखांनी कमवत असेल, तरी तुम्ही फक्त गृहीणी म्हणून न राहता चार पैसे हक्काचे मिळवायचा प्रयत्न करावा. आळशी कोकीळेप्रमाणे नवऱ्याच्या घरात अंडी घालून नवऱ्याच्या पैशावर मजा करण्याचे स्वप्नं पाहू नये. कारण ही मजा अधांतरी आहे. परावलंबी आहे. यात स्वाभिमानही नाही. कारण नवरा आणि सासर कितीही श्रीमंत आणि चांगलं असेल, तरी जोवर तुम्ही तिथं त्यांच्या मर्जीने नांदताय तोवरच ते तुमचं असणार आहे. ज्या क्षणी संघर्ष होईल त्या क्षणी तुम्ही कफल्लकच असणार आहात 

गृहीणी -








अलका गांधी-असेरकर



Dec 27, 2020

शाम्पू आणि उवा

 सहावी सातवीत असेन.
खेड्यावर वास्तव्य आणि लांब केसांच्या करकचून आईने बांधून दिलेल्या वेण्या. 
डोक्यात उवांचं वास्तव्य असायचंच. 
आई त्यासाठी नको नको ते उपाय करायची कुणी सांगेल ते.
काय काय उपाय केले अघोरी ते सांगायलाही लाज वाटतेय आता. प्रतिमेला धक्का बसेल.😝

आमच्या गावात मुस्लिम खूप. त्यांच्यापाशी इम्पोर्टेड वस्तू खूप. 
अगदी सुका मेवा, चॉकलेट्स पासून चाकू-सुऱ्या सगळंच परदेशी असायचं त्यांच्या घरात भरभरून. 
गल्फ किंवा बोटीवरची नोकरी करून सुट्टीत येताना चार माणसं डोक्यावर वाहायला लागतील इतकी मोठी ट्रंक भरून सामान ते लोक आणायचे. 
त्यात कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या. पाचपंचवीस इंपोर्टेड रंगीत नाजूक छत्र्या, परफ्युम्स, सुका मेवा, कटलरी, चॉकलेट्स, साबण, शाम्पू, तेलं अन अजून बरंच काही. 
आम्हाला त्यांचा अजिबातच हेवा नसायचा. साधारणपणे कसं असतं की आपल्या नात्यात, जातीत, मैत्रीत कुणी खूप श्रीमंत असेल, तर माणसाला त्यांचा हेवा अधिक वाटतो. पण एकदम परके, जात-धर्मातही नसलेले लोक श्रीमंत असले काय नि गरीब असले काय, माणसाला फारसा फरक पडत नसावा. तसंच काहीसं होतं ते. 
असो. तर विषय तो नव्हता. 
विषय होता आई माझ्या केसांतल्या उवांसाठी काय काय प्रयत्न करायची. पण त्या जाम चिकट होत्या. हटत नव्हत्या. 
एकदा ती माझ्या उवा काढत ओटीवर बसलेली असताना आमच्या दुकानात एक मुस्लिम चौदा पंधरा वर्षांचा मुलगा काही विकत घेण्यास आला. आम्हाला बघून तो आईला म्हणाला, 'आमच्या घरी उवांचं औषध आहे इम्पोर्टेड. आणून देऊ का तुम्हाला थोडं. ते हिच्या केसांना लावून केस धुवून टाका. सगळ्या उवा मरून जातील.'
आईने होकार देताच तो लगेच त्याच्या घरी गेला आणि एका बाटलीत त्याने  ते औषध आणून दिलं. अर्थात मूळ बाटलीतून थोडं दुसऱ्या साध्या बाटलीत काढून आणलं होतं त्याने ते. 
आईने दुसऱ्या दिवशी माझ्या केसांना ते चोपडलं. चिकट चिकट आणि सुगंधी होतं. अर्ध्या एक तासाने केस धुवायला घेतले, तर केसांत फेसच फेस. सुगंधच सुगंध...
मी आईला म्हटलं, "आई, हा तर शाम्पू." आई म्हणाली, "म्हणजे काय?"
तोपर्यंत कधी शाम्पू वापरला नव्हता. पण वाचला होता. म्हणजे वाचन चांगलं असल्याने शाम्पूबद्दल माहिती होती. 
मग आईला सांगितलं की तो लिक्विड साबण येतो हल्ली केस धुण्यासाठी. तो आहे हा. उवांचं औषध बिवशध काही नाही हे. 
आमचं किराणा मालाचं दुकान. दुकानात कपडे धुण्याचा ५०१ साबण विकायला असे. आंघोळीचा साबण देखील विकायला नसे, तर शाम्पूचा काही प्रश्नच नव्हता. घेणार कोण विकत? जे गिऱ्हाईक होतं ते गरीब हिंदू होते. मुस्लिम तर सगळं बाहेरूनच आणत. 
आम्ही सगळे ५०१ कपडे धुण्याच्या साबणानेच आंघोळ करत असू. नि आजी तर धुण्याच्या सोड्याने केस धूत असे दर आठवड्याला. तरी तिचे केस वयाच्या ७२व्या वर्षी ती वारली तोपर्यंत काळेभोर होते. अन मला पुढे कॉलेजला गेल्यावर मैत्रिणी विचारायच्या, की तू काय लावतेस, तुझी स्कीन इतकी छान कशी दिसते?😂
बाबा तर साबणच लावायचे नाहीत. नुसतंच गरम पाण्याने अंग चोळून घ्यायचे. 
आणि घरात सगळे केवड्याची कांती असलेले गोरेपान. कुणाला साधा पिंपल देखील चेहऱ्यावर आला नाही. अशी मख्खन त्वचा सगळ्यांचीच.

तात्पर्य - साबण शाम्पू तेलं सर्व काही भ्रम आहे, मिथ्या आहे... आपले ओरिजिनल अवयव हेच सत्य आहे. 😂

आणि हां... त्या उवा... त्यांनी पिच्छा पुरवला लग्न होईपर्यंत. लग्नानंतर दोन तीन वर्षांनी मी केस पूर्ण कापून शोल्डर कट केला. केस मोकळेच राहू लागले नि अशा मोकळ्या तेलविरहीत रेशमी केसांतून उवांचे पाय सरकून त्या पडू लागल्या. ही जमीन काही आता आपल्या कामाची नाही म्हणत त्या निघून गेल्या कायमच्या... 😍

ते आमच्या वेळी लांब केस, नि त्याच्या घट्ट दोन वेण्या, रिबिनी, तेल लावून चपचप... हे सगळंच खरंतर उवांना आमंत्रण होतं. पण मुलींच्या सौंदर्याबाबतच्या भ्रामक कल्पना सर्वच काळात असतात. तशा त्या तेव्हाही होत्या. मुलींचे लांब केस, त्यांच्या घट्ट वेण्या, रिबिनी, मोठाले अंबाडे हे सगळं सौंदर्याच्या संकल्पना होत्या. एखादीचे बिचारीचे केस जरा तोकडे असतील, तर तिला खंत असायची. आता तो प्रकार तरी राहिला नाही हे बरंच झालं. 

तात्पर्य - उवांवर एकच उपाय - केस कापून तोकडे करून टाकणे.

Dec 26, 2020

तोहफे और यादें....बरसों से है आज भी वही..

 वर्ष 1991-92

प्रसंग १ - Marriage anniversary. तिसरं किंवा चौथं वर्ष.
Gift - कोसा प्युअर सिल्क.. ओरिजिनल कोसा रंग, प्लेन मोतिया रंगाची सोबर साडी आणि बारीक भरतकाम केलेला पदर आणि किनार...
आणि 'लागू बंधू मोतीवाले'यांच्याकडून घेतलेल्या कल्चर्ड मोत्यांच्या पारंपरिक किलवर कुड्या.
कोसा म्हणजे काय हे मला माहित नव्हतं. साड्यांमधलं, कपड्यांमधलं फार कळत नव्हतं तेव्हा. नवरा म्हणाला कोसा सिल्क घेऊ तुझ्यासाठी. आणि त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे खरेदीसाठी डोंबिवलीहून दादर मार्केटला गेलो. सर्व दुकाने फिरूनही कोसा सिल्क सापडत नव्हती. मी तर पाहिलीच नव्हती कधी. पण नवऱ्याच्या सांगण्यावरून तिथले साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले दुकानदार साड्या दाखवत होते. पण त्याच्या काही त्या मनास येत नव्हत्या. "अहं, ही नाही, ती नाही" करत 'रंगोली' या दुकानात आलो. तिथे तुफान गर्दी होती. कोसा म्हटल्यावर तिथल्या एका सेल्समनने सांगितलं. थांबा थोडं. एक दोन पीस आहेत. आत गोदामात. मी आणून दाखवतो.
समोरचं गिऱ्हाईक आटपून तो आत गेला. काही वेळाने दोन तीन साड्या घेऊन आला. तीच ही साडी. बघताक्षणीच नवरा म्हणाला, हीच ती. आणि बघताक्षणीच मी त्या साडीच्या प्रेमात पडले. चमकदार मोतिया रंगाची प्लेन साडी, फक्त नाजूक भरलेली किनार आणि तसाच नाजूकसा भरलेला पदर... किंमत ११५०/- १९९२ साली. म्हणजे आता साडे अकरा हजारच धरून चाला कमीतकमी. कारण तेव्हा डोंबिवली स्टेशनला जाण्यासाठी शेअर रिक्षा माणशी एक रुपया घेत होत्या फक्त. आता दहा रुपये घेतात.
हा कोसा म्हणजे रेशमाचा एक विशिष्ट प्रकार. विशिष्ट रेशमाच्या किड्यांपासून तयार झालेला. त्याचा ओरिजिनल रंग हाच. पिवळसर. मोतिया. काहीशी सोनेरी झाक असलेला. बहुधा मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील जंगलात मिळत असावा. किंवा तयार होत असावा. या कापडाचे पुरुषांना कुर्ते देखील फार छान दिसतात.
खूप नेसले ही साडी. खूप आवडायची. माझा स्कीन कलर आणि हिचा कलर एकरूप होऊन जायचे. आता विरलीय थोडी एका जागी. मात्र अजूनही इस्त्री केली की तीच चमक पुन्हा जैसे थे येते. या साडीवर मोत्याचे दागिने अफलातून उठून दिसतात.
त्याच वर्षी मोत्याच्या कुड्या केल्या. 'लागू बंधू मोतीवाले' हे नाव जाहीरातीत वाचत होतो. माझ्या एका दूरच्या जावेने सांगितले, की त्यांच्याकडचे मोती, हिरे आणि दागिने अभिजात असतात.
आज 'लागू बंधू' यांच्या ठिकठिकाणी शाखा दिसतात. तेव्हा मात्र दादरला एकच होती. कबुतरखान्याजवळ. एका जुन्या ईमारतीत वरच्या मजल्यावर एका छोट्याशा, साध्याशा गाळ्यात. शोधत शोधत गेलो. तेव्हा मोबाईल तर दूरच पण साधे फोनही नव्हते अजून.
त्यांनी डिझाईन दाखवले. हे पारंपरिक किलवर डिझाईन आम्ही पसंत केले. एका मोत्याची किंमत तेव्हा काहीतरी शंभर शंभर रुपये होती. दोन्ही कानात मिळून सहा मोती. आणि सोन्याची किंमत वेगळी. त्यांनी सांगितले की आमचे मोत्याचे दागिने कर्नाटकात जातात घडवण्यासाठी. मोती बांधण्याचे काम तिथेच होते. ते बनून यायला दोन महिने तरी लागतील. तोपर्यंत तुम्ही येऊ नका. कुड्या आल्या की आमचे तुम्हाला पत्र येईल. पत्र आले की मग या. कारण पुन्हा तेच. फोन नव्हते.
त्याप्रमाणे दीड दोन महिन्यानी त्यांचे पत्र आले. आम्ही गेल्यावर आमच्या हातात त्या पाणीदार कुड्या ठेवत ते म्हणाले, 'तुम्ही वापरून कंटाळाल, पण या कुड्यांना वर्षानुवर्षे काहीही होणार नाही.
अगदी तसंच झालंय. आजही या कुड्या तशाच्या तशाच पाणीदार आहेत. त्यावरचे मोती तसेच आहेत. सोनं, त्यात बसवलेले बारीक माणिक तसेच आहेत. तेव्हा नवऱ्याला पगार होता जेमतेम अडीच तीन हजार फक्त ! त्यातल्या निम्म्याची त्याने मला साडी घेतली नि निम्म्याच्या कुड्या ! कट टू प्रसंग २ - वर्ष १९८७
माझा वाढदिवस - लग्नाच्या आधी आम्ही प्रेमात होतो. घरच्यांनी लग्नाला संमती दिली पण अजून त्याच्याबरोबर कुठे जायचं म्हटलं तर नकारच असायचा, अशावेळी एक दिवस घरी न सांगताच माझ्या वाढदिवसाला कोकणातून सकाळच्या एसटीने आम्ही दोघे मुंबईला आलो. तिथून तो मला पेडर रोडवरील ब्रीच कॅन्डीजवळील सुप्रसिद्ध 'अमर सन्स' या दुकानात घेऊन गेला होता. मला तर ते दुकान ऐकूनही माहीत नव्हते. तिथे मणीपुरी कोटा सिल्क साडी त्याने मला घेऊन दिली. अतिशय सुंदर मजेंटा कलर. किंमत साडेचारशे रुपये. साल १९८७. साडी घेऊन लगेच मुंबई सेन्ट्रलला येऊन परत एसटी पकडून रात्री आठपर्यंत कोकणातल्या घरी!
नवऱ्याची आवड क्लासिक आहे. त्याला बरोबर कळतं की मला काय चांगलं दिसतं. आजही वेस्टर्न असो वा पारंपरिक, कपडे आणि दागिने त्याच्या मदतीशिवाय मी खरेदी करू शकत नाही. मला अजूनही त्याच्यातलं काही कळत नाही.
जेव्हा जेव्हा त्याला बरोबर न घेता, किंवा त्याचा सल्ला न मानता मी काही खरेदी केली ती नेहमी फसलेली आहे.







Dec 12, 2020

फुकटच्या अस्मिता - आणि मालवणी हिसका

 माझ्या नवऱ्याचा एक गावठी मित्र आहे. म्हणजे विदर्भातल्या गावाकडे राहणारा. चांगला इंजिनिअर आहे. बारा गावं फिरलेला आहे. पण मानसिकता मागास आहे.

तो नेहमी वैदर्भियन बोली भाषेतच बोलतो. कधी कधी माझ्यासारखी शहरी बाई बोलणारी समोर आली की अजून मुद्दामच वऱ्हाडी भाषेत बोलतो. चांगली मराठी येत असतानाही.
परवा त्याचा फोन आला.
अर्थात मला नाही, माझ्या नवऱ्यालाच.
पण नवरा फोन घरी ठेवून जरा बाहेर पडला होता.
फोन मी उचलला.
आयती त्याच्या तावडीत सापडले.
याचं झालं वऱ्हाडी भाषेत सुरू. परत मध्ये मध्ये विचारणं, चालेल ना मी वऱ्हाडीत बोललो तर..
मी सभ्यपणे म्हटलं, हो बोला, मला येत नसली तरी समजते.... पण मनातून चिडले होते. मी जर याला म्हटलं असतं, 'चालेल, तू बोल वऱ्हाडीत, मी मालवणी कोकणीत बोलते तुझ्याशी.. चालेल ना... रांxxxx... शिरा पडली तुझ्यार त्या.......'
😆😆😆
तर काय झालं असतं त्याचं....
कशाला लोक असं करतात. प्रमाण मराठी येते ना. तीच बोला ना इतरांशी बोलताना. वऱ्हाडी आला समोर तर वऱ्हाडी बोला, मालवणी आला, तर मालवणी बोला. उगाच चाळे कशाला करता? मला उत्तम कोकणी मुसलमानी मराठी येते, म्हणून ज्याच्या त्याच्यासमोर त्या भाषेत बोलू का मी?
Like
Comment

Dec 9, 2020

शेतकरी आंदोलनासंदर्भात जाणून घ्या काही गोष्टी -

 

शेतकरी आंदोलनासंदर्भात मी सरकास्टीक पोस्ट्स खूप टाकल्या. पण आता जरा गंभीर -
अर्थात त्या सरकास्टीक पोस्ट्स देखील आशयातून गंभीरच होत्या.
पण..
मी साधारण गेली दीड दोन वर्षे ‘किसानपुत्र आंदोलन’ या महाराष्ट्रातील शेतकी विषयक आंदोलनाच्या थोडीफार संपर्कात आहे.
मी स्वतः शेतकरी नाही. शेतीशी माझा काहीही संबंध नाही. तरीही या किसानपुत्र आंदोलनाच्या संपर्कातून मला काही गोष्टी कळल्या. मी अभ्यास केला असे मी म्हणणार नाही. पण काही गोष्टी जाणून नक्की घेतल्या.
मला असे वाटते की सध्या चालू असलेल्या देशातील हमीभाव आणि बाजारसमितीसंदर्भातल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवताना, किंवा विरोधही करताना, त्या आधी या किसानपुत्र आंदोलनाची माहिती, त्यांचा हेतू, त्यांची कळकळ सर्वांनी आधी जाणून घ्यावी व मगच आपली भूमिका ठरवावी.
अमर हबीब सारख्या प्रामाणिक आणि गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या आदरणीय व्यक्तीने शेतकरी विरोधी कायदे या नावाची प्रश्नोत्तर स्वरुपात पुस्तिका लिहिलेली आहे. ती त्यांनी आज लिहीली नाही. छापील स्वरुपात मी ती जवळपास दोनेक वर्षांपूर्वीच वाचलेली आहे.
यात -
१. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण कोणते?

२. कायदे लोककल्याणासाठी असतात मग शेतकरीविरोधी कायदे कसे?

३. संविधानातील परिशिष्ट ९ ही काय भानगड आहे?

४. कोणकणत्या घटनादुरुस्त्या शेतकरीविरोधी आहेत?

५. शेतकऱ्यांसंबंधीचे कोणकोणते कायदे शेतकरीविरोधी आहेत?

६. सिलिंग कायद्याला विरोध का आहे?

७. सिलिंग कायद्याचे नेमके स्वरुप काय आहे?

८. हा कायदा पक्षपात करतो ते कसे?

९. सिलिंग कायद्याचा उद्देश्य जमिनदारी संपविणे हा नव्हता काय?

१०. सिलिंग कायदा करण्यामागे काय हेतू असावा?

११. भुमिहिनांना जमिनी वाटप करण्यास विरोध आहे का?
१२. सिलिंग कायदा उठला तर भांडवलदार येऊन छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन संसार उघड्यावर पडतील त्याचे काय?

१३. सिलिंग कायदा उठल्याने शेतकऱ्यांचा काय फायदा?

१४. शेतकऱ्यांनी शेतरी करायचे सोडायचे काय?
१५. शेतीतून लोक बाहेर पडले तर शेती कोण करेल?

१६. सिलिंग कायदा रद्द करणे सरकारला राजकीय दृष्ट्या परवडत नसेल तर मधला मार्ग कोणता?

१७. जगातील अन्य देशांमध्ये जमीनधारणेची परिस्थिती कशी आहे?

१८. वारसा हक्काच्या कायद्यात काही बदल व्हावा का?

१९. जीवनावश्यक वस्तू कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?
२०. आवश्यक वस्तू कायद्यात कोणत्या वस्तूंचा समावेश केला आहे?

२१. आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला तर?

२२. आवश्यक वस्तू कायद्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला?

२३. या कायद्यात अन्य वस्तूही आहेत, त्यांच्यावर काय परिणाम झाला?

२४.जगातील अन्य कोणत्या देशांत असा कायदा आहे का?
२५. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील का?

२६. भूमी अधिग्रहण कायद्याची पार्श्वभूमी काय आहे?

२७. युपीए व एनडीए सरकारांनी भू-संपादन कायद्यात केलेल्या दुरुस्त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत का?
२८. भू-संपादन कायद्यावर आक्षेप काय आहेत व सूचना काय आहेत?

२९. भारतीय संविधान बदलायला हवे का?

३०. शेतकरीविरोधी कायद्यांना नेमके कोण जबाबदार आहेत?

३१. कोणत्या कायद्याचा, कोणत्या पिकाच्या शेतकऱ्यावर, कसा परिणाम झाला?

३२. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त होत आहेत, अशी आकडेवारी पुढे आली आहे, त्याबद्दल तुमचे मत काय आहे?

३३. शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध न्यायालयात का जात नाहीत?

३४. हे कायदे रद्द व्हावे यासाठी किसानपुत्र आंदोलनाची भूमिका काय आहे?

३५. किसानपुत्रच का?

३६. किसानपुत्र आंदोलनाची वाटचाल कशी आहे?

३७. किसानपुत्र आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर काय करावे लागेल?

अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ती जरूर वाचा, नंतरच आपली भूमिका ठरवा. जर तुम्हाला ही पुस्तिका हवी असेल, तर अमर हबीब यांच्या परवानीने मी तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी ई-मेल करू शकेन. अथवा ८४११९०९९०९ या क्रमांकावर तुम्ही त्यांनाच फोन करूनही मागवू शकता. आणि तुमच्या शंका त्यांना विचारू शकता. अर्थात शंका आणि त्या विचारण्यामागचा हेतू प्रामाणिक असेल तरच.
देशातील सर्व भागातल्या शेतकऱ्यांच्या समस्या काही कॉमन आहेत, तर काही वेगवेगळ्या. कायद्याने कॉमन आहेत, तर पिकं, जमिन, पाणी इ. नुसार वेगळ्या. त्यामुळे सरसकट सगळ्यानाच पाठींबा देता येणार नाही किंवा विरोधही करता येणार नाही. कुठलेही सरकार एवढ्या मोठ्या संख्येत असणाऱ्या शेतकऱ्यांचे वाईट करून निर्णय घेऊ शकणार नाही. एक भांडवलदारापेक्षा अनेक सर्वसामान्यांच्या जोरावर सरकार निवडून येत असते. असे मला वाटते. त्यामुळे मोदी सरकारही शेतकऱ्यांचे वाईट करण्यासाठी कोणता निर्णय घेऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल असे वाटत नाही. मात्र कुणीतरी वाईटपणा घेऊन कठोर निर्णय घेतले तरच शेती आणि शेतकरी सुधारतील. गुडी गुडी वागून जैसे थे परिस्थिती बदलत्या काळानुसार फार काळ ठेवता येणार नाही.

सध्या एक डिसेंबर ते १०  डिसेंबर या काळात या किसानपु्त्र आंदोलनातील सदस्यांचं ऑनलाईन शिबीरही झालं. मला शक्य झालं तितकं मीही सहभाग घेतला. 
किसानपुत्र आंदोलनाचा फेसबूक ग्रुप, फेसबूक पेजही आहे. तुम्ही तिथे सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या, कायदे जाणून घेऊ शकता. 
निदान काही शेतकरी या कायद्यासाठी आंदोलन करत असताना काही या कायद्याविरोधात का आहेत हे तरी सर्वसामान्यांनी जाणून घेऊनच मग त्यावर बोलायला हवे. केवळ शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हणायचं, नि शेतकरी, कामगार म्हटलं की सहानुभूती दाखवायची अशा वरवरच्या भावनांना अर्थ नाही.
  
अर्थात ज्यांना शेतकऱ्यांच्या आडून आपले राजकारणच करायचे आहे, नि आपआपले अजेंडेच पुढे करायचे आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही.  

Dec 3, 2020

समाजवादी कावा -

महाराष्ट्रातले अनेक शेतकरी शेती कायद्यातल्या बदलावर खुश आहेत. त्यांना शेती समाजवादी कचाट्यातून पूर्ण मुक्त व्हावी असेच वाटतेय. ते कायदे रद्द व्हावेत म्हणून ते धडपडतायत.
आणि लेखक, विचारवंत विरोधात 🤦‍♀️ खरंतर यांना विचारवंत कितपत म्हणायचं हा प्रश्नच आहे.
ही पुरस्कारवापसी गॅंग पुन्हा सक्रीय झालेय. शेतकऱ्यांच्या विरोधात.
यांना मोदी विरोध करायचाय.. शेतीशी काही देणं घेणं नाही नि शेतकऱ्यांशी नाही. नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे ही यांची वृत्ती.
पंजाब मधील शेतकऱ्यांवर ( की दलालांवर?) थंड पाण्याचा मारा झाला म्हणून यांच्या लेखण्यांना कापरं भरलंय. पण आये दिन शेतकरी आत्महत्या करतो त्याची कारणे शोधायची नाहीत.. कमीत कमी शेतकी कायदे, याच्या समर्थनार्थ असलेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे, विचार ऐकून घेणे, समजून घेणे एवढं करून मग हे विरोध करू लागले असते, तर समजू तरी शकतो. पण केवळ मोदीविरोधात जायला मिळतंय म्हणून एकही संधी सोडायची नाही नि भांडवलशाहीविरोधात गळे काढायचे. त्यात शेतकरी मेला तरी यांना सोयरसुतक नाही.
यांना शेतीमालाचे भाव वाढतील याची काळजी पडलेय. शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील याचा आनंद नाही..यांना स्वस्त धान्य मिळावे म्हणून शेतीचे भांडवलीकरण नकोय यांना.. यातल्या कितीजणांना अर्थकारण कळतंय? किती जणांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न कळलेत?त्यांच्या समस्या माहीत आहेत? लेखणी चालवता येते नि चार पुस्तकं प्रकाशित झालीत एवढ्याच जोरावर राजकारण करत सुटायचं? सरकारी धोरणांचा विरोध जरूर करावा. मला बीजेपी नि कॉंग्रेस की अजून कोणता पक्ष, त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. पण विरोध करताना त्यातलं भलंबुरं काही बघावं की केवळ आपलंच रेटावं? कोणत्याही शेतकऱ्याला ठराविक एकराच्या वर जमीन घेता येत नाही, शेती करायची नसेल, तरी विकता येत नाही असे कायदे आहेत, याचा तरी यापैकी किती जणांना पत्ता आहे?
गरीब शेतकऱ्यांची शेतीतून सुटका होऊ नये, तो तिथेच पिचून मरावा यासाठी हे संघटित होत आहेत. राजकारण करायला.
शेतीचा शही जाणून ना घेता केवळ आपला समाजवादी मुखवटा सतेज रहावा म्हणून ते शेतकऱ्यांच्याच विरोधात लेखण्या परजू लागलेत.. यात मग 'मला कवी म्हणा, 'मला सााहित्यिक म्हणा' वाले हौशे, नवशे, गवशे देखील सामील होऊन जातात. समाजवादी यात्रेत मिरवायला. कारण साहित्याच्या जगतात टिकून राहायचं तर सगळ्यांनाच हा समाजवादी मुखवटा चेहऱ्यावर बांधूनच राहावं लागतं. तो नाही धारण केला, तर तुम्ही जातीयवादी, धर्मवादी, भांडवलशाहीवादी, मानवताविरोधी, भक्त, संघी वगैरे वगैरे म्हणून शिताफीने तुम्हाला वाळीत टाकलं जाऊ शकतं. घरात हे लोक कामवाल्या बाईचेही खाडे कापतील. पण बाहेर गोरगरीबांबाबत कळवळे दाखवतील. लिहायला काय जातंय ? दांभिक वृत्ती असली की लेखन एक आणि कृृती एक सहजपणे करता येऊ शकते. ---
शेतीमालाचे भाव वाढायलाच हवेत. देशात सर्वात काय स्वस्त असेल तर तो शेतीमालच आहे. परवडत नसेल, तर मुलं, पुढची पिढी जन्माला घालताना विचार करा. लाखो रुपयांची शिक्षणं परवडतात, लाखो रुपयांची घरं परवडतात, गाड्या परवडतात, मोबाईल नि त्यातले नेट परवडते, नि कांदा दहा रुपयांनी वाढला तर परवडत नाही? आज घरकाम करणाऱ्या बायांकडेही टिव्ही असतो, फ्रिज असतो, मोबाईल असतात. नि सोसायटीचा केर काढणाऱ्या लोकांकडेही. पण त्यांना कांदा परवडत नाही? समजा नसेलही परवडत तर दोन, चार किंवा एक मुलही जन्माला घालताना विचार करावा लागेल त्यांना. तेवढं न कळण्याइतपत अडाणी आता कुणीच राहिलं नाही. केवळ अन्नधान्य स्वस्ताई आहे, रेशनिंगवरही मिळतं म्हणूनच मुलं जन्माला घातली जातात बिनधास्त. वर चोच देतो तो चारा देतो ही शिकवण. चोच देतो तो चारा देत नाही. इथले समाजवादी कायदे शेतकऱ्याची अडवणूक करून तुम्हाला चारा देतात. शेतकरी तुमची मुलं फुकटात पोसण्यासाठी नाहीत.
चार मुलं मलाही आवडत होती. पण त्यांना चांगलं जीवन देऊ शकणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी जन्माला घातली नाही. हे जे शेतकी कायदे रद्द करण्याला विरोध करतात, त्यांनीही नाही घातली. त्यांनी एकच मूल जन्माला घालावं नि अमेरिकेला पाठवावं. शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पोराबाळांनी मात्र इथं गरीबांची मुलं पोसण्यासाठी शेतीत मरावं. अशी अपेक्षा. ---- जाता जाता - बिल्कीस दादी इतक्या म्हातारपणातही मोर्च्यात सामील झाली म्हणून तिचं कौतुक ? आणि मोदीची आई बँकेच्या रांगेत उभी राहीली तर मोदी नालायक?
आता म्हातारपणाचं भांडवल कोण करतंय आपल्या स्वार्थासाठी? तुमच्यात नि त्यांच्यात रत्तीभर फरक नाही. असता तर सर्वसामान्य तुमच्या पाठीशी उभे राहिले असते.

Dec 2, 2020

भारतीय दांभिक, उपाशी, वखवखलेली विकृत संस्कृती-

 भारतीय संस्कृतीचा डांगोरा मोठा पिटला जातो. 
पण ही संस्कृती अतिशय विसंगत, दांभिक आणि विकृत संस्कृती आहे.
इथं अध्यात्म, नीती-अनीती, पाप-पुण्य याच्या कल्पना विचित्र आहेत. 
विशेषतः स्त्री-पुरुष संबंधांबाबत ही संस्कृती गंडलेली आहे. 
इथं मंदिरांवर संभोगशिल्पे आहेत. त्यात ऍनिमल पॉर्नपासून गॅंगबॅंगपर्यंतच्या सर्व सेक्स कल्पना आणि भावना चित्रीत आहेत. 
मात्र तरीही इथं सेक्सकडे गलिच्छ नजरेने पाहिलं जातं. 
मुलं तिशी-चाळीशीत आली तरी लग्नाआधी सेक्स करण्याला जाहीर मान्यता नाही. त्यांना चोरूनच भेटावे लागते. लग्न होईपर्यंत मुलीला सेक्सबद्दल काहीही माहिती नसणं हे तिच्या मुर्खपणाचं द्योतक असायला हवं, परंतु तसं न होता अशा मुलीला पवित्र, निरागस इत्यादी समजून खुश होणारे तिच्यासारखेच मुर्ख तरूण अजूनही या देशात बहुसंख्येत आहेत.
भारतात सेक्स म्हणजे फक्त पोरं काढण्याचं माध्यम समजलं जातं. त्यातही मुलं झाली, की निदान महिलेला तरी सेक्स कशाला हवा, किंबहुना तिला तो नकोच असतो, किंवा नसावाच अशा फुल टू अपेक्षा भारतीय समाजात असतात. 

मध्यंतरी स्टेशन परीसरातून मी एकदा जात होते. तिथे एक चाळीशीतली तरुणी आणि तिचा बारावीतला मुलगा, हे दोघे मिळून तीन चार पंचविशीतल्या तरुणांशी भांडताना दिसले. भांडण हमरीतुमरीवर आले होते. मी स्कूटरवर होते. मला वाटले की त्या बाईला ते तरूण त्रास देत आहेत. मी स्कूटर एका बाजूला लावून उतरले. भवताली गर्दी होती. पण कोणीही मध्ये पडत नव्हते. ती बाई धावून धावून त्या मुलांपैकी एकाला मारायला जात होती. बडबड करत होती. अर्थात मी तिच्या बाजूनेच होते. काही माहीत नसल्याने. मी तिला जरा एका बाजूला धरून विचारले. काय झालं?
आता हतबुद्ध होण्याची पाळी माझी होती. मला ती बाई म्हणाली, हा एका मुलीला स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर किस करत होता. सगळ्यांच्या समोर. यांना काही लाजा नाहीत का? लहान मुलं वगैरे बघतात इत्यादी इत्यादी..
मी म्हटलं ते जर राजीखुशीने करत असतील, तर त्यात आपला काय संबंध? तो जर त्या मुलीवर जबरदस्ती करत असेल, तर मध्ये पडणं ठिक. पण जर ती मुलगीही त्याची गर्लफ्रेन्ड असेल, नि राजी खुशीने त्याच्याबरोबर असेल, तर त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ती बाई संस्कृतीच्या नावाने पेटली होती. शेवटी तो मुलगा आणि त्याचे दोन मित्र हे मारामारीवर उतरले. रिक्षातून रॉड काढू लागले. मी त्या मुलाला समजावलं. त्याच्या रिक्षात बसलेल्या मित्राला समजावलं, की याला घेऊन निघून जा. त्या बाईच्या नादाला लागू नका.
आईशप्पथ सांगते, जर मी मध्ये पडले नसते, तर त्या बाईने नि तिच्या बारावीतल्या मुलाने त्या दिवशी मार खाल्ला असता. शिवाय लोक तिच्याच बाजून राहिले असते. कारण एक मुलगा आणि मुलगी राजीखुशीने सार्वजनिक जागी किस करत असतील, तरी यांची संस्कृती बुडते. 
हीच बाई आणि हाच तिचा मुलगा, रस्त्यात कुणाला थुंकताना पाहून, कचरा टाकताना पाहून त्याला जाब विचारते झाले नसते. गपगुमान तिथून गेले असते. 
कारण भारताच्या रस्त्यावर हगणं, मुतणं, कचरा टाकणं, थुंकणं हे सगळं केलेलं चालतं. मात्र कुणी प्रेम केलेलं चालत नाही. इथं बलात्कार आए दिन होतात. तशी पार्श्वभूमी घरात असते. वर्चस्वाची. तेव्हाच तिथे बलात्कारी पैदा होतात. मात्र प्रेमाची पार्श्वभूमी कोणत्याच घरात सहसा नसते. मुलीशी बोलायचं नाही, मुलांशी बोलायचं नाही. हे असले संस्कार चांगले संस्कार म्हणून ओळखले जातात. 
आजही मी जेव्हा माझा मित्र म्हणून मी एखाद्याचा जाहीर उल्लेख करते, तेव्हा शेकडा नव्वद टक्के लोकांच्या, त्यातही महिलांच्या नजरा अधिक बदलतात. बाईला मित्र कसा काय असू शकतो? त्यातही माझ्याएवढ्या मोठ्या बाईला?.. मी काय आता कॉलेजला जाणारी मुलगी आहे का मला मित्र असायला? 
ही परिस्थिती मुंबईसारख्या शहरात आहे. तर भारताच्या इतर राज्यांत आणि छोट्या गावांमध्ये तर विचारायलाच नको. 
स्त्री पुरुष, तरुण-तरुणी प्रेमासाठी, सेक्ससाठी इथं चोरून भेटतात. घरांमधून जागा नसतात.  बाहेर भेटलं की समाजाला चालत नाही. अनेकदा अशा गावाबाहेर, एकांत जागी चोरून भेटणाऱ्या तरुणतरुणींना, स्त्री-पुरुषांना इतर उपाशी, वखवखलेले तरूणच मागावर राहून त्रास देतात. ब्लॅकमेल करतात. कारण इथं प्रत्येक तरुण उपाशी आहे. त्याला प्रेम करायला, भिन्नलिंगी मैत्री करायला, त्यांच्याबरोबर जाहीर रित्या भटकायला, परवानगी नाही. किंवा  त्याची स्वतःचीच एखाद्या मुलीबरोबर निखळ मैत्री असण्याएवढी त्याची लायकी नाही. पात्रता नाही. कारण पुन्हा तेच. घरीदारी असलेल्या स्त्रीपुरुष मैत्रीबाबतच्या दांभिक कल्पना. एखाद्या मुलीबरोबर एखादा तरुण दिसला, किंवा उलटही तर लगेच त्याच्या घरी जाऊन सांगण्याचे परमपुण्य काम मागच्या पिढीतले उपाशी ढुढ्ढाचार्य करत असतात. पोलिस देखील अशा तरुणतरुणींना त्रास करतात. दंड करतात. 

थोडक्यात इथली तरुण पिढी देखीलउपाशी आहे, नि प्रौढ पिढी देखील. पण बोलू शकत नाही. कारण त्याच्यावरही संस्कार नावाच्या च्युतियापाचे ओझे असते. मग इथला पुरुष बलात्कार करतो, ते जमलं नाही तर गर्दीत सापडलेल्या बाईच्या अंगाला नको तिथे स्पर्श करतो, धक्के मारतो, चिमटे काढतो. एखादी बरी बाई दिसली की तिच्याकडे एकटक उपाशी नजरेने बघत बसतो. इथं लहान लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतात, शरीरविक्रयाचे पाच रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंतचे सौदे होणारे बाजार भरभरून वाहतात. तिथं पोरी पळवून आणल्या जातात, विकल्या जातात, या उपाशी भारतीय पुरुषांची वखवख शमवण्यासाठी त्या मुलींवर अमानुष अत्याचार केले जातात. त्याचं वैषम्य वरील उदाहरणातील बाईपासून कोणालाच वाटत नसते. त्यावर कुणी बोलत नसते. कारण देवदासीसारख्या प्रथा या आपल्याकडे धर्म आणि संस्कृतीच्या नावावर जाणीवपुर्वक तयार केल्या गेल्या आहेत.

इथं अजूनही बाई म्हणजे, 'माझ्या घरची ठेवायची झाकून, नि दुसऱ्याची बघायची वाकून' अशी वस्तू समजली जाते.

मला असा प्रश्न पडला, की वरील उदाहरणातील बाईचा मुलगा आता कॉलेजला जाईल, उद्या शिकण्यासाठी अमेरिका, युरोपला जाईल. तिथे तर सर्रास खुलेआम तरुण तरुणी एकमेकांच्यात हरवून बसलेले दिसतात. ठायी ठायी. अगदी एकमेकांच्या मांडीवर बसलेले असतात, एकमेकांच्या अंगावर पडलेले असतात. हगिंग, किसिंग सर्वांच्या समोर, सर्वांना विसरून सुरू असते. तिथे लहान मुलेही असतात. तरुणींच्या अंगावर वीतभर चड्डी नि अर्धा वीत कुडता असतो. पण या जोडप्यांकडे कुणीही ढुंकून बघत नाही. त्यांना त्रास करण्याचे तर दूरच. पण त्यांच्याकडे बघत बसणे हे देखील तिथे मॅनरलेस समजले जाते. तिथे तर जागांचेही प्रॉब्लेम नसतात त्यांना. बहुतेक तरुणतरुणी एकत्र लिव्ह इनमध्ये राहत असतात. तरीही जाहीर ठिकाणीही ते एकमेकांच्यात हरवून बसू शकतात. तेव्हा हा मुलगा त्या मुलांना मारायला धावेल का? याची ती संस्कृतीपुजक आई देखील त्या लोकांना मारायला धावेल का, जेव्हा ती आपल्या मुलाकडे तिथे जाईल तेव्हा? 
आपल्याकडे तर नवराबायकोही हातात हात घेऊन फिरणं पाप समजतात, वाईट समजतात. 
लोक म्हणतील, प्रेमाचं प्रदर्शन कशाला? ठिक मग, रस्त्यात हगून, थुंकून, कचरा टाकून घाणींचं प्रदर्शन मात्र चालतं का तुम्हाला? प्रेमाचं नको, घाणीचं प्रदर्शन चालतंय तुम्हाला. 

आणि आपल्याकडे अजूनही मुलींच्या तोकड्या कपड्यांवर निरर्थक चर्चा झडतात. बलात्कारासारख्या घटनांचे समर्थन करत मुलींच्या कपड्यांवर आरोप केले जातात. मात्र आपल्या इथल्या मंदिरात, लेण्यांमध्ये सर्व शिल्प हे अत्यल्पवस्त्रांकीत तरुणींचे असतात. म्हणूनच भारतीय समाज दांभिक आहे. तो नीतीमान नाही, तर विकृत आहे. गंडलेला आहे. 
आपल्याकडे (नीतीमान)पुरुष इतके वखवखलेले आहेत, की ते केवळ अल्पवस्त्रांकीत गोऱ्या युवती बघायला गोव्याला जातात. गोव्याचे सौंदर्य बघायला नाही. आणि घरच्या बाईला पूर्ण कपड्याची संस्कृती शिकवतात. भारतीय लोकांची डोकी इतकी बधीर झालेली आहेत की त्यांना साडी ही संस्कृती वाटते. त्यातून दिसणारं उघडं अंगं हे असंस्कृत वाटत नाही. मात्र पॅन्ट शर्ट घातलेली बाई दिसली की यांची संस्कृती बुडते. इतका मुर्ख समाज अजून कुठे असेल. 
हे तर दूरचं झालं. इथं सोशल मिडीयावर देखील स्त्रियांना कपड्यांवरून, त्यांच्या लेखनावरून, त्यांच्या वयावरून, जज केलं जातं. त्यांना उपलब्ध समजलं जातं. इथं नवराबायको दोघेही सोशल मिडीयावर असले, तरी एकमेकांवर पहारा ठेवून राहतात. एकमेकांना स्पेस देत नाहीत. बहुसंख्य लोकांजवळ स्वतःचं असं सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं काहीच नसतं. तेवढी वैचारीक समज नसते, क्षमता नसते. त्यामुळे इथं केवळ हा काय करतोय, ती काय करतेय, हा कुणाशी बोलतोय, ती कुणाबरोबर दिसतेय हेच गॉसिपिंग अधिक केलं जातं. त्यावरून त्या त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधले जातात. आणि हे करणारे अधिकतर पुरुष असतात.
पण पुरुषांनाच का नावं ठेवा, इथं स्त्रिया देखील प्रेमाच्या नावावर लांबच लांब पोष्टी टाकतील. हिंदी इंग्रजी सिनेमे, त्यातील नायकनायिकांचे प्रेम, प्रेमाची गाणी यावर लळूलळून लिहितील. त्यावर शेपाचशे प्रतिक्रिया पडतील. हजार बाराशे लाईक्स उठतील. पण हेच लोक एखादी वास्तवातली प्रेमकहाणी समोर आली तर तिला भरभरून शिव्या देतील. इथं प्रेम म्हणजे लग्न, प्रेम म्हणजे एकमेकांना खेकड्यासारखं अडकवून ठेवणं, प्रेम म्हणजे जबाबदाऱ्या, प्रेम म्हणजे पाप, प्रेम म्हणजे प्रदर्शन, प्रेम म्हणजे वंशाला वारस अशा आपणच आपल्या दांभिक मनाच्या सोयीसाठी तयार करून ठेवलेल्या व्याख्या आहेत. 
अरे यार, प्रेम म्हणजे फक्त प्रेम. ते क्षणाचं असेल, महिन्याचं असेल, वर्षाचं किंवा जन्माचं. तुमच्या व्याख्या तुम्ही त्याला का लावताय? जे करतायत ते त्यांचं बघून घेतील. क्षणाचं करायचं की जन्माचं ते...

प्रेम आणि सेक्स म्हणजे उदात्त, मंगल, पवित्र असलं काही नसतंय. इतर अनेक भावनांप्रमाणेच ती एक भावना आहे. गरज आहे. बास्स. इतकंच. माणसाला साधी पाणीपुरी खाताना सारं शरीर सुखमय, हवंहवं वाटत राहण्यासारखं होतं. भैय्या, और एक दो ना, एक तिख्खा दो, एक मिठा दो, चटणी जरा और डालो असं म्हणत एका प्लेटच्या जागी चार प्लेट हादडल्या जातात. मग पाणीपुरी खाणं हे उदात्त, मंगल, पवित्र, अध्यात्मिक वगैरे वगैरे वाटायला हवं का? प्रेम, सेक्स या उदात्त, मंगल, पवित्र इत्यादी नसून आनंद देणारी गोष्ट आहे. स्वतः आनंदी रहा, दुसऱ्याला राहू द्या. तुमची गळणारी नाकं तिथं नका खुपसू. बस इतनी सी बात है. 

भारतात अजून दोनशे वर्षे तरी स्त्रीपुरुष निखळ संबंध, प्रेम-सेक्स इत्यादीबद्दलच्या भोंगळ कल्पना, समज गैरसमज बदलणार नाहीत.

बरं मनमर्जीने प्रेम आणि सेक्स सोडा, इथं लग्नं तरी प्रेमाने होऊ दिली जातात का? तर तेही नाही. पोरांची लग्नं हा पालकांचा स्वार्थ असतो. त्यांना त्यांची जात, धर्म, गोत्र, कुळ इत्यादी जपायचे असतात. पोरांना लवकरात लवकर पोरं होऊन वारस हवे असतात. इथल्या भिकाऱ्याला देखील खानदानाचा अभिमान असतो, नि वंशाला पोर हवं असतं. आपण पोरं काढली तितक्यावर लोकांचं समाधान नसतं. इथं पोरांनी पण पोरं काढून पालकांना कृतकृत्य करायचं असतं. नि तरी हे म्हातारे जिवंत राहिले, तर नातवंडांनीही पतवंडं देऊन यांना उपकृत करायचं असतं. सोन्याची फुलं उधळायची असतात. 
थोडक्यात इथं प्रेम आणि सेक्स म्हणजे पोरं काढण्याचं माध्यम.  ती पोरं पण आपल्या जातीची हवीत. धर्माची हवीत. तर ती गोड असतात. तशी ती नसली तर कडूच. पण ते माध्यपणम वाईट समजायचं. त्याची निंदा करायची. 
म्हणूनच हा समाज विकृत समाज आहे. हा माणसाला नैसर्गिक जगू देत नाही. स्वतः जगत नाही.

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...