Oct 12, 2021

भटकंती - लॉकडाऊन अनुभव

 ....रत्नागिरीहून कास पठारला जाण्यासाठी निघालो. नि वाटेत एक दिवस महाबळेश्वरला थांबलो.
खूप पाऊस, प्रचंड धुकं. या अशा ऋतुमध्ये महाबळेश्वरला दुसऱ्यांदा येत होते. दहा पावलांवरचं दिसेना इतकं धुकं. खरंतर ते धुकं नसून ढग असतात. 

उन असो, ढग असो वा पाऊस.. महाबळेश्वरला आल्यावर शॉपिंग हे मस्ट आहे. तिथलं मार्केट भुलावतंच आपल्याला. चपला, शाली, स्वेटर्स, रजया, बॅगा, चिक्की, टॉफीज्, मसाला चणे नि काय काय. एकही वस्तू न घेता तिथून परत जाणारा माणूस योगीच असू शकतो. त्यामुळे यथासांग खरेदी झाली. मका पॅटीस, स्ट्रॉबेरी शेक सगळं खाऊन झालं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस जरासा कमी झाला, किंचित उघडीप दिसू लागली नि हत्ती पॉइंटवर जाता आलं. छान स्वच्छ वातावरण मिळालं. थोडं सूर्यदर्शनही झालं. त्यामुळे पॉइंट्सवरच्या सगळ्या  ऍक्टीव्हीटीज करता आल्या.  अगदी घोडेस्वारीपासून माकडांच्या त्रासापर्यंत सगळं.

महाबळेश्वर हे सर्व ऋतुत  अनुभवण्याचं ठिकाण आहे. प्रचंड जंगल, लिंगमळा, तिथले धबधबे, विविध पक्षी, विविध पॉइंट्स, शॉपिंग. शिवाय महाबळेश्वर सुरक्षित आहे. तुम्ही एकट्यानेही तिथं भटकंती करू शकता. अगदी स्त्रिया देखील. अर्थात स्त्रियांना सदासर्वकाळ सगळीकडेच जसं एक सिक्स्थ सेन्स वापरतच जगावं लागतं तो वापरून अखंड सावध राहूनच कुठंही वावरणं श्रेयस्कर!

माझ्या मते स्त्रियांनी सोलो ट्रीप्स करायला हव्या. एकट्याने बाहेर निघायला हवं. थोडी भटकंती करायला हवी. मला तर अगदी सोळा सतराच्या वयापासून एकटीने प्रवास करण्याची सवय आहे. भटकंती मी कोणत्याही प्रकारे करू शकते. एकटीने, नवऱ्यासोबत, मित्रमैत्रिणींसोबत अथवा टूर कंपनीच्या ग्रुपसोबतही. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. मी कुठेही कंटाळत नाही सहसा. सगळ्यांत राहूनही अलिप्त राहण्याचा स्वभाव मुळचाच आहे. त्यामुळे माझा प्रवास हा माणसात असला तरी सोलोच असतो. तसं तर प्रत्येक व्यक्तिचा प्रवास हा सोलोच असतो. "कहने को साथ अपने दुनिया चलती है.. पर चुपके इस दिल में तनहाई पलती है".............या ओळी प्रत्येकालाच लागू पडतील. 

भटकंती आवडत असली, तरी मी भटकी नाही. मला स्थैर्य पसंत आहे. मी मनाने आणि सवयीनेही अगदी शहरी आणि घर प्रिय असणारी बाई आहे. पण थोडंफार भटकण्याने तुम्ही अनुभवसमृद्ध होता, फ्रेश होता, आपल्या विहिरीबाहेरही अफाट जग आहे याची आपल्या बेडूकमनाला थोडी तरी जाणीव होते. त्यातही एकटं फिरून पहा. मजा असते. 

गेल्या वर्षीची गंमत सांगते. कर्नाटकातील कूर्गचं प्लॅनिंग केलं होतं. मी आणि नवरा. दोघेच. (आम्ही दोघे दोघेच अधिक फिरलोय. टिपिकल मराठी मध्यमवर्गीय.) पण नवऱ्याचा नंबर विपश्यना कोर्समध्ये लागला (जो लागायला अनेकदा बराच काळ लागतो.) आणि तो तिकडे गेला. मी रेल्वे, हॉटेल बुकींग करून ठेवलं होतं. (मीच. कारण आम्ही दोघं फिरत असलो, तरी सारं प्लॅनिंग, बुकींग हे मीच करत असते. फार तर मुलाची मदत घेऊन. नवरा फक्त ममं म्हणत निर्धास्त ट्रिप एन्जॉय करत असतो. माझ्यावर विसंबून.)
नवऱ्याला म्हटलं. तू जा विपश्यनेला. मी सगळी तिकीटं रद्द करून घेते कूर्गला नंतर जाऊ पुन्हा कधीतरी. ही गोष्ट मार्च २०२०ची.  नवरा गेला. मी तिकीटं रद्द करणार, एवढ्यात माझा मुलगा म्हणाला, 'आई रद्द कशाला करतेस. तू जा की फिरून ये.' मी दुविधेत पडले. जावंसं तर वाटत होतं. पण नवरा परतेल, तेव्हा त्याला काय वाटेल? त्यालाही यायचं होतं. नि आपण एकटीनेच मजा करून यायचं? पण मोह जिंकला नि मी फक्त त्याचं तिकीट रद्द करून मी एकटीच निघाले. कूर्गला जायला. काहीतरी तेरा मार्च वगैरे होती. आसपास.  कल्याण टू मॅंगलोर ट्रेनचं बुकींग होतं. तिथून कूर्गला टॅक्सी करून जाणार होतो. 

पण त्याच सुमारास कोविडचा प्रसार वाढत होता. अजून इथं सुरूवात होती. बातम्या येत होत्या. मास्क बांधा, सॅनिटायझर लावा, लोकांपासून लांब राहा. मी म्हटलं, अशा परीस्थितीत कसं जायचं रे, पण मुलगा म्हणे, त्याला काय होतंय. जा. 
ठिक आहे, चला तर मग. 

तोपर्यंत अजून जागोजागी मास्क मिळत नव्हते. मुलाचा ट्रेकमास्क होता. तो सोबत घेतला. सॅनिटायझर घेतलं. 

ट्रेनमध्येच पुढील परिस्थितीची चुणूक आली. ट्रेन बहुतांश रिकामी होती. लोकांनी आपली रिझर्वेशन्स रद्द करून घेतली असावीत.  पण तरी फार काही वाटलं नाही. सकाळी मॅंगलोरला उतरले. हॉटेल मॅंगलोर शहराबाहेर दहा किमीवर होतं. रिसॉर्ट बुक केलं होतं दोन दिवसांसाठी. रिक्शा करून गेले. तर ते एका उंच टेकडीवजा जागी पार जंगलातच होतं. त्यात माझं कॉटेज अगदी एका बाजूला. भवतीने झाडी. सामान टाकलं नि रिसेप्शन काऊन्टरला विचारलं, गावात कसं जायचं? तिने पर्याय सांगितले. त्यात एक भाड्याने स्कूटर मिळते हेही सांगितलं. हे कधी केलं नव्हतं. म्हटलं, चला स्कूटर घेऊन आपलं आपण फिरू. स्वस्तही पडेल नि मस्तही. 
काय बघायचं? इथे सगळंच बंद आहे कोविडमुळे. झू, पार्क सगळंच. गावात फिरा.

कॉटेजच्या बाहेर येऊन तिथून रिक्शा करून स्कूटरच्या दुकानात गेले. तिथे स्कूटर भाड्याने घेतली. दोनशे रुपये भाडं काहीतरी दिवसभराचं.  विचारत विचारत निघाले. पण गाव फारच लांब होतं. तिथे पोचून ठरवलेली ठिकाणे पाहू म्हटलं, तर एक मंदिर, दोन रेस्टॉरंट्स एवढंच पाहता आलं. तोवरच संध्याकाळ होत आली. परतायला हवं म्हणत आल्या रस्त्याने गुगल मॅप लावून निघाले. वाटेतच काळोख झाला. नि जसं जसं गावाच्या बाहेर आले तसं सगळं सुनसान होत गेलं. रस्त्यावर काळोख. आणि मंजिल काही येईचना. असं वाटत होतं की अंतहीन चालत राहिलोय आपण आणि कुठेतरी भरकटलोय. थोडी घाबरले. मध्ये कुणीतरी भेटायचं चुकून त्यांना विचारत गेले. शेवटी एकदाच आलं स्कूटरचं दुकान. स्कूटर जमा केली. पण रिसॉर्टपर्यंत जायला रिक्शा गरजेची होती. ती बराच वेळ सापडेना. एकदाची सापडली. बिचारा भला होता. किमान पैशात पोचवलं. त्या जंगलात आल्यावर त्या कॉटेजमध्ये एकटं राहायला भीती वाटू लागली. जनावरं, भूतं, हडळी आठवू लागल्या. रिसॉर्टवाल्याला म्हटलं, बाबा रे रिसेप्शनच्या इथेच दे ना एखादी रूम जवळ. तर नाहीए म्हणाला. तिथे भीतीसारखं काही नाही म्हणाला. काही वाटलं तर आम्हाला फोन करा. आम्ही जागेच आहोत. 

मग दारं खिडक्या आतून घट्ट लावून झोपले. काही फोन केले. दुसऱ्या दिवशी इथे राहायचं नाही ठरवलं. शिफ्ट व्हायचं गावातल्या हॉटेलमध्ये. सकाळी उठून नाश्ता करून गावात आले. चौकशा करून एक हॉटेल मध्यवर्ती ठिकाणी शोधून काढले. कोविडची भीती वाटत होतीच. माझ्याजवळच्या सॅनिटायझरने मीच रूम क्लीन करून घेतली. बेड चादरी ब्लॅंकेट सगळ्यावर मारून घेतले. उडपी रेस्टॉरन्ट शोधून तिथे जेवून घेतले. दुसऱ्या दिवशी कूर्गला जायचं होतं त्यासाठी बस सोयीची पडणार होती. एकटीने टॅक्सी करून जाण्यापेक्षा. थोडा आराम करून राहिलेली ठिकाणं बघू नि बस स्टॅन्डवर जाऊन बसची चौकशी करू म्हणून निघाले. मॅंगलोर तसं मोठं शहर आहे. एक एक ठिकाण बरंच लांब होतं. एसटी स्टॅन्डवर जाऊन बसची चौकशी केली. तिथून बीचवर जायला निघाले.
मध्ये मध्ये कोविडसंबधित बातम्या येतच होत्या. मेसेजमध्ये, फोनवर. लॉकडाऊनच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. बीचवर गेल्यावर कोविडची खरी चुणूक जाणवली. बीच बंद केला होता. पोलिस कुठूनही आत जाऊ देत नव्हते. 

बीचवर जाण्यासाठी देखील एका मोटरबोटमधून जावे लागत होते. तिकीट काऊन्टरवरची म्हणाली की तिथे जाऊ देत नाहीत. तरी माझ्या सारख्या अजून काही प्रवाशांनी बोटीची तिकीटं हट्टाने मागितली. तिने ती वैतागून दिली. तिकडे गेलो खरे पण पोलिसांनी उतरूच दिलं नाही. आल्या पावली परत. तेव्हा कोविडचं गांभीर्य जाणवू लागलं. तिथेच दोन मित्रांचे फोन आले. की रेल्वे देखील बंद होणार आहेत. तू काळजी घे. तरी वाटत होतं, छे.. एवढ्या रेल्वे कशा बंद करतील? पण एका मित्राने कोणत्या गाड्या बंद केल्यात त्याची यादीच पाठवली. मग मी हबकले. मॅंगलोरमधले मॉल वगैरे बंद होते ते कळले. संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर वेगात हालचाली केल्या. कूर्गवाल्याला फोन करून विचारले, तिकडे परिस्थिती कशी आहे? तोही म्हणाला सार्वजनिक ठिकाणं बंद केलीत कालपासून. मग लगेच दुसऱ्या दिवसाची परतीची एखादी ट्रेन सापडते का पाहिले. सुदैवाने दुपारी एकची सापडली. लगेच तिचं परतीचं रिझर्वेशन करून टाकलं. ते मिळाल्यावर हायसं वाटलं. मग आधीचं परतीचं रद्द केलं. 

मग मात्र निवांत झाले. आरामात झोपले. दुसऱ्या दिवशी गावातल्या प्रसिद्ध उडपी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन भरपेट खाल्लं. आणि स्वारी गाशा गुंडाळून बॅक टू पॅव्हिलियन. आल्यावर मुलावर जरा रागावून घेतलं. भलत्याच परिस्थितीत मी नाही म्हणत असताना मला जा जा करून पाठवलं म्हणून. काहीतरी सतरा की अठरा मार्चला परत आले नि २१ पासून कडक लॉकडाऊन लागला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती माझ्याबाबतीत हेच खरं. हाहाहा....

अंगावर जरा काटा आला होता. जर अजून बेसावध राहिले असते नि सगळ्या ट्रेन, गाड्या, हॉटेलं बंद झाल्या असत्या, तर मी तिकडे काय केलं असतं?  तरीही कानाला खडा वगैरे लावण्याइतकी मी भ्यायले नव्हते. मी काही ना काही मार्ग काढलाच असता. शेवटी भारतातच तर होतो. मॅंगलोर असं कोणतं परग्रहावर आहे बा?

इकडे नवराही तर अडकलाच सेंटरवर. त्याला घ्यायलाही  मीच ऑनलाईन परवानग्या वगैरे काढून गाडी घेऊन गेलेच की तिथून आल्यावर. हाय काय नि नाय काय...
मै क्या हिरकणी से कम हुं के......आपण साऱ्याच हिरकण्या आहोत. संकटात, अडचणीत अधिक उजळून निघणाऱ्या. संकटात हतबल व्हायला आपण काय पुरुषोत्तम थोड्याच आहोत..
हेच तर अनुभव असतात जीवनाचे. यातूनच तर आत्मविश्वास दृग्गोच्चर होत जातो. कुणावर अवलंबून राहण्याची भित्री वृत्ती कमी होत जाते. म्हणूनच, बायांनो एकट्या फिरा. झोला उठाओ, और निकल पडो....डर के आगेही जीत है........

अरे, पण... कास पठारला जाता जाता मी कूर्गचाच अनुभव सांगत बसले की..... आता कास पठार पुन्हा केव्हातरी...!


Oct 7, 2021

भटकंती -

 अधुनमधून थोडी भटकंती केली की आत्मा फ्रेश होतो. त्यातही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा ठिकाणी तुम्ही राहत असाल, तर दोन चार महिन्यांतून तिथून पळून कुठेतरी निवांत, शुद्ध हवेच्या ठिकाणी चार आठ दिवस जाऊन डिटॉक्स होऊन येणं हे पुढील जगण्यासाठी आवश्यक असतं.

कोकणची भटकंती ही काही कुणाला नवीन सांगण्याची गोष्ट नाही. तरीही माझं कोकणावर प्रेम आहे. मी अजूनही मनाने केशवसूत, पेंडसे, दळवी यांच्या कोकणात वावरत असते. आणि तसं पाहायला गेलं तर अजूनही कोकण तसंच आहे. फार फरक पडलेला नाही. 
तिथली हिरवाई, डोंगर, झरे, समुद्र, खाड्या, बारमास वाहणाऱ्या नद्या, देवळं, लाल माती, माड अजून तशीच सुशेगाद आहेत. स्वच्छ आहेत. निवांत आहेत. 

कास पठारला जायचं होतं. मित्राने सांगितलं आधी माझ्याकडे रत्नागिरीत या. तिथून जाऊ पुढे. म्हणून आधी रत्नागिरीला गेलो. बरेच वर्षांनंतर. तिथला भगवतीचा किल्ला, भाट्येचा किनारा, गणपती पुळे, आरे-वारेचा किनारा हे सगळं भटकलो, भरपूर फोटो काढले, व्हिडिओज काढले, मस्ती केली. 
दुसऱ्या दिवशी मार्लेश्वरला गेलो. डोंगरातला प्रचंड धबधबा आणि डोंगरातल्या गुहेत असलेलं मार्लेश्वराचं वास्तव्य. मंदिर असं नाहीच.  गेलो तेव्हाच नेमकी आरती सुरू झाली. नि केशवसुतांच्या ओळी आठवल्या -

उंच नाहीत देवळे मुळी तेथे
परी डोंगर आहेत मोठ मोठे

देवळी त्या देवास बळे आणा
परी राही तो सृष्टीमध्ये राणा

उंच डोंगर ते उंच कडे भारी
पडे धो धो ज्यांचियावरून वारी........ 

देव बिव न मानणारे मन देखील नकळत नतमस्तक होतं सृष्टीचे ते रूप पाहून.

माझे आजोबा म्हणायचे, 'कोकणात जितके दगड तितके देव, जितका झाडोरा तितक्या भाज्या नि जितकी झाडं तितकी भूतं.'
कोकणी माणूस देवाला भिऊन असतो. नि भूतालाही. त्यामुळेच की काय कदाचित कोकण हे गुन्हेगारीच्या बातम्यात कमीच असतं. 
मला आठवतंय, माझ्या बाबांचं किराणा दुकान होतं. तेलाचा ट्रक आला होता. आजुबाजूच्या प्रत्येक दुकानदारांनी आपल्याला हवे असलेले तेलाचे डबे विक्रीसाठी म्हणून घेतले. ट्रक निघून गेल्यानंतर बाबांनी आपण घेतलेल्या डब्यांपैकी दोन डबे उचलून दुकानात आणले. तिसरा घ्यायला गेले, तर तिथे डबा नाही. गायब! पंधरा किलो तेलाचा डबा गायब? ते हैराण झाले. त्यांचा संशय तिथल्याच समोरच्या टग्या दुकानदारावर होता. नक्की त्यानेच उचललाय. त्याला विचारलं तर त्याने सरळ कानावर हात ठेवले. एवढं नुकसान झालं म्हणून बाबा निराश झाले. आधीच छोटंसं दुकान. 
आम्ही तिथे भाड्याने दुकान घेतलं होतं. त्या दुकानाच्या मालकीणबाई होत्या खमक्या. त्या म्हणाल्या. तुम्ही सर्वांना मोठ्याने जाहीर करून सांगा, 'माझा तेलाचा डबा ज्यांनी घेतलाय, त्यांनी मुकाट आणून द्यावा. नाहीतर मी वाकडाईला जाऊन नारळ देतो. तीच काय ते चोराचं बघून घेईल.'
वाकडाई म्हणजे ग्रामदैवत.. गावच्या वेशीवर गावाचं रक्षण करत सगळ्यांवर नजर ठेवून बसलेली.
ही कल्पना फलद्रूप झाली. बाबांनी आजुबाजूच्या सर्व दुकानदारांना जाऊन सांगितलं. मुख्यत्वे शंका असलेल्याच दुकानदाराला सांगितलं. बाकीच्यांना फक्त तोंडदेखलंच. पण अर्ध्या तासात तो दुकानदार डबा घेऊन आला बाबांकडे आणि म्हणू लागला, 'काय तुम्ही पण, लगेच देवीला नारळ बिरळ द्यायला निघालात? मी मस्करी करत होतो तुमची.'

थोडक्यात काय, तर पठ्ठ्या घाबरला नि माल चुपचाप आणून दिला. तर असे कोकणातले लोक बरेचसे पापभीरू...

आमच्याकडे पूर्वी एक राष्ट्र्रीय किर्तनकार यायचे. ते म्हणायचे, 'कोकणात भिकारी नाही, कुष्ठरोगी नाही. पण वेडे भरपूर.'
त्याचे प्रत्यंतर आजही येते. 
मार्लेश्वर असो, कर्णेश्वर असो, रत्नागिरीतलं ग्रामदैवत भैरीचं देऊळ असो. कुठेही नावालाही भिकारी दिसला नाही. निवांत, प्रशस्त प्रांगण, झाडंमाडं, सुंदर, देखण्या दिपमाळा  आणि प्रत्येक मंदिरासमोर असलंच पाहिजे असं एक छानसं देखणं तळं. 
मार्लेश्वरला अवघ्या पन्नास रुपयात तांदुळाची गरमागरम भाकरी, पिठलं, मटकीची उसळ, डाळ-भात, ताक असं जेवण जेवलो. त्यांना आवर्जून सांगितलं, की 'बाई हे बरं नाही. इतक्या स्वस्तात जेवण देऊ नका. शहरात दोन वडापाव खायलाच इतके पैसे घेतात. उडपी दोन इडल्यांचेच इतके घेतात.' तर म्हणाली, 'तो वर बसलाय, मार्लेश्वर. त्याच्या कृपेने काही कमी नाही. विनाकारण भाव वाढवणार नाही.' 
मला सांगा, कुठल्या देशात पन्नास रुपयात इतकं भरपेट जेवण मिळेल?
एमपी, राजस्थान, उत्तराखंड सगळीकडे पन्नास रुपयात असंच ताजं, चविष्ट जेवण मिळालंय. एमपी आणि राजस्थानात तर पोळीवर साजूक तुपाची धार होती. याच रेटमध्ये. 
पण आपण बोलत होतो भिकारींबद्दल. नॉर्थमधील सर्व देवळांच्या बाहेर भरपूर भिकारी. अगदी तगडे भिकारी. पूर्वी नेहमी राजस्थानच्या नाथद्वारा मंदिराला जात असू. एकदा एका भिकारी बाईला दहा रुपये दिले. फार चिकटली होती. भूक लागली, खायला घेऊन द्या म्हणून. आणि अरे बाप रे! लगेच भिकारणींची झुंडच चालून आली माझ्यावर. सगळ्या हात पुढे करून दबाव आणू लागल्या. मी पर्स काखेत दाबून पळाले तिथून. इतके त्यांचे वर्चस्व होते. सगळ्या तगड्या बाया होत्या. माझ्यापेक्षा ताकदवर. हातातली पर्स ओढून घेतायत की काय इतका जोर करत होत्या. नि या भिकारणी. काय म्हणायचं आता...
कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. जगण्याला चिवट आहे. त्याची भूक कमी आहे. संतुष्ट आहे. तो मुंबईत चाकरमनी म्हणून काम करेल, हॉटेलात कपबशा विसळायचं काम करेल, पण हात पसरणार नाही शक्यतो. अपवाद असू शकतील. 
तिथून गेलो कर्णेश्वरला. संगमेश्वरजवळीत कसबा येथे. तिथे शिलाहारकालीन प्राचीन मंदिर आहे. कर्णेश्वराचं. तिथंच आपल्या संभाजीराजेंना  शेवटचं पकडलं होतं औरंगजेबाने. दगाफटक्याने. त्यांनी तिथल्या त्या प्राचीन मंदिरात अभिषेक केला, नंतर तिथल्या देसायांच्या वाड्यात काही बैठकीसाठी गेले. तिथेच पकडले गेले. ती सगळी ठिकाणं पाहताना गलबलून आलं. 

पुढचे प्रवासवर्णन पुढील पोष्टीत......









Sep 27, 2021

भटकंती.. कोकण.

Once again in kokan ..
कोकण अजूनही happening आहे.. निळेशार, स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे, त्यावर दूरवर तरंगणाऱ्या होड्या, लोभस, रंगांची उधळण करत होणारे सूर्यास्त, हिरवागार आसमंत, झाडांनी गच्च भरलेले डोंगर- टेकड्या, पावला पावलावर दुथडी खळाळत वाहणाऱ्या नद्या, त्यावरील पुल, ठायी ठायी कोसळणारे धबधबे, वाऱ्यावर डोलणारे माड, मनाला सुकून देणारी ग्राम मंदिरे, त्यांची ऐसपैस प्रांगणे, त्यातील नजाकतीपूर्ण दीपमाळा, देवळासमोर मस्ट असलेले तळे, आणि या सर्वांवर कळस चढवणार निळेभोर विस्तीर्ण आकाश... एकूणच वातावरणात भरलेला निवांतपणा.. आणि एकदम सुरक्षित वातावरण.
सारं अजून तरी जसच्या तसं आहे.
एकेका ठिकाणावरून पाय हलत नाही. निघावस वाटत नाही.
कोकणात तुम्ही एकटे फिरू शकता अजून. स्त्री असूनही. अगदी खेडोपाडी देखिल, आणि आधुनिक कपड्यात देखील. कोकण सुरक्षित आहे. स्त्रियांकडे पाहण्याची नजर बहुतांश निर्मळ आहे. निकोप आहे.
आत्ता रत्नागिरी परिसरात आहे. 
कर्णेश्वर हून येताना मस्त पाऊस आणि चिंब भिजणारा हिरवा आसमंत अनुभवला. कोकणातला पाउस हा एका मोठ्या निबंधाचा विषय होऊ शकतो.
बाकी उघडीप आहे. भटकायला योग्य असा मोसम आहे.

कोकण ही एक धुंद करणारी नशा आहे.

जुन्या कवितेच्या दोनच ओळी आठवतायत. पूर्ण कविता खूपदा शोधूनही सापडलेली नाही.
"कोकण दरिद्री बोलते कोण?
छे, छे, ती तर सुंदर सोन्याची खाण.."

Sep 8, 2021

कोकण आणि वेड -

 कोकणात बैल आहेत

पण पोळा नाही ..संपला विषय ( हायला इथे माणसाला खायला पुरणपोळी नाही. गहू नाही. बैलाला कुठून घालायची ?)
दिवाळी झाली की घाटावरून नंदी बैल घेऊन लोक कोकणात उतरायचे.
आमच्या ऑफिस मधला एक सहकारी ऑफिसमधल्या एका घाटी कलिगला फार चिडवत असे. "दिवाळी संपली. आता तुमचा घाट उतरेल खाली गुबु गुबू करत."
तो काळ भावना दुखावून घेणारा पोचट काळ नव्हता. आणि कोकणात तर जाता येता भावनेच्या पाठीत धपाटे घालणारे अंतू बरवा गावोगावी असल्याने लोकांच्या भावना घट्ट बनलेल्या असत. आपल्यावरचे विनोद देखील ते हसून साजरे करत.
एक राष्ट्रीय कीर्तनकार (पक्षी: संघी) येत.
ते म्हणायचे कोकणात भिकारी नाही. (दारिद्र्य असून) कोकणात महारोगी नाहीत. मात्र कोकणात वेडे फार. ( आणि वेड्या पण) प्रत्येक गावात सापडतील.
हे खरं होतं. पंचक्रोशीत प्रत्येक गावात एक दोन तरी दिसत. (आरशात दिसत का हे विचारू नका)
नंतर बरेच वर्षांनी जयवंत दळवी यांच्या लेखनात हे वाचले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत वेडी पात्रे असतात.
असो
आम्ही आपले समाधान मानून घ्यायचो की वेड असणं केव्हाही चांगलं...
कारण या जगात वेड्या माणसांनीच परिवर्तन घडवलंय...
माजला सारा जगी हा खास वेड्यांचा पसारा...हे गाणं लिहिणारे वामनराव जोशी कोकणीच असणार ??

पण चांगला कवी लेखक कालातीत कसा लिहितो ते हे गाणं वाचून तुम्हाला कळेल.. शंभर वर्षापू्र्विचे हे गाणे आजच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत जुळते बघा..

जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी, ध्रुवाचा 'वेड' हा तारा !!

कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या, कुणाचे चित्त ते नाचे ।

*कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या, नशेने धुंदली भारी ।*

अशा या विविध रंगाच्या, पिशांच्या लहरबहरींनी
दुरंगी दीन दुनियेची, जवानी रंगली सारी

- अलका 

Jul 31, 2021

डोंगरातील वस्त्या..

 

दर पावसाळ्यात दरडी कोसळून डोंगरकुशीतली गावं धराशायी होण्याच्या बातम्या येत असतात.

मग छोट्या टेकड्या, छोटे डोंगर यांच्या उतारावर का रहात असतील लोक?
दरड कोसळण्याच्या शक्यता असून?
त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रत्येकवेळी सरकारची असते का? 

लोकसंख्या जबाबदार असते का? गरीबी जबाबदार असते का?

माझे गाव कोकणातील एक लहानसे गाव. चारी बाजूने डोंगर आणि मध्ये असलेल्या सपाटीवर शे-सव्वाशे घरांचे गाव. पक्क्या घरांचे. गरीब-श्रीमंत सगळ्यांची घरे जवळपास पक्की. पारंपरिक. 
कोकणातील इतर गावांप्रमाणेच जातीनिहाय विभाग.  ही गवळआळी, ही जंगमआळी, हा कुंभारवाडा, हा महारवाडा, हा मुस्लिम मोहल्ला. असं पारंपरिक गाव. 

माझ्या लहानपणापासून, किंवा त्याही आधीपासून गावात मुस्लिम लोकवस्ती थोडी अधिक होती. यातले मुस्लिम सगळे बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीला. भरपूर पैसा कमवणारे, सधन. हिंदू पारंपरिक व्यवसाय-शेती इत्यादी करत गावातच राहणारे. प्रमाणात हाता तोंडाची जेमतेम गाठ. शिक्षणाचे प्रमाण दोन्ही समाजात कमीच होते. दोन्ही समाजासाठी गावात सातवीपर्यंतच्याच शाळा होत्या. त्यांची उर्दू, यांची मराठी.
मुस्लिम वस्ती वाढत गेली आणि त्यांचा पैसाही. त्यांच्या वाढत्या वस्तीला जागा, घरं गावात कमी पडू लागली आणि त्यांनी हिंदूंना रग्गड पैशांची ऑफर देत त्यांची घरं खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यात जबरदस्ती अजिबात नव्हती. पण आर्थिक ताकद काम करत होती. 
लाखालाखाच्या किंमतीत आपली घरं जातायत हे पाहून गरजू हिंदूंनी आपली घरं त्यांच्या हवाली केली. मिळालेले पैसे कनवटीला लावले आणि गावाजवळच्या डोंगराची वाट धरली. डोंगरावरची जमीन माळरान. सरकारी मालकीचे. तिथं त्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करत त्यांनी तिथे पुन्हा कच्ची पक्की घरं बांधली. आणि गाव सोडून जवळपास ऐंशी टक्के हिंदू डोंगरपठारावर राह्यला निघून गेले. 
आता हा डोंगर कधी घसरला, दरड बिरड कोसळली तर दोष कुणाचा? किती? कसा? हा प्रश्न उभा राहतो. 

एकाच गावात हे हिंदूच गरीब का राहिले? मुसलमानांप्रमाणे ते गल्फला का गेले नाहीत? कारण एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला हाताला धरून तिथे नोकरी मिळवून देत होता. तसा तो हिंदू माणसाला नेत नव्हता. हे एक. नेलं असतं तरी हे हिंदू किती गेले असते आणि तिथल्या कष्टाच्या नोकऱ्या त्यांना किती झेपल्या असत्या हे दुसरं. इथं कौशल्य, गट्स, परदेशात टिकून राहण्याची, पडेल ते काम करण्याची क्षमता हे सर्व जर एका समाजाचे वैशिष्ट्य असेल, आणि दुसऱ्या समाजात नसेल, तर समता आणि समानता यांची अपेक्षा कशी धरायची?

जेही असो.
यात सरकाचा दोष किती? सरकारने त्यांना मदत करायला हवी का? का? कशी?

प्रत्येक ठिकाणी डोंगराच्या कुशीत अशा वस्त्या दिसतात. त्यांचीही कारणं अशीच काहीबाही असतील ना?

एकाच परीसरात राहून एक समाज प्रगती करतो. तर दुसरा अधोगती. गावातले स्थान, आपली पक्की घरं, पारंपरिक विरासत सोडून सगळे हिंदू डोंगराकडे परागंदा झाले त्याचं वाईटही वाटतं. रागही येतो आणि ज्याची जशी लायकी तसे त्याचे स्थान असेही वाटते. 

Jul 10, 2021

सायकल -

 

सायकल –

 

शिवा रोज ती सायकल बघायचा आणि त्याचा जीव खालीवर व्हायचा. रोज त्याच्या स्वप्नात ती छोटीशी, नाजूक, सुंदर सायकल यायची. आपण त्या सायकलवर बसून वाऱ्याच्या वेगाने ती सुसाट चालवतोय हे एकच स्वप्न तो रोज बघत होता. एखाद्या भुकेल्या माणसाला पंचपक्वान्न पाहून जसं होईल, तसंच त्याला होत होतं म्हणाना, ती सायकल पाहून. बाजूच्याच दोन सोसायटी सोडून तिसऱ्या सोसायटीतला त्याच्याएवढाच एक गोरापान, स्वच्छ, सुंदर मुलगा ती सायकल चालवत त्याच्या चहाच्या टपरीसमोरून अनेकदा जात होता. आणि त्या सायकलला पाहून शिवा कासावीस होत होता.

खरंतर शिवाला सायकल चालवताही येत नव्हती अजून. पण एकदा मिळाली, तर शिकायला असा काय वेळ लागणार? आपण ती सहज आणि लगेच शिकू असा त्याला आत्मविश्वासच होता.
आजही तो गोरा मुलगा ती सायकल चालवत त्याच्या समोरून गेला आणि शिवा जागेपणीच स्वप्नात हरवला. त्या सायकलवर बसला आणि सुसाट निघाला रस्त्यामागून रस्ते टाकत लांब.. लांब... कदाचित आपल्या गावापर्यंत.. जिथून तो आला होता. जिथून त्याच्या आईबापाने त्याला इतक्या लांब कमवण्यासाठी चहाच्या टपरीवर पाठवून दिलं होतं.
तेवढ्यात हाक आली, ‘शिवा, क्या कर रहा है उधर? चाय कौन तेरा बाप ले कर जाएगा क्या साले?’
तसा तो दचकला, भानावर आला आणि चहाचा क्रेट उचलून धावला.
त्याची चहाची टपरी म्हणजे तो ज्या चहाच्या टपरीवर पोऱ्या म्हणून काम करत होता ती.

शिवा फारतर आठदहा वर्षांचा असेल. काळासावळा, वयापेक्षा थोडा बुटका पण अंगाने भरलेला, अंगावर जुने विटके कपडे. कधी हाफ पॅन्ट तर कधी फुलपॅन्टही असायची. पण जुनेरीच.

चहाच्या टपरीवरून चहाचे भरलेले पेले असलेला जाळीचा ट्रे घेऊन तो आजुबाजूच्या दुकानवाल्यांना, रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना त्यांच्या ऑर्डरचा चहा नेऊन द्यायचा. रस्त्याच्या अलिकडे-पलिकडे दोन्ही ठिकाणी त्याच्या फेऱ्या चालू असायच्या. मधला वाहता रस्ता सुसाट वाहनांची वर्दळ असलेला. त्याच्याएवढ्या एखाद्या चांगल्या घरच्या मुलाला त्याची आई अशा रस्त्यावर एकटाही पाठवणार नाही कदाचित, रस्ता क्रॉस करून जायचं असेल तर.
पण शिवा सरावला होता.
त्याला त्या कामाचाही सराव झाला होता. चहाचे पेलेच तर पोचवायचे असत. रस्त्यावरची किती गंमत पाहायला मिळायची. भरलेला बाजार, वर्दळ, रंगीबेरंगी माणसं. त्यात त्याला ते काम काही फार जड वाटत नव्हतं. शिवाय मालक त्याचा पगार त्याच्या आईबाबांना पोचवत होता आणि दोन्ही वेळ त्याला पोटभर जेवायलाही घालत होता. दुकानातच रात्रीचा इतर दोन कामगारांसोबत झोपायचीही सोय होती.
तरीही, समोरून त्याच्याच वयाची स्वच्छ, सुंदर मुलं पाठीवर स्कूल बॅग अडकवून मस्ती करत जाताना दिसली की तो त्यांच्याकडे एकटक पाहात राहायचा. रस्त्याच्या पुढच्याच वळणावर अनेक शाळांच्या विविध बसेस थांबायच्या. त्यातून चिवचिवाट करत लहान-मोठी मुलं चढता उतरताना दिसायची. तेव्हा मनातल्या मनात तोही त्या बसमध्ये जाऊन बसायचा.

कधी कधी स्वप्नांत तो पाठीला बॅग लावून सायकलवरून शाळेपर्यंत पोचायचा. तेव्हा ती शाळा त्याच्या गावातली त्याला अंधूक आठवणारी छोटीशी प्राथमिक शाळा असायची. त्या शाळेतली मुलं सगळी त्याच्या ओळखीची होती. त्याच्याच आजुबाजूला राहणारी, त्याच्यासोबत खेळणारी. ती सगळी मुलं त्याच्या त्या सायकलीभोवती गोळा होत. कौतुकाने बघत राहत. काही जण त्यावरून हात फिरवून बघत. शिवाला ते पाहून अजून आनंद होई. अशी सायकल त्या गावात कुणापाशीच नव्हती.
आता इथून पुन्हा त्या चहाच्या दुकानात जाणार नाही असं तो आईबाबांना सांगायचं ठरवून टाकी. आपण रोज ही सायकल घेऊन आपल्या या शाळेत जाऊ. पाठीला दप्तर लावून.

हे स्वप्नं पूर्ण होईपर्यंत पहाट व्हायची. पाच वाजल्यापासूनच दुकानात वर्दळ सुरू व्हायची. चहाचा मोठा स्टोव्ह ढणाढणा पेटायचा. मालक त्याच्या अंगावरची चादर ओढून, एखादी शीवी देतच त्याला उठायला भाग पाडायचा. शिवा स्वप्नं बाजूला सारून उठायचा आणि तोंडावर पाणी मारून कामाला लागायचा.


एकदा शिवा चहाचे पेले घेऊन रस्त्याकडेला असलेल्या दोन सोसायट्या सोडून तिसऱ्या सोसायटीत गेला. खरं तर चहाच्या टपरीवरून चहा मागवणारं त्या सोसायटीत कोणी नव्हतं. सगळी सोसायटी रहिवाशांची होती. तिथं कोणतंही दुकान नव्हतं. पण बहुधा सोसायटीची काही कामं चालू होती. ती कामं करणाऱ्या कामगारांसाठी तो चहा घेऊन आलेला होता. चहाचे पेले त्या कामगारांच्या हातात एकेक करून दिल्यावर त्यांचा चहा पिऊन होईपर्यंत तो इकडे तिकडे बघत तिथेच फिरत होता.

तेवढ्यात... त्याची दृष्टी एका कोपऱ्यात गेली. तीच सायकल! तिथं उभी होती. आणि तिला साखळी वगैरे काहीही बांधलेली नव्हती. शिवाचे डोळे लकाकले. दिवसरात्र या सायकलीनेच तर त्याचा पिच्छा पुरवला होता. म्हणजे तो गोरापान मुलगा याच इमारतीत राहात होता तर. शिवाला अगदी राहवत नव्हतं. त्याने भराभर चहाचे रिकामे पेले गोळा केले. धावत जाऊन दुकानात ठेवले आणि मालकाचा डोळा चुकवून तसाच सुसाट पळत तो पुन्हा त्या सोसायटीत आला. सगळ्यांची नजर चुकवून त्याने ती सायकल हळूच बाहेर काढली, त्याचे दोन्ही हॅंडल धरून तो हळू हळू सोसायटीच्या बाहेर पडू लागला. तो ती सायकल नेण्यात इतका तल्लीन झाला होता की तो जराही इकडे तिकडेही बघत नव्हता. अगदी आपलीच नेहमीची सायकल असल्यागत सराईतपणे तो गेटच्या बाहेर पडायला जाणार, इतक्यात,
‘ए मुला, सायकल घेऊन कुठं चाललास? ठेव ती सायकल जाग्यावर. सायकल चोरतोस काय?’ अशी बाजूच्याच खिडकीतून हाक आली.
तो दचकला, कावराबावरा झाला. थोडा घाबरला. खिडकीतली बाई फार जोरात ओरडत नव्हती. किंवा फार रागाने बोलत नव्हती. पण तरीही त्याला काय बोलावं ते सुचेना.

खिडकीतली ती गोरीपान बाई, ती त्या मुलासारखीच दिसत होती चेहऱ्याने. म्हणजे त्या मुलाची आईच असणार ती. ती पुन्हा म्हणाली, ‘ठेव ती सायकल तिथे. सायकल चोरतोस का? सांगू का तुझ्या मालकाला येऊन?’

तेव्हा मात्र तो घाबरला. सायकल तिथेच भींतीला लावली आणि तो गेटबाहेर पळत सुटला.
-

-

-

शिवा पळून गेला.

पण इकडे खिडकीतल्या बाईचा जीव कासावीस झाला. अगदी योगायोगाने ती खिडकीत यायला आणि त्याचवेळी शिवाच्या हातात आपल्या मुलाची सायकल दिसायला एकच गाठ पडली होती. क्षणभर तर तिला त्या मुलाला काय बोलावं तेच कळलं नाही. त्या मुलाला तिने जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर अनेकदा पाहिलं होतं. कारण त्या टपरीच्याच बाजूला त्यांचा नेहमीचा किराणावाला होता. असं कधी कुठल्या चोराला हटकायचं कारण पडलं नव्हतं, जो आपल्या डोळ्यासमोर चोरी करून जाईल. त्यामुळे तीही गोंधळली. पण लगेच तिने हाक मारली,
‘ए मुला, सायकल चोरतोस काय? ठेव ती जाग्यावर.’
तो मुलगा पळून गेला. पण नंतर तिच्या मनात कालवाकालव झाली. जाऊ द्यायला हवं होतं का आपण त्याला सायकल घेऊन. तशीही ती दोनेक वर्ष जुनीच तर झाली होती. एवढुसं पोर, इतकं धाडस करून सायकल नेतंय म्हणजे त्याचा किती जीव अडकला असेल त्या सायकलीत? आणि आपण नेमकं त्याचवेळेला खिडकीत नसतो आलो, तर गेलीच असती ना सायकल चोरीला. मग आपण थोडंसं हळहळलो असतो फारतर. अजून काय मोठं होणार होतं? 

पण त्याने ती सायकल नेऊन कुठं ठेवली असती? त्याला त्याच्या चहाच्या टपरीवाल्या मालकाने हटकलं नसतं? ही सायकल कुठून आणली म्हणून? कुठे लपवून ठेवू शकणार होता तो ती सायकल? आणि कुठे, कशी, कधी चालवू शकणार होता?
अनेक वर्ष झाली. पण अजूनही बाईंना ती सायकल त्याला घेऊन जाऊ दिली नाही याचा पश्चात्ताप होतोय. पण त्या आपल्याच मनाला समजावतात, की अशा चोराला इतर कुणी पाहिलं असतं तर धरून चोपलं असतं, हंगामा केला असता, शिवीगाळ केली असती. आपण निदान त्याला तसं काही केलं नाही.

आणि शिवा.... तो कुठे आणि कसा असेल आता देवच जाणे....

- अलका गांधी-असेरकर

Jul 2, 2021

चिमण्या

 सैपाकघराच्या खिडकीत चिमण्यांसाठी फिडर लावलं. पण फिडर लावलं की लगेच चिमण्या येत नसतात. कधी कधी तर दोन दोन महिने येत नाहीत. त्या अदमास घेतात. घाबरतात. पण धीर ठेवून वाट पाहात राहिलो की एक दिवस दबकत दबकत हळूच एखादी चिमणी येते. मग दुसरी येते. 
मग बरेच दिवस या दोघीच येतात. यांना रोज बिनधास्त दाणे टिपताना पाहून मग बरेच दिवसांनी तिसरी येते. पण या दोघी तिला येऊ देत नाहीत. एकच कल्ला करतात आणि तिला हाकलून लावतात. त्यांचंही बरोबरच असतं. पहिली रिस्क त्यांनी घेतलेली असते, हे धान्याचं कोठार शोधून तिथे येण्याची. बसण्याची आणि जीवाला घाबरत घाबरत दाणे खाऊन बघण्याची. आता या मेल्या आयत्यावर रायतं करायला येणार का? हॅट आम्ही नाही येऊ देणार..
पण हळू हळू बाकीच्याही येतातच. भांडणं चालूच राहतात. आणि संधी मिळेल तसं एकमेकींना हुसकावत दाणे टिपणंही. अखंड चिवचिवाट... 
सैपाकघरातील ओट्याच्या अगदी समोर दोन फुटावर तो फिडर असल्याने सुरुवातीला माझी चाहूल ओट्यापाशी लागली की त्या भूर्रकन उडून जायच्या. जोपर्यंत आपण तिथून दूर होत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. नंतर मात्र हळू हळू त्या आपल्या उपस्थितीला सरावतात. इथं धोका नाही याची त्यांना हळू हळू खात्री वाटू लागते. 
पण अजून एक वेगळीच गंमत आहे. 

मी जर खाली मान घालून माझं काम करत असेन ओट्यापाशी तरी त्या बिनधास्त चरत राहतात. येतात जातात भांडतात. पण मी त्यांच्याकडे नजर उचलून पाहिलं रे पाहिलं की लगेच भूर्रकन उडून जातात. मला फार आश्चर्य वाटायचं. हा काय प्रकार. अशा येतात. पण मी पाहिलं तर निघून जातात. फोटो देखील लपून छपून काढावे लागतात. जोपर्यंत मी नजर वर उचलून पाहत नाही तोपर्यंत त्या बिनधास्त असतात. मग मला असं लक्षात आलं की कदाचित माणसांचे डोळे पाहिल्यावर त्या घाबरत असतील. माणसाचे आणि त्यातही माझे ते भले मोठे काळे काळे डोळे पाहिले की त्या बिचकत असतील. कदाचित माणसांच्या डोळ्यांकडे त्यांचे लक्ष लवकर वेधले जात असेल. 

पण मला खात्री आहे, हळू हळू त्या माझ्या डोळ्यांनाही सरावतील. आणि मी त्यांच्याकडे एकटक बघत राहिले, तरी त्या बिनधास्त चरत बसतील. कारण, 
माझ्या माहेरी कोकणातल्या त्या मोठ्या घराच्या ओटीवर आजोबांनी एक मोठा, जवळपास दोन फुटाचा पत्र्याचा झोपाळा टांगला होता. चिमण्यांसाठी धान्य टाकायला म्हणून. चिमण्यांसाठीच स्वस्तातल्या भाताची एक दोन पोती घेऊन ठेवली जायची. त्यातले धान्य मूठमूठभर जाता येता घरातले कुणी ना कुणी टाकत राहायचे त्या झोपाळ्यात. आणि असंख्य चिमण्या यायच्या. आमची ओटी चिवचिवाटाने गजबजलेलीच असायची. जरा कुणी जवळ आले, ओटीपुढच्या अंगणातून कुणी जात असले, तर उडाल्यासारखं करून दुसऱ्याच सेकंदाला पुन्हा येऊन बसायच्या. तो झोपाळा चिमण्यांनी फुलून गेलेला असायचा. फक्त चार महिने. पावसाळ्यातले. पावसाळा संपला की त्या कुठे गायब व्हायच्या कोण जाणे. धान्य टाकलं तरी यायच्या नाही. आजोबा म्हणायचे आता त्यांना शेतात पडलेले दाणे मिळतात खायला. पावसात मिळत नाहीत. खरं खोटं कोण जाणे. 
दिवसभर चिमण्यांना भात, फक्त सकाळी एकदा छपरावर कबूतरांना ज्वारी, आणि समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या पथिकांसाठी ओटीवर, किंवा दुकानात भरून ठेवलेला पाण्याचा माठ ह्या आजोबांच्या पुण्याच्या कल्पना होत्या तेव्हा...!   



किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...