Jul 8, 2022

रिमझिम गिरे सावन....

रिमझिम गीरे सावन ...

दमदार पाऊस सुरू झाला की "रिमझिम गिरे सावन" या गाण्याची हमखास आठवण येते. कारण मुंबईचा आसमंत ओलाचिंब करून टाकणारा पाऊस या गाण्यात व्यवस्थित चित्रित झालाय. पाऊस अंगावर घेत, चिखल पाणी तुडवत अमिताभ आणि मौसमी मुंबई, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, परिसरात वेड्यासारखे फिरत असतात, कट्ट्यावर समुद्राच्या लाटा अंगावर घेत असतात..
म्हणजे इतक्या सुंदर निसर्गाचे वर्णन असलेले गाणे चक्क मुंबईत, तेही सिग्नल, स्टेशन इत्यादी परिसरात चित्रित केले जाऊ शकेल यावर कुणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण म्हणूनच आपली चित्रपट नगरी थोर आहे. जे ना सोचे हम तुम वो सोचे बॉलिवूड...
फक्त यात अमिताभ पूर्ण सुटाबुटात का भिजताना दाखवलाय ते माहीत नाही.. आणि साडी नेसून पावसात भिजणे, बर्फात धावणे आणि  नाचणे हे केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच करू जाणे... आम्हाला इथे घरापासून स्टेशन पर्यंत साडी नेसून चालायचे म्हटले तर परकर पायात अडकतो...🤦
मौसमी त्या काळातील स्त्रिया नेसत तशी टिपिकल प्रिंटेड शिफॉनची अत्यंत साधी साडी नेसून आहे तरी क्यूट दिसते. पण अमिताभ सुटात चिखल उडवत धावताना येडा दिसतो .. पण मुंबईसारख्या शहरात पाऊस अंगावर घेत धुंदीत पळण्याचे काम वेडेच करू शकतात .. नाही का?? बाकीच्यांनी बायकोला भजीच तळायला लावून गलासच घेऊन बसावे आणि कांदेनवमी साजरी करावी....!

Jul 6, 2022

संपन्न वारसा

हरप्पन संस्कृती मधील मोएनजो दरो आणि हरप्पा ही दोन गावे तर पाकिस्तानात गेली. ती बघायची खूप इच्छा असूनही ते शक्य नाही. पण याच संस्कृतीतील लोथल हे गाव अहमदाबाद जवळ असल्याने ते बघायचे कधीपासून मनात होते. ते आज पाहिले... 
साडेतीन हजार वर्षापूर्वी मातीत गडप झालेली ही गावे... त्यांचे बाथरूम, चुली, गोडाऊन, डॉकयार्ड, कारखाने... सगळ्यांच्या विटांच्या रांगा फक्त शिल्लक आहेत. गाईड म्हणाला की या भिंती दहा बारा फूट खोल होत्या. नंतर त्या मातीने भरून घेतल्या परत. तो proper गाईड नव्हता. तिथे काम करणारा माणूस होता. पण तो म्हणाला की आधीच्या पूर्ण भिंतींचे फोटो काढून म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तो कितपत खर खोटं सांगत होता माहीत नाही. लोथल हे मुएंजो दरो आणि धोळा विरा प्रमाणे अजून युनेस्कोने जपायला घेतलेले नाही. त्यामुळे तिथे अनास्था दिसते. 
 म्युझियम दुरुस्ती साठी बंद असल्याने बघता आले नाही.
त्यात तिथे सापडलेल्या टेराकोटा, शंख शिंपले आदिपासून बनवलेल्या मण्यांच्या माळा, भांडी, खेळणी वगैरे ठेवलेली आहेत.
याशिवाय तांबे आणि ब्राँझच्या वस्तू... टेरकोटाच्या भांड्यांवर पेंटिंग आहे.
काल पाच - सात मजली विहिरी पाहिल्या. परवा मोढेराचे सूर्यमंदिर पाहिले. भारतात अशा प्राचीन वास्तू, शिल्पे, मंदिरे, मुर्त्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.. 
प्रत्येक शिल्प कथेत सगळीकडे स्त्रिया, पुरुष, मुले सोबत बरोबरीने वावरताना दिसतात. कुठेही स्त्रिया घुंघट मध्ये दिसत नाहीत. 
शिल्पातील एकेका स्त्रीच्या अंगावरील आभूषणे, त्यांच्या केशभूषा बघता थक्क व्हायला होते. व्यवस्थित शेप दिलेल्या दाढीवाल्या पुरुषांची शिल्पे, स्त्रियांच्या हातात पर्स, आरसा, पुस्तक, लेखणी इत्यादी वस्तू.. कोरलेली वाक्ये, लिपी, भाषा ...हे सर्व पाहता भारतात दीड दोन काय, त्याहून कितीतरी अधिक वर्षे आधीपासून संपन्न, आधुनिक अशी नगरे होती, कारखाने होते, निर्मिती होती. ज्ञान होते. याचे ढळढळीत सूर्यप्रकाशा इतके लख्ख पुरावे ठायी ठायी आढळतात.
तरीही जेव्हा भारतात मोगल आणि इंग्रज येई पर्यंत काहीच, अगदी सुई देखील बनत नव्हती असे म्हणणारे, आणि बनत होते असे म्हणणाऱ्या लोकांना मंद, अंध भक्त इत्यादी म्हणणारे अतीशहाणे लोक किती खोटारडेपणा करतात ते कळतं...
अनेक प्राचीन मंदिरे भूगोल आणि खगोलशास्त्राच्या परफेक्ट ज्ञानावर अशा रीतीने स्थापित आहेत की सूर्यकिरणे ठराविक वेळी बरोबर गाभाऱ्यातील मूर्तीच्या पायावर येतात.
Harappan कालीन नगरात शास्त्रशुद्ध भुयारी गटार व्यवस्था होती. होड्या होत्या, जहाजे होती, व्यापार होता, कला होत्या, क्रीडा होत्या....
आपण अशा एका संपन्न वारशाचे वंशज आहोत. याचा आनंद वाटतो.

Jun 17, 2022

नाशिकची नवलाई -

कढी-वडा, कढी-समोसा, कढी-भेळ....


हे नाशिकला मिळणारे पदार्थ आहेत...
यातील कढी-समोसा खाऊन पाहिला....
कढी भेळ खायला अजून मन घट्ट नाही झालं.
शिवाय वेगवेगळ्या अमृततुल्य चहांसोबतच गुळाचा चहा, देशी गुळाचा चहा, बासुंदी चहा, चुलीवरचा चहा,तंदूर चहा... हे पण आहेच.
एके ठिकाणी एकशे वीस प्रकारच्या मटक्यातल्या खिचड्या मिळतात. म्हणून घेतली, तर ती साध्याच भांड्यात नेहमीसारखी बनवलेली. फक्त पार्सल देताना ते मातीच्या मटक्यात भरून दिले....
मिसळी तर विचारूच नका.. आठवड्यातून दोनदा मिसळीचं पार्सल मागवून सहकुटुंब खाल्लं नाही, तर नाशिककरांना कायद्याने काहीतरी शिक्षा होत असावी बहुधा... इतकं नाशिककरांना मिसळीचं वेड आहे. मिसळीसोबत इथं पापड आणि गोड पदार्थ जिलबी इत्यादी देतात. त्यात द्राक्षाच्या मळ्यातली मिसळ, पेरूच्या बागेतली मिसळ अशा गंमतीजंमतीही आहेत.
इथं एक पाव-वडा हा पदार्थ सगळीकडे मिळतो. यात अख्खा पाव बेसनपीठात बुडवून तळलेला असतो. त्यात अगदी नावाला, बोटभर बटाट्याचे सारण भरलेले असते. ठिपक्याएवढे.... पिझ्झाचे सात तुकडे करतात, तसे त्या मोठ्या तळलेल्या पावाचे सात तुकडे कापून वर चटणी टाकून देतात.
हे असे चित्रविचित्र प्रकार केवळ मुंबई सोडून इतर शहरातच मिळू शकतात. मुंबईकर एक वडा-पाव, आणि दुसरं पावभाजी इतक्या दोनच पदार्थांवर खुश राहू शकतात. हॉटेलमध्ये गेल्यास फारतर इडली डोसा.... संपला कारभार.
मुंबईतून पोहा, थालिपीठ, साबुदाणा खिचडी, मिसळ हे मराठी पदार्थ तर जवळपास हद्दपार आहेत. क्वचितच कुठे मिळतात. शोधून शोधून खायला लागतात.
इथं नाशकात हॉटेलमध्ये गेलात की शेवभाजी आणि लसूनी मेथी सगळीकडे मिळते. त्यात दूध शेव भाजी हा एक महागडा पण चांगला प्रकार असतो. मुंबईला हॉटेलमधून न मिळणारा मराठी भाकरी हा प्रकार इथं सर्रास मिळतो. यात ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ इत्यादी सर्व पीठांच्या उत्तम भाकरी मिळतात. जेवण तिखटच असतं इथं. ब्राम्हणी मिळमिळीत जेवण अजून तरी सापडलं नाही कुठे तिथे.
मात्र इथं डोंबिवलीसारखी ठायी ठायी पोळी-भाजी केंद्रे नाहीत.


May 6, 2022

सरस्वती

 




"ज्या देशात विद्येची देवता सरस्वती आहे, त्याच देशात स्त्रियांना शेकडो वर्षे शिक्षणांपासून वंचित ठेवले गेले."
असे वाक्य मी नेहमी म्हणत असते.
मात्र प्राचीन मंदिरे आणि लेण्या पाहत असताना, त्यात अनेक स्त्रिया एका हातात पेन आणि दुसऱ्या हातात कागद घेऊन लिहितानाच्या मूर्त्या आहेत. अनेक स्त्रिया नृत्य करताना, वाद्ये वाजवताना दिसतात. मुक्त शृंगार करताना दिसतात. अगदी सर्वसामान्य स्त्री आपल्या कडेवर मुल घेऊन रस्त्यावरची मिरवणूक बघते अशा मूर्त्या दिसतात. त्यात तिच्या डोक्यावर पदर नसतो, खालचे वस्त्र फक्त जेमतेम गुडघ्यापर्यंत, आताच्या बर्म्युडासदृश्य असते. अनेक मूर्त्यांच्या उरोभागावर वस्त्र नसते. 
प्राचीन मंदिरे, लेणी यातील कुठल्याही मूर्तीच्या चेहऱ्यावर बुरखा, घुंघट, पदर, स्कार्फ सारखे कोणतेही वस्त्र मी अजून तरी पाहिले नाही. 
हम्पीसारख्या ठिकाणी खुद्द राजाची पत्नी सणावारी सार्वजनिक ठिकाणी शास्त्रीय नृत्य करत होती याची माहिती गाईड देतो. मग असे नृत्य गरत्या बाईने करू नये, असे केव्हापासून समाजाच्या मनावर बिंबले असेल?
पुराणकथात कुठेही स्त्रिया घरी बसल्यात आणि फक्त पुरुष  ऍक्टीव्ह आहेत असे दिसत नाही. पांडवांबरोबर द्रौपदी फिरतेय, रामाबरोबर सीता फिरतेय. अशा जोड्याजोड्याच दिसतात. त्या कृष्णाशी चर्चा करतायत, युद्धावर बोलतायत, वेदना व्यक्त करतायत. जाब विचारतायत. 
असे जर असेल, तर नेमकं कुठल्या काळापासून भारतातील स्त्रिया घुंघट, पदर, बुरखा, पडदा घेऊ लागल्या असतील, अशिक्षित राहू लागल्या असतील, असा प्रश्न पडतो. हे अंधारयुग नेमकं कधी आणि का सुरू झालं असेल, यावर अभ्यासपुर्वक मांडणी केली जायला हवी.
मग सरस्वतीला उगा दोष देण्यात काय अर्थ?  समाज बाह्य परिस्थीतीने बदलतो, हतबल होतो, असहाय होतो असेही घडू शकते ना? 

Feb 6, 2022

सूरमयी..

 झोपडीपासून ते महालापर्यंत, चार पिढ्यांमधील सान-थोर सर्वांना एकाच दरात, किंबहुना जवळपास फुकट आनंद  देणारा एकच आवाज, किंवा एकच कुटुंब होतं म्हणू या... ते म्हणजे मंगेशकर घराणे.
हा आवाज कुठे नव्हता..?
पानाची टपरी, आदीवासी पाडे, जंगल, मंदिरे, बॉर्डर, बांधकाम ठिकाणे, लहान मोठी हॉटेल्स, लग्नं, पार्टी, वाढदिवस, प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिन, सण-वार, गणेशचतुर्थी, दत्तजयंती, दिवाळी And What not... ही सगळी ठिकाणे, प्रसंग लताचा आवाज नसता तर कसे साजरे झाले असते कोण जाणे?
बांधकामाच्या ठिकाणी, पानाच्या टपऱ्या इत्यादी ठिकाणी एक बारीकसा रेडीओ स्वर पाझरत राहायचा... आणि त्या तालावर मजूरांचे श्रम हलके होत राहायचे... अगदी जंगलात आदिवासी पाड्यांवर देखील  हा आवाज गुंजत राहिलेला मी पाहिलाय. 
कान्होपात्रा ते ज्ञानेश्वरांपर्यंत सर्व संत, ग्रेस ते भट सगळे कवी यांच्या अवघड रचना सोप्या करून सर्व सामान्यांपर्यंत पोचल्याच नसत्या, जर हे कुटुंब नसतं तर....
अगदी सर्वसामान्यांना शास्त्रीय राग, सूर यांची माहिती आणि आवड निर्माण नसती झाली, जर हे कुटुंब नसतं तर...
हा स्वर्गीय स्वर सर्वांना समान उपलब्ध होता.
सुखात, दुःखात, आनंदात, आजारपणात, प्रवासात, घरात, हॉल, पार्टी, हॉटेल ..... सगळीकडे हा आवाज नेहमी सोबतीला राहिला....
हा स्वर्गीय आवाज असूनही तो इतका स्वस्त दरात आणि इतका सहजपणे सर्वांना उपलब्ध होता की, लोकांना आपल्याला काही स्वर्गीय गोष्ट इतक्या सहजपणे उपलब्ध आहे, याची जाणीवही नव्हती. इतका तो आवाज गृहीत धरला गेला होता. 
कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांना एका सूरात बांधू ठेवणारा हा आवाज होता. भारतात कुठेही गेले तरी हा सूर कानावर येतच राहायचा कुठून ना कुठून. आणि आपण आपलं घर, गाव, भाषा सोडून बाहेर आलोय असं वाटतच नसे.
या लोकांनी इतरांना पुढे येऊ दिलं नाही म्हणतात.... का येऊ द्यावं? त्यांचंही नाणं खणखणीत होतं म्हणून ते चार पिढ्यांपर्यंत वाजत राहिलं ना.... नसतं तर त्यांनाही सारून कुणीतरी आलंच असतं पुढे....
ते दळभद्री आणि छिद्रान्वेषीच, जे या कुटुंबाचेही दोष शोधून त्यांना शिव्या घालतात.... अशा कृतघ्न जीवांना कुठेच शांती नसते..........


Nov 17, 2021

अविकास आणि हिंसा

 सामाजिक राजकिय विकास आणि त्या त्या ठिकाणचा समाज, माणसे यांची प्रगती यांचा थेट संबंध असतो का असा प्रश्न पडतो.

विकास नाही, शैक्षणिक सुविधा नाहीत म्हणून त्या त्या ठिकाणचे किंवा अमुक तमूक समाजाचे लोक हिंसेकडे वळतात यातही कितपत तथ्य आहे?
हिंसा ही प्रवृत्ती असते. ती वैयक्तिक असते, तशीच सामाजिकही असते. तिचा विकास, गरिबी, श्रीमंती याच्याशी फारसा संबंध नसावा. अपवाद वगळता.
विकास नाही म्हणून हिंसा, नक्सलवाद, विकास नाही म्हणून शेतकरी किंवा इतर आत्महत्या, विकास नाही म्हणून आंदोलन, मोर्चे, तोडफोड इत्यादी इत्यादी....
याचा थेट संबंध जोडणं शक्य नाही.
विकास नाही, म्हणून आर्थिक दरिद्री समजल्या जाणाऱ्या कोकणात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या ऐकीवात आली नाही अन्यथा.
राजस्थान, गुजरात ही एकेकाळची अविकसित राज्ये. राजस्थान तर उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाळवंटी प्रदेश, शालेय शिक्षणाची वानवा. पण दोन्ही राज्यांतील मोठ्या समाजाने देशच नव्हे तर जग पादाक्रांत करत आर्थिक आघाडी मिळवलेली दिसते.
घरदार नि सारा संसार सोडून देशोधडीला लागलेला सिधी समाज मोर्चे, बंद, हरताळ, आरक्षण इत्यादी चळवळी न करता गेला तिथे स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडला आणि श्रीमंत समाजाच्या यादीत जाऊन बसला.
विकास नसलेल्या यूपी, बिहार सारख्या राज्यांतून अनेक कष्टकरी लोक बाहेर पडून मेहनतीची रोजी रोटी खाऊ लागले. तशीच देशोधडीला लागलेली कश्मीरी पंडीतांची मुलं भारतात लांबलांबच्या राज्यांमध्ये आरक्षणाच्या सीटा मिळवून उच्चशिक्षण घेऊ लागली. कुठेही बदला वृत्ती पाळून हाणामाऱ्या करत बसलेली ऐकिवात नाहीत.
विकास नाही म्हणून हुशार, होतकरू मुलं आक्रस्ताळेपणा न करता देशाबाहेर पडली, आणि परदेशातल्या आर्थिक प्रवाहात जम बसवून राहिली.
विकास दाराशी येत नसेल, तर विकासापर्यंत पोचावं लागतं. स्वतःच विकासाचा स्रोत होऊन वाहावं लागतं. हे अनेक समाजांनी, व्यक्तींनी, प्रांतांनी, परिसरांनी सिद्ध केलेय.
विकास नाही म्हणून मी हिंसा करतो, आत्महत्या करतो, गोंधळ घालतो ही पळवाट आहे, आपल्या परिस्थितीचं खापर दुसऱ्यावर फोडून सुटका मिळवणं आहे.
जीने की तमन्ना हो तो पत्थर फाड के भी पौधे निकलते है और फूल खिलाते है....
हिंसा ही वृत्ती आहे. राजकीय, सामाजिक नेत्यांचा स्वार्थ आहे.
तिचा विकासाशी फारसा संबंध नाही.

Nov 13, 2021

सात सुखांच्या खाली -

    


सात सुखांच्या खाली
दुःखाचा काटा सलतो
भरलेल्या पेल्यावरचा
उरलेला का डुचमळतो..


एकदा एका गोष्टीत तोतया राजकुमारी कोणती आणि खरी कोणती हे ओळखायचं असतं. तेव्हा राजाचा हुशार प्रधान ती जबाबदारी घेतो आणि रात्री त्या दोघींची एकसारख्या बेडरूममध्ये झोपायची सोय करतो. सारखेच शाही पलंग, एकावर एक अशा सात मऊ, रेशमी गाद्या, त्यावर रेशमी चादर, उशी, इत्यादी सारीच सारखी व्यवस्था.

दुसऱ्या दिवशी दोघींना सकाळी तो विचारतो, "झोप लागली ना व्यवस्थित?' तेव्हा त्यातील एकजण म्हणते, 'हो मस्त झोप लागली.' तर दुसरी म्हणते 'नाही, रात्रभर मला गादीखाली काहीतरी टोचत होतं.'
तेव्हा प्रधान सांगतो, 'हीच खरी राजकुमारी. जी शांत झोपली रात्री ती तोतया आहे.'
बात अशी असते, की प्रधानाने रात्री दोघींच्या त्या रेशमी सात मऊ गाद्यांच्या खाली काही वटाण्याचे दाणे टाकून ठेवलेले असतात. खरी राजकुमारी, जिला कोणत्याच अशा गैरसोयींची सवय नसते, सुखासीन आयुष्याचीच सवय असते, तिला ते रात्रभर टोचत राहतात. ती निवांत झोपू शकत नाही. पण जी सामान्य मुलगी तोतया राजकुमारी बनून आली असते तिला मात्र ते ऐश्वर्य सुखाची झोप घेण्यास पुरेसं असतं.
तर आता प्रश्न असा आहे, की त्या राजकुमारीचं दुःख हे खोटं आहे का? तिचा तो माज आहे का?
अनेकदा आपण आपली भावनिक, मानसिक दुःखं, आपल्या समस्या, आपल्या गैरसोयी, अडचणी कुणाला सांगायला जावं, तर त्यांच्याकडून उपदेश येतो, की ज्या लोकांना एवढंही मिळत नाही त्यांच्याकडे पाहा. लोकांना दोन वेळ जेवायला मिळत नाही, रहायला छप्पर नाही, अंगावर कपडा नाही. त्यांची खरी दुःखं! तुम्हाला सुखासुखी सगळं मिळत असताना तुमच्या या समस्या म्हणजे चोचलेच आहेत रिकामपणाचे.
अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रत्येक माणसाला मिळायलाच हव्यात हेही तितकंच खरं. या मूलभूत गोष्टीही मिळत नसणारे दुर्दैवी जीव खरेच. अभागीच ते.
पण म्हणून या गोष्टी नीट मिळत असणाऱ्यांची भावनिक, मानसिक दुःखे खोटी कशी ? किंवा गैरसोयीच्या समस्या, खोट्या कशा?. मुलभूत गोष्टी मिळणे ही तर प्रत्येक प्राणीमात्राची गरज. वाघाला देखील शिकार केली की झोपायला गुहा लागतेच. ती मिळायला हवी.
पण या मुलभूत गरजांच्या नंतरच तर खऱ्या अर्थाने मानवी गरजा निर्माण होतात ना. मग सात गाद्यांच्या खालचा वाटाणाही टोचतोच. किंबहुना तो टोचतो तेव्हाच ती व्यक्ती जगण्याच्या प्राणीस्तरावरून जगण्याच्या माणूस स्तरावर पोचलेली असते. वाटाणा न टोचणारी मुलगी अभावातून आलेली आहे. दुर्दैवी आहे. पण म्हणून वाटाणा टोचणारीचं दुःखं हे दुःखच नाही किंवा ते कमी प्रतीचं आहे कसं म्हणायचं? तिने आपली रात्रीची झोप गमावली आहे हे सत्य उरतंच.

० 

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...