May 3, 2024

जा जरा उत्तरेकडे...

एका बाजूला पार आकाशात आपले सुळके घुसवून उभे असलेले भव्य पहाड, तर दुसऱ्या बाजूला खोल खोल दरी.. जिला दरी म्हणणे म्हणजे तिचा अपमान करणेच होय. खोल खोल पाताळ म्हणायला हवे..
दोन्हीं कडे पाहताना छाती दडपते. निसर्गाचे भव्य पण रौद्र सौंदर्य पाहून आनंदासह भीती वाटत राहते. 
मध्ये मध्ये असंख्य झरे, ओढे, तलाव आणि धबधबे..मध्येच बर्फाची पखरण.. उतरणीवरची छोटी छोटी गावे. दोन पहाडांमधून खोल खाली वाहणाऱ्या नद्या. मधूनच धुक्याने भरून जाणारा आसमंत...
हे उत्तर किंवा उत्तर पूर्व भारतातील अनेक ठिकाणांचे सार्थ वर्णन. बस एवढेच. पण तरीही पुन्हा पुन्हा मोहवते. साद घालते. 
या पहडांमधून गोल गोल फिरणाऱ्या  वळणदार रस्त्यांवरून आपली गाडी तिथले ड्रायव्हर शिताफीने चालवत राहतात. समोरून येणाऱ्या गाडीला ना थांबता वळसा घालून झरकन पुढे निघतात, तेव्हा आपल्या छातीचा ठोका चुकतो. तिथे स्थानिकच ड्रायव्हर हवेत. आपले काम नव्हे. बहुतेक ठिकाणी अपवाद वगळता रस्ते उत्तम आहेत.
शहरे आपल्या शहरांसारखीच झालीत आता सगळीकडे. पण वाटेत भेटणारी छोटी छोटी गावे आपले वेगळेपण अजून बऱ्यापैकी राखून आहेत.
थंड हवेत गुलाब खूप फुलत असावेत. जागोजागी घरांसमोर लाल गुलाब फुललेले असतात. एकेका झाडाला पन्नास शंभर गुलाब!

हे उत्तरेकडील पहाडी सौंदर्य हिंदी सिनेमाने पडद्यावर आपल्याला बरेच दाखवलेले आहे. पण प्रत्यक्षात अनुभवणे जास्त सुखद. सगळा स्ट्रेस पार दूर निघून जातो. मन ताजे तवाने होते. या भव्य निसर्गासमोर आपले खुजेपण, आपले हेवे दावे, आपली सुख दुःखे, आपले विचार सगळे ठेंगणे वाटू लागते. 
तवांग पासला १५५०० फूट उंचीवर आल्यावर आकाश अगदी हाताशी येतेय असे जवळ वाटत होते. असे इतके जवळ आकाश कधी पाहिले नव्हते. तर पहाडांच्या खूप खाली दरीत तरंगणारे पांढऱ्या ढगांचे मोठाले पुंजके..
आपल्या सह्याद्रीच्या रांगा, कडे, हे या हिमालयीन पहाडांसमोर अक्षरशः पिल्लू आहेत. कितीही वर वर गेलो, तरी पहाडांवर पहाड अंतहीन भेटतच जातात. एका ठिकाणाहून दुसरे ठिकाण गाठायला किमान आठ ते बारा तास गरगर प्रवास करावा लागतो. मात्र हे भव्य सौंदर्य आणि थंड हवामान यामुळे प्रवासाचा कंटाळा येत नाही. वाटेत छोटे छोटे कॅफे, धाबे प्रवासाचा शीण हलका करायला भेटतातच. या धाब्यांच्या दारात गुलाब फुललेले असतात.बहुतेक ठिकाणी हे कॅफे चालवणाऱ्या स्त्रिया मुलीच असतात. नॉर्थ इस्ट कडे सर्व दुकानांतून स्त्रियांचे राज्य. त्यामुळे की काय साडे आठ नऊला दुकाने बंद होतात. त्यांना घरी जाऊन घर सैपाक पण बघावे लागत असणार. लहान मुलांना पाठुंगळीच्या झोळीत बांधतात.
नॉर्थ इष्ट, भूतान, हिमाचल या ठिकाणी खूप सुंदर बौद्ध मॉनेस्ट्री भेटतात. सिक्किमला एके ठिकाणी एका उंच पहाडावर बुद्धाचा भव्य पुतळा, बाजूच्या दरीतून विहरणारे पांढरे ढग, त्यांना भेदून वर आलेले पहाडांचे सुळके, त्यावर बर्फाची पखरण आणि त्या गार सुखद वातावरणात जणू काही खोल दरीतून लहरत येत आल्यासारखे बौद्ध स्तोत्रांचे सूर...अवघे वातावरण परम शांती देणारे आणि आनंदित करणारे..तिथून हलुच नयेसे...
ही शांती, हे पावित्र्य, ही स्वच्छता कुठल्याच प्राचीन, अर्वाचीन मंदिरात मिळत नाही. अपवाद कोकण आणि दक्षिणेकडची काही मंदिरे थोडीशी...
मी पर्यटनात कुठल्याच मंदिरात जात नाही. रांगा लावून तर नाहीच. बाहेरून सहज बघता आली तरच. उत्तरेकडे तर अतिशय गलिच्छ. पंडे पुजारी यांनी वेढलेला, त्यांच्या तार स्वरातील कर्कश श्लोकानी  वैतागलेला देव स्वतः तर हळद कुंकू फुले अभिषेकात गुद्मरलेला.. त्याचे मूळ स्वरूप दिसतच नसते..! असो.
उत्तरेकडे निसर्गात आठ दहा दिवस जरी फिरून आलो तरी वर्ष भराची ऊर्जा मिळते. म्हणून तुम्हीही... जा जरा उत्तरेकडे....




May 3, 2023

बाबा बुवा नेते गुरू इत्यादी...

 लोक बाबा, बुवा, अम्मा, दिदी, महाराज, गुरू, नेते यांच्या इतके भजनी कसे काय लागतात? यात बहुसंख्य जनता सामील असते हे विशेष.
इतक्या बहुसंख्येत लोक तर्कहीन वागत असतात? स्वतःच्या  अकलेचा वापर जराही करू शकत नाहीत... इतका बाबा वाक्यं प्रमाणमच्या आहारी जातात..

जीवनाची साधी साधी तत्वे समजायला कोणत्याही बाबा, बुवा, अम्मा दिदीची गरज का भासावी? अगदी निरक्षर माणसे देखील अनेकदा इतका तर्काने विचार करतात की आपण थक्क होतो, याऊलट अगदी डॉक्टर इंजिनिअर झालेले लोक या बाबा बुवांच्या नादी लागताना दिसतात तेव्हाही थक्कच होतो. 

याचा फायदा हे तमाम बाबा न उचलते तरच नवल.. प्रसिद्धी कुणाला नकोय? पुरस्कार कुणाला नकोत? 

दोन महिन्यापूर्वी नाशकात होते. फ्लॅटचा दरवाजा उघडाच असतो. तीन बाया शिरल्या घरात. टिपिकल पेहेराव. साडी. कनिष्ठ मध्यमवर्गीय चेहरे. 

काय हवं विचारलं. काही नको. आम्ही आज एकादशी म्हणून सहज भेटीला आलोय. स्वाध्याय परिवारातर्फे. तसे आम्हाला आदेश असतात. लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या...
पण कशाला?

कशाला नाही. असंच. सहज. 

बरं चहा पाणी काही?

नाही कुणाकडे काही घ्यायचं नाही अशी पद्धत आहे आमची. थोडं पाणी चालेल फार तर..

ठिक. पण मी जवळपास नास्तिक आहे. बाबा बुवा वगैरेंवर माझा विश्वास नाही. तूच आहेस तुझा सांगातीवरही माझा विश्वास नाही, कारण मीच आहे माझी सांगाती.

चालेल. ते तुमचे विचार आहेत. मग काही श्लोकांची छापील कागदे दिली. ते कॉमन श्लोक होते. जे साधारण ब्राम्हणी घरांमध्ये सकाळ संध्याकाळ बोलले जातात. 

जवळपास माझा अर्धा पाऊण तास खाऊन गेल्या.

मी विसरले देखील.

दोन महिन्यांनी मी परवा नाशकात परत आले.

तर काल ही तिगोळी परत हजर. शिरल्या घरात. 

तोच प्रकार. 

मी पुन्हा सांगितलं. मी नास्तिक आहे. बाबा महाराज वगैरे मला मानवत नाहीत. 

चालेल. 

मी माझे महत्त्वाचे काम संगणकावर करत होते. त्यांनी विचारलं देखील काम चालू आहे का. मी हो म्हटलं. तरी बसूनच.

मग मला राहवलं नाही. मी विचारलं. तिघीही साडीतच का? हा पेहेराव तुम्हाला कम्फरटेबल वाटतो का? यात पळता, धावता येत नाही, उड्या मारता येत नाहीत. पोहता येत नाही. सायकल चालवता येत नाही. 

आम्हाला साडीच कम्पलसरीली आहे. विशेषतः बैठकीची कामे करताना. 

का.. असं का... 

ते आपले ट्रॅडीशनल पेहेराव हवा, आपली संस्कृती...

अच्छा.. पण ही साडी आपली परंपरा नाहीए. हे तुम्हाला ठाऊक नाही का? नऊ वारी साडी ही आपली परंपरा आहे. ती कम्फर्टेबल देखील आहे. तुम्ही नऊ वारी नेसून घोड्यावर सायकलीवर बसू शकता. धावू शकता. पोहू शकता.

हो पण सध्या हीच साडी चलतीत आहे ना मग हीच नेसायची.

अहो, सध्या सुटसुटीत ड्रेस चलतीत आहेत. त्याच्याशी तुमच्या संस्थेला का वाकडं आहे. 

आम्हीही करतो एरव्ही फॅशन. पण संस्थेत जाण्यासाठी एक तासापुरती नेसायला काय हरकत आहे. आम्हाला आवडते. आमची काही हरकत नाही.

पण का? याचे बंधन का? असा प्रश्न तुम्हाला पडत नाही? एक तास तरी अनकम्फर्टेबल कपड्यांत का वावरायचंय तुम्हाला? आणि मी फॅशन म्हणून सांगतच नाही. सुटसुटीतपणा, सर्व तऱ्हेच्या हालचाली नीट करता येणं ह्यासाठी सांगतेय...


वाद वाढत गेला. भडकल्या. मला म्हणे सगळीकडे क्रांती, विद्रोह करायचा नसतो... 


आता यांनी मला शिकवावं क्रांती वगैरे... ज्या स्वतःच गुलाम आहेत दुसऱ्यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या... अक्कल गहाण ठेवून. 

मग विचारलं पुरुषांना काय नेसायला सांगतात. 

त्यांना पॅन्ट शर्ट चालते. 

मग ती पारंपरिक आहे का? त्यांना धोतर का नाही? धोतर ही आपली संस्कृती नाही?

मला ठाऊक होतं. यांच्या मठ्ठ डोक्यात काहीही फरक पडणार नाही.

पण मला न विचारता माझ्या घरात शिरून माझ्या वेळेवर अतिक्रमण करत असतील, तर मीही त्यांची उलटतपासणी घेणं माझा अधिकार आहेच..........
नंतर उठल्या. गेल्या.

परत येणार नाहीत नक्कीच. मलाही तेच हवं होतं. नाहीतर दर एकादशीला मंडळ माझ्या दारी... असं झालं असतं.

आश्चर्य हे वाटले की दोन्ही वेळेस माझ्याच घरात शिरल्या. शेजारणीचं घर उघडं असूनही तिथे नाही शिरल्या. शेजारीण चांगली पारंपरिक आहे. पण कदाचित माझे कपडे पाहून मलाच सुधारावं या हेतून माझ्याच घरात शिरत असाव्यात. 

बाबा बुवा अम्मा देखील परंपरेच्या विरोधात विद्रोह, बंड करायला शिकवू शकत नाहीत. तेवढी त्यांची क्षमता नसते. साडी नेसा म्हटलं की समाज खुश असतो. रांगोळ्या काढा म्हटलं की बाया हिरीरीने तयार होतात. हे अम्मा बाबांनाही ठाऊक असतं. 

तू भी खुश, मै भी खुश......

और संस्कृती काकू तर खुशच खुश.

Apr 24, 2023

कोकणी मुस्लिम आणि उर्दू

 कोकणात मुस्लिम संख्येने खूप आहेत. विशेषतः समुद्रकिनाऱ्यानजिकच्या गावांत त्यांची बहुसंख्या आहे. अशाच एका गावात माझा जन्म आणि साधारण अठरा वीस वयापर्यंत वास्तव्य झालेलं आहे.

माझ्याही जन्माच्या आधीपासून गावात उर्दू शाळा होती. मुस्लिम बहुसंख्या असलेल्या बहुतांश, नव्हे जवळपास सर्वच गावांत त्यांच्यासाठी उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. हिंदूंसाठी मराठी माध्यम, तर मुस्लिम लोकांसाठी उर्दू माध्यमाची शाळा. 

या दोन वेगळ्या शाळांमुळे असे झाले, की आमच्या वर्गात एकही मुस्लिम विद्यार्थी नसे आणि त्यांच्या शाळेत एकही हिंदू  विद्यार्थी नसे. त्यामुळे एकत्र खेळणे, अभ्यास करणे, एकत्र मिळून शाळेत जाणे, गप्पा टप्पा, एकमेकाचं विश्व जाणून घेणे, हे कधी घडतच नव्हते. अजूनही तसेच आहे. बरं शाळाही दोन  वेगळ्या टोकाला. त्यांची मोहल्ल्यात तर आमची दुसरीकडे. 

आम्हीही काही मराठी नव्हतो. घरात गुजराती बोलणारे आम्ही, परंतु बाहेर गुजराती माध्यमाच्या शाळा नसल्याने आम्ही गेली सहा पिढ्यांपासून मराठी माध्यमांच्या शाळेतच शिकत होतो. त्याच्या परिणामी मराठी संस्कृती, खान-पान, साहित्य, प्रादेशिकता इत्यादींशी आमची नाळ आपोआप जुळत गेली. गुजराती घरी बोलण्यापुरती, तर मराठी भाषा ही व्यवहाराची, ज्ञानाची, माहितीची, मनोरंजनाची भाषा झाली. मातृभाषेपेक्षा ती अधिक जवळची झाली.

मात्र मुस्लिम मुलांची हालत अशी झाली, जशी आता इंग्रजी माध्यमातील ग्रामीण मुलांची होते. त्यांची मातृभाषा कोकणी-मराठी बोलीभाषा. पण शिक्षण उर्दूत. त्यामुळे ना मराठी सुधारली, ना उर्दू धड आली. मी कधीही गावातल्या कुठल्या मुस्लिम लोकांना आपसांत उत्तम उर्दूत संभाषण करताना पाहिलेले, ऐकलेले नाही. त्यांच्या कोकणी-मराठीतच ते बोलतात. या कारणाने ते आजही मुख्य धारेपासून वेगळे राहिलेत. ना उत्तम मराठी बोलत, ना उत्तम उर्दू. उर्दू माध्यमात शिकूनही ना तिथे कुणी उर्दू साहित्यिक झाले, ना शायर झाले, ना कधी गजल मुशायरे ऐकले. 

शिवाय शाळा उर्दू माध्यमातील असल्या तरी कॉलेजेस उर्दू माध्यमातील नाहीत. तेव्हा तरी नव्हते. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी मराठी, किंवा इंग्रजीच घ्यावे लागे. त्या काळात उच्च शिक्षण घेतच नव्हते कुणी. आता घेत असतील, त्यांचे काय हाल असतील, ते त्यांनाच ठावे. 

आता मुस्लिम मराठी साहित्य संमेलने होतात. मी अशा एकाच संमेलनाला हजर होते. त्यात साहित्यावर कमी आणि मुस्लिम म्हणून काय परिस्थिती आहे याची रडगाणीच अधिक होती. त्यात कोकणाबाहेरील साहित्यिक अधिक होते. कारण कोकणाबाहेरील मराठी मुस्लिम बऱ्यापैकी मराठी माध्यमांत शिकणारे आहेत. उदा. सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी.

माझे ते वेगळे या घेट्टो प्रवृत्तीमुळेही मुख्य धारेत सगळे येत नाहीत. त्याला सामाजिक मानसिकता ही अशी कारणीभूत ठरते. जर हे मुस्लिम मराठी मुस्लिम आहेत, तर त्यांचा नि उर्दूचा खरंतर काय संबंध? उर्दू कुठली पश्चिम उत्तरेकडची भाषा. महाराष्ट्रात काही संबंधच नाही खरं तर... त्यांनी मराठी माध्यमांतूनच शिकायला हवे. तर सामाजिक सलोखा, एकरुपता येण्यास अधिक मदत होऊ शकते. पण तसे झाले नाही, आणि होतही नाही.

२४-४-२३

Mar 1, 2023

टवाळक्या -

 खूपदा, "मला बोलायचंय तुमच्याशी. कधी भेटाल, किंवा कधी कॉल करू?"

असे लोक विचारत असतात.
मग आपण देखील मनात असताना, किंवा नसतानाही, उगाच समोरच्याला आपण भाव खातो असं वाटायला नको म्हणून आपण आपल्या तंद्रितला अमूल्य वेळ काढून त्याला "ये बाबा" म्हणतो.
आणि आल्यानंतर, प्रत्यक्ष किंवा कॉलवरही, ती व्यक्ती काहीच बोलत नाही. घुम्यासारखी एक दोन वाक्ये बोलते. आपल्याकडे बघत बसते.

तो वेळ, ते क्षण फार इरिटेटींग असतात.

मनात चरफडत, "आरे बाबा, बोलायचं होतं ना? मग बोल की तोंड उचकटून भडाभडा..काय ते?"
पण नाही, तो/ती आपल्याकडूनच अपेक्षा ठेवून चुळबुळत बसून राहतात. फोनवर असतील, तर आपल्यालाच म्हणतात, "बोला."

हे तर अजून डोक्यात जातं.

म्हणजे आपणच यांना आपल्या कामासाठी बोलावलंय अशी लाचारीची भावना मनात दाटून येते.
कदाचित त्यांना वाटत असेल, ही बाई रोजच्या रोज फेसबूकवर मनोरंजन पिरसत असते, तशी आज खास फक्त आपल्यासाठी शो करेल काही. समोरासमोर. अगदी आमने सामने.

किंवा ही परकाया प्रवेश करून जशा कविता लिहिते, लोकांच्या मनातलं ओळखते, तसं आपण न बोलताच आपल्या मनातलं सगळं ओळखेल, आणि आपले काऊन्सेलिंग करेल, किंवा न जाणो कविताही करेल आपल्यावर. खरंतर त्यांच्या मनातलं सग्गळं मी ओळखलेलं असतंच. पण ते फुकट का म्हणून सांगायचं मी त्याला? काऊन्सेलर हजार पंधराशे घेतो एका सिटींगचे. हे दळभद्री मला चहाही पाजत नसतात. मीच शेवटी कंटाळून उठून बिल भरते. अनेकदा बिअरचे देखील.

आता बोला.

पुन्हा त्या व्यक्तिशी काहीही संवाद ठेवण्याच्या मूडमध्ये मी राहत नाही. टाळते. 

Feb 23, 2023

टवाळक्या -




ज्यांना ईमोजी टाकल्याशिवाय लेखनातला ह्युमर कळत नाही, असा एक मोठा वर्ग इथं आहे. त्यांची मला भीती वाटते.

वर्गात पुलं, चिंवि इत्यादी शिकवताना मुलांच्या चेहऱ्यावरची रेष हलायची नाही, ते आठवलं.
पुलंनी आणि त्यांच्या फडणीसानी रेखाचित्राऐवजी ईमोजी टाकल्या असत्या, तर बिचारी मुलं हसली तरी असती...😣😣

Feb 14, 2023

स्त्रियांचे प्रेम -

 

प्रेमात स्त्रियांना काय हवं असतं, ते अजून नेमकं स्त्रियांनाही कळत नाही. तर बाकीच्यांना काय कळणार..
त्यात स्त्रियांच्या मागे निसर्गाने आणि पितृसत्तेने लावलेली कर्तव्ये, अपेक्षा, अडसर, बंधने, भीती इत्यादी धरून स्त्रियांची मानसिक आणि भावनिक जडणघडण अत्यंत गुंतागुंतीची झालेली आहे. शिवाय ती प्रत्येक स्त्रीची वेगळी असते. सामाजिक स्तराप्रमाणे देखील बदलते.

  
या सगळ्या सामाजिक जडणघडणीत आणि काही निसर्गाच्या अपेक्षा, यानुसार पुरुषांच्या प्रेमातल्या अपेक्षा आणि स्त्रियांच्या या वेगळ्या होतात. तिथे गोची अजून वाढते. निसर्गाने मानवप्राण्याच्या सेक्शुअल भावना प्राण्यांप्रमाणेच ठेवल्यात, पण माणसाला इतर प्राण्यांच्यापेक्षा बुद्धी आणि भावना या जास्तीच्या देणग्या दिल्याने त्यातली गुंतागुंत आणि भेद वाढत गेलेले आहेत.

त्यात आमच्यासारख्या अर्धे वय उलटत चाललेल्या स्त्रियांची गोची तर अजून वेगळीच आहे. एकीकडे परंपरेचा पगडा, तर दुसरीकडे आधुनिक काळाच्या तनमनाकडून होत असलेल्या लोभस मागण्या..या दोन्हीत ओढाताण होते. जाए तो जाए कहां....

कुणी कितीही मुलामा चढवला, तरी पुरुष प्रेमात आधी सेक्स, शरीर यांच्या अपेक्षा ठेवतो हे सार्वकालिक सत्य अजूनही अबाधित आहे. एवढंच नाही, तर एकाच शरीराला तो लवकर कंटाळतो स्त्रीच्या तुलनेत, हेही सत्य आहेच. एखाद्या स्त्रीच्या मैत्रीत देखील शरीर मिळण्याची शक्यता नसली, तरी तो त्या मैत्रीला कंटाळतो. आणि स्त्रियां हे पटकन ओळखतात. त्यांना नेमके तेच आवडत नाही.

स्त्रियांना सेक्स नको असतो असे नाहीच, पण त्याबरोबर त्या आधी आणि त्या नंतरही त्यांना हजारो गोष्टी हव्या असतात. त्यात त्या सगळ्या प्रत्यक्षात हव्याच असतात असेही नाही, पण प्रेमातला पुरुष त्या द्यायला तयार आहे, द्यायचा प्रयत्न करतोय, एवढेही त्यांना खूप असते. कारण त्या भावनेनेच अधिक गुरफटलेल्या असतात. अर्थात पुन्हा पुरुषाची नाटकी वचने आणि प्रामाणिकपणा हे देखील त्या झटकन ओळखतात. त्यामुळे पुन्हा गफलत होतेच.

उदा. अगदी बेसिक पातळीवर घेतलं, समजा एखादा दागिना स्त्रीला हवाय, पुरुष तो देण्याचे प्रॉमिस स्वतःहून करतोय, मला तुझ्यासाठी हे घ्यायची फार इच्छा आहे असे म्हणतोय हेच त्यांना सुखावतं. प्रत्यक्ष तो ते नाही घेऊ शकला काही कारणाने तरी त्यांना ते चालतंय. त्या समजून घेऊ शकतात. पण आपल्या इच्छेची याला काही पडलेलीच नाही. त्याला ते महत्त्वाचे वाटतच नाही हे पाहून त्या जास्त दुखावतात.

या दागिन्याच्या ठिकाणी काहीही असू शकतंय, फिरायला जाणे, निवांत बसून गप्पा मारणे, सिनेमा नाटकाला जाणे, घर, कपडे, वस्तू खरेदी करणे, सफाई करणे, सजावट करणे, नातेवाईकांकडे जाणे, गाणी ऐकणे, शिजवून खाऊ घालणे.... ही यादी खूप असते. पुरुषाने त्यात रस दाखवावा.. बस. पण बहुधा पुरुषांना तो रसही दाखवायचा नसतोच. कारण त्यांना त्या एकाच स्त्रीबरोबर आणि सातत्याने हे करायचा कंटाळा लगेच येतो.  मग ते त्यावर हिडीस विनोद करू लागतात.

अगदी माझेच उदाहरण द्यायचे झाले, तर माझ्या नवऱ्याला चांगला सैपाक करता येतो. तो मलाही करून खाऊ घालतो. क्वचित नव्हे, तर अनेकदा. नित्यच म्हटलं तरी चालेल. पण त्याचं म्हणणं असतं की तो सैपाक करताना मी तिथे उभं राहायचं नाही. आणि मी करत असताना तो तिथे येत नाही. आता इथे माझ्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्याने काही करू नये. फक्त मी सैपाक करत असताना सैपाकघरात बसावं. माझ्याशी गप्पा माराव्यात. एखादी वस्तू लागली तर पटकन हाताशी द्यावी. फळीवरचे डबे काढून द्यावेत. माझी ही रोमान्सची साधी अपेक्षा आहे. त्यातून माझा सहवास त्याला आवडतोय हे प्रतीत होत असतं. पण नेमके तेच करायला त्याला आवडत नाही. त्याला वाटतं मला हाताशी तिथे नोकर हवा असतो... 🙈

नवरा किंवा प्रियकर, जरी असा नीरस असला तरी जिस पे दिल आया है, तिथे स्त्रियांचा नाईलाज होत असल्याने, (कारण असा पटकन त्यांचा दिल कुणावर येत नाही. (कारण त्या फक्त शरीर बघत नाहीत. त्या पैसा बघतात हा देखी आरोप अपवादात्मकच आहे. त्यांना फक्त ती व्यक्ती क्लिक व्हावी लागते. ) त्या त्या पुरुषाला चिकटून राहतात. राहण्याचा प्रयत्न करतात. पुरुषाला वाटते, की ही आपल्याशी एकनिष्ठ आहे, आपल्याशिवाय तिला कुणात रस नाही. ती तशीच असावी असेही त्याला वाटत असतेच. पण प्रत्यक्षात ती राहते कारण तिच्यात सेक्सच्या पलिकडचे वात्सल्यप्रेम शिल्लक असते. सेक्स अबाधित असतोच. पण तो ती परिस्थितीनुसार दडपू शकते. या दडपण्याचे दुष्परिणाम होतातच. पण ते ती झेलते. ती तुमचे प्रेम संपल्यावरही तुम्हाला सहन करत राहते ती करुणेने. वात्सल्याने. प्रेम तिचेही संपलेले असू शकतेच.

पुरुषाला स्त्रीचे कपडे काढण्यात रस असतो. ज्या दिवशी कपडे नेसतानाही पुरुष तिच्याकडे प्रेमाने पाहील, हुक्स काढण्याइतकाच रस हुक्स, साडीची पिन, साडीच्या निऱ्या निट लावून देण्यात दाखविल तेव्हा तिला त्याच्याबद्दल अधिक प्रेम वाटत असते. केस मोकळे करण्याइतकाच रस पुन्हा वेणी घालून, बांधून देण्यात दाखवलेला तिला जास्त आवडतो.  कारण इथं घेणं आणि देणं हा फरक असतो. धुतलेले तिचे केसही टॉवेलने पुसून दिलेत तर तिला का नाही आवडणार ते? 
अरे, कधी तिचे केस धुवून दिलेत, केसांना तेलाचा मसाज करून दिलात, तर त्या दिवशी ती तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. स्त्रियांना केस धुण्याचा कंटाळा येतो. त्यांना ते आयते वायते धुवून हवे असतात. लहानपणी आई धुवून द्यायची तसेच. त्यासाठी त्या पार्लरमध्ये जातात. पैसे खर्च करतात. हे कधीच पुरुष लक्षात तरी घेतात का?  असे पुरुष मोजकेच.


स्त्रिया कृष्णाच्या प्रेमात का असतात? कृष्ण राधेचे केस विंचरून देतो. कृष्ण राधेला, द्रौपदीला एवढंच नव्हे, तर अगदी रुक्मिणीला, सत्यभामेलाही आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ देतोय. तिचं ऐकून घेतोय. तिच्याशी मैत्री करतोय. तिच्या खोड्या काढतोय,  कृष्णाच्या शृंगाराच्या कथा थेट सेक्सशी संबंधित कधीच नसतात. तसं असतं, तर सर्व मंदिरांच्या कामशिल्पात कृष्णच दाखवला असता. तसा तो तिथे कधीच दिसत नाही.  हे सर्वसामान्य पुरुष फार क्वचित करतो.

होतं काय, की पुरुषाच्या सेक्सच्या अपेक्षा स्त्री समजून घेते. अनेकदा इच्छा नसली तरी त्याच्यासाठी ती तयार होते. पण स्त्रियांच्या या छोट्या छोट्या रोमान्सच्या अपेक्षा पुरुष समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. अनेकदा त्यावर विनोदच केले जातात. 
आणि मग दोघांच्या प्रेमाच्या अपेक्षा दोन वेगळ्या दिशांची वाट धरून चालत राहतात.......


Jan 22, 2023

उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रम

 खूप जणांनी विचारलं होतं, की उरळीकांचनबद्दल लिही म्हणून

उरळीकांचन हे पुण्याच्या पुढे सोलापूर रस्त्यावर असलेलं गांव. इथं म. गांधीजींनी १९४६ साली स्थापन केलेला आश्रम आहे. या आश्रमात निसर्गोपचार करून बऱ्याच लहानमोठ्या व्याधींपासून सुटका केली जाते. जास्तीचं वजन कमी केलं जातं. 

हा आश्रम जवळपास ३५ एकरावर पसरलेला आहे.

इथं उपचार घेण्यासाठी इथं निवास करावा लागतो. निवासासाठी वेगवेगळ्या प्रकारची संकुलं आहेत. 

सर्व प्रकारचे उपचार हे नैसर्गिक आधारावर केले जातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाज, स्टीम बाथ, ऍक्युपंक्चर, मड थेरपी, सात्विक आहार, रसाहार, काढे, योग, हलका व्यायाम, पंचकर्म, चालणे इत्यादीचा समावेश असतो. नॅचरोपॅथीचा अभ्यास केलेले  डॉक्टर इथे आधी तुमच्या तक्रारी ऐकून घेतात, वजन बीपी शुगर इत्यादी तपासले जाते. त्यानंतर ते तुम्हाला आहार, योगा प्रकार, वेगवेगळ्या थेरपींपैकी तुम्हाला योग्य असणाऱ्या थेरपी लिहून देतात. दुसऱ्या दिवसापासून सकाळपासून या थेरपी सुरू होतात. यात रोजच्या रोज मसाज, स्टीमबाथ, मड थेरपी, सन बाथ इत्यादी सुरू होते. जोडीला त्यांनी सुचवलेले रस किंवा ज्युसेस वेळच्या वेळी दिले जातात. सकाळचे शेडयुल पहाटे पाचपासून सुरू होते. सकाळचे जेवण साडेबाराच्या आत तर संध्याकाळचे साडेसहाच्या आत उरकायचे असते. ते लिमिटेड आणि बिन तिखटाचे बिन तेलाचे असते. तरीही ताजे, गरम आणि चविष्ट असते. 

इथे अतिरिक्त वजन असलेले बरेच लोक वजन कमी करण्यासाठी येतात. आणि त्यांना आश्चर्यजनक रिझल्ट मिळतो. 

सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपला रोजचा दिनक्रम अस्तव्यस्त झालेला असतो. झोपण्याच्या जेवणाच्या वेळा अनैसर्गिक झालेल्या असतात. त्याचेच दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. आणि तक्रारी सुरू होतात. त्याच तक्रारी नंतर मोठ्या आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे जरी मोठे आजार नसले, तरी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, दिनक्रमाची योग्य, नैसर्गिक शिस्त लावून घेण्यासाठी सर्वांनीच इथं काही दिवस राहून जरूर उपचार घ्यायला हवेत. कमीत कमी आठवडा ते महिनाभर इथे राहून उपचार घेतल्यास अतिशय फ्रेश, हलके आणि उत्साही वाटू लागते.. कारण इथे आहार-विहाराची नैसर्गिक शिस्त शरीराला लावली जाते. 

हा सेवाभावी आश्रम असल्याने इथे व्यवसाय म्हणून हे उपचार दिले जात नाहीत. अतिशय माफक दरात या सर्व सेवा आपल्याला इथं मिळतात. साधारण दिवसाला माणशी १०००-१५०० पर्यत खर्च येतो. यात राहणं, जेवण, रसाहार, वेगवेगळ्या थेरपी, डॉक्टरांची तपासणी हे सर्व आले. 

त्यामुळे इथे देशभरातूनच नव्हे, तर परदेशांतूनही लोक उपचार घेण्यासाठी येत असतात. परिसर अतिशय शांत रम्य, भरपूर झाडे, बाग, शुद्ध हवा, आहारात नैसर्गिक रित्या पिकवलेले धान्य, फळं, रस इत्यादीमुळे आपोआप छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी दूर होऊ लागतात. 
इथला सर्व स्टाफ विनम्र, सेवाभावी आहे. 
इथं एकावेळी २००-२५० लोक उपचारासाठी राहू शकतील इतकी क्षमता आहे. यात स्त्री-पुरुष दोन्ही आले. थेरपीसाठी पुरुषांना आणि स्त्रियांना वेगवेगळी व्यवस्था आहे. एवढ्या लोकांसाठी लागणारा मोठा स्टाफ आहे. उदा. केवळ स्त्रियांच्या मसाजसाठी ३०-३५ मसाजिस्ट महिला आहेत. 
या आश्रमामुळे इथल्या स्थानिक लोकांना मोठा रोजगार मिळाला आहे. गांधीजींची ग्रामसुधार योजना या आश्रमाचा एक भाग आहे.
इथलं बुकींग ऑनलाईन होतं. त्यासाठी उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रम असं सर्च केलं की साईट सापडते. 

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...