Jan 22, 2023

उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रम

 खूप जणांनी विचारलं होतं, की उरळीकांचनबद्दल लिही म्हणून

उरळीकांचन हे पुण्याच्या पुढे सोलापूर रस्त्यावर असलेलं गांव. इथं म. गांधीजींनी १९४६ साली स्थापन केलेला आश्रम आहे. या आश्रमात निसर्गोपचार करून बऱ्याच लहानमोठ्या व्याधींपासून सुटका केली जाते. जास्तीचं वजन कमी केलं जातं. 

हा आश्रम जवळपास ३५ एकरावर पसरलेला आहे.

इथं उपचार घेण्यासाठी इथं निवास करावा लागतो. निवासासाठी वेगवेगळ्या प्रकारची संकुलं आहेत. 

सर्व प्रकारचे उपचार हे नैसर्गिक आधारावर केले जातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे मसाज, स्टीम बाथ, ऍक्युपंक्चर, मड थेरपी, सात्विक आहार, रसाहार, काढे, योग, हलका व्यायाम, पंचकर्म, चालणे इत्यादीचा समावेश असतो. नॅचरोपॅथीचा अभ्यास केलेले  डॉक्टर इथे आधी तुमच्या तक्रारी ऐकून घेतात, वजन बीपी शुगर इत्यादी तपासले जाते. त्यानंतर ते तुम्हाला आहार, योगा प्रकार, वेगवेगळ्या थेरपींपैकी तुम्हाला योग्य असणाऱ्या थेरपी लिहून देतात. दुसऱ्या दिवसापासून सकाळपासून या थेरपी सुरू होतात. यात रोजच्या रोज मसाज, स्टीमबाथ, मड थेरपी, सन बाथ इत्यादी सुरू होते. जोडीला त्यांनी सुचवलेले रस किंवा ज्युसेस वेळच्या वेळी दिले जातात. सकाळचे शेडयुल पहाटे पाचपासून सुरू होते. सकाळचे जेवण साडेबाराच्या आत तर संध्याकाळचे साडेसहाच्या आत उरकायचे असते. ते लिमिटेड आणि बिन तिखटाचे बिन तेलाचे असते. तरीही ताजे, गरम आणि चविष्ट असते. 

इथे अतिरिक्त वजन असलेले बरेच लोक वजन कमी करण्यासाठी येतात. आणि त्यांना आश्चर्यजनक रिझल्ट मिळतो. 

सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपला रोजचा दिनक्रम अस्तव्यस्त झालेला असतो. झोपण्याच्या जेवणाच्या वेळा अनैसर्गिक झालेल्या असतात. त्याचेच दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. आणि तक्रारी सुरू होतात. त्याच तक्रारी नंतर मोठ्या आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे जरी मोठे आजार नसले, तरी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, दिनक्रमाची योग्य, नैसर्गिक शिस्त लावून घेण्यासाठी सर्वांनीच इथं काही दिवस राहून जरूर उपचार घ्यायला हवेत. कमीत कमी आठवडा ते महिनाभर इथे राहून उपचार घेतल्यास अतिशय फ्रेश, हलके आणि उत्साही वाटू लागते.. कारण इथे आहार-विहाराची नैसर्गिक शिस्त शरीराला लावली जाते. 

हा सेवाभावी आश्रम असल्याने इथे व्यवसाय म्हणून हे उपचार दिले जात नाहीत. अतिशय माफक दरात या सर्व सेवा आपल्याला इथं मिळतात. साधारण दिवसाला माणशी १०००-१५०० पर्यत खर्च येतो. यात राहणं, जेवण, रसाहार, वेगवेगळ्या थेरपी, डॉक्टरांची तपासणी हे सर्व आले. 

त्यामुळे इथे देशभरातूनच नव्हे, तर परदेशांतूनही लोक उपचार घेण्यासाठी येत असतात. परिसर अतिशय शांत रम्य, भरपूर झाडे, बाग, शुद्ध हवा, आहारात नैसर्गिक रित्या पिकवलेले धान्य, फळं, रस इत्यादीमुळे आपोआप छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारी दूर होऊ लागतात. 
इथला सर्व स्टाफ विनम्र, सेवाभावी आहे. 
इथं एकावेळी २००-२५० लोक उपचारासाठी राहू शकतील इतकी क्षमता आहे. यात स्त्री-पुरुष दोन्ही आले. थेरपीसाठी पुरुषांना आणि स्त्रियांना वेगवेगळी व्यवस्था आहे. एवढ्या लोकांसाठी लागणारा मोठा स्टाफ आहे. उदा. केवळ स्त्रियांच्या मसाजसाठी ३०-३५ मसाजिस्ट महिला आहेत. 
या आश्रमामुळे इथल्या स्थानिक लोकांना मोठा रोजगार मिळाला आहे. गांधीजींची ग्रामसुधार योजना या आश्रमाचा एक भाग आहे.
इथलं बुकींग ऑनलाईन होतं. त्यासाठी उरुळीकांचन निसर्गोपचार आश्रम असं सर्च केलं की साईट सापडते. 

1 comment:

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...