काल मी फेसबूकवर 'घर' ही माझी कविता पोस्ट केली. माझ्या 'कन्या-रास' या आगामी कवितासंग्रहातील ही कविता आहे. याच संग्रहात एक 'गृहीणी' या नावाची कविता देखील आहे.
मला स्वतःला गृहीणी हे पद आणि ही संकल्पना मान्य आहे. या पदाचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे आणि या पदाचं केवळ कौटुंबिकच नव्हे, तर सामाजिक आणि राष्ट्रिय महत्त्व देखील मोठंच आहे.
"स्त्रियांचे कष्ट मोजले जातील, तेव्हा मानवी समाजाची सर्वात मोठी चोरी पकडली जाईल" असं कुणाचं तरी वाक्य आहे.
स्त्रिया जे घराकरता, कुटुंबाकरता राबतात त्या कष्टाचे पैशात मोल होत नाही. त्या घरात खाऊनपिऊन राबतात. कुटुंबाचा कर्ता श्रीमंत असेल, तर समाज त्या गृहीणीलाही श्रीमंत म्हणतो आणि तिला चांगलंचुंगलं खायला ल्यायला मिळू शकतं. याउलट जर कर्ता गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल तर त्या प्रमाणातच तिला खायला ल्यायला राहायला मिळू शकतं. इथं तिच्या हातात चॉइस नाही. जोपर्यंत ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत तिला स्वतःची गरीबी, श्रीमंती नाही. घरातील कर्त्या माणसाची जी आर्थिक स्थिती, तीच तिचीही.
अर्थात सामाजिक रचना आणि व्यवस्था अशा आहेत की यात कुणालाही काही वावगं वाटत नाही. ना त्या स्त्रीला, ना कुटुंबियांना, ना समाजाला. नवरा राखेल तसंच गृहीणीने राहावं. कमी पगार असेल, तर काटकसर करावी नि अधिक असेल, तर मिरवावं हे अगदी सर्वमान्य आहे, नव्हे तशीच सामाजिक अपेक्षा आहे.
इथपर्यंत ठिकही आहे. मात्र यात स्त्री ही पूर्णपणे परावलंबी आहे याची जाणीव फार कमी वेळा आणि कमी लोकांना होते. अगदी सगळा पगार जरी घरातला कर्ता पुरुष त्या स्त्रीच्या हातात आणून देत असेल, तिला खर्चाचे, निर्णयाचे स्वातंत्र्य देत असेल, तरीही .. तरीही जेव्हा वेळ येते तेव्हा तिचा त्या पैशांवर काडीचाही हक्क नसतो. ती असते केवळ खजिनदार. एक जबाबदार खजिनदार.!
जेव्हा कुठलीही इमर्जन्सी येते, त्या घरातल्या इतर व्यक्तींशी, विशेषतः घरातल्या कर्त्या व्यक्तीशी उर्फ नवऱ्याशी तिचं पटेनासं होतं, वादावादी होते तेव्हा तिला या सगळ्यावर पाणी सोडावं लागणार असतं. ते खजिनदाराचं पदही सोडावं लागणार असतं. किंबहुना प्रत्यक्ष घर सोडायचं नसेल, किंवा घटस्फोटही घ्यायचा नसेल, केवळ भांडणाच्या वेळी रागात बोलायचं असेल, की मला नाही राहायचं तुझ्याबरोबर... तेव्हा खरंतर त्या स्त्रीलाही माहीत असतं की नाही राहायचं हे खरं, पण एक रात्रही जायचं असेल रागवून तर जायचं कुठं? माहेरी? त्या घरावर तिचा कितपत हक्क असतो हे साऱ्यानाच ठाऊक आहे. माहेरी जायचं ते केवळ पाहुणी म्हणून असा समज आजही पक्का आहे. तेव्हा तिथं जाऊन राहाणं हे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था असते हे प्रत्येक स्त्री जाणून असते. त्यात माहेरी फक्त आईबाबा असतील तर जरा तरी राहणं सोपं असतं. पण तिथे भावाचे कुटुंब असेल, तर पुन्हा तेही कठीणच. अगदी पाहुणी म्हणूनही तिथं राहणं किती अवघडलेपणाचं असतं ते एक स्त्रीच सांगू शकते.
राहिला कायदेशीर हक्काचा प्रश्न. माहेर, सासर किंवा नवऱ्याचे घर यात कायदेशीर हक्क जरूर आहेत पण ते मिळवायचे म्हणजे संघर्ष आला. ते मिळवायचे म्हणजे शेवटचं तोडण्याचं टोक आलं. यात सहज हिस्सा असा कुठं आहे?
बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यातल्या त्यात घरावर तिचंही नाव असतं. किंवा इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी तिच्या नावावरही काही मालमत्ता असते. पण त्या मालमत्तेची माहिती, कागदपत्रे इत्यादीचीही किती गृहीणींना माहिती असते आणि त्याचा उपभोग त्या नेमका किती घेतात हा प्रश्नच आहे.
अनेकदा श्रीमंत घर पाहून मुलींची लग्नं केली जातात. पण ते सासरचं घर तिचं तर सोडाच, तिच्या नवऱ्याच्या नावावरही नसतं. ते असतं सासऱ्याच्या, चुलत सासऱ्याच्या, किंवा आजेसासऱ्यांच्या नावावर. आणि अशी कुटुंबे भारतात आजही बहुसंख्येने आहेत. तिथे तर ती अगदीच परावलंबी जीव असते.
काल पोस्ट केलेली कविता होती.. 'घर'
या कवितेत प्रामुख्याने रोख होता तो अशा स्त्रियांवर. स्त्रियांना पुरुषांपेक्षा घर अधिक प्रिय असतं. घराची स्वप्नं पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक मोहवत असतात. घर हे केवळ तिचं स्वप्नं नसतं. तिची सुरक्षितता असते. तिचं स्थैर्य असतं. असं असूनही स्त्रीला स्वतःचं, स्वतःच्या पैशांचं, स्वतःच्या नावावरचं घर असावं असं का वाटत नसेल? वयात आलेल्या प्रत्येक लग्नाळू मुलाच्या घराचा विचार केला जातो. एकतर त्याला त्याचे पालक घर घेण्यास मदत करतात, शक्य असेल, तर त्याला त्याच्या नावाचं स्वतंत्र घर करून देतात. नसेल, तर त्याला त्याच्या कमाईतून, कर्ज काढूनही एक घर घेण्यास अतीआग्रह केला जातो. आणि त्याचं आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मुलीच्या बाबतीत आजही हे होत नाही. आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित असावं, तिच्या नावाचं स्वतंत्र घर असावं, तिने ते आपल्या कमाईतून घेण्याचा प्रयत्न करावा असं क्वचितच कुणा पालकांना वाटताना दिसलंय.
तिच्या लग्नाचा विचार तिच्या लहानपणापासून केला जातो. त्यासाठी पैसे बाजूला काढले जातात. अगदी लाखो रुपये. लग्नाच्या एका दिवसात उडवले जातात. गरीबातला गरीब माणूस पण जास्तीतजास्त पैसे मुलींच्या लग्नावर खर्च करायला तयार असतात. ऋण काढूनही. पण त्याऐवजी त्याच पैशातून तिचं पूर्ण भवितव्य सुरक्षित होईल अशा विचाराने तिच्या नावाने छोटंसंही घर घेतलं जात नाही. अपवाद असतील. आणि यात कुणालाही काही खटकत नाही याचं वाईट अधिक वाटतं.
माझ्या या संग्रहात तीनचार कविता या विषयावरच्या आहेत. दुसरी 'गृहीणी' या नावाची जी कविता आहे त्याचा अनुभव मी स्वतः अनेकदा घेतला. गृहीणीला तिच्या नावावर तिच्या नवऱ्याने, किंवा कर्त्या पुरुषाने घर घेऊन दिलं तरच ते होऊ शकतं. अन्यथा तिला तिच्या नावावर घरासाठी कर्ज मिळत नाही. तिला कोणत्याच कारणासाठी कर्ज मिळत नाही. इथंच स्त्रीचे गृहीणी या नात्याने असलेले पद पोकळ ठरते. तिच्या कष्टाला मोल नाही हे तेव्हा कळते. ती परावलंबी आहे हे तेव्हा कळते.
परवाचीच गोष्ट आहे. एके ठिकाणी एक छोटंसं घर बुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. अगदी विचार केला तर बहुसंख्य कुटुंबांमध्ये हक्काचं घर विकत घेण्यासाठी धडपड त्या कुटुंबातील स्त्रियाच अधिक करतात. त्यासाठी काटकसर करतात, प्लॅनिंग करतात. घरातल्या पुरुषाचा पिच्छा पुरवतात. पण आर्थिक नाड्या तिच्या हातात नसतात. कर्ज इत्यादी घरातील कमवत्या व्यक्तीच्या नावावरच मिळणार असतं.
मी देखील हक्काचं घर व्हावं म्हणून नवऱ्यापेक्षा अधिक प्रयत्न केले नेहमी. म्हणून हे स्थैर्य कुटुंबाला मिळाले. पैसे जरी नवऱ्याने दिले तरी सारे आयोजन माझेच अधिक होते. धडपड माझीच राहीली. त्यासाठी त्याचं मन वळवणं हे माझंच (अतिशय मानसिक संघर्ष) होतं. आणि घर तर त्याच्याच नावावर झालं. पण मी त्याला नेहमी बोलते, की घर हे केवळ पैशानी होत नाही. हे घर उभं करण्यात माझा वाटा अधिक आहे. पण हे बोलणं व्यावहारिक दृष्ट्या निरर्थक आहे. हे मलाही माहीत आहे.
त्याप्रमाणेच आताही झालं. एके ठिकाणी सेकंड होम म्हणून घर घेण्याच्या इच्छेने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मुलाला कर्ज घ्यायला सांगितले आहे. पण त्यात पैसे माझा नवराही टाकणार आहे. साहजिकच आता हे घर माझ्या नावावर असावं असं मला वाटतंय. त्यासाठी फार पूर्वी नवऱ्याने माझ्या नावावर (तेही नाईलाजाने.. कारण काही कारणाने कागदोपत्री त्याला तो प्लॉट त्याच्या नावावर घेणं शक्य नव्हतं म्हणून.) एक छोटा प्लॉट घेऊन ठेवला होता. तो विकून त्याचे पैसेही मी या फ्लॅटमध्ये गुंतवायचे ठरवले. पण आता गोची अशी झाली आहे, की जी व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा घर घेईल तिला पंतप्रधान योजनेतून दोन लाख साठ हजार रुपये मदत मिळते. आता योजनेत अशी तरतूद आहे की त्यासाठी ते घर त्या व्यक्तीच्या नावावर असावं किंवा त्याच्याबरोबर त्याच्या बायकोचं चालेल. मात्र आईचं चालणार नाही. कारण आईच्या नवऱ्याचं जे घर आहे तेच तिचंही पहिलं घर आहे. त्यावर तिचं नाव असो की नसो. जर माझं नाव त्या घरावर लावलं तर माझ्या मुलाला ते अडीच लाख रुपये मदत मिळणार नाहीत. अडीच लाखाची रक्कम आमच्या सारख्या मध्यमवर्गीय, ईमानदारीने पगार एके पगारावर आयुष्य काढलेल्या, लाचलुचपतीने पैसा न कमवलेल्या कुटुंबाला मोठीच वाटत आहे. त्यावर पाणी सोडायला मन होत नाही. मात्र तसे केले तर घर हे फक्त मुलाच्या नावाने होणार. माझ्या नाही.
म्हणजे मला सरकार कर्जही देणार नाही. मदतही देणार नाही. मुल्य कुणाला आहे? तर रोख कमावणाऱ्या व्यक्तीला फक्त. गृहीणी आयुष्यभर झिजत असेल, समाज उभारण्यात, पर्यायाने देश उभारणीसाठी स्थिर कुटुंब देण्यात ती कितीही मोलाचे काम करत असेल, तरी तिची आर्थिक किंमत शून्य आहे. हीच खंत माझ्या या 'गृहीणी' या कवितेत उतरलेली आहे.
साहजिकच माझ्या पिढीतल्या स्त्रियांनी केली ती चूक पुढील पिढीतल्या मुलींनी करू नये. स्वतःचं हक्काचं घर करावं. नोकरी व्यवसाय करावा. फक्त नवऱ्याच्या घराची स्वप्नं आपण पाहू नये. नवरा लाखांनी कमवत असेल, तरी तुम्ही फक्त गृहीणी म्हणून न राहता चार पैसे हक्काचे मिळवायचा प्रयत्न करावा. आळशी कोकीळेप्रमाणे नवऱ्याच्या घरात अंडी घालून नवऱ्याच्या पैशावर मजा करण्याचे स्वप्नं पाहू नये. कारण ही मजा अधांतरी आहे. परावलंबी आहे. यात स्वाभिमानही नाही. कारण नवरा आणि सासर कितीही श्रीमंत आणि चांगलं असेल, तरी जोवर तुम्ही तिथं त्यांच्या मर्जीने नांदताय तोवरच ते तुमचं असणार आहे. ज्या क्षणी संघर्ष होईल त्या क्षणी तुम्ही कफल्लकच असणार आहात
गृहीणी -
अलका गांधी-असेरकर






