मासिक पाळीचा असाही अनुभव
आज काहीतरी मासिक पाळी स्वच्छता दिन वगैरे आहे म्हणतात. बऱ्याच पोस्ट त्यावर दिसल्या.
त्याचप्रमाणे काल एका मीम ग्रुपवर देखील मासिक पाळी हा विषय देऊन मीम्स बनवायला सांगितले होते. खूप लोकांनी तिथे चांगले मिम्स बनवून टाकले होते. मीही चार पाच बनवून टाकले.
मीम वगैरे बनवणे हे जरा कौशल्याचे, सर्जनशील आणि तांत्रिक माहितीचेच काम असते नाही म्हटले तरी. त्यामुळे चांगला मिम बनवता आला की त्याचाही आनंद होतो. अर्थात मिम ग्रुपवर सारा यंग क्राऊडच अधिक असतो नि त्यांचा या बाबतीत हातखंडा असतो.
तर दोन दिवस हा विषय असा सतत इथं चर्चिला जात असताना मला माझ्या आयुष्यातली एक मासिक पाळीच्या संदर्भातली एक गोष्ट आठवते जी आता शेअर कराविशी वाटतेय.
कदाचित एक अनुभव म्हणून त्याचा अनेकींना सावध राहण्यासाठी उपयोगही होईल म्हणूनही हा अनुभव लिहिण्याचा प्रपंच..
तर माझं लग्नं झालं त्या वर्षीची ही घटना. माझं लग्न झालं मे मध्ये. लग्न झाल्यानंतरही मी माझ्या नोकरीमुळे जवळपास दोन वर्षे माझ्या आईकडेच राहत होते नि नवरा डोंबिवलीला. आठ पंधरा दिवसांनी कधी मी डोंबिवलीला येत असे, तर कधी तो माझ्या आईच्या गावी येत असे. असे चालले होते.
लग्न झालं नि तिसऱ्याच महिन्यात माझी पाळी चुकली. पाळीची तारीख उलटून सात-आठ दिवस झाले तरी पाळी येत नाही म्हटल्यावर माझ्या आईनेही सांगितले, की बहुधा तुला दिवस गेले असावेत. अजून आठच दिवस वर झाले असल्याने तशी काही खात्री नव्हती आणि तेव्हा असं तातडीने डॉक्टरकडे जाण्याची पद्धतही नव्हती. आईपण म्हणाली वाट बघ थोडी अजून, मग डॉक्टरकडे जाऊ.
अजून दोनेक दिवस गेले आणि पाळी सुरू झाली. जेमतेम आठच दिवस वर झाले होते. त्यामुळे आईला पण वाटले की पाळीच आहे. आणि मलाही तसंच वाटलं. रेग्युलर पाळीप्रमाणेच सारं सुरु होतं. मात्र थोडं पोटात अधिक दुखत होतं. कळ मारल्यासारखं आणि ब्लिडींग नेहमीपेक्षा थोडं अधिक होत होतं इतकंच. आठ दिवस उशीराने पाळी आली म्हणून ब्लिडींग जास्त होत असावं असा समज होता. मी जॉबला जात होते.
असे दोन दिवस गेल्यावर शुक्रवार आला. कसलीतरी सुट्टी होती.. यावेळी माझा नवरा येणार नव्हता. मग आईला म्हटले शुक्रवार धरून तीन दिवस मिळतायत सुट्टीचे. तर मी जाते डोंबिवलीला. आई पण बरं म्हणाली.
पण त्या दिवशी ब्लिडींग जास्तच होत होतं. तिसरा की चौथा दिवस होता. अनुक्रमे कमी कमी होत जाणारं ब्लिडींग जास्त जास्त होत होतं. पण तो काळ असा होता, की आईशीही या विषयावर इतकं मोकळेपणी बोललं जात नव्हतं. शिवाय मला तसं काही वाटलंही नव्हतं. आता आठवतही नाही, की आईला हे मी सांगितलं होतं की नाही ते.
दुसऱ्या दिवशी सकाळची एसटी बस पकडून डोंबिवलीला जायची तयारी करून मी झोपले. जूलै की ऑगस्ट महिना होता काहीतरी. पावसाचे दिवस. कोकणातला भरपूर पाऊस आणि पहाटे साधारण चार वाजता मला शू लागल्यासारखे वाटले म्हणून उठले आणि बाथरूममध्ये गेले. तिथे बसताच एकदम पिशवीभरून काहीतरी गपकन पडल्यासारखे पडले. अगदी ढीगच झाला. रक्ताचा. एकदम घट्ट रक्ताचा.
ते पाहून मी घाबरले. मी पाहिलेही फक्त एक नजर. जास्त पाहिलेही नाही त्या गोष्टीकडे. आणि रक्ताची धार लागलेली. तशीच आईच्या खोलीत जाऊन तिला उठवलं. मी खूप घाबरले होते आणि आईला म्हटलं आई तिकडे बाथरूममध्ये बघ. काहीतरी पडलंय.
आईने जाऊन पाहिले. ती अनुभवी बाई. आम्ही तीन भावंडे आणि त्याशिवाय अजून न जगलेली, मिस कॅरेज झालेली अशा कितीतरी वेळा अनुभवलेली स्त्री.
तिने ते पाहूनच लगेच म्हटलं. ' याचा अर्थ तुला दिवसच राहिले होते. ते पडून गेलंय.' क्षणभर वाईट वाटलं. पण इकडे पोटातून कळा येत होत्या नि ब्लिडींग इतकं होत होतं की मोठाले परकर फाडून पॅडसारखे घेऊनही ते पंधरा वीस मिनिटात भिजून जात होते. नॉर्मल पॅड वगैरे म्हणजे त्यासमोर किस झाड की पत्ती होते.
एकीकडे भीतीही वाटत होती. पण दोनेक तास तसेच काढून सहा वाजता चांगलं उजाडल्यावर हॉस्पिटल गाठलं. नि तिथे सोनोग्राफी वगैरे केल्यावर कळलं की गर्भ पडून गेलेला आहे.
तरीही पोटात खूपच दुखत असल्याने क्युरेटींग करावं लागणार होतं. ते सगळं निस्तरण्यात नंतर बरेच दिवस गेले. महिनाभर ऑफिसमधून सु्ट्टी काढली. सगळं व्यवस्थित झालं.
थोडीशी आईवरही चिडले, की तिला कसं कळलं नाही की ही पाळी नाही, काही वेगळं आहे म्हणून... तेव्हा ती बिचारी शांतपणे बोलली, 'या गोष्टी सगळ्या बेभरोशी असतात गं. कुणीच याबद्दल काही ठाम सांगू शकत नाही. अगदी डॉक्टरला दाखवून नक्की निदान कळलं असतं, तरी व्हायचं ते झालंच असतं.'
प्रश्न मूल गमावण्याचा फार वाटत नव्हता मला तेव्हा... एका भीतीने अंगाचा थरकाप होत होता. की दैव बलवत्तर म्हणून त्या रात्री पहाटेच ते सगळं मी घरी असतानाच झालं. जर मी सकाळी उठून डोंबिवलीला यायला एसटीत बसले असते, नि वाटेत कुठे ते घडलं असतं तर माझं काय झालं असतं? मी काय केलं असतं? गावाहून डोंबिवलीला घरी येईपर्यंत कमीत कमी पाचेक तास लागत होते.
ते आठवलं की अजूनही मला अंगावर काटा येतो.
अर्थात मी तशी खमकी होते तेव्हाही. जिथे ते सुरू झालं असतं तिथेच एखाद्या स्टॉपला उतरून गेले असते नि तिथला दवाखाना गाठला असताच. पण ते सगळं ब्लिडींग, तो गर्भ पडलेला... त्या सगळ्याचं काय? समजा एसटीतच ते झालं असतं तर मग?
अवघ्या आठ दिवसाचा खेळ होता सारा. केवळ आठ दिवसात एवढं ध्यानी मनी नसलेलं नाट्य घडून गेलं होतं..
खरंच बाईच्या बाबतीत हे सगळं अगदी बेभरोशी आणि अकल्पित असतं. कितीही काळजी घेतली तरी या गोष्टी कधी आणि कशा घडतील ते सांगता येत नाही. पाळी हा प्रकारच बेभरोशी आहे.
खरंतर मागच्या आठवड्यात ती एक बाई लॉकडाऊनमुळे गावी चालत जायला निघाली असताना रस्त्यातच बाळंत झाली, ती बातमी ऐकली तेव्हापासूनच ही घटना पुन्हा इतक्या वर्षांनी सारखी आठवत होती. लिहाविशी वाटत होती. पण नाही लिहिली. मात्र दोन दिवसांपासून पाळीचा विषय इथं सोशल मिडियावर चर्चिला जात असल्याने वाटलं, लिहायलाच हवं.. इतर कुणाला यातून सावध राहता येईल.
-अलका गांधी-असेरकर.
No comments:
Post a Comment