दर पावसाळ्यात दरडी कोसळून डोंगरकुशीतली गावं धराशायी होण्याच्या बातम्या येत असतात.
मग छोट्या टेकड्या, छोटे डोंगर यांच्या उतारावर का रहात असतील लोक?
दरड कोसळण्याच्या शक्यता असून?
त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी प्रत्येकवेळी सरकारची असते का?
लोकसंख्या जबाबदार असते का? गरीबी जबाबदार असते का?
माझे गाव कोकणातील एक लहानसे गाव. चारी बाजूने डोंगर आणि मध्ये असलेल्या सपाटीवर शे-सव्वाशे घरांचे गाव. पक्क्या घरांचे. गरीब-श्रीमंत सगळ्यांची घरे जवळपास पक्की. पारंपरिक.
कोकणातील इतर गावांप्रमाणेच जातीनिहाय विभाग. ही गवळआळी, ही जंगमआळी, हा कुंभारवाडा, हा महारवाडा, हा मुस्लिम मोहल्ला. असं पारंपरिक गाव.
माझ्या लहानपणापासून, किंवा त्याही आधीपासून गावात मुस्लिम लोकवस्ती थोडी अधिक होती. यातले मुस्लिम सगळे बोटीवर, गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीला. भरपूर पैसा कमवणारे, सधन. हिंदू पारंपरिक व्यवसाय-शेती इत्यादी करत गावातच राहणारे. प्रमाणात हाता तोंडाची जेमतेम गाठ. शिक्षणाचे प्रमाण दोन्ही समाजात कमीच होते. दोन्ही समाजासाठी गावात सातवीपर्यंतच्याच शाळा होत्या. त्यांची उर्दू, यांची मराठी.
मुस्लिम वस्ती वाढत गेली आणि त्यांचा पैसाही. त्यांच्या वाढत्या वस्तीला जागा, घरं गावात कमी पडू लागली आणि त्यांनी हिंदूंना रग्गड पैशांची ऑफर देत त्यांची घरं खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यात जबरदस्ती अजिबात नव्हती. पण आर्थिक ताकद काम करत होती.
लाखालाखाच्या किंमतीत आपली घरं जातायत हे पाहून गरजू हिंदूंनी आपली घरं त्यांच्या हवाली केली. मिळालेले पैसे कनवटीला लावले आणि गावाजवळच्या डोंगराची वाट धरली. डोंगरावरची जमीन माळरान. सरकारी मालकीचे. तिथं त्या जागेवर अनधिकृत अतिक्रमण करत त्यांनी तिथे पुन्हा कच्ची पक्की घरं बांधली. आणि गाव सोडून जवळपास ऐंशी टक्के हिंदू डोंगरपठारावर राह्यला निघून गेले.
आता हा डोंगर कधी घसरला, दरड बिरड कोसळली तर दोष कुणाचा? किती? कसा? हा प्रश्न उभा राहतो.
एकाच गावात हे हिंदूच गरीब का राहिले? मुसलमानांप्रमाणे ते गल्फला का गेले नाहीत? कारण एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला हाताला धरून तिथे नोकरी मिळवून देत होता. तसा तो हिंदू माणसाला नेत नव्हता. हे एक. नेलं असतं तरी हे हिंदू किती गेले असते आणि तिथल्या कष्टाच्या नोकऱ्या त्यांना किती झेपल्या असत्या हे दुसरं. इथं कौशल्य, गट्स, परदेशात टिकून राहण्याची, पडेल ते काम करण्याची क्षमता हे सर्व जर एका समाजाचे वैशिष्ट्य असेल, आणि दुसऱ्या समाजात नसेल, तर समता आणि समानता यांची अपेक्षा कशी धरायची?
जेही असो.
यात सरकाचा दोष किती? सरकारने त्यांना मदत करायला हवी का? का? कशी?
प्रत्येक ठिकाणी डोंगराच्या कुशीत अशा वस्त्या दिसतात. त्यांचीही कारणं अशीच काहीबाही असतील ना?
एकाच परीसरात राहून एक समाज प्रगती करतो. तर दुसरा अधोगती. गावातले स्थान, आपली पक्की घरं, पारंपरिक विरासत सोडून सगळे हिंदू डोंगराकडे परागंदा झाले त्याचं वाईटही वाटतं. रागही येतो आणि ज्याची जशी लायकी तसे त्याचे स्थान असेही वाटते.
वास्तविक आणि मार्मिक..छान..
ReplyDelete