Nov 7, 2021

भवताल -

 धार्मिक मंदपणा आणि पिडीत जनता -

विजेच्या काळात वाऱ्यावर लगेच विझणाऱ्या तेलाच्या पणत्या लावून तेल वाया घालवणे आणि दगडी मूर्तीवर दूधाचे अभिषेक करून दूध वाया घालवणे हे धार्मिक मतीमंदत्वाचे लक्षण आहे.
असे सावरकर म्हणून गेले. पण सावरकरांच्या भक्तांनाच ते पटत नसावे. 
नेते सोयीने वापरायचे असतात.

मग सणासुदीला तरी तेलाचे दिवे लावावे म्हणणाऱ्यांनी सणासुदीला तरी गॅस आणि लायटर्सचा वापर न करता दगडावर दगड घासून चकमकीने तीन दगडांची चूल पेटवून कंदमुळे शिजवून खावावीत. पाळायच्या तर सर्वच परंपरा आणि मूळापासून पाळाव्या. अशा अर्धवट कशाला?

असो.
यावरून एक गोष्ट आठवली लहानपणी ऐकलेली.


एका गावात एक सासुरवाशिण राहत होती. तीची सासू तिचा फार छळ करी. पोटभर खाऊपिऊ देत नसे. काम खूप करून घेई.
एके दिवशी सण असतो म्हणून घरात घारगे तळले जातात. मात्र सासू हिला खायला देत नाही. ही त्या घारग्यांच्या पीठातलं थोडं पीठ चोरून आपल्या पदरात लपवून ठेवते. कपडे धुवायला नदी किनारी जाताना नेहमीसारखी गावच्या वेशीवरील मारूतीच्या मंदिरात विश्रांतीला घटकाभर टेकते. 

त्या काळी मंदिरं निवांत असायची. लोक दिवसभर रांगा लावून देवाला निष्कारण त्रास देत नसत. एकदा सकाळी दिवा लावून गुरव गेला की देव निवांत निजायला मोकळा असायचा.
ही देवळात जाते. मारूतीसमोर एक मोठा दगडी दिवा पेटत असतो. तेल चांगले तापलेले असते. ही चोरून आणलेल्या पीठाचे चार वडे त्या दगडी पात्रातील तापलेल्या दिव्यात तळून खाते. 

हे पाहून मारूती राया अचंबित होतो. इतका की त्याचे बोट तोंडात जाते आणि तो चकीत होऊन तिच्याकडे वाकून पाहतो. 
हीचे मारूतीकडे लक्ष नसते. खाऊन झाल्यावर ही निघते. 
दुसऱ्या दिवशी गुरव देवळात येतो. तर त्या भव्य दगडी मारुतीचे बोट तोंडात आणि चेहरा चकीत होऊन खाली बघतोय. तो घाबरला. गावात येऊन त्याने हा चमत्कार सगळ्यांना सांगितला. लोक जमा झाले. हे असं कसं झालं. गावाचं पाप पाहून मारूतीने तोंडात बोट घातलं हे नक्की. कुणीतरी पाप्याने देवळात पाप केलं असणार. आता गावावर संकटं येणार.
 लोक मारूतीची माफी मागतात. पण त्याचं बोट तसंच. नि चेहरा चकीतच!
शेवटी गाववाले बैठक घेतात. ठरवतात की उद्या सकाळी बऱ्या बोलाने ज्याने पाप केलं असेल त्याने मारूतीसमोर जाऊन माफी मागावी. नाहीतर प्रत्येकाने एकेकटं जाऊन माफी मागावी. 
ही सासुरवाशिण घाबरते. पाप तर आपणच केलंय. आता लोकांना आणि मुख्य म्हणजे सासूला कळणार. ती अर्ध्या रात्री उठून लपत छपत देवळात जाते. मारुतीचा सोटा पडलेला असतो त्याच्या पायाशी. तो उचलते आणि मारूतीवर उगारून म्हणते, "मेल्या, मला माझी सासू खायला देत नाही, म्हणून मी दोन वडे तुझ्या तेलात तळून खाल्ले, तर त्यात तुला इतकं आश्चर्य वाटायला काय झालं? बऱ्या बोलाने बोट खाली घेतोस की हाणू हा सोटा तुझ्या डोक्यात?"
तिचे ते बोल ऐकून मारूती दचकतो, घाबरतो आणि पटकन आपले बोट तोंडातून काढून साळसूदासारखा वर पाहू लागतो. 
दुसऱ्या दिवशी लोक पुन्हा देवळात गोळा होतात. तर मारूती आपला निरागस. नेहमीसारखा. लोक हुश्श करतात. चला गावावरची अलाबला टळली.

थोडक्यात काय, अत्याचाराने पिडीत स्त्री मारूतीला सिधा करू शकते, तर महिलांनो आपण काय करू शकत नाही? सोचो... सोचो....

असो
विषय तेल वाया घालवायचा होता. पण कधी कधी मंद लोकांमुळे पिडीत लोकांचा फायदाही होतो. त्यामुळे मंद लोक स्वतःवरच खुश असतात. 

3 comments:

  1. छान, चांगला 'दृष्टांत' आहे.

    ReplyDelete
  2. Hi gosht majha aajji ne majha lahanpani mala sangitali hoti.. Mala ajun athavtey 😄

    ReplyDelete

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...