Apr 4, 2025

गणित आणि मी.

नववी-दहावीचं वर्ष

दहावी बारावीचे रिझल्ट लागले की, ऐंशी टक्के न नव्वद टक्के शिवाय बोलतच नाही कुणी....गेला बाजार सत्तर टक्केच्या खाली सहसा नसतातच कोणी की काय असं वाटावं, असा माहौल दिसतो सगळीकडे. तेव्हा साहजिकच एकदा तरी स्वतःच्या दहावी बारावीचं वर्ष आठवतंच, नाही म्हटलं तरी.

 छोट्याशा तालुक्याच्या गावी आठवी ते दहावी शिक्षण झालं. त्याआधीचं त्याहुनही लहानशा खेड्यात.  त्यामुळे ते तालुक्याचं गावही शहर वाटायचं तेव्हा. न तिथल्या शाळेतली मुलं चकचकीत..!!... असे दिवस होते ते. 

आमच्या खेड्यावर तर पायात पायताणही नसायची कोणा विदयार्थ्याच्या. तालुक्याला पाहिलं, इथं तर प्रत्येकाच्या पायात चप्पल दिसते. मग आधी एक चप्पल विकत घेतली. पण सवय नसल्याने कुठंही काढून ठेवली, की तिथंच विसरायला व्हायची. सुदैवाने तेव्हा चप्पल चोर फारसे बोकाळले नव्हते. 

इंग्रजीचा गंध नाही सातवीपर्यंत. मग आठवीत आमच्यासारखे खेड्यावरून आलेले विद्यार्थी वेगळे बसवले जायचे. त्यांच्याकरिता इंग्रजीचा वेगळा कोर्स असायचा. 

ओ की ठो कळायचं नाही. 

घरी काही अभ्यासाचा, पास व्हायचा तगादा नसायचा. त्यामुळे रमत गमत अभ्यास होईल तेवढा करायचा. परंतु पालक जरी ठेवत नसले, तरी गणित आणि इंग्रजी हे दोन शत्रू सतत धाकात ठेवत. अशावेळी माझ्याचसारखे गरीब बिचारे असलेले, मराठी, इतिहास, हिंदीसारखे विषय मला टेकू देत. आधार देत. पास व्हायला मदत करत. 

मग नववी उजाडली. आणि बीजगणित नावाचा आधुनिक शत्रू डोक्यावर येऊन थयथयाट करू लागला. इथं दोन अधिक दोनची मारामार होती तिथं,  ए वर्ग अधिक बी अधिक सी चा घनं वगैरे घनघोर लढाईच सुरु केली शत्रूने एकदम. दाणादाण उडाली. पळता भुई झाली. 

नववीचा वर्ग जून मध्यावर सुरू झालेला. ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यात पहिली चाचणी. सगळे गरीब बिचारे विषय आले आणि मुकाट गेले. पण गणिताचा पेपर अशा काही शस्त्रानिशी आला होता, की त्याच्याशी दोन तर जाऊ दे, एक हातही करता आला नव्हता. मला एक बोटही लावू दिलं नाही त्याने आपल्या अंगाला कुठंही. आला तसा कोरा करकरीत गेला. पण मला घायाळ करूनच.

साधारण आठेक दिवसांनी चाचणी परिक्षेचे पेपर तपासून मिळायचे. त्यात सारे हुशार (आगाऊ) विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रोज सरांना, "सर सर ...पेपर नाही आणले का....कधी देणार?"... वगैरे विचारून आमचं टेन्शन अजून वाढवायचे. 'मरो ते पेपर...नाही दिले तर काय आकाश कोसळणार आहे का'....असं वाटत राहायचं. आणि सरही असे वस्ताद असायचे काही काही, की मुकाट ज्याच्या त्याच्या हातात पेपर देण्याऐवजी, त्याच्या मार्कांचा पुकारा करून, बोलवून द्यायचे. बरं आवाजही एकेकाचा असा दणदणीत लेकाचा, की त्याकाळी माईक वगैरे नसूनही अख्ख्या शाळेला ऐकायला जातील मार्क ....

तर असं गणिताचा पेपर कोरा गेल्यावर आठ दिवस उलटले, न आज पेपर मिळणार हे कळले होते. जीवाची नुसती उलघाल सुरू होती...(तेवढी तर नंतर इतक्या वेळा प्रेमात पडतानाही नाही झाली साली कधी..!!)...

त्यातल्या त्यात एकच जमेची आणि आनंदाची गोष्ट अशी होती, की माझ्या जोडीला अजून अशीच एक दुस-या खेड्यावरून आलेली मुलगी होती माझ्यासारखीच. (माझ्यासारखीच म्हणजे... माझ्यासारखीच देखणी,.. :P  माझ्यासारखीच गुजराती, माझ्यासारखीच मामाकडे राहून शिकणारी आणि माझ्यासारखाच गणित कोरा पाठवलेली...!!) हिंदीचा तास संपला. न आता गणिताचा सुरू होणार, त्याआधी आम्ही दोघी हळूच वर्गाबाहेर सटकलो.  आणि शाळेसमोर वाहतुकीचा, पण सुनसान रस्ता होता भरदुपारी, तिथं येऊन एका चिंचेच्या थोरल्या झाडाखाली उभ्या राहिलो. 
जाऊन जाणार कुठे...!! ते काही कॉलेज नव्हतं, कॅम्पस वगैरे भरलेलं. सारा आसमंत चिडीचूप होता. फक्त समोर शाळेतून सरांचे शिकवण्याचे आवाज थोडे येत होते. 

दिवस इतका वाईट होता, काय सांगू...!! भर ऑगष्टचा पहिला आठवडा...कोकणातला पावसाळा... अचानक धो धो पाऊस जो सुरू झाला...!! माझ्या जोडीदारणीने वर्गातून निघताना नशीब छत्री घेतली होती हातात. एका छत्रीत आम्ही दोघी त्या झाडाखाली पंचेचाळीस मिनिटे पाऊस झेलत उभ्या राहीलो. 
ती पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस युगासारखी घालवली आम्ही. 

आणि शाळेच्या तासाचा टोल वाजला. हुश्श..
लांबून कानोसा घेतला. सर वर्गाबाहेर पडल्याचा. न चुपके से वर्गात शिरलो. साळसूदासारख्या. तर काय...!!...
बेंचेस बडवून की हो सा-या वर्गाने आमचं स्वागत केलं..!!. आम्ही मुकाट माना खाली घालून आपापल्या जागी जाऊन बसलो. कारण आम्ही समजून गेलो त्या स्वागतावरूनच, की जरी आम्ही वर्गात नव्हतो, तरी आमचे भोपळे सरांनी भर वर्गात फोडले होते. 

का असं करत असतील सर ? :P  ...

( का असं करतात ते आज कळतंय म्हणा...वर्गात शिकवताना... :P ...)
मागच्या वर्षीच एक माझा विद्यार्थी, कॉलेज सुरू झाल्यावर माझ्या जवळ आला. आणि मला म्हणाला, "मॅडम मी नापास होऊन पुन्हा या वर्गात आहे, हे बोलू नका प्लीज कोणासमोर वर्गात"..... 
घ्या... इथं तर माझ्या लक्षातही नव्हतं, की हा विद्यार्थी गेल्या वर्षीचाच आहे. कारण तो सठीसमासी कधीतरी उगवायचा न मावळायचा.  मी त्याला विचारलं, "तू गेल्या वर्षी माझ्या वर्गात होतास"..???....तसा तो एकदम कूल झाला..! 
"नाही लक्षात का मॅम..??.जाऊ द्या ..मग राहू द्या". म्हणत तो एकदम सुटकेचा श्वास सोडून निघून गेला...!!)

तर असं नववीचा पावसाळा हा असा बरसून गेला...डोक्यावरून, डोळ्यातून आणि गणिताच्या पेपरावरून...त्यामुळे तो कायमचा लक्षात राहीला. 

आणि असे हे गणित, इंग्रजी वगैरे घातकी शत्रू त्या त्या वेळी घात करून गेले. तरी आम्ही झाशीच्या राणीसारख्या लढलोच. आज मी महाविद्यालयात एक पेपर का होईना शिकवतेय.. त्या शत्रूंच्या नाकावर टिच्चून. आणि ती माझी देखणी (माझ्याहून जरा जास्तच) जोडीदार, बारावीलाच ह्या शत्रूंसमोर नांगी टाकून गावातल्या धनाढ्य आणि तालेवार माणसाची सून होऊन चांगली गाडीतून फिरू लागली..... तेही या शत्रूंच्या नाकावर टिच्चूनच............!!!

 

(दहावीच्या आणि बारावीच्या वर्षांची कहाणी पुन्हा केव्हातरी.........)

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...