Jan 22, 2023

धुणं -

 शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच तिच्या मनावरचा ताण कमी व्हायला सुरूवात व्हायची. केवळ शुक्रवारच्या इंतजारमध्ये. आणि शनीवारपासून पुन्हा पुढच्या शुक्रवारकडे तिचे डोळे लागून राहायचे. 

शरीफा मजिदची पहिली बायको. दोन मुली झाल्यावर मजिदने गावातल्याच एका मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरे लग्न केले होते. त्या गावात, आणि त्यांच्या धर्मात हे नवलाचे नव्हते. त्यातही एक लग्न घरच्यांच्या मर्जीने तर दुसरं आपल्या मर्जीने असं करणारेही पुरुष होते. तरी देखील अशा प्रकारे दोन लग्न करणारे पुरुष संख्येने कमीच असत. ज्यांची घरं मोठी आहेत, बऱ्यापैकी पैसा आहे आणि मुळात तशी  रंगीन वृत्ती आहे असेच वीर पुरुष विनाकारण दोन लग्ने करत. बाकीचे मात्र मुलगा नसेल, पहिली बायको मेली असेल, किंवा तिला सोडून दिलं असेल कुठल्या कारणाने तरच दुसरं लग्न करत. 
त्यामुळे मजिदने दुसरं लग्न केलं म्हणून शरीफाच्या आयुष्यात काही फार फरक पडला होता असं नाही. मजिद आणि त्याचा भाऊ नासिर हे दोघे आपल्या मोठ्या बहिणीच्या भल्या थोरल्या घरात लहानाचे मोठे झाले, तिथेच आई आणि ते राहिले. बहिणीचा नवरा अपघातात वारला होता, पण मागे बराच पैसा, नुकताच बांधलेला नवीन बंगला आणि बहिणीच्या पदरी पाच मुलं सोडून गेला होता. त्यांची बहीण अमीना हिने देखील सासरच्या माणसांना दूर ठेवून आपला माहेरचा हा सगळा गोतावळा आपल्याजवळ आणून ठेवला. घरात पुरुष माणूस असावा म्हणून हे दोन्ही भाऊ जवळ असलेले बरे होते.  दाम करी काम या न्यायाने भाऊ, आई, दोन्ही भावांच्या दोन दोन मिळून चार बायका या सगळ्या अमिनाच्या शब्दाबाहेर नसायच्या. तशी हिंमत नव्हती. कारण सगळा ऐशोआराम विनासायास तिथे मिळत होता. 

मनात आलं तर दोघे भाऊ आळीपाळीने बोटीवर किंवा गल्फमध्ये नोकरीसाठी अधनमधनं एक दोन वर्ष चक्कर मारून येत. थोडा पैसा कमावून आणत. दोघांनी दोन दोन बायका केल्या तरी अमिनाने त्याना हरकत घेतली नव्हती. कारण एक बाई घरात जास्तीची येणं म्हणजे एवढ्या मोठ्या खटल्यात कामाला बिनपगारी माणूस मिळणं असंच होतं..

दोन भावांच्या चार बायकांपैकी तिघींना कामं वाटून दिलेली होती. एक सदैव चौवीस तास पेटत्या चुलीचे सैपाकघर सांभाळत होती. एक दिवसभर गावाबाहेरच्या विहीरीवरून पाणी भरत होती. तर एक अमिनाची पाच आणि या तिघींची मिळून सातआठ अशी बारा पंधरा पोरं सांभाळत होती. दिवसभर खाटेवर बसून गावभराचं गॉसिप्स करत बसलेल्या अमिनाच्या हातात चहाचे पेले, जेवणाची ताटं आणून देत होती. अमिनाची आई या तिघींवर सुपरवायझरचं काम करत होती. तिला सगळे दादी म्हणत. 
थोडक्यात दादीलाही काम होतं. त्या घरात काम नव्हतं ते फक्त अमिनाला आणि तिच्या मुलांंना. 

यात चौथी जी होती ते प्रकरण हुश्शार होतं. ते म्हणजे मजिदच्या दुसऱ्या बायकोचं. मजिदने तिच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरं लग्न केलं खरं, पण ती लग्न करूनही सासरी येऊन राहिली नाही. माहेरीच राहिली. तिचं माहेरही सधन होतं. जोपर्यंत मजिद स्वतःचं घर करून स्वतंत्रपणे राहत नाही तोपर्यंत सासरी येणार नाही असा प्रेमळ धाक तिने घालून ठेवला होता. कारण सासरी जाणं म्हणजे कामाला नोकर म्हणूनच जाणं, त्या तिघींच्या जोडीला. हे तिला पक्कं ठाऊक होतं. ती माहेरी लाडकी होती. माहेरच्यांनी तिला लग्नानंतरही प्रेमाने आपल्याजवळच ठेवून घेतलं  होतं. ती फक्त सणावारी, प्रसंगपरत्वे अमिनाबायच्या बंगल्यात आपली पायधूळ झाडायला येई. तरी तिचं अमिनाबायसह सगळ्यांना कौतुक होतं. तिचं कपाळ भव्य होतं. आणि भव्य कपाळाच्या बाया फार नशीबाच्या, कुटुंबाचं कल्याण करणाऱ्या असतात असं अमिनाबायची मोठी मुलगी मुमताज माझ्याशी बोलताना म्हणायची. मुमताज माझ्या वयाची माझी मैत्रीण होती.  
मुळात तिचं सासरी न येणं चालवून घेतलं जात होतं कारण ती घरची सधन होती. सासरच्यांवर अवलंबून नव्हती. बाकीच्या तिघी मध्यम घरातल्या होत्या. त्यातील एक तर माहेरच्यांचा विरोध पत्करून पळून नासिरबरोबर दुसरी बायको म्हणून लग्न करून आली होती. तिला आता पुन्हा माहेरी स्थान नव्हतं. तिच्याच माथी दिवसभर लागणारं पाणी विहिरीवरून वाहून आणण्याचे काम मारण्यात आले होते. 
दिवसभर ती आमच्या घरासमोरून पाण्याच्या खेपा मारताना दिसे आणि माझी आई म्हणे, "बघा.. प्रेमलग्न केल्याचे  परीणाम. पाण्याचे हंडे वाहून वाहून बिचारीचं टाळकंही झिजलं." खरंतर तीही घरची बरीच होती. पण मुलगी आपल्या मर्जीविरोधात लग्न करते म्हणजे काय? जातीत आणि स्वधर्मातही केलं म्हणून काय झालं? आपली मर्जी पोरी चालवूच कशा शकतात? आता भोग आपल्या कर्माची फळं. सासरचे लोक देखील अशा पोरींना बरोब्बर राबवून घेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. 

पण सगळ्याच मुली अशा नव्हत्या. बऱ्याचशा मुली मजिदच्या दुसऱ्या बायकोसारख्या खमक्या असायच्या. आधी तू देखील घराबाहेर पड मग मीही येते तुझ्याबरोबर पळून. आपण स्वतंत्र राहू अशी अट घालणाऱ्या मुली आणि ती स्वीकारून तसे राहणारे बहाद्दूर गडी देखील होतेच. नव्हते असे नाही. कारण पळून गेले, नि स्वतंत्र राहिले तरी पुरुषांना कुणी त्यासाठी कायमचं वाळीत टाकत नाही. घरचे त्यांना नंतर स्वीकारतातच.
त्यामुळे त्या गावात अमुकच अशी चाल सगळीकडे नव्हती. सहन करणाऱ्या सोशिक स्त्रिया होत्या तशाच त्यांना राबवून घेणाऱ्या नि आपल्याच मस्तीत आपल्या अटीवर टेचात राहणाऱ्या बायाही तिथं होत्याच.  विनाचकारण दोन दोन लग्नं करणारे गडी होते, तसेच अगदी रामाप्रमाणे आयुष्यभर एकपत्नी राहणारेही भरपूर होतेच. दुसरं लग्न केलं नवऱ्याने म्हणून त्याच्याशी बोलणं टाकून एकाच घरात राहून संबंध तोडणाऱ्या बायका होत्या नि प्रेमाने सवतीसोबत एकत्र राहणाऱ्याही होत्या. कुणी नवऱ्याला सोडून माहेरी जाऊन राहणाऱ्या होत्या नि त्यांना सांभाळणारी प्रेमळ माहेरंही होती. तर कुणी प्रेमलग्न केलं म्हणून मुलीला कायमची मेली म्हणून तिच्या नशीबावर सोडणारेही होते.
गावात अशी, यशस्वी झालेली, फसलेली, तुटलेली, विरोधात आत्महत्या करून मेलेली प्रेमप्रकरणं भरपूर असायची. गडी तगडे देखणे होते नि बायाही खमक्या नि देखण्या होत्या. बुरखा नावालाही नव्हता. एकेकीच्या प्रेमकहाणीवर प्रतिभावंत लेखक दीर्घकथा लिहू शकेल नि त्यावर एखादी फिल्म निघू शकेल अशा कहाण्या आमच्या गावात घडत होत्या. गावच प्रेमळ होतं. खातपितं निवांत होतं. त्यामुळे प्रेम करायला सवड होती. 

तर ते असो. 

आपण बोलत होतो शरीफाबद्दल. मजिदची पहिली बायको. जिला घरातल्या पंधरा-वीस जणांचं सैपाकघर सांभाळावं लागत होतं. दिवस सारा सैपाकघरात जायचा. एवढ्या लोकांसाठी सकाळसंध्याकाळ 'चावलच्या रोट्या' बडवायच्या, सालन शिजवायचं, सारखा चहा करत राहायचं, मासे बिसे साफ करायचे, धान्यधुन्याची निगुती करायची. यात तिला बाहेरचा तुकडाभर आभाळही बघायला फुरसत नसे. नासिरची दुसरी निदान पाण्याच्या खेपा मारायसाठी तरी दिवसभर बाहेरचं जग बघत होती. चार लोकांबरोबर वाटेत, विहिरीवर गप्पा मारायची संधी तिला मिळायची. थोडं रेंगाळायची पण. शरीफाला मात्र सतत दादीचा पहारा नि सैपाकघर यातून मान वर करायला मिळायची नाही. नवऱ्याशी बोलायचं ते रात्रीच. खोलीत गेल्यावर. शिवाय दिवसभर हे दोघे भाऊ घरातही कमीच असायचे. घरात सगळ्या बाया नि लहान मुलं यांचंच राज्य. गावातल्या बहुतेक घरांत हीच परिस्थिती होती. एखादा पुरुष. बाकी सगळ्या बाया.  बाकीचे पुरुष परदेशी.
म्हणून ती जुम्म्याची वाट बघायची. जुम्म्याला सगळ्यांच्या कंपल्सरी आंघोळी. पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं गावात. डोक्यावरून एक एक हंडा आणावा लागे. एकदोन किमीची फेरी मारून. त्यात रोज आंघोळ केलीही तरी कपडे मात्र रोज धुवायला टाकले जायचे नाही. दोन तीन दिवस एकच साडी. तेच कपडे. काम करताना त्यावर एप्रन बांधून घेतलं जायचं. त्यामुळे साड्या मळायच्या नाही. पुरुष देखील एक लुंगी चार पाच दिवस पुरवायचे. बाहेर पडताना शर्टावर जन्नत-ए-फिर्दौस शिंपडले की काम झाले. 
जुम्म्याला सगळ्या घराचे आठवडाभराचे कपडे धुवायला निघायचे. ते काम शरीफाकडेच होते. त्या दिवशी तिला सैपाकघराला सुट्टी असायची. भल्या सकाळीच कपड्यांची बोचकी घेऊन नदीवर निघायचं. उशीरा गेलं तर चांगला दगड मिळायचा नाही. नदीवर आधीच गर्दी झालेली असायची बायांची. त्या चांगलं खोल असलेल्या पाण्याची ठिकाणं आणि चांगले गुळगुळीत दगड पटकावून बसायच्या. 
शरीफा याचसाठी शुक्रवारची वाट बघत असायची. आठवड्यातून एक पूर्ण दिवस दादीचा पहारा, चुलीचा ताप सोडून तिला मोकळं वावरायला मिळायचं. चार बायांशी गप्पा टप्पा करायला मिळायच्या. बाहेरची हवा अंगाला लागायची. त्यात पुन्हा नदीवर जाणं हे तर फारच सुखाचं आनंदाचं होतं. गावाला कवेत घेऊन खळखळत वाहणारी ही अगदीच ओढा म्हणावा अशी छोटीशी नदी. उन्हाळ्यात खालून जसजशी आटत जाई तशी वर वर  पाण्याची ठिकाणं शोधत गावापासून दूर जावं लागे कपडे घेऊन. तिथं दोन्हीतीरी भरपूर झाडी, सावली आणि निवांतपणा असायचा.  

तनमन एकदम प्रफुल्लित होऊन जाई शरीफाचं. बोचकी एकदा किनारी टाकली की ती अर्धा घटका आराम करून घेई तिथल्याच एखाद्या खडकावर बसून. आज कोण कोण आलंय कपडे घेऊन, ती नजर फिरवून घेई.एकमेकींना हाकारणं होई.  तिच्या सोबत घरातल्या एकदोन लहान मुली मदतीला असत. त्यांना बोचकी सोडून कपडे काढ, त्यांचे ढीग कर, साबण भिजव अशी छोटी मोठी कामं सोपवून ती निवांत बसून घेई. हे स्वातंत्र्य शरीफाला इतकं प्रिय वाटायचं की त्यापुढे आता दिवसभर कपड्यांची ही बोचकी धुऊन काढायचीत हे कष्ट देखील तिला मामूली वाटायचे. आता दिवसभराची निश्चिती असायची. वाहत्या पाण्यात कपडे धुणं हे तसंही फार कष्टाचं काम नसे.

तिच्यासारख्या अनेक स्त्रिया त्या दिवशी कपड्यांची बोचकी काढून नदीवर हजर असायच्या. नदीचे काठ फुलून जायचे. सोबतच्या लहान लहान मुली-मुलं चिवचिवत असायची. कपडे धुवायचे. काठावरच वाळवायचे आणि ते वाळले नि उन्हं कलायला लागली की त्यांच्या घड्या करून शुभ्र धुतलेले कपडे पुन्हा धुतलेल्या बोचक्यात निगूतीने बांधून सावकाश संध्याकाळी घरी परतायचं. घरून भाजी-भाकरी बांधून आणायची. कपडे धुवून वाळत घातले की दुपारी उशिराने ती खाऊन घ्यायची. झाडाखाली गप्पा मारत बसायचं. सगळ्या गावाची हालहवाल तिथे कळे. माहेरच्या स्त्रियांची भेट होई. सुखदुःखाच्या गोष्टी होत. बहुतेकींचे सासरमाहेर गावातच. गावातच लग्नं होणं हे मानाचं, प्रतिष्ठेचं समजलं जाई. ज्यांच्याबद्दल , खऱ्या खोट्या वावड्या उठलेल्या असत त्यांची गावात लग्नं होणं कठीण असे. त्यांना आजुबाजूच्या गावात स्थळं शोधावी लागत. 


सादिकासारख्या सिनेमांच्या गाण्यांची, शेरोशायरीची, गजलांची आवड असणाऱ्या तिथं मुक्त गळ्याने गाऊन घेत...

ऐ मेरे हमनशीं, चल कहीं और चल... इस चमन में भी अपना गुजारा नहीं.

बात होती गुलों तक तो सह लेते हम... अब तो कांटों पे भी हक हमारा नहीं.....

सादिकाच्या तोंडून ऐकलेल्या गैरफिल्मी गजला अजून जशाच्या तशा आठवताहेत...

माझ्या कडे पाहून म्हणायची..

गोरी चलो न हंस की चाल... जमाना दुश्मन है...

तेरी उमर है सोला साल.....

मी खरंच तेव्हा सोळा-सतराची होते. क्वचित सुट्टीत त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायची.

नदीचे दोन्ही काठ वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपड्यांनी सजायचे. सगळ्यांचे कपडे भारीतले. टेरीनचे इंपोर्टेड शर्टंस, झुळझुळीत साड्या, लहान मुलामुलींचे सुंदर सुंदर झगे, झबले आणि ते सगळे धुण्यासाठी तसेच इंपोर्टेड सुगंधी साबण, पावडरी. ते मी पाहात राहायची. आमच्या धुणेवाल्या बाईंकडे आई मोजून पाचशेएक साबणाचा एक तुकडा कापून देई. तो लावल्यावर आमचे कॉटनचे कपडे पांढरे व्हायच्याऐवजी अजून पिवळे दिसत. आमच्याकडे इंपोर्टेड वस्तू नसायच्या. त्या फक्त मुस्लिम घरांतूनच असायच्या. कारण सारे बोटीवर किंवा गल्फला नोकऱ्यांना. वर्षातून एकदा आले की मोठमोठ्या ट्रंका भरून सामान आणायचे. कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या, पंचवीसेक छत्र्या, सुऱ्या, कातऱ्या, परफ्युम्स, साबणं नि काय काय.....
आमच्या घरी कपडे धुण्यासाठी बाई होती. तिच्याबरोबर मी अनेकदा नदीवर जायची. शुक्रवारी ती वैतागायची. म्हणायची, 'आज नदीवर जागा सापडायची नाही, दगड मिळायचा नाही चांगला.' अशावेळी एखादा नवीन दगड शोधावा लागे. तो वापरात नसल्याने घासून घासून साफ करावा लागे. तरी त्याचीच घाण कपड्यांना लागे. असे पुन्हा पुन्हा घासून गुळगुळीत झालेले दगड पुन्हा लवकर येणाऱ्या बाया पटकावत. पण कोणाची तक्रार नसे. कारण ही गर्दी फक्त शुक्रवारी. बाकीच्या दिवशी बायांनी घासून मऊ केलेले हे सारे दगड आपापल्या सख्यांची वाट बघत स्वच्छ, पण कोरडे ठाक पडलेले असायचे. आणि त्यांच्या सख्यांनाही शुक्रवारचा इंतजार असायचा.

कपडे घेऊन घरी गेल्यावर त्या दिवशी घरात त्या बाईला फार काम नसे. बिचारी दिवसभर कपडे धुऊन आलेय याबद्दल सहानुभूती असे. संध्याकाळचं जेवणही घरात राहिलेल्या बाईने शिजवायला घेतलेलं असायचं.


फक्त दगडच नव्हे, तर शुक्रवारी नदी देखील आनंदात थबकायची. संथ व्हायची. दोन्ही काठावरच्या बायांच्या गप्पा, गाणी, क्वचित छोटंसं भांडणं, वादावादी ऐकत. त्यांचे कपडे धुवू लागायची.  आठवडाभराचा तिचा एकटेपणाही भरून निघायचा. एरव्ही ती देखील एकटीच दिवसरात्र पाणी वाहत राहायची. नासिरच्या बायकोसारखीच...!

Jan 16, 2023

आपले सण आणि उत्सव

संक्रांत आणि अश्विन नवरात्र हे दोन उत्सव भारताच्या बहुतांश सर्व राज्यात साजरे होताना दिसतात.
भारतीय बहुतांश सण उत्सव हे ऋतुचक्र आणि त्यातील बदल यांना अनुसरून असतात, हे जवळपास सगळ्यांना माहीत आहे.
जरी हे सगळे आता अधिकतर हिंदू धर्माला जोडले जात असले, आणि एके काळी त्यांच्यावर सवर्णांनी कब्जा केलेला असला तरी खरं तर हे सगळ्यांच्याच जीवनाशी जोडले गेलेले आहेत, किंवा असायला हवेत. ऋतुमानानुसार आहार, विहार, पोशाख इत्यादी साऱ्याच गोष्टीमध्ये बदल करत आयुष्य सुखकर आणि आनंदी करून घेण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. त्याचा थेट संबंध धर्माशी ना जोडता, म्हणूनच सर्व धर्मीय भारतीय यांनी त्यात सहभागी व्हायला हवे.
तिळगुळाचे संबंध धर्म आणि जातीशी नसून थंड हवामानात उष्ण आणि स्निग्ध पदार्थ सेवन करण्या शी आहे.
नवरात्रीत हिरवा रंग हा धर्माशी संबंधित नसून धर्तीवर पावसानंतर उगवून आलेल्या संपन्न हिरवाईशी आहे.
दिवाळीत रोषणाईचा संबंध धर्माशी नसून अश्विनातल्या काळोखाशी आहे..
त्यामुळे धर्म आणि पूजा प्रतीके यांना बाजूला ठेऊन सर्व भारतीयांनी आपले भारतीय सण मस्त साजरे करावेत. हे सुंदर सण कुणा एका धर्म किंवा जातीची मक्तेदारी नाही.
- अलका गांधी - असेरकर

Dec 28, 2022

डॉक्टरी खर्च-

सर्व साधारणपणे हॉस्पिटलात असे रेट असतात. बोर्ड वर लिहूनच ठेवलेले असतात.

नर्स चार्जेस दर दिवशी 2000
Rmo dr 2000
Mavshi /mama 500
विशेष dr visit फी 3000
लॅब रोज 3000 हजार
Oxygen 2000
Bp unit 1000
रूम चार्जेस २-३००० ( एवढे तर चांगल्या हॉटेलचे पण नसतात अनेकदा)

असो 

प्रश्न हा आहे की ह्या रेट प्रमाणे तिथल्या नर्सला, वॉर्ड बॉयला, RMOला पगार मिळतात का??

Dr ना शिकताना, नंतर हॉस्पिटल्स उभारायला खर्च येतात. मान्य आहे. म्हणून आयुष्यभर त्यांनी खोऱ्याने पैसे कमवावे असा काही नियम आहे का..??

वरील रेटने सर्व सामान्य माणसाला उत्पन्न कमवायला अख्खा आयुष्य जातं, 
तर ते आयुष्य भर कमावलेलं गमवायला एक आजार अन एक Dr आणि त्याचे हॉस्पिटल पुरेसे असतात . माणसाची आयुष्य भराची पुंजी dr. Hospitals आणि औषध कंपन्या अलगद त्याच्या खिशातून केवळ एक दोन महिन्यात बिन बोभाट काढून घेऊ शकतात .. काढतात.
आणि त्या माणसाची पूंजी संपली की तो बरा होवो वां ना होवो, त्याला दवाखान्यातून हाकलून देतात.

Dec 24, 2022

वय आणि त्याची गणितं

 अमुक वयात अमूक करावं आणि तमुक वयात तमूक 

याची गणितं आपणच मांडलेली असतात. बराच सामाजिक प्रभावही असतो त्यावर. या वयाची, वाढत्या वयाची दडपणं घेऊनच जगत असतो मग आपण. विशेषतः समाजात वावरताना आपण याबद्दल अनेकदा टारगेटही केले जातो. 
शिक्षणाचं वय, लग्नाचं वय, मुलंबाळं होण्याचं वय, काम करण्याचं वय, विशिष्ट कामं करण्याचं वय, विशिष्ट छंद किंवा आवडी जोपासण्याचं वय, विशिष्ट कपडे घालण्याचं वय, फॅशन करण्याचं वय..........

प्रत्येक गोष्टीसाठी वयाच्या अलिखित मर्यादा आपण आखून घेऊन जगत असतो. त्या त्या मर्यादेत त्या त्या गोष्टी नाही झाल्या तर समाज आपल्याला दडपणं देत राहतो, आणि आपणही ते दडपण घेत राहतो. बरं या मर्यादा कालसापेक्ष बदलत असतात, तरी आपण ते दडपण घेतोच. आता लग्नाचंच बघा ना, एकेकाळी मुलामुलींची लग्नं दहा ते बारा वयात न झाली, तर दडपण घेणारे पालक होतेच की.. आणि आता विशीत लग्नं झाली, तर एवढ्या लवकर? असं विचारलं जातं. पण तिशीनंतरही लग्नं नाही झालं तर पुन्हा जो तो हैराण करतो विचारून, काय मग लग्नं कधी करताय...? झालं, पालक आण मुलं दोघेही चिंतेत पडायला सुरूवात..

या वयाच्या मर्यादा आपल्या डोक्यात इतक्या घट्ट बसलेल्या असतात की आपणही त्या मर्यादेतच विचार करतो आणि त्याप्रमाणे  काय करायचं नि काय नाही करायचं याची गणितं मांडत राहतो. 
आता या वयात? लोक काय म्हणतील? याचा बागुलबुवा लोक काही म्हणण्याआधीच आपल्या मनाला खात राहतो.
मागच्याच महिन्यात मित्राने घेतलेल्या त्याच्या नवीन गाडीत बसले होते. त्याला वरती काचेचं ओपन होणारं रुफ टॉप होतं. त्याने मला ते उघडून दिलं आणि त्यातून डोकं काढून उभं राहायला सांगितलं. मी पण मजेत वर डोकं काढून वाऱ्याचा आनंद घेत उभी राहिले, नंतर दोनच मिनिटात मला वाटू लागलं, हे तर लहान मुलांसाठी असतं ना...आपण या वयात काय हे असल्या गमती करतोय...

त्यावर मित्र म्हणाला, की हेच चुकतं आपलं, आनंद घेण्यासाठी वयाच्या मर्यादा असतात का? जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत सगळ्याच गोष्टी करण्यासाठी मर्यादा का आखून घ्यायच्या? केवळ समाज काय म्हणेल या भीतीने?

तर वयाची गणितं आपल्या मनात असतात. त्यामुळे आपणच ठरवून टाकतो की अमुक वयानंतर हे होणार, शरीर थकणार, अमूक आजार होणार, मृत्यु येणार वगैरे...आपलं शरीर हे एखाद्या कम्प्युटरसारखे असते. तुम्ही जी कमांड देणार ते ते अंमलात आणत असते. तुम्ही मनाला आदेश दिलात की अमुक वयात तमुक होणार. तर ते होणारच ना... 

मी तर म्हणते की मरणाचे वय देखील आपणच ठरवत असतो. आपल्या मनाने. आता काय करायचंय जगून? असं तुम्ही स्वतःच म्हणालात तर ते जगणं लवकरच संपणार. तसं तर इतके दिवस देखील जगून काय केलं आपण? नसतो जगलो तर काय जग थांबणार होतं? मग आता तरी का म्हणायचं ते...

त्यामुळे लोक काही म्हणू दे... म्हातारचळ लागलाय म्हणू दे.. अर्धी लाकडं गेली म्हणू दे.. आता शोभतंय का म्हणू दे... काहीही बरळू दे...
डोक्यातली वयाची गणितं दूर फेकून मस्त जगा.. मस्त खा.. प्या.. प्रेम करा.. उड्या मारा.. खिदळा.. फॅशनी करा..छंद करा.. नवीन गोष्टी शिका. काय वाट्टेल ते करा..ज्यांना आपल्या या वागण्याचा त्रास होतो त्यांनी दूर राहावं आपल्यापासून.

समाज वयाचीच कशाला सगळीच गणितं आखून देतो आणि आपल्याला त्या चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न करतो. आताच पठाण सिनेमा आलाय. त्यात किती त्या टिप्पण्या शाहरुखवर आणि दिपिकावर... खरंतर हेच स्टार अभिनेते लोक चौकटी मोडण्याचे काम करत असतात. तो आता म्हाताराच दिसतोय, दिपिका सपाट दिसतेय. सेक्सी दिसत नाही. काय नि काय.. नका बघू ना. तुम्हा ट्रेलर दिसला. सिनेमा नका बघूु. कोण जबरदस्ती करतोय का...अमुक फिगर म्हणजे सेक्सी, तमुक त्वचा म्हणजे तारुण्य, अमुक रंग म्हणजे सौंदर्य,  हे सगळं चौकटीत का बसवू पाहता तुम्ही..?  कुणाला डबल एक्सेल् फिगर सेक्सी वाटेल, तर कुणाला झिरो फिगर. कुणाला विशीतला जोडीदार आकर्षून घेईल, तर कुणाला प्रौढ. ज्याचं त्याला ठरवू द्या ना रे कसं जगायचं ते......तुमचं तुम्ही बघा. 

तसं तर विशी-तिशीतच म्हातारी झालेली मनं दिसतात आजुबाजूला.. नि नव्वदी उलटूनही रसरसून जगणारी माणसेही दिसतात... !

Nov 2, 2022

झोला उठाकर चलो....

 गुगलमुळे आपल्या आपण ट्रिप आखून फिरणं सोपं झालंय खूप. त्यासाठी टूर कंपन्यांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागणं आता कमी झालंय.

तरी देखील अजूनही खूप लोकांना स्वतःच्या ट्रिप स्वतः आखून जायचा कंटाळा येतो. बऱ्याचजणांना गुगलवरून माहिती कशी मिळवावी आणि ट्रिप कशा अरेंज कराव्या हे समजत नाही.
मी गेली जवळपास दहा वर्षे थोडं फार फिरले. भारतात आणि थोडं भारताबाहेरही. त्यात मोजक्या तीनचार ट्रिपच टूर कंपन्यांबरोबर गेले. बाकीच्या माझी मीच गुगल सर्च करून अरेंज केल्या आणि फिरलो.
बहुतेक ट्रिप मी आणि माझा नवरा असे दोघेच गेलो.
खरंतर त्या ट्रिपची तपशीलवार माहिती लिहून ती ब्लॉग किंवा फेसबूक इत्यादीवर टाकली असती तर लोकांना त्याचा फायदा झाला असता असे आता वाटू लागलेय.
म्हटलं तर अत्यंत सोपं आहे. अनेक हुशार लोकांना अशा माहितीची गरजही नाही. हे मला माहीती आहे. पण बरीच मोठी संख्या अशी आहे, त्यांना अजून हे नीट माहिती नसतं. त्यांच्यासाठी असे ब्लॉग उपयोगी पडू शकतात.
लिहू म्हटलं तर अनेकदा कंटाळाही असतो, अनेकदा असं वाटतं की या तर भारतातल्या सोप्या सोप्या ट्रिप्स, आपण आजवर गेलो नाही, पण बाकीचे अनेक लोक अनेकदा फिरून आले असतील या ठिकाणी. त्यांना कसले आलेय कौतूक...
तरी माझी मी अरेंज करताना खालील गोष्टी क्रमाने करत असते. हे माझ्यासारख्याच अज्ञ लोकांसाठी -
१. सर्वप्रथम मी त्या स्थळांच्या राज्यांची पर्यटन साईट उघडून ती स्थळं आणि त्यांची माहिती बघते. ती वाचत असतानाच त्यातील स्थळे एकमेकांपासून किती लांब आहेत हे मॅप उघडून बघून गेते. अशा जवळपासच्या स्थळांची एकत्र ट्रिप करण्याचे ठरवते.
२. त्या साईटवर त्या स्थळांचे हवामान, जाण्यासाठी कोणते ऋतु योग्य, जाण्यासाठीचे मार्ग, वाहने यांची माहिती असते. शिवाय प्रत्येक राज्याच्या पर्यटन खात्यांची राखीव हॉटेल्स असतात. त्यांची माहिती, त्यांचे रेट्स दिलेले असतात. ही हॉटेले बहुतेक ठिकाणी चांगली, बऱ्यापैकी, मध्यमवर्गीय लोकाना परवडतील अशी असतात. तिथला स्टाफ सहकार्य करणारा असतो. सुरक्षित असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती त्या त्या ठिकाणच्या मोक्याच्या ठिकाणी असतात. उदा. नैनीतालला कुमाऊ गेस्टहाऊस नैनी तळ्याच्या अगदी काठावर आहे.
३. जाण्याची तारीख ठरली, की रेल्वे किंवा फ्लाईट्सचे रिझर्वेशन करते. जाण्या येण्याचे. साधारण प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन दिवस लागतील या अंदाजाने ट्रिप आखून घेते. एका स्थळाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे रिझर्वेशन असेल तर तेही करून घेते. किंवा तिथे जाऊन मग टॅक्सी करतो. अनेकवेळा लोकल बसने इत्यादी देखील प्रवास करतो. (सामान एक मोठी आणि एक खांद्यावरची अशा दोनच बॅग ठेवतो अशावेळी. तर अशी इकॉनॉमी टूर करता येते.)
४. जाण्यायेण्याचे रिझर्वेशन झाल्यावर हॉटेल्सची बुकींग करते. भारतातल्या आणि जगातल्याही बहुतेक लहान मोठ्या शहरातल्या हॉटेल्स, मोटेल्स, झोस्टेल्स, होस्टेल्स इत्यादींची यादी, फोटो, आणि रेट गुगलवर अनेक साईट्सवर मिळतात.. अव्हेलेबिलिटी दिसते. शिवाय या सगळ्या साईट्समध्ये आपसात स्पर्धा असल्याने कमीत कमी रेटमध्ये हॉटेल्स मिळू शकतात. सर्च करत राहिल्याने वेगवेगळ्या साईट्सचे सतत बदलते रेट्स समोर येत राहतात. आपल्या आवा्क्यात असलेले, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हॉटेल अत्यंत सहजपणे बुक करता येते. प्रत्यक्षात तिकडे जाऊन त्या हॉटेलचे असलेले रेट्स आणि ऑनलाईन बुकींगमध्ये असणारे रेट्स यात भरपूर फरक असतो. ऑनलाईन खूप स्वस्तात मिळतात.
५. बस.. यानंतर काहीही करायचे नाही. त्या त्या स्थळांची माहिती गोळा करत राहायचे निवांत. तिथली बघण्यासारखी स्थळे, खाणं पिणं, खरेदी इत्यादी. आणि प्रत्यक्ष तिकडे गेल्यावर हॉटेलच्या काऊन्टरवर देखील भरपूर माहिती मिळते तोंड उचकटून विचारल्यावर. टॅक्सी, रिक्षा, बस काय योग्य आहे तेही कळते तिथे. त्याप्रमाणे दिवसभर भटकंती करावी. खावं प्यावं, शॉपिंग करावी.
इतकं सोपं आहे हे.
भारतातल्या भारतात फिरायला तर अगदी सोपं आहे. थोडी सावधानी, थोडी दक्षता, थोडी हुशारी राखली तर कुठेही फसवलं जात नाही. वाईट अनुभव येत नाहीत. त्यातही गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी साऊथची राज्ये ही तर आपल्या घरआंगनसारखी असतात. जेथे जाऊ तेथे आपलीच भावंडे दिसतात. आपल्याच शहरासारख्या बऱ्यावाईट सुविधा असतात. बस, रिक्षा, टॅक्सी आणि त्यांचं बारगेनिंग... सगळं असतं. मस्त घासाघीस करून ठरवावं. असं फिरण्याने त्या शहराचं अंतरंग बघता येतं, स्थानिक खानपान कळतं. टूर्ससोबत गेलो की हे शक्य नसतं. फक्त महत्त्वाच्या ईमारती बघून परत येतो. उदा. आता बघा, समजा मुंबईत कुणी फिरायला आलं बाहेरून तर टूर कंपन्या त्यांना काय दाखवणार? गेटवे.. गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह आणि अमिताभचा बंगला.... पण मुंबई म्हणजे एवढंच आहे का? तर नाही. हे आपल्याला माहीत आहे... मुंबई म्हणजे लोकलचा प्रवास, वडापाव, दादर, क्रॉफर्ड, भुलेश्वर इत्यादी स्थळांवरील गर्दीतली पण स्वस्तात मस्त खरेदी... असं बरंच काही असतं ना... ते कसं अनुभवणार टूर्स सोबत... त्यासाठी स्वतंत्रच फिरायला हवं. तर असंच सगळ्या ठिकाणचं असतं. म्हणून स्वतंत्र फिरा... भारतातल्या बहुतांश राज्यांत अगदी एकटंही निर्धोक फिरता येतं. भाषेचा काही प्रश्न येत नाही.
हॉटेल्स चेकआऊट केल्यावर ट्रेनसाठी वेळ असेल, तर अनेक मुख्य रेल्वे स्टेशन्सवर सामान ठेवण्यासाठी लॉकर्स असतात. (त्यासाठी सोबत नेहमी आपली एक दोन छोटी कुलुपे आणि चावी जवळ ठेवावी.) वेटींग रूम असतात. रिटायरींग रूम असतात. या आयत्या वेळी देखील मिळतात. अगदी स्वतंत्र रुमदेखील असतात. मात्र त्याचं बुकींग आधी करावं लागतं. सामान लॉकर मध्ये टाकून तुम्ही ट्रेनच्या वेळेपर्यंत पुन्हा शहरात फिरून येऊ शकता... खान पान आटोपून येऊ शकता....
काही हॉटेल्सवाले तुम्हाला पिकअपची सोय देखील देतात. एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्टेशन्सवर... त्यांना फोन करून सांगून ठेवावे.
मग... करून पाहा एखादी छोटीशी टूर आपली आपण.... एकतर पैसा वाचतो खूप...आणि दुसरं म्हणजे आपल्या मर्जीने हवं तिथे हवं तितक्या वेळ रेंगाळता येते. कुणाला प्राचीन स्थळांत रस असतो, कुणाला नैसर्गिक, कुणाला शॉपिंगमध्ये तर कुणाला निरुद्देश भटकण्यात.... आपण स्वतंत्रपणे गेलो तर यातलं आपल्या मर्जीने करता येतं. नको ते बघत इतरांसोबत फरपटावं लागत नाही..... प्रवासात सामान कमीत कमी, कपडे कमीत कमी ठेवले की आपलं आपण सामान उचलून धावता येतं. बसेस इत्यादी पकडता येतात. दोन दिवसाला एक जोड असेच कपडे ठेवावेत. अंतर्वस्त्रं (स्त्रियांची) आजकाल युज एन्ड थ्रो मिळतात. यात अनेक प्रकार असतात. ते वापरावेत. कपडे धुण्याच्या भानगडीत कुठेही पडू नये. मी पाहिलेय की बऱ्याच बाया टूरला गेल्यावर हॉटेलवर आल्यावर आधी बाथरूममध्ये कपड्यांचा ढिग धूत बसतात... अरे कशाला... यासाठी तुम्ही आलाय का इकडे... सोडा ते... घरी गेल्यावर बघा... दोन तीन दिवस एकच जीन्स आणि एकच टीशर्ट वापरा. आणि रात्रीची एखादी नाईटी. बास. सगळीकडे दिवसाला तीन तीन ड्रेस बदलायला आपण काही पडद्यावरच्या हिरोईन्स नाहीत की आपल्याला त्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यांची टीम त्यांच्यासोबत असते ते सगळं उरकायला...
अलका गांधी -असेरकर
See insights
Like
Comment

Oct 30, 2022

खंती...!

कॉमन गॅलरी असलेल्या मुंबईतील एका चाळीतल्या गॅलरीच्या कठड्याला टेकून ती खाली बसली होती. तिथून कठड्याच्या जाळीतून खालचा वाहता रस्ता दिसत होता. दूपारपासून ती त्या रस्त्याकडे अगदी डोळ्यांत प्राण आणून भाईची वाट पाहात होती. शेकडो माणसं जात होती नि येत होती त्या रस्त्यावर. पण भाई काही येताना दिसत नव्हता. 
ती आज मुंबईला येणार हे भाईला कळवलं होतं. तो तिला तिथे घ्यायला येणार होता. 
मुंबईला यायचं तर एका दूरच्या चुलत काकांकडे. दूरचे असले, तरी बऱ्यापैकी चांगले संबंध होते. मुंबईला अनेक कारणांनी यावं लागायचं. लग्नप्रसंग, अहमदाबादला जाताना वाटेवरचा थांबा म्हणून, स्थळं बघायला आणि बरीच कारणे...

भाईचंही लग्न व्हायचं होतं अजून. त्यामुळे तोही स्थिरावलेला नव्हता. कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून, किंवा मित्र मित्र असे राहत होते. मुंबईला आलं की भाई त्या काकांकडे सोडून यायचा. तिथे रोज भेटायला यायचा. आला की फिरायला न्यायचा, सिनेमाला न्यायचा. भरपूर गप्पा मारायचा. नवनवीन माहिती सांगायचा. क्वचित काही खरेदीला. कारण  त्याच्याकडेही खरेदी वगैरे करण्याइतके पैसे नसायचे. 

सकाळपासून वाट पाहूनही भाई आला नव्हता. मुंबईला येताना बहुतेकवेळा ती एकटीच यायची सरळ त्या काकांकडे. परंतु कधी कधी कुणा नातेवाईकांसोबत यायचं झालं तर आधी त्यांच्या सोबत ते जिथे जातील तिथे उतरावं लागायचं. तिथे भाई घ्यायला यायचा नि काकांकडे घेऊन जायचा. यावेळीही असंच झालं होतं. एका दूरच्या मावशीसोबत आली होती ती. ती मावशी देखील आपल्या मुंबईच्या भावाकडे, भावाच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून आली होती. तिच्याबरोबर ही आली होती. 

आता झालं असं होतं, की लग्नघरी ती अनाहूत पाहुणी झाली होती. दुसऱ्या दिवशी लग्न होतं. लग्न घर, तेही चाळीतलं त्यामुळे दोन खणांच्या त्या खोलीत फार गर्दी, वेगवेगळे हळद मेहंदीसारखे काहीबाही विधी चालू होते. सगळं घर लग्नाच्या रेशीम कपड्यांत सळसळत होतं. दागिन्यांनी चमकत होतं. घर म्हणायला चाळीतलं होतं, तरी ते व्यापारी माणसाचं घर होतं. बऱ्यापैकी सधन मंडळी होती.मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे चाळीतली घरंही धरून राहणारी माणसं तेव्हा होती. चाळीत राहत असली तरी सहज लखपती करोडपती असायचे. 

मात्र हिच्याजवळ लग्नाचे जाऊच दे. साधेही कपडे नव्हते जरा चांगले म्हणावे असे. साधीशी मॅक्सी अंगावर होती. एक दोन स्कर्ट ब्लाऊज. आईने एक कॉटन साडी दिली होती. कधी वेळ पडली तर आईची साडी नेसायची ती. तेव्हा अठरा विशीच्या वयात मुली साडी सर्रास नेसत. पण आईने दिलेली ती कॉटनची साडीही नवीन असली तरी अगदीच साधी होती. लग्नात नेसायसारखी अजिबातच नव्हती. दागिने वगैरे तर दूरच. 

खेड्यावर कुठे काही आर्टीफिशिअल ज्वेलरी सुद्धा मिळत होती तेव्हा?

'भाई अजून का येत नाही?' ती फार  वैतागली होती. 

त्या घरातल्या कुणीही मुली, स्त्रिया तिच्याशी फार बोलत नव्हत्या. कुणाचं तिच्याकडे फार लक्षही नव्हतं. जो तो लगीनघाईत होता. तिला मात्र फार कानकोंड्यासारखं झालं होतं. 'रात्री तरी येईल उशीरा भाई, काम आटपून.' असं वाटत होतं तिला. या घरातून तिला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. बरं एकटं निघून जावं, तर भाई इकडे यायचा. चुकामूक व्हायची शक्यता. मावशीही जाऊ देत नव्हती.

'तुला काय घाई आहे? थांब. उद्या लग्न आहे. ते करून जा. भाई तिथेच येईल तुझा.'


तिला कशी सांगू माझी कुचंबणा?
थांबलं की दुसऱ्या दिवशी सकाळच्या लग्नात सामील व्हावं लागणार होतं. अनेक दूरदूरचे आणि जवळचेही नातेवाईक तिथे दिसणार होते, भेटणार होते. आणि लग्नात नेसण्यासारखा एकही कपडा अंगावर नव्हता. जवळ नव्हता. ना ड्रेस होता, ना साडी होती. ना दागिने होते.
आधीच लग्न वगैरेसारखे सोहळे, त्यातील ती गर्दी, निरर्थक हाहाहीहीहूहू, हे तिला नेहमीच कंटाळवाणं फार वाटायचं. ती आपल्या आपल्यातच असायची. सदैव डोक्यात विचारचक्रं सुरू असायची. काही भेदभाव तर तेव्हापासून ठळक जाणवायचे. लग्नात केलं जाणारं संपत्तीचं प्रदर्शन उबग आणायचं. आपल्या हिनपणाची जाणीव अधिकच व्हायची.

फार राग येत होता मनात भाईचा. 
रस्ता पाहून पाहून डोळे दुखले. इतकी वाट त्यानंतर आयुष्यात तिने कधी कुणाची पाहिली नसेल, तितकी वाट पाहिली भाईची त्या दिवशी. फार परावलंबी झाल्यासारखं वाटू लागलं होतं.

पण भाई नाहीच आला. रात्र झाली. त्या दिड खणाच्या खोलीत रात्री झोपायलाही जागा नव्हती. आणि दुसऱ्या दिवशी हॉलवर निघायच्या तयारीत सारं घर रात्रभर जागं होतं. लाईटच्या प्रकाशात आणि आवाजांत झोपही येत नव्हती. दिवसभराचा एसटीचा प्रवास. थकलेपण. चीडचीड होत होती.

सकाळ झाली आणि सगळी प्रमुख मंडळी पटापट आंघोळी आवरून हॉलवर जायला रवाना होऊ लागली. मावशी अजून थांबली होती. कुणीतरी आपल्याला एखादी बऱ्यापैकी साडी नेसायला द्यावी असं चक्क वाटू लागलं होतं. मावशीला विचारलं.

 
'मावशी, तुझ्याजवळ एखादी साडी असेल तर दे मला नेसायला. मी तर काही आणलं नाही. काय नेसू?'


 मावशीजवळही काही नव्हतं फारसं. ती म्हणजे उघड्यापाशी दिगडं गेलं अशीच दोघींची परिस्थिती होती. त्यामुळे त्या लग्न घरी तिचे स्वागतही काही फार जोमाचे नव्हतेच. फक्त ती नवऱ्या मुलीची सख्खी आत्या होती. त्या घरातली एक तरूण सून फक्त कालपासून प्रेमाने थोडंतरी तिच्याशी बोलत होती. तिने सकाळी हॉलवर जाताना आपली आधीची साडी बदलून ती वरच्या दांडीवर टाकून दिली होती. ती साडी साधीच, प्लेन पण जॉर्जेटची होती. तिला जरीचे काठ होेते. हिची नजर सारखी त्या साडीकडे जात होती. 'सांगावं का तिला, मी नेसू का ती साडी म्हणून?' पण जीभ उचलत नव्हती. फार लाजिरवाणं वाटत होतं. 


सगळे निघून गेल्यावर मावशी म्हणाली, 'आटप, आंघोळ कर तूही आता. आपणही जाऊ या हॉलवर.' ती उठली. नाईलाजाने बॅग उघडून आईने दिलेली राणी कलरची प्लेन, निळ्या रंगाचे काठ असलेली सुती साडी काढून आंघोळ करून ती नेसली.
फार लाज वाटत होती. लग्नात अशी साडी कोण नेसतं? कामवाल्या बाईसारखं वाटू लागलं होतं तिला.  सगळ्यांच्या अंगावर भरजरी साड्या, दागिने होते. तिथून पळून जावं असं वाटत होतं. लग्न लागल्यानंतरही फार उशीरा भाई आला. थेट हॉलवर. त्याला काही कपड्या बिपड्याचं पडलं नव्हतं. असंही पुरुषांच्या कपड्यांकडे कोण पाहतं?  त्याला तिथून निघायची घाई नव्हती. 

'थांब गं, आता मस्त जेवूनच जाऊ. सगळ्यांना भेटून जाऊ.' तो सगळ्यांशी मस्त गप्पा मारत होता. लोकही त्याच्याशी बोलत होते. तो बोलका होता. आत्मविश्वास दांडगा होता त्याच्याजवळ. नातेवाईकांमध्ये लोकप्रिय होता. देखणा आणि बोलण्यात चतुर असल्याने (शिवाय होतकरू लग्नाळू मुलगाही असल्याने...) सगळे त्याला समोर होऊन बोलत होते. पण तिच्याकडे ढुंकून बघत नव्हते. 
---
किती वर्षे झाली या गोष्टीला..!
ती दांडीवरची साडी, आणि ती अंगावरची साडी...! दोन्ही तिच्या नजरेसमोर तरळू लागल्या.

 तिला अगदी रंग,पोतासह लख्ख आठवतात अजूनही त्या दोन साड्या. डोळ्यांसमोर दिसू लागतात. तारुण्याची उमेदीची वर्षे असताना मैत्रिणी, चुलत- मावस- मामे बहिणी यांचे विविध प्रकारचे कपडे, प्रसंगानुसार वेगवेगळे पाहून फार वाईट वाटायचं. लग्नादी प्रसंगात लाजिरवाणं वाटाचयं. मिटल्यासारखं व्हायचं. क्वचित चार पैसे हातात असले, तरी खरेदीची अक्कल नव्हती. नेमकं काय घ्यायचं? कुठून घ्यायचं? ते कळायचं नाही. कळलं तर खरेदीला सोबत कुणी असायचं नाही. शिवाय दागिन्यांची, खाण्यापिण्याची नव्हती, पण कपड्यांची फार आवड होती.
 
आज दहा वीस हजाराची साडी घ्यायची म्हटलं तरी पटकन घेऊ शकण्याइतकी ऐपत आली. पण ती उमेदीची, तारूण्यात मिरवण्याची वर्षे निघून गेली. त्यामुळे आता घेतली तरी दहा हजाराच्या साडीचं कौतुक काही वाटत तर नाहीच, पण आज  पैशाची नसली तरी, अगदी साधे कपडे नेसूनही टेचात कोणत्याही प्रसंगात कुणाच्याही घरी जाण्याइतकी वैचारिक श्रीमंती वाढली. 

तरी सुद्धा ... त्या त्या वयाच्या गरजा असतात.. मानसिकही आणि शारिरीकही. आणि वय असतं परावलंबी.
आणि हो! गरिबी आणि लाचारी ही कुठल्या जातीची मक्तेदारी नसते. ती सगळीकडे असते.

- अलका गांधी-असेरकर




Oct 17, 2022

सौ. मंगळसूत्र साडी इत्यादी....

 सौ. लावणे, मंगळसूत्र घालणे, साडी नेसणे, सण-वार पाळणे...

फेमिनिझममध्ये हे सगळं मागास समजले जाते. ते योग्यही आहे. त्यासाठी कधीतरी टोचेल असं बोलून स्त्रियांना जागृत करण्याचा प्रयत्न जरूर करावा. परंतु प्रत्येक स्त्री ही बदलाच्या कुठल्या ना कुठल्या पायरीवर असते. सगळ्याच स्त्रियांना एकाच वेळी हे सगळं त्यागून बंधमुक्त होणं कठीण आहे.

 
साधं पोशाखाचं बंधन देखील स्त्रियांना त्यागणं फार कठीण होतं. ब्रिटीशांचं पाहून शंभर वर्षांपूर्वीच पुरुषांनी धोतरं सोडून पॅंटी चढवल्या. मात्र स्त्रियांना नऊवारीतून पॅंन्टीत नि पॅन्टीतून हाफ पॅन्टीत यायला तब्बल सहा पिढ्या लागल्या...नऊवारीला पाचवारीसाठी संघर्ष करावा लागला. टोमणे ऐकावे लागले. पाचवारीला सलवार कमीजसाठी तेच करावं लागलं. सलवारीला पॅन्टसाठी संघर्ष करावा लागला नि पॅन्टवालीला गुडघ्यापर्यंतचा प्रवास करायला एक पिढी लागली. म्हणूनच आजही समाजात एकाच वेळी एकाच शहरात स्त्रिया अजून नऊवारी ते हाफ पॅन्ट या सर्व प्रकारच्या कपड्यांत दिसत असतात... मात्र धोतरवाले पुरुष फार म्हणजे फारच विरळा झाले. 
महाराष्ट्रीयन समाजात मंगळसूत्राचे महत्त्व अतिशयोक्त इतके पहिल्यापासून आहे... त्यामुळे ते अजूनही टाकण्याची स्त्रियांची मानसिकता तयार होत नाही. यात हिंदू वगैरे असण्याचा काडीचा संबंध नाही. हिंदू म्हणून सौभाग्याची लक्षणे प्रत्येक राज्यात वेगळी आहेत. कुठे सिंदूर आहे, तर कुठे मंगळसूत्र आहे.. तर पंजाबसारख्या राज्यात काहीच नाही. कुंकू सुद्धा लावत नाहीत अनेक पंजाबी सरदार बायका. कदाचित तिथे मोगली सत्तेचा प्रभावामुळे कुंकू कमी झालं असू शकेल. तरी बाया सौभाग्याची चिन्हे कवटाळून बसतायत अजून हे खरं आहे. कधी कधी लोकांच्या प्रश्नांना उत्तर नको म्हणून, कधी सामाजिक प्रतिमा अबाधित राहावी म्हणून, कधी सासरच्यांचा धाक म्हणून...

तरी देखील बदलाची ही धीमी गती पुढच्या पिढीत जलद होताना दिसते. अशावेळी बदलाच्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पायरीवर असलेल्या स्त्रीचे स्वागत करायला हवे. तिला स्वीकारायला हवे. समोरच्याचा बदल बघून कदाचित ती बदलणार नाही, पण पुढच्या पिढीसाठी तरी ती सौम्य होईल.

हीच गोष्ट सणावाराची... आज ज्या स्त्रिया, 'मी नाही बाई काही करत असलं..' म्हणत स्वतःतील सुधारणा किंवा वैचारिकता मिरवत असतात, त्या देखील या ना त्या कारणाने पाच पंचवीस वर्षांपूर्वी हे सगळं करतच होत्या. त्यांना लवकर जाग आली, लवकर स्वातंत्र्य मिळालं, घरात तशी पार्श्वभूमी मिळाली हे देखील बदलासाठी तेवढंच कारणीभूत आहे. सर्वांना तशी पार्श्वभूमी, तसे कुटुंब, तसे शहर, सुबत्ता मिळतेच असं नाही... साधं उदाहरण घ्यायचं तर सर्वांनाच तयार फराळ परवडत नाही. त्यांनी घरी केलं तर त्या फुकट राबताहेत म्हणणं कितपत योग्य आहे..? त्यांनी आपल्या मुलाबाळांना करून खायला घालायचे नाही का? अनेक घरात सणावाराची साफसफाई, फराळ, खरेदी यात घरचे पुरुषही भरपूर मदत करत असतात.... 

संविधान हाच धर्म माना... सावित्रीबाईंनी तुम्हाला शिकवलं, त्यानाच पुजा..नवरात्रीत नऊरंग नेसू नका... ह्यॅव नि त्यॅव... अनेक उपदेश बायांना केले जातात. ते जरूर केले जावेत... परंतु त्यासाठी त्यांना हिणवले जाऊ नये.. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांच्या घरातही शंभर टक्के याचे पालन होत नसते. कुठेतरी परंपराशरणता असतेच असते...त्याला वेगवेगळ्या रितीने ते समर्थन करू शकतात, इतकंच.

नटणं, सजणं, चांगलं दिसणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पुरुष देखील याला अपवाद नाहीत. नाहीतर नैसर्गिक दाढ्या वाढू न देता विविध प्रकारे त्या कोरण्याची पद्धत त्यांनीही स्वीकारली नसती... बाया भुवया कोरतात म्हणून त्यांना हिणवणारे हे बघत नाहीत, की ते दाढ्या का कोरतात मग? का जंगली माणसाप्रमाणे केस, दाढ्या वाढू देत नाहीत?

सजायचं नाही, मेकअप करायचा नाही, लाजायचं नाही, नैसर्गिक राहायचं... ही आधुनिक बंधनं तर टाकली जात नाहीत ना स्त्रियांवर पुन्हा?

त्यामुळेच, प्रत्येक छोट्या बदलाचे देखील स्वागत व्हावे.. ज्यांनी या गोष्टी टाकल्या त्यांचे कौतुक जरूर व्हावे, पण ज्या टाकू शकल्या नाहीत, त्यांना बदलायला वेळ लागतोय, एवढे तरी समजून घ्यायला हवे. कारण आपणही एका रात्रीत बदललेलो नाही... आपल्या एकेका पिढीला बदलत आणलंय स्त्रीवादी चळवळीने... पण ही धीम्या गतीची असली तरी शंभर टक्के पुढे जाणारी चळवळ आहे हे नक्की... तिला आता मागे फिरवता कुणालाच येणार नाही... अगदी कुठल्याच धर्माच्या सनातनी प्रवृत्तीलाही नाही... कारण ईराणसारख्या देशातही स्त्रिया बुरखा जाळू लागल्या.... ही केवढी मोठी गोष्ट आहे..........

स्त्रियांना त्यांच्या गतीने बदलू द्या......पुरुषांत देखील सर्व स्तरावरची विविधता दिसते की... ते तरी कुठे सगळेच्या सगळे पुरोगामी आहेत........

जे पुरोगामी म्हणवतात स्वतःला ते देखील बायस्ड वागताना दिसतात.... पुरोगामींना देखील इस्लामचे नाव घ्यायला भीती वाटते, मग स्त्रियांना सासरच्यांची वाटणार नाही ....? हाहाहाहा........!

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...