बायकांचं गाव -
त्यातील एका सुखी बाईची गोष्ट-
आपल्या घराच्या पुढच्या सोप्यात अमिनाबी ऊन खात निवांत बसलेय. हिवाळ्यातले कोवळे दिवस. तिच्या केवड्यासारख्या कांती असलेल्या चेह-यावर आता ब-याच सुरकुत्या दिसतायत. केसांमध्ये चंदेरी पसरलेय. साहजिकच आहे. आज अमिनाबीने वयाची पंचाहत्तरी ओलांडलेय. तिची मुलगी आणि पाच नातवंडे जी इंग्लंडहून सुट्टीसाठी आली होती, ती नुकतीच, तासाभरापूर्वीच्या एसटीने परत जाण्यासाठी मुंबईला रवाना झालीय.
अमिनाबी समाधानी आहे. तशी ती कधी नव्हती म्हणा..! अमिनाबीचं आयुष्य सुखातच गेलं होतं. भौतिक सुखांची साय चाखतच गेलं होतं. मुस्लिमबहुल छोट्याशा गावात तिचा जन्म आणि सारं आयुष्य गेलं होतं. तिची गोरीपान देखणी विधवा आई जी तिच्याहून केवळ 15-16 वर्षांनी मोठी होती ती आयुष्यभर तिच्यासोबत राहिली. सारं गाव तिला दादी नावाने ओळखत असे. आईच नव्हे तर दोन भाऊ, वहिन्या त्यांची कुटुंबंही तिच्याचसोबत राहिली. एकप्रकारे अमिनाबी आयुष्यभर माहेरीच राहीली म्हणू या. अमिनाबीचं लग्नंही ती सतरा अठराची असतानाच झालं. सासू सासरे लवकर वारले आणि नव-याला दुसरं कोणी जवळचं असं नव्हतं. बहिणींची लग्नं झालेली होती. अमिनाबीच्या माहेरचं सारं कुटुंब तिच्याच घरी येऊन राहिलं.
अमिनाबीचा नवरा गावातल्या इतर बहुतेक मुस्लिम पुरुषांप्रमाणेच बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. सहा महिने बोटीवर तर चार सहा महिने घरी. असं त्याचं येणंजाणं होतं. खरंतर ते गावच बायकांचं गाव होतं. एकेका घरात कमीत कमी सात आठ बायका, त्यांची भरपूरशी मुलं आणि घरात एक्कादुक्का पुरुष. बाकीचे सगळे बोटीवर नाहीतर अरब देशांत कामाला, मोलमजुरीला.. पण भरपूर पैसे कमवून वर्षाकाठी महिना दोन महिन्यासाठी येणारे. बहुतांश घरात हीच स्थिती. येताना सगळे घरातल्या बायकांना झुळझुळीत साड्या आणत. पोरांना तसेच कपडे आणत. रंगीबेरंगी छत्र्या आणत, सुका मेवा, चॉकलेट्स आणत. आणि असं बरंच काही...
गाव सधन होतं. मुस्लिम समाज गरीब असतो हे मला आता फेसबूकसारख्या वर आल्यानंतर डाव्यांकडून कळलं. आम्ही पाहिले ते चित्र उलटे होते. गावातले सगळे हिंदू, बारा बलुतेदार कफल्लक, लंगोटी लावून फिरणारे होते. तर मुस्लिम सुका मेवा खात , जन्नत-ए-फिर्दौस लावून झुळझुळीत कपड्यात वावरणारे होते.
अमिनाबीच्या नवऱ्याने शेजारच्या गावात दुसरी बायको पण करून ठेवलेली होती आणि तिलाही मुलं होती.
अमिनाबीला चार मुलं. दोन मुली दोन मुलगे. सर्वात मोठी महजबीन. माझ्या बरोबरीची. आमच्या दोघीत थोडी मैत्रीही होती. त्यामुळेच तिच्या घरी येणंजाणंही होतं.
अमिनाबीची चारी मुलं लहान लहान असतानाच अमिनाबीवर आभाळ कोसळलं. ज्या बोटीवर तिचा नवरा खलाशी होता ती बोट बुडाल्याची वार्ता एके दिवशी गावात येऊन थडकली. कम्युनिकेशनची कोणतीही साधने नसलेला तो काळ होता. बातमी तारेने आली होती. अमिनाबी लगेचच्या एसटीने भावाला घेऊन मुंबईला बोटीच्या कार्यालयात पोचली. बोट परदेशी कंपनीची होती. सारे बुडाले. कोणी सापडलं नाही. सापडले त्यात तिचा नवरा नव्हता. मात्र कंपनीने तगडी नुकसानभरपाई दिली. इतकी, की त्या काळात एवढा पैसा कोणी डोळ्यांनी क्वचितच पाहत असे. अमिनाबी पहिली बायको असल्याने तार तिच्याच नावाने आली होती. शेजारच्या गावी असलेल्या सवतीला काही पत्ता लागण्याआधी तर हिने मुंबई गाठून पैसा पदरात पाडून घेतला होता.
असं ऐकण्यात होतं की अमिनाबीच्या नव-याचे आपल्या सासूशीही शारीरिक संबंध होते. सासू फारतर त्याच्याहून दहाबारा वर्षांनी मोठी. देखणी. विधवा. तिच्याही शारिरीक गरजा होत्याच. खरं खोटं अल्ला जाणे. गाव आलं तिथं चहाड्या आल्याच! मुळातच अमिनाबीचा नवरा बोटीवर चांगली कमाई करत होता. बोटीवरून येताना इंपोर्टेड वस्तूंच्या ट्रंकच्या ट्रंक भरून आणत असे. त्यात शंभरेक तर झुळझुळीत साड्याच असत. मरण्याआधी बोटीवर गेला तेव्हा गावात टुमदार बंगला बांधूनच गेला होता. परंतु त्या घराचं सुख त्याच्या नशीबात नव्हतं.
अमिनाबी आता मिळालेला तगडा पैसा आणि माहेरचा कुटुंबकबिला घेऊन नवीन बंगल्यात शिफ्ट झाली. नवरा गेल्याच्या दुःखापेक्षा सुखासमाधानाचं आयुष्य लाभल्याचा आनंद तिच्या चेह-यावर अधिकाधिक परावर्तित होत गेला. तिची पाच मुलं, आई, दोन जानजवान भाऊ. असं भरलं, नांदतं घर!. नव-याची कमी अशीही त्या गावातल्या घरांमधून फारशी जाणवायची नाही. सवय होती. नवरा वर्ष वर्ष बोटीवर किंवा अरबी देशात नोकरीला जाण्याची. अमिनाबीचे भाऊ पण आलटून पालटून जात असत. थोडीफार कमाई करून येत असत.
अमिनाबीने दोन्ही भावांची लग्नं लावली. दोन्ही भाऊ आणि आई अमिनाबीच्या शब्दाबाहेर नसत. तिच्याच जीवावर तर सा-यांची मजा होती. दोन्ही भावांनी एकेक लग्नं बहिणीच्या खुशीने केलं. आणि एकेक लग्नं आपल्या मर्जीने केलं. दोघांच्या चार बायका. पहिल्याची पहिली बायको दिवसभर सैपाकघरात राबत असे. तर दुसरी बायको प्रेमात माहेरून पळून आलेली. ती सकाळपासून दिवसभर एवढ्या मोठ्या कुटुंबाला लागणारं पाणी गावाबाहेरील विहिरीतून डोक्यावरून वाहून आणत असे. आमच्या दारावरून पाण्याची खेप घेऊन ती जातायेता दिसली की माझी आई म्हणायची, “हे बघा प्रेमाचं फळ..!.पळून जाऊन केलेल्या लग्नाचे परिणाम ! पाणी भरून भरून टाळू पण झिजली हिची” खरंतर ती पण माहेरची श्रीमंताघरची लेक होती. पण पळून जाऊन लग्नं करणा-या बाईला सासरीमाहेरी दोन्हीकडे फारशी किंमत नसायची. तिला तक्रार करायाल कुठेही जागा उरायची नाही. दुस-याची पहिली बायको घरातली इतर कामे सांभाळत असे. दर शुक्रवारी आठवड्याभराचे सगळ्यांचे कपडे नदीवर जाऊन धूऊन आणणे. घरातील पोरवडा सांभाळणे इत्यादी कामे तिच्या अंगावर असत. मात्र त्याची दुसरी प्रेमाची बायको हे सगळं आधीच ठाऊक असल्याने तिच्या माहेरीच अधिक राहत असे. येऊन जाऊन असे. नवरा बोटीवरून आला की यायचे नि गेला की माहेरी निघून जायचे.
अशा भरल्या घरात सगळ्यांना कामं सोपवून देऊन अमिनाबी दिवसभर बंगल्याच्या मधल्या खोलीत खाटेवर पडून असे. कुणाला तरी धरून गप्पा मारत बसणे. ओटीवर बसून येणा-या जाणा-याला हाक मारून चौकशा करत बसणे. घरातील सर्वांवर लक्ष ठेवणे. हे महत्त्वाचे काम तिला असे. मुळातच देखणी असलेली कांती अधिकच तुकतुकीत झाली होती. गुलाबी झाली होती.
करता करता अमिनाबीची मुलं मोठी झाली. मुली जवान झाल्या. परंतु मुलीना मंगनी येत नव्हती. कारण मुली काहीच काम करत नव्हत्या. आईप्रमाणेच आरामात राहत होत्या. तो-यात वागत होत्या. अशा श्रीमंती मुलींना लग्न करून आणून त्या काय कामाच्या..! महजबीनला आपल्यासारख्याच रिकामटेकड्या मैत्रिणी होत्या. दिवसभर त्यांच्यासोबत गप्पा मारत बसणे, गावातल्या तरूण मुलांविषयी बोलत बसणे, संध्याकाळी फिरायला जाणे यातच तिचे दिवस पसार होत होते. गावात तेव्हा पर्दा, बुर्का नावालाही नव्हता. कोकणातल्या इतर स्त्रियांप्रमाणेच मुस्लिम स्त्रियांना देखील बऱ्यापैकी स्वातत्र्य होतं. समानता होती.
महजबीनची तीशी उलटली तरी मंगनी येत नव्हती. खरंतर गावातच लग्नं होणं हे आदराचं, सन्मानाचं समजलं जाई. परंतु गावात अशारितीने बदनाम असलेल्या मुलामुलींना ..विशेषतः मुलींना लग्नं जमणं कठीणच जाई. त्यांच्यासाठी बाहेरच्या, शेजारच्या गावात खटपट केली जाई. परंतु त्या गावातलेही आधी शंका काढत, की यांची त्यांच्या गावात का लग्नं जमत नाहीत.! म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. मग तिथंही कठीणच जाई लग्नं जमणं. मात्र म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा अशा प्रकारची दोन्हीकडे काही मजबूरी असलेली पात्रे मिळून जात. त्यातच एके दिवशी महजबीनचं लग्नं शेजारच्या गावातल्या परंतु लंडनला राहत असलेल्या एका स्थळाशी जुळलं.
अमिनाबीची एक जबाबदारी कमी झाली. मुलांचीही लग्ने लावली. त्यांच्या बायका घरातील कामाला लागल्या. भावांची आणि विशेषतः त्यांच्या चार बायकांची आता गरज नव्हती. त्यांना वेगळे काढले. त्यांच्या त्यांच्या कुटुंबासहीत. दादी केव्हाच वारलीय. वहिन्यांच्या जागी आता सुना राबताहेत. आयुष्य मागील पानाहून सुखासीनपणे पुढील पानावर चालू आहे. दुस-या मुलीचं लग्नं मात्र अजून झालं नाही. तिची चाळीशी उलटलीय. पण तोरा मात्र उलटलेला नाही. बाहेर वाळत घातलेल्या वाळवणाशी बसून कोणा मैत्रिणीशी गप्पा छाटत बसलीय ती समोरच. आयुष्य आपल्याच अटीवर जगायची तिची तयारी आहे. महजबीन लकी निघाली असं म्हणायचं. लंडनला तिचं कसं चाललंय माहीत नाही. पण पाच पोरांचा पोरवडा आहे तिलाही; म्हणजे बाई सुखी आहे असं समजायचं ! बाईसाठी अजून सुख ते काय असतं दुसरं......
- अलका गांधी-असेरकर
Mastta
ReplyDelete