Jan 22, 2023

धुणं -

 शरीफा नेहमीच जुम्म्याची वाट बघत असायची मनोमन. ज्याप्रमाणे नोकरदार लोक रविवारची वाट पाहात असतात तशीच. जुम्मेरातपासून म्हणजे गुरूवारपासूनच तिच्या मनावरचा ताण कमी व्हायला सुरूवात व्हायची. केवळ शुक्रवारच्या इंतजारमध्ये. आणि शनीवारपासून पुन्हा पुढच्या शुक्रवारकडे तिचे डोळे लागून राहायचे. 

शरीफा मजिदची पहिली बायको. दोन मुली झाल्यावर मजिदने गावातल्याच एका मुलीच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरे लग्न केले होते. त्या गावात, आणि त्यांच्या धर्मात हे नवलाचे नव्हते. त्यातही एक लग्न घरच्यांच्या मर्जीने तर दुसरं आपल्या मर्जीने असं करणारेही पुरुष होते. तरी देखील अशा प्रकारे दोन लग्न करणारे पुरुष संख्येने कमीच असत. ज्यांची घरं मोठी आहेत, बऱ्यापैकी पैसा आहे आणि मुळात तशी  रंगीन वृत्ती आहे असेच वीर पुरुष विनाकारण दोन लग्ने करत. बाकीचे मात्र मुलगा नसेल, पहिली बायको मेली असेल, किंवा तिला सोडून दिलं असेल कुठल्या कारणाने तरच दुसरं लग्न करत. 
त्यामुळे मजिदने दुसरं लग्न केलं म्हणून शरीफाच्या आयुष्यात काही फार फरक पडला होता असं नाही. मजिद आणि त्याचा भाऊ नासिर हे दोघे आपल्या मोठ्या बहिणीच्या भल्या थोरल्या घरात लहानाचे मोठे झाले, तिथेच आई आणि ते राहिले. बहिणीचा नवरा अपघातात वारला होता, पण मागे बराच पैसा, नुकताच बांधलेला नवीन बंगला आणि बहिणीच्या पदरी पाच मुलं सोडून गेला होता. त्यांची बहीण अमीना हिने देखील सासरच्या माणसांना दूर ठेवून आपला माहेरचा हा सगळा गोतावळा आपल्याजवळ आणून ठेवला. घरात पुरुष माणूस असावा म्हणून हे दोन्ही भाऊ जवळ असलेले बरे होते.  दाम करी काम या न्यायाने भाऊ, आई, दोन्ही भावांच्या दोन दोन मिळून चार बायका या सगळ्या अमिनाच्या शब्दाबाहेर नसायच्या. तशी हिंमत नव्हती. कारण सगळा ऐशोआराम विनासायास तिथे मिळत होता. 

मनात आलं तर दोघे भाऊ आळीपाळीने बोटीवर किंवा गल्फमध्ये नोकरीसाठी अधनमधनं एक दोन वर्ष चक्कर मारून येत. थोडा पैसा कमावून आणत. दोघांनी दोन दोन बायका केल्या तरी अमिनाने त्याना हरकत घेतली नव्हती. कारण एक बाई घरात जास्तीची येणं म्हणजे एवढ्या मोठ्या खटल्यात कामाला बिनपगारी माणूस मिळणं असंच होतं..

दोन भावांच्या चार बायकांपैकी तिघींना कामं वाटून दिलेली होती. एक सदैव चौवीस तास पेटत्या चुलीचे सैपाकघर सांभाळत होती. एक दिवसभर गावाबाहेरच्या विहीरीवरून पाणी भरत होती. तर एक अमिनाची पाच आणि या तिघींची मिळून सातआठ अशी बारा पंधरा पोरं सांभाळत होती. दिवसभर खाटेवर बसून गावभराचं गॉसिप्स करत बसलेल्या अमिनाच्या हातात चहाचे पेले, जेवणाची ताटं आणून देत होती. अमिनाची आई या तिघींवर सुपरवायझरचं काम करत होती. तिला सगळे दादी म्हणत. 
थोडक्यात दादीलाही काम होतं. त्या घरात काम नव्हतं ते फक्त अमिनाला आणि तिच्या मुलांंना. 

यात चौथी जी होती ते प्रकरण हुश्शार होतं. ते म्हणजे मजिदच्या दुसऱ्या बायकोचं. मजिदने तिच्या प्रेमात पडून तिच्याशी दुसरं लग्न केलं खरं, पण ती लग्न करूनही सासरी येऊन राहिली नाही. माहेरीच राहिली. तिचं माहेरही सधन होतं. जोपर्यंत मजिद स्वतःचं घर करून स्वतंत्रपणे राहत नाही तोपर्यंत सासरी येणार नाही असा प्रेमळ धाक तिने घालून ठेवला होता. कारण सासरी जाणं म्हणजे कामाला नोकर म्हणूनच जाणं, त्या तिघींच्या जोडीला. हे तिला पक्कं ठाऊक होतं. ती माहेरी लाडकी होती. माहेरच्यांनी तिला लग्नानंतरही प्रेमाने आपल्याजवळच ठेवून घेतलं  होतं. ती फक्त सणावारी, प्रसंगपरत्वे अमिनाबायच्या बंगल्यात आपली पायधूळ झाडायला येई. तरी तिचं अमिनाबायसह सगळ्यांना कौतुक होतं. तिचं कपाळ भव्य होतं. आणि भव्य कपाळाच्या बाया फार नशीबाच्या, कुटुंबाचं कल्याण करणाऱ्या असतात असं अमिनाबायची मोठी मुलगी मुमताज माझ्याशी बोलताना म्हणायची. मुमताज माझ्या वयाची माझी मैत्रीण होती.  
मुळात तिचं सासरी न येणं चालवून घेतलं जात होतं कारण ती घरची सधन होती. सासरच्यांवर अवलंबून नव्हती. बाकीच्या तिघी मध्यम घरातल्या होत्या. त्यातील एक तर माहेरच्यांचा विरोध पत्करून पळून नासिरबरोबर दुसरी बायको म्हणून लग्न करून आली होती. तिला आता पुन्हा माहेरी स्थान नव्हतं. तिच्याच माथी दिवसभर लागणारं पाणी विहिरीवरून वाहून आणण्याचे काम मारण्यात आले होते. 
दिवसभर ती आमच्या घरासमोरून पाण्याच्या खेपा मारताना दिसे आणि माझी आई म्हणे, "बघा.. प्रेमलग्न केल्याचे  परीणाम. पाण्याचे हंडे वाहून वाहून बिचारीचं टाळकंही झिजलं." खरंतर तीही घरची बरीच होती. पण मुलगी आपल्या मर्जीविरोधात लग्न करते म्हणजे काय? जातीत आणि स्वधर्मातही केलं म्हणून काय झालं? आपली मर्जी पोरी चालवूच कशा शकतात? आता भोग आपल्या कर्माची फळं. सासरचे लोक देखील अशा पोरींना बरोब्बर राबवून घेत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. 

पण सगळ्याच मुली अशा नव्हत्या. बऱ्याचशा मुली मजिदच्या दुसऱ्या बायकोसारख्या खमक्या असायच्या. आधी तू देखील घराबाहेर पड मग मीही येते तुझ्याबरोबर पळून. आपण स्वतंत्र राहू अशी अट घालणाऱ्या मुली आणि ती स्वीकारून तसे राहणारे बहाद्दूर गडी देखील होतेच. नव्हते असे नाही. कारण पळून गेले, नि स्वतंत्र राहिले तरी पुरुषांना कुणी त्यासाठी कायमचं वाळीत टाकत नाही. घरचे त्यांना नंतर स्वीकारतातच.
त्यामुळे त्या गावात अमुकच अशी चाल सगळीकडे नव्हती. सहन करणाऱ्या सोशिक स्त्रिया होत्या तशाच त्यांना राबवून घेणाऱ्या नि आपल्याच मस्तीत आपल्या अटीवर टेचात राहणाऱ्या बायाही तिथं होत्याच.  विनाचकारण दोन दोन लग्नं करणारे गडी होते, तसेच अगदी रामाप्रमाणे आयुष्यभर एकपत्नी राहणारेही भरपूर होतेच. दुसरं लग्न केलं नवऱ्याने म्हणून त्याच्याशी बोलणं टाकून एकाच घरात राहून संबंध तोडणाऱ्या बायका होत्या नि प्रेमाने सवतीसोबत एकत्र राहणाऱ्याही होत्या. कुणी नवऱ्याला सोडून माहेरी जाऊन राहणाऱ्या होत्या नि त्यांना सांभाळणारी प्रेमळ माहेरंही होती. तर कुणी प्रेमलग्न केलं म्हणून मुलीला कायमची मेली म्हणून तिच्या नशीबावर सोडणारेही होते.
गावात अशी, यशस्वी झालेली, फसलेली, तुटलेली, विरोधात आत्महत्या करून मेलेली प्रेमप्रकरणं भरपूर असायची. गडी तगडे देखणे होते नि बायाही खमक्या नि देखण्या होत्या. बुरखा नावालाही नव्हता. एकेकीच्या प्रेमकहाणीवर प्रतिभावंत लेखक दीर्घकथा लिहू शकेल नि त्यावर एखादी फिल्म निघू शकेल अशा कहाण्या आमच्या गावात घडत होत्या. गावच प्रेमळ होतं. खातपितं निवांत होतं. त्यामुळे प्रेम करायला सवड होती. 

तर ते असो. 

आपण बोलत होतो शरीफाबद्दल. मजिदची पहिली बायको. जिला घरातल्या पंधरा-वीस जणांचं सैपाकघर सांभाळावं लागत होतं. दिवस सारा सैपाकघरात जायचा. एवढ्या लोकांसाठी सकाळसंध्याकाळ 'चावलच्या रोट्या' बडवायच्या, सालन शिजवायचं, सारखा चहा करत राहायचं, मासे बिसे साफ करायचे, धान्यधुन्याची निगुती करायची. यात तिला बाहेरचा तुकडाभर आभाळही बघायला फुरसत नसे. नासिरची दुसरी निदान पाण्याच्या खेपा मारायसाठी तरी दिवसभर बाहेरचं जग बघत होती. चार लोकांबरोबर वाटेत, विहिरीवर गप्पा मारायची संधी तिला मिळायची. थोडं रेंगाळायची पण. शरीफाला मात्र सतत दादीचा पहारा नि सैपाकघर यातून मान वर करायला मिळायची नाही. नवऱ्याशी बोलायचं ते रात्रीच. खोलीत गेल्यावर. शिवाय दिवसभर हे दोघे भाऊ घरातही कमीच असायचे. घरात सगळ्या बाया नि लहान मुलं यांचंच राज्य. गावातल्या बहुतेक घरांत हीच परिस्थिती होती. एखादा पुरुष. बाकी सगळ्या बाया.  बाकीचे पुरुष परदेशी.
म्हणून ती जुम्म्याची वाट बघायची. जुम्म्याला सगळ्यांच्या कंपल्सरी आंघोळी. पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं गावात. डोक्यावरून एक एक हंडा आणावा लागे. एकदोन किमीची फेरी मारून. त्यात रोज आंघोळ केलीही तरी कपडे मात्र रोज धुवायला टाकले जायचे नाही. दोन तीन दिवस एकच साडी. तेच कपडे. काम करताना त्यावर एप्रन बांधून घेतलं जायचं. त्यामुळे साड्या मळायच्या नाही. पुरुष देखील एक लुंगी चार पाच दिवस पुरवायचे. बाहेर पडताना शर्टावर जन्नत-ए-फिर्दौस शिंपडले की काम झाले. 
जुम्म्याला सगळ्या घराचे आठवडाभराचे कपडे धुवायला निघायचे. ते काम शरीफाकडेच होते. त्या दिवशी तिला सैपाकघराला सुट्टी असायची. भल्या सकाळीच कपड्यांची बोचकी घेऊन नदीवर निघायचं. उशीरा गेलं तर चांगला दगड मिळायचा नाही. नदीवर आधीच गर्दी झालेली असायची बायांची. त्या चांगलं खोल असलेल्या पाण्याची ठिकाणं आणि चांगले गुळगुळीत दगड पटकावून बसायच्या. 
शरीफा याचसाठी शुक्रवारची वाट बघत असायची. आठवड्यातून एक पूर्ण दिवस दादीचा पहारा, चुलीचा ताप सोडून तिला मोकळं वावरायला मिळायचं. चार बायांशी गप्पा टप्पा करायला मिळायच्या. बाहेरची हवा अंगाला लागायची. त्यात पुन्हा नदीवर जाणं हे तर फारच सुखाचं आनंदाचं होतं. गावाला कवेत घेऊन खळखळत वाहणारी ही अगदीच ओढा म्हणावा अशी छोटीशी नदी. उन्हाळ्यात खालून जसजशी आटत जाई तशी वर वर  पाण्याची ठिकाणं शोधत गावापासून दूर जावं लागे कपडे घेऊन. तिथं दोन्हीतीरी भरपूर झाडी, सावली आणि निवांतपणा असायचा.  

तनमन एकदम प्रफुल्लित होऊन जाई शरीफाचं. बोचकी एकदा किनारी टाकली की ती अर्धा घटका आराम करून घेई तिथल्याच एखाद्या खडकावर बसून. आज कोण कोण आलंय कपडे घेऊन, ती नजर फिरवून घेई.एकमेकींना हाकारणं होई.  तिच्या सोबत घरातल्या एकदोन लहान मुली मदतीला असत. त्यांना बोचकी सोडून कपडे काढ, त्यांचे ढीग कर, साबण भिजव अशी छोटी मोठी कामं सोपवून ती निवांत बसून घेई. हे स्वातंत्र्य शरीफाला इतकं प्रिय वाटायचं की त्यापुढे आता दिवसभर कपड्यांची ही बोचकी धुऊन काढायचीत हे कष्ट देखील तिला मामूली वाटायचे. आता दिवसभराची निश्चिती असायची. वाहत्या पाण्यात कपडे धुणं हे तसंही फार कष्टाचं काम नसे.

तिच्यासारख्या अनेक स्त्रिया त्या दिवशी कपड्यांची बोचकी काढून नदीवर हजर असायच्या. नदीचे काठ फुलून जायचे. सोबतच्या लहान लहान मुली-मुलं चिवचिवत असायची. कपडे धुवायचे. काठावरच वाळवायचे आणि ते वाळले नि उन्हं कलायला लागली की त्यांच्या घड्या करून शुभ्र धुतलेले कपडे पुन्हा धुतलेल्या बोचक्यात निगूतीने बांधून सावकाश संध्याकाळी घरी परतायचं. घरून भाजी-भाकरी बांधून आणायची. कपडे धुवून वाळत घातले की दुपारी उशिराने ती खाऊन घ्यायची. झाडाखाली गप्पा मारत बसायचं. सगळ्या गावाची हालहवाल तिथे कळे. माहेरच्या स्त्रियांची भेट होई. सुखदुःखाच्या गोष्टी होत. बहुतेकींचे सासरमाहेर गावातच. गावातच लग्नं होणं हे मानाचं, प्रतिष्ठेचं समजलं जाई. ज्यांच्याबद्दल , खऱ्या खोट्या वावड्या उठलेल्या असत त्यांची गावात लग्नं होणं कठीण असे. त्यांना आजुबाजूच्या गावात स्थळं शोधावी लागत. 


सादिकासारख्या सिनेमांच्या गाण्यांची, शेरोशायरीची, गजलांची आवड असणाऱ्या तिथं मुक्त गळ्याने गाऊन घेत...

ऐ मेरे हमनशीं, चल कहीं और चल... इस चमन में भी अपना गुजारा नहीं.

बात होती गुलों तक तो सह लेते हम... अब तो कांटों पे भी हक हमारा नहीं.....

सादिकाच्या तोंडून ऐकलेल्या गैरफिल्मी गजला अजून जशाच्या तशा आठवताहेत...

माझ्या कडे पाहून म्हणायची..

गोरी चलो न हंस की चाल... जमाना दुश्मन है...

तेरी उमर है सोला साल.....

मी खरंच तेव्हा सोळा-सतराची होते. क्वचित सुट्टीत त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायची.

नदीचे दोन्ही काठ वाळत घातलेल्या रंगीबेरंगी कपड्यांनी सजायचे. सगळ्यांचे कपडे भारीतले. टेरीनचे इंपोर्टेड शर्टंस, झुळझुळीत साड्या, लहान मुलामुलींचे सुंदर सुंदर झगे, झबले आणि ते सगळे धुण्यासाठी तसेच इंपोर्टेड सुगंधी साबण, पावडरी. ते मी पाहात राहायची. आमच्या धुणेवाल्या बाईंकडे आई मोजून पाचशेएक साबणाचा एक तुकडा कापून देई. तो लावल्यावर आमचे कॉटनचे कपडे पांढरे व्हायच्याऐवजी अजून पिवळे दिसत. आमच्याकडे इंपोर्टेड वस्तू नसायच्या. त्या फक्त मुस्लिम घरांतूनच असायच्या. कारण सारे बोटीवर किंवा गल्फला नोकऱ्यांना. वर्षातून एकदा आले की मोठमोठ्या ट्रंका भरून सामान आणायचे. कमीत कमी शंभरेक झुळझुळीत साड्या, पंचवीसेक छत्र्या, सुऱ्या, कातऱ्या, परफ्युम्स, साबणं नि काय काय.....
आमच्या घरी कपडे धुण्यासाठी बाई होती. तिच्याबरोबर मी अनेकदा नदीवर जायची. शुक्रवारी ती वैतागायची. म्हणायची, 'आज नदीवर जागा सापडायची नाही, दगड मिळायचा नाही चांगला.' अशावेळी एखादा नवीन दगड शोधावा लागे. तो वापरात नसल्याने घासून घासून साफ करावा लागे. तरी त्याचीच घाण कपड्यांना लागे. असे पुन्हा पुन्हा घासून गुळगुळीत झालेले दगड पुन्हा लवकर येणाऱ्या बाया पटकावत. पण कोणाची तक्रार नसे. कारण ही गर्दी फक्त शुक्रवारी. बाकीच्या दिवशी बायांनी घासून मऊ केलेले हे सारे दगड आपापल्या सख्यांची वाट बघत स्वच्छ, पण कोरडे ठाक पडलेले असायचे. आणि त्यांच्या सख्यांनाही शुक्रवारचा इंतजार असायचा.

कपडे घेऊन घरी गेल्यावर त्या दिवशी घरात त्या बाईला फार काम नसे. बिचारी दिवसभर कपडे धुऊन आलेय याबद्दल सहानुभूती असे. संध्याकाळचं जेवणही घरात राहिलेल्या बाईने शिजवायला घेतलेलं असायचं.


फक्त दगडच नव्हे, तर शुक्रवारी नदी देखील आनंदात थबकायची. संथ व्हायची. दोन्ही काठावरच्या बायांच्या गप्पा, गाणी, क्वचित छोटंसं भांडणं, वादावादी ऐकत. त्यांचे कपडे धुवू लागायची.  आठवडाभराचा तिचा एकटेपणाही भरून निघायचा. एरव्ही ती देखील एकटीच दिवसरात्र पाणी वाहत राहायची. नासिरच्या बायकोसारखीच...!

2 comments:

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...