योगपरिचय -
योग आणि व्यायाम यात फरक -
योग असो वा व्यायाम, आधी तर तुम्हाला फिटनेसची आवड हवी. आपलं स्वतःवर प्रेम हवं. prevention is better than cure या उक्तीवर विश्वास हवा. हे जात्याच नसेल, तर जबरदस्तीने किंवा तात्पुरतं यातील काहीही केल्याने एक परसेंटही फायदा होणार नाही.
तहान लागली म्हणून विहीर खणायला घेत नसतात, तद्वतच काहीतरी आजार झाला, समस्या झाली म्हणून लगेच योग किंवा व्यायाम यापैकी काहीही केल्याने लगेच फायदा मिळणार नसतो. तरीदेखील काही किरकोळ आजार, उदा. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादींवर योगाने त्वरीत आराम मिळतोही अनेकदा.
परंतु योग असो वा व्यायाम यांना आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या आन्हीकांप्रमाणे किंवा दिनचर्येप्रमाणे स्थान दिले तरच तुम्हाला त्याचा सर्वांगीण फायदा मिळू शकतो.
थोडक्यात 'तुरंत दान महापुण्य' असे हे प्रकार नाहीत.
दोन्हीतला फरक जाणून घेण्याआधी आपण दोन्हीचे महत्त्व पाहू या.
योग आणि व्यायाम या दोन्ही संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. मात्र त्यातील साम्य बघितलं तर ते एकच आहे ते म्हणजे दोन्हींची आपल्या जीवनात नितांत गरज आहे. योग केला म्हणजे व्यायामाची गरज नाही असं नाही, आणि व्यायाम केला म्हणजे योग करण्याची गरज नाही असंही नाही. दोन्ही आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या पण आरोग्यासाठीच फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत.
योग, व्यायाम, चालणं आणि प्राणायाम या चारी गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि चारी आपापल्या जागी महत्त्वाच्या आणि फायदेशीर आहेत. त्यामुळे या चारी गोष्टींचा आपल्या दिनचर्येत सहभाग हवा. यासाठी दिवसभरातून आपल्या सोयीने कमीत कमी एक ते सव्वा तास काढला तरी पुरेसा ठरतो. मात्र ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळात करू नये. सकाळी योग आणि प्राणायाम तर संध्याकाळी चालणँ आणि व्यायाम असं अर्धा अर्धा तास विभागणी करू शकतो.
योग आणि व्यायाम यातील फरक -
१. योग केल्याने शरीरातील स्नायू लवचिक होतात. तर व्यायामाने ते स्नायू मजबूत होतात.
२. योगाने चपळता वाढते, तर व्यायामाने स्टॅमिना वाढतो.
३. योग शरीराबरोबरच मनस्वास्थ्यही देते. किंबहुना योग मनस्वास्थ्यावरच अधिक भर देतो. तर व्यायामाचा आणि मनस्वास्थ्याचा तसा काही थेट संबंध नसतो.
४. योग करत असताना मन एकाग्र करण्यावर अधिक भर असतो. तर व्यायाम करताना आपलं शरीर सगळ्या हालचाली करत असतं, पण तेव्हा मन स्थिर असेलच असं नाही. व्यायाम शिकवणारे देखील तुम्हाला मन केंद्रित करा असं सांगत नाहीत सहसा. त्यामुळे तुम्ही एका बाजूला वेट ट्रेनिंग करत असाल मात्र मन तेव्हा सैरभैर इकडे तिकडे फिरत असेल. त्यामुळे तुमचे ताणतणाव, अस्वस्थता हे तसेच राहतील.
५. योग हा संथ, सावकाश आणि स्थिर प्रकार आहे. तर व्यायाम हा जलदगती आणि न थांबता करण्याचा प्रकार आहे.
६. योग करताना मध्ये मध्ये विश्रांती आवश्यक असते. शरीराला पूर्ण विश्रांती देऊनच दुसरं, पुढचं योगासन केलं जातं. व्यायामात मात्र मध्ये अशी विश्रांती फारशी घेतली जात नाही. एकदा का शरीर वॉर्म अप झालं की एका मागोमाग एक व्यायाम जलदगतीने केले जातात.
७. संथ आणि स्थिर गतीने केल्यामुळे योग हा प्रकार दुर्बल, वृद्ध, आजारी, स्त्रिया अशा सगळ्या व्यक्ती करू शकतात. नव्याने शिकू शकतात. मात्र व्यायाम करताना दुर्बल, वृद्ध, स्त्रिया, आजारी यांच्यावर बंधनं येतात. त्यांना सगळ्यांना व्यायाम झेपेलच असं नाही. योग मात्र लहान मुलं सोडल्यास कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. अगदी ऐंशीच्या घरातील व्यक्तीही योग शिकू शकतात. अर्थात त्यांनी करण्याचे वा नव्याने शिकण्याचे प्रकार वेगळे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असतात.
योगदर्शनात श्लोकच आहे -
युवावृद्धोतीवृद्धो वा, व्याधितो दुर्बलोsपि वा |
अभ्यासात्सिदधिमाप्नोती सर्वयोगेष्वतंद्रितः ||
म्हणजेच, तरुण, वृद्ध, अतीवृद्ध, व्याधीग्रस्त, दुर्बल असे सर्व लोक प्रयत्नांनी योग साध्य करू शकतात असे 'हठप्रदिपिका' या योगसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या ग्रंथात स्पष्ट सांगितलेले आहे.
८. योग हा शब्द 'युज्' या धातूपासून आलेला आहे. युज् म्हणजे जोडणे. योग जोडण्याचे काम करतो. हे मूळ जोडणे आत्म्याशी परमात्म्याला स्वरुपातले आहे. अर्थात त्यासाठी आधी माणसाने माणसाशी जोडून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग माणसामाणसाला जवळ आणतो. व्यायामात तसा काही हेतू नसतो. उलट स्नायू बलवान झाले की अहंकार आणि इतरांवर ताकदीचे प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते.
९. व्यायाम केल्यानंतर थकवा येतो. आरामाची गरज भासते. तर योग केल्यानंतर थकवा न येता अजून ताजेतवाने वाटते. योग केल्यानंतर आरामाची गरज नसते. तुम्ही लगेच आपल्या कामाला लागू शकता.
वरील फरकातून व्यायामाला कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही. मी वरती आधीच सांगितलेले आहे, की व्यायामही शरीराला तितकाच गरजेचा आहे. मात्र व्यायाम आणि योग हे दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत, दोन्हीचे फायदे वेगळे आहेत. हे समजून घ्यायला हवे.
अर्थात योग असो वा व्यायाम, या दोन्ही गोष्टी दैनंदिन जीवनात जीवनावश्यक गोष्टी म्हणून त्यांचा कायमसाठी स्वीकार केल्यासच निरामय जीवनाचा आनंद मिळू शकतो. या कधीतरी सवडीने करण्याच्या गोष्टी नव्हेत.
तरीदेखील मनुष्यस्वभाव म्हटल्यावर आपल्याला या गोष्टींचा आळस येतोच. कंटाळा येतो. आज नको उद्या करू असेही होते. मानवी प्रवृत्ती पाहता ही गोष्ट अशी नाहीच, की एकदम उत्साह येईल आणि आपण ती करायला सदैव तयार असू. त्यासाठी मानसिक तयारी करत राहावी लागते. मनाला बजावत राहावं लागतं. हे नाही केलं तर शरीर लवकर साथ सोडू लागेल हे चित्र डोळयासमोर येत राहायला हवं. आज उठता बसताना त्रास होतोय, उद्या चालायला होईल, परवा अंथरुण धरून बसावं लागेल. असे चित्र (ज्यात बऱ्यापैकी वास्तवही आहेच) डोळ्यासमोर आणले की लगेच आपण मॅट टाकून तयारी करतो हा माझा स्वानुभव आहे. आज तर चाळीशीतच लोकांना अनेक व्याधी जडू लागल्या आहेत.
त्यामुळे या आळसावर आणि नकारात्मकतेवर प्रत्येकाने आपापल्या परीने उपाय शोधून काढायचा आहे.
काही गोष्टी मी सुचवते. त्या केल्यास बऱ्यापैकी खंड न पडता या गोष्टी केल्या जातात.
उदा.
- सकाळी उठल्यापासूनच मनाला एकदोनदा बजावून ठेवायचे की सकाळी (किंवा संध्याकाळी, सोयीनुसार) व्यायाम/योग करायचा आहे.
- दोन तीन वेळा जाता येता घरातल्यांशी बोलायचे, 'अजून योग/व्यायाम राहिलाय. करायचाय.'
- योग मॅट/सतरंजी जे असेल ते टाकून ठेवायचे. ते जाता येता दिसल्याने सवड झाली की लगेच करण्याची इच्छा होते.
- एखाद दिवस खंड पडल्यास दुसऱ्या दिवशी मनाला बजावायचे. काल राहिलं, आज चालणार नाही. करायलाच हवं.
- कधी वेळ कमी असेल, तर रोजची सगळी आसने किंवा प्रकार न करता मोजकेच काही प्रकार का होईना पण करून घ्यायचे. संपूर्ण सुट्टी मारायची नाही.
अशाप्रकारे मानसिक तयारी केली तर आठवड्यातून चार दिवस तरी व्यायाम/योग हे केले जातातच. ते केले नाही तर अस्वस्थ वाटेल त्या दिवशी आपण जिंकलो असं समजायचं. योग/व्यायाम यांच्यावर प्रेम बसलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रेमाची व्यक्ती क्षणभरही आपल्या मनातून दूर होत नाही, तसंच हे प्रकार आपल्या मनात ठाण मांडून बसले पाहिजेत. किंवा ज्याप्रमाणे बीपीची गोळी एकदा लागली की आयुष्यभर नाईलाजाने, आठवणीने घेत राहावी लागते. सोडून चालत नाही, त्याचप्रमाणे एकदा योग स्वीकारला की तो सोडायचा नाही असे ठरवून टाकले की होतेच. बाय द वे, योगसाधनेने बीपी शंभर टक्के बरा होतो आणि बीपीची गोळी सुटते. डायबेटीस कंट्रोल मध्ये राहतो. दम्याच्या विकारात आराम मिळतो, थायरॉईड बरा होतो. थायरॉईडची गोळीही सुटते. हे सत्य आहे.
त्यामुळे स्वतः योग करा आणि स्वतः त्याची प्रचिती घ्या.
हे बिनपैशाचे औषध आहे. सुखी निरामय जीवनासाठी. व्यायामासाठी तरी जिम लागते, जिमचे पैसे भरावे लागतात मात्र योगसाधनेसाठी लागते ती फक्त एक मॅट किंवा सतरंजी आणि थोडा आपला वेळ. बाकी पाच पैसेही लागत नाहीत.
जिस को खुद से हो प्यार... वो योग से कैसे करे इन्कार...?