मुंबईचा पाऊस ... ही अनुभवायची चीज आहे..
खरंतर मुंबईचा म्हणायचं... कोकण पट्ट्यात कुठेही..
सध्या लागलाय असाच मुंबईत... नेहमीचंच ते मुंबईची तुंबई होणे, गाड्या बंद पडणे.. सुटी घेऊन घरात बसणे.. शाळा बंद इत्यादी...
पण ह्या समस्या पावसाच्या नाहीत ना... व्यवस्थेच्या आहेत.. त्यासाठी इतक्या सुंदर पावसाला का दोष द्यायचा...
तो तर मस्त धुँवाधार कोसळतो... आसमंत चिंब करतो... तलाव भरतो...
काल बातमी होती की तलावात आठ की पंधरा दिवसच पुरेल इतकं पाणी आहे मुंबईकराना..
आज बहुधा वर्षभर पुरेल इतकं पाणी चारच दिवसात ओतून गेलाय तो...
मुंबईचा पावसाळी आसमंत नेमका बघायचा असेल, तर रीमझीम गिरे सावन हे अमिताभ मौसमीवर चित्रीत झालेलं गाणं बघा... सध्याही तोच आसमंत आहे...
पण मला आठवतोय तो कोकणातल्या खेड्यातला ३०-४० वर्षांपूर्वीचा... पाऊस...
पाऊस सुरू झाला, की तालुक्याशीही संपर्क तुटणार... निदान तीन महिने तरी... धो धो कोसळणार...
चार महिने लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू भरून ठेवायच्या... चुलीतल्या लाकडांपासून ते धान्यापर्यंत सारंच... त्याला आगोटी भरणे हे नाव असायचं.. मे अखेरीस जो तो आगोटी भरण्याच्या गडबडीत... घरं शाकारण्याच्या गडबडीत... एकदा झड सुरू झाली की आठ आठ दिवस अविरत, संतत कोसळणारा पाऊस हा महाराष्ट्राच्या अन्य भागात क्वचितच अनुभवास येत असेल... छोट्या छोट्या नद्यांना, वहाळांना पूर... आमच्या खेड्यावर सातवीपर्यंत शाळा... आजुबाजूच्या अजून छोट्या खेड्यांना जेमतेम पाचवीपर्यंत किंवा शाळाच नाही अशी स्थिती... ती मुलं सहावी सातवीसाठी आमच्या शाळेत येत.. हे वहाळ, ओढे, नद्या ओलांडून... शेताच्या बांधाबांधावर चालत... शिक्षणाची जागृती तेव्हाच झाली होती सुरू... मुली पण येत...
सहावी सातवीतली म्हणजे जेमतेम बाराचौदा वर्षांची मुलं... ना कोणी पालक येत सोडायला.. ना गाडी घोडे... पाच पाच किमीचं अंतर सोबती सोबतीने चालत येत... पण कधी कोणता अनवस्था प्रसंग ओढवला नाही.. कुठलं मूल गायब झालं नाही.. कुठली मुलगी अत्याचाराला बळी पडली नाही... यात सगळ्या जातीतली मुलं असायची..
की कधी कुठल्या मुलाला दप्तराचं ओझं झालं नाही..
आज आई सोडते बस स्टॅन्डवर.. नी बसमधून मुलं शाळेत जातात.. तरी त्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या बातम्या होतात... ही पोकळ पिझ्झा बर्गर वडापाववाली पिढी ... की हॉर्लिक्सवाली...?
असो... ते न दिवस राहिले आता... किंवा असतीलही कुठे कुठे अजून... किंवा आहेतही.. अनिल साबळेचे फोटो आणि पोस्ट दाखवतातच अजून... तेव्हा मला माझं खेडंच आठवतंय...
पावसाचं कौतुक तुम्हाला हो... गोरगरीबांचं काय असा गळा काढतीलच लोक...
बारीश का मिजाज हम से पुछिए
हम.. जो कच्चे मकान के वासी है....
हा शेर आहेच कुणाचा तरी...
पण हाल गरीबांचेच नसतात... मुंबईत कोटी रुपयाचा फ्लॅटही गळतो... ओल घेतो..फ्लॅट, चाळी यांच्या घरातही पाणी शिरते.. आयुष्यभराच्या कमाईचा सत्यानाश करते... मोसमच तसा आहे... इथे निसर्गाविरुद्ध धाब्याची घरं आली... पण धाबे गळतातच इथले... मुंबईत एकवेळ धाब्याला पर्याय नाही म्हणू... पण कोकणातही लोक धाब्याची घऱं का बांधतात देव जाणे... तिथे उतरत्या छपराची, कौलांचीच घरं हवी...
गोरगरीबांचे हाल सगळ्याच ऋतुत असतात... त्याला ऋतु नव्हे, तर माणसं आणि त्यांच्या सगळ्या व्यवस्थाच कारणीभूत असतात..
ऋतु सुंदर असतात..
हिमाचल प्रदेश, भूतान आदी ठिकाणी कधीही अवचित पडणारा पाऊस अनुभवलाय... पण नाही आवडला... तो बर्फासारखा गार, सुयांसारखा तीक्ष्ण पाऊस... एक थेंब पडला अंगावर तर हाडापर्यंत थंडी गेली... कोकणातला पाऊस तसा नाही.. रिमझिम पडो वा मुसळधार... तुम्ही बिनधास्त भिजू शकता... नव्हे भिजतोच आपण... छत्री नुसती असावी म्हणून असते हातात... घरात शिरल्यावर कपडे बदलावेच लागतात महाराज..आणि केस पुसावेच लागतात खसाखसा... आणि घरात कपड्यांचे ढीग साचतात....
असो.. मी या पावसावर कितीही आणि काहीही लिहू शकते.. एन्डलेस... पण वाचणाऱ्याला किती बोअर मारायचं याच्या मी काही मर्यादा ठरवून ठेवल्यात...
----
पाऊस म्हटला की अजून एक गोष्ट आठवते..
महर्षी धोंडो केशव कर्वे कोकणातल्या दापोलीजवळच्या मुरुडचे... छोटंसं खेडं...
त्यांच्या काळी मॅट्रीकची परीक्षा द्यायला कोकणातून मुंबईला यावं लागायचं... साल असेल १८५६-६६ च्या दरम्यानचं काहीतरी.. दिडशे वर्षांपूर्वी...
तेव्हा एसट्या नव्हत्या... रेल्वेचा प्रश्नच नव्हता.. कोकणातली माणसं मुंबईत यायची ती बोटीने फक्त... भाऊच्या धक्क्यावर. बोटीने पोचायलाही दोनदोन तीन तीन दिवस लागायचे...
जूनमध्ये परीक्षा होती बाळ कर्वेची... आणि कोकणातल्या पावसाने इंगा दाखवला.. असा कोसळू लागला की बोटी बंद झाल्या.. पुन्हा कधी सुरू होतील निश्चित नव्हते... परीक्षा जवळ येत चालली होती.. कर्वेंची तडफड सुरू झाली.. काय करावे...
अजूनही काही मुलं होती त्यांच्याबरोबरची..
तिघाचौघांनी ठरवले.. चालत जायचे... मुंबईला... (दापोली ते मुंबई, किमान चारशे किमी अंतर असेल माझ्या अंदाजे)
आणि निघाल्या स्वाऱ्या...
पोचल्या मुंबईला कदम कदम बढाए जा म्हणत... कधी?
आठ दिवसांनी....
पाय सुजून टम्म झाले होते.. पण परीक्षा मिळाली...
हे धडे का नसतात मुलांच्या पाठ्यपुस्तकात...?
(ब्राम्हणांच्या मुलांनाही सगळं सोपं नव्हतं, हेही लक्षात घ्यायला हवं.. भटाबामणांच्या नावाने करवादणाऱ्या लोकांनी. बामणांच्या पहिल्या पिढ्याही कष्टानेच शिकल्या.. माधुकरी मागून शिकल्या.. गाव घर सोडून कुठं कुठं राहून शिकल्या.)
आजच्या मुलांना दप्तराचं ओझं कमी करून हवंय...!
तक्रारींना अंत नसतो.. स्वीडनसारख्या देशाच्या सुविधा मिळाल्या तरी माणूस तक्रारखोर असेल तर तो समाधानी नाहीच राहणार...
आणि हे कर्वे तब्येतीने नाजूक म्हणून प्रसिद्ध होते तेव्हा बरं का.. हा मुलगा फार जगणार नाही असं म्हटलं जात होतं तेव्हा... तो मुलगा १०४ वर्षे जगला... आता बोला...
आणि नुसताच जगला नाही, तर असामान्य कार्य करत जगला.. समाजाच्या विरुद्ध सुधारणा करत जगला... र. धों. कर्वेंसारखा मुलगा जन्माला घालत जगला...
(मला हे कळतच नाही... जिथे शाळा तिथेच परीक्षा का नाही घेतल्या जात ते.. अजूनही शाळा वेगळी आणि परीक्षेचं सेंटर वेगळं...हा काय प्रकार आहे... माझ्यावेळीही दुसऱ्या गावात यायचं सेंटर. किती टेन्शनमध्ये असायची आमची चिमुकली मनं आणि डोकी... कसलंच साधन नसायचं... दिवसाकाठी दोन तीन चालणाऱ्या एसटी... बाकी काहीच नाही... ती बंद पडली की गेलं वर्ष वाया... मुलांसाठी काहीही सोयी केल्या जायच्या नाही तेव्हा... यायचं तर या परीक्षा द्यायला नाहीतर मरा तिकडे...)
- अलका गांधी-असेरकर
No comments:
Post a Comment