Jun 28, 2020

लग्नाचे आमिष आणि त्या अनुषंगाने बरंच काही -

लग्नाचे आमिष आणि  'बलात्कार' -

खूपदा बातम्या वाचण्यात येतात. 'लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार' 'लग्नाचे आमिष दाखवून नऊ वर्षे बलात्कार'. तेव्हा ती बातमी फारच विनोदी वाटते. हो, अगदी मलाही. 
शिवाय अजून विनोद तर पुढेच आहे. अनेकदा या बातम्यांतील स्त्रियांचे वय तिशीच्या पुढे असते. पस्तीस, चाळीस, पंचेचाळीस ते अगदी पन्नासही. 
हा तर कळसच झाला अध्यायाचा. 
एकवेळ अज्ञान, (वयाने आणि शिक्षणानेही) मुलींच्या बाबतीत असं काही घडत असेल तर ते गांभीर्याने घेताही येईल.
पण तिशी उलटल्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार कसा काय होऊ शकतो?
पुन्हा कहर म्हणजे यातल्या स्वतःला व्हिक्टिम समजणाऱ्या स्त्रिया या अनेकदा डिव्होर्सी, विधवा, एकट्या राहणाऱ्या, मुलं असलेल्या, नवऱ्याशी न पटलेल्या अशाही असतात. म्हणजे जीवनाचा बऱ्यापैकी अनुभव घेतलेल्याही असतात. त्या जेव्हा एखादा पुरुष आपल्याशी लग्न करेल या आशेवर त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत असतील आणि तो पुरुष निघून गेल्यावर, वा त्याच्याशी न पटल्यावर त्याच्यावर 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' हा आरोप लावत असतील तर कठीण आहे. मुळात असा आरोप कोर्टात  टिकतो? ह्याबद्दल उत्सुकता आहे. 
त्यातही  'लग्नाचं आमिष दाखवून अमुक वर्षे लैंगिक संबंध ठेवले' असा शब्दप्रयोग जरा तरी समजू शकतो. मात्र लग्नाचं आमिष दाखवून 'बलात्कार' कसा काय असू शकतो बुवा? बलात्कार हा बलात्कार असतो. त्यात कुठलंही आमिष कसं काय असू शकतं (वयाने अज्ञान मुलगी सोडल्यास)
वचन लग्नाचं असो वा सोबत राहण्याचं असो. हे जर काही मागणीवर आधारित असेल, तर तेव्हाच शंका यायला हवी. आणि तशी आली नसेल, तर असे संबंध त्या स्त्रीलाही तितकेच हवेहवेसे वाटले असणार. त्याशिवाय ती त्यात सहभागी होणार नाही. वयाची चाळीशी आली, तरी मानवी स्वभाव, त्यातही पुरुषी स्वभाव, वृत्ती ओळखता येत नसेल, तर आपल्यातच काहीतरी अज्ञान आहे अजूनही. आणि त्याला कारणीभूत आपण आणि आपला समाज आहे. 
त्याही पल्याड, या बातमीत अजून एक असे अधोरेखित होते, की जणू लैंगिक संबंध हे पुरुषालाच हवेसे वाटतात. त्यालाच त्याची गरज असते आणि स्त्री केवळ त्याला साधन म्हणून आपला देह त्याला सोपवते. तसा ती सोपवतही असते अनेकदा. पण तेही तिच्या इच्छेवर, प्रेमावर, समंजसपणावर  ती सोपवत असते. जबरीने नाही. जबरी आली तर बलात्कार आला हे मान्यच. पण प्रत्यक्षात असे नसते. जी स्त्री अमुक इतकी वर्षे लग्नाच्या आमिषावर एखाद्याशी असे संबंध ठेवते तेव्हा तिनेही त्याच्या इतकाच आनंद त्याच्याबरोबर घेतलेला  असतो. त्या त्या क्षणाला तो बलात्कार नसतोच. 
शिवाय यामुळे अजूनही असा एक गैरसमज पसरतो की लैंगिक संबंधात केवळ पुरुषच त्या स्त्रीचा उपभोग घेत असतो. आणि स्त्री मात्र बिचारी, उपभोगाचे साधन म्हणून वापरली जात असते. हा समज समाजात बऱ्यापैकी अजूनही दाट आहे. अनेकदा प्रेमात विशेषतः भारतीय मुलींना सावध केले जाते ते अशा शब्दांत, 'तो तुला वापरून फेकून देईल. सोडून देईल.' यातूनच स्त्रियांच्या मनातही हा समज घर करून असतो की लैंगिक संबंधात आपला 'वापर' केला जातो. आणि पुरुष हा केवळ उपभोगकर्ता असतो. असा समजच मनात किंवा डोक्यात असणं हे अतिशय वाईट आहे. असे संबंध हे एकाच वेळी दोघांनाही सारखाच आनंद देणारे असतात. त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणावे (गरोदरपणा, त्याच्यापासून आजार वगैरे) तर त्यालाही जबाबदार आपला निष्काळजीपणा असतो.
एकेकाळी वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना हे समजू शकतो की अशा संबंधांत स्त्रिया अधिक सफर होत होत्या. पण आता विज्ञान मदतीला असताना असं काही राहिलेलं नाही. तेव्हा असा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. या बाबतीत तरी मी कोणत्याही प्रौढ बाईची तरी बाजू घेणार नाही. 
आणि अजूनही स्त्रिया या बाबतीत अज्ञानी, भोळ्या, निरागस किंवा सरळ मूर्ख म्हणू या, राहत असतील तर त्याला जबाबदार सर्वस्वी त्या स्वतः आहेत. एक तर माणूस ओळखायला शिका, किंवा माणूस ओळखूनही त्याच्याशी संबंध ठेवायचे असतील, तर त्याच्याप्रमाणेच आपला स्वार्थ साधायला शिका. 
थोडंसं हे मान्य आहे, की अशा संबंधात स्त्रियांची, मुलींची बदनामी अधिक होते. तिच्या चारित्र्याच्या नावाने डंका अधिक पिटला जातो. आणि पुरुष नेहमी नामानिराळा राहतो. त्याला फार बदनाम केले जात नाही. हे अगदीच मान्य आहे. पण या चारित्र्य नावाच्या बुजगावण्याला किती भीक घालायची हे आता स्त्रियांनी स्वतःच ठरवायची वेळ आलीय. घाबरलात तर तो भीतीदायक वाटेल, आणि फाट्यावर मारलंत तर ते बुजगावणं आहे हे सिद्ध होईल. 
मात्र अशी प्रकरणे घेऊन स्त्रिया कोर्टापर्यंत जात असतील, तर त्यांना तशी चारित्र्याचीही भीती वाटत असेल असं वाटत नाही. त्या पुरुषाला धडा शिकवण्यासाठीच हे पाऊल त्यांच्याकडून उचललं जातं आणि स्त्री असल्याचं व्हिक्टीम कार्ड खेळलं जातं अनेकदा.
काही वृत्ती या स्त्री आणि पुरुषांच्या नैसर्गिक आहेत. कदाचित नैसर्गिक नसल्या तरी त्या सामाजिकीकरणात का होईना, तशा घडलेल्या आहेत, आणि त्या ओळखता आल्या पाहिजेत. आणि मगच पुढचं पाऊल उचलायचं की नाही ते ठरवता यायला पाहिजे. 
पुरुषांनीही असे संबंध प्रस्थापित करताना लक्षात घ्यायला हवं, की असे संबंध जोडताना स्त्रिया लॉंग रिलेशनशीपची अपेक्षा ठेवतात. त्यांच्यासाठी हे नातं फक्त शारीरिक राहात नाही. ते भावनिकही बनतं. त्यामुळे नात्यात स्पष्टता ठेवा. आपण कितपत आणि किती साथ देऊ शकणार आहोत ते क्लिअर करा सुरुवातीलाच. खोटी आमिषं, जी पूर्ण करता येणार नाहीत अशी दाखवू नका.
थोडक्यात, मैत्री करा, प्रेमात पडा, लैंगिक संंबंध ठेवा. आनंद घ्या, द्या. मात्र परिस्थिती फिरली की व्हिक्टीम कार्ड खेळून स्वतःला आणि समोरच्यालाही त्रास देऊ नये असं वाटतं. नातं काचायला लागलं की सोडूनही देता यायला हवं. पुढचं वळण धरायला हवं. अगदी स्त्रियांनाही ते जमायला हवं... सोपं नाही. पण जमवायचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. पुरुषापेक्षा स्त्रिया भावनिकरित्या अधिक गुंततात त्यामुळे त्यांना ते जड जातं. पण मैत्रिणींनो, आपल्याला जमायला हवं ते.   

- अलका गांधी-असेरकर

Jun 23, 2020

लॉकडाऊन आणि सैपाक -

संकटं आणि स्त्रिया - कंटाळल्यात बायका घरोघरी सैपाकघरात शिजवून. तरी शिजत राहतायत चुलीपुढे घामाच्या धारांतून. कंटाळ्यातून. चिडचिडीतून.
आता कुठं बिचाऱ्या या दशकात जरा जरा बाहेर पडू लागल्या होत्या सैपाकघरातून. बाहेर सगळं मिळू लागलं होतं आयतं वायतं आणि जरा बरं सुद्धा.
कंटाळा आला तर घेऊन येता येत होत्या कोपऱ्यावरच्या पोळीभाजी केंद्रावरून पोळ्या, गरमगरम भाकऱ्या आणि भाजी. एखाद्या संध्याकाळी निवांत जाऊन बसता येत होतं नवरा, पोरं घेऊन कोपऱ्यावरल्या बऱ्याशा हॉटेलात दोसा बिसा खाऊन येता येत होतं.

पण कोणतंही संकट आलं, की त्याचा आधी मार बायकापोरांवर बसतो म्हणतात. कोरोनाच्या ल़ॉकडाऊनने देखील बायांना पुन्हा सैपाकघरात लॉक करून टाकलं. उपाशी राहू शकत नाही, बाहेरचं आणू शकत नाही आणि बहुतांश घरातल्या पुरुषोत्तमांना तर कूकरचं झाकणही लावता उघडता येत नाही अशी स्थिती. त्यात पोरांच्या फरमाईशी. साधं वन डिश मिल फारतर एखाद दिवस चालवून घेतात ती. नंतर भुणभूण सुरू. हे बनव, ते बनव. घरात राहून अजून खाय खाय सुटलेय सगळ्यांना. बाईची खरी मैत्रीण कोण असेल तर ती घरसखी. बाई करीअर, नोकऱ्या करते ते देखील घरच्यांच्या नव्हे तर, या घरसखींच्या जीवावर. आता तीही नाही. भांड्यांचे ढीग पडतायत. काही घरी पुरुष एकवेळची घासून देतात. पण यज्ञात सातत्याने आहुती पडत राहते तशी सिंकमध्ये सतत भांडी पडत नाही राहिली तर सिंकदेवता कोपत असावी बहुधा. शिवाय पुरुषांच्या घरातल्या मदतीकडे अजूनही बोनस म्हणूनच पाहिले जाते.. मिळाला तर वाहवा, न मिळाला तर वाहवा...
तरीही त्यातूनही काहीतरी नवीन म्हणून स्त्रियांनी यु ट्यूबवर नवीन रेसिपि शोधल्या. त्या ट्राय केल्या. पण शेवटी काय तर चुलीपुढेच शिजल्या.
छान राहणं, सजणं, नटणं, चांगलेचुंगले आवडते कपडे घालून फिरणं, मिरवणं, थोडंफार तरी शॉपिंग करणं, पार्लरला आठवड्या पंधरवड्यातून एकदा तरी भेट देणं, मैत्रिणींच्या घोळक्यात हेल्दी गॉसिपिंग करणं, एखादी छोटी मोठी पिकनिक करणं, ही बायकांच्या जगण्याची गरज आहे. विशेषतः गृहीणींची. नोकरीवर जाणाऱ्या बाया आपसूकच हे सगळं करत असतात. पण गृहींणींना अकारण सकारणही हे करावं लागतं. ती त्यांची मानसिक गरज असते. ते केलं नाही, तर त्यांचं सगळं आयुष्य पूर्वीच्या बायकांसारखं घराचा तर सोडाच पण सैपाकघराचा नि माजघराचाही उंबरा न ओलांडता असंच निघून जाईल. या दोनच खोल्यांत. कळकटलेल्या कपड्यांत. केसांच्या अवतारात. क्षणाची पत्नी नि आयुष्यभराची अन्नपुर्णा म्हणूनच गौरवल्या जातील नि मरतील त्या. कोरोनासारख्या परिस्थिती उद्भवत राहिल्या तर. त्यातही ज्या स्त्रिया गेली दहा, पंधरा, वीस, तीस वर्षे गृहिणी म्हणून राहिल्या, त्या आता जरा काही कर्तव्यांतून बाहेर पडून बाहेरच्या दुनियेत रमू लागल्या होत्या. काही नवीन गोष्टी शिकू लागल्या होत्या. फिरू लागल्या होत्या. आपले छंद जोपासू लागल्या होत्या. त्या पुन्हा सैपाक घरात लॉक झाल्या. नि अधिक वैतागल्या.
पुरुषांच्या या गरजा नसतात. ते दोन जोड कपड्यांवर पूर्ण वर्ष काढू शकतात. तेही बाहेर. घरात तर पट्ट्यापट्यांचा एक बर्म्युडा आणि वर एक गंजिफ्रॉक यावर ते आठवडाच काय, आयुष्य काढू शकतात. कारण त्यांना सतत सैपाकघर नसतं. त्यांना बाहेरची दुनिया असते. मन रमवायला. प्रत्येक पुरुष बाहेरच्या दुनियेतले वेगवेगळे टक्केटोणपे सहन करतो. त्यातून समृद्ध होत जातो. मात्र प्रत्येक स्त्री, मग ती मजुराची बायको असो वा साहेबाची, तिला सैपाकघरात स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यातून वेळ मिळाला तर उडा. पण कोरोनाने ते पार्ट टाईम उडणं पण बंद करून टाकलंय गृहीणींचं. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या स्त्रिया तर दुहेरी चक्रात अडकल्यायत. घरचे नि बाहेरचे बॉस सांभाळताना तारेवरची कसरत करतायत.
पुरुष घरात बसूनही ऑफिसची कामं करतायत. पगार घेतायत. उरल्या वेळात टाईमपास करतायत. सोमिवर. वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत.
फार फार तर दारू मिळत नाही, नि मिळाली तर बसायला मित्रमंडळी घावत नाहीत. एवढीच काय ती खंत उरी बाळगत चारी ठाव गिळत तंगड्या पसरणं एवढीच गोची पुरुषांची या कोरोनाने केली असेल तर केलीय.
मी मध्यमवर्गापुरतं बोलतेय. इथं लगेच कामगार नि मजूर नि बेरोजगार घुसडू नका. प्रत्येक वर्गाच्या समस्या असतात. नि त्या वेगळ्या असतात.
आणि या सगळ्या गोष्टी माझ्यावरही आणू नका. मला हॉटेलातलं जेवणच चालत नाही ही माझी कोरोना नसतानाचीही स्थिती होती.
संकटांपुढे, मग ते संकट आस्मानी असो वा सुलतानी, आधी ढाल म्हणून उभं राहावं लागतं ते बायांना. पहिला हल्ला सहन करावा लागतो तो त्यांना. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचेही प्रमाण वाढलेय असं आकडेवारी सांगतेय. आधीच मार खात असलेल्या स्त्रिया आता जास्त मार खातायत. कारण त्यांचे पुरुषोत्तम आता दिवसरात्र त्यांच्या डोक्यावर घरातच बसलेले आहेत. ते त्यांचं सगळं फ्रस्ट्रेशन, नोकरी गेली असेल तर अधिकच, घरातल्या बायापोरांवर काढताहेत.
पुरुष रिटायर्ड होतात. नित्याच्या कामातून, वर्षानुवर्षाच्या कंटाळवाण्या चक्रातून सुटतात. पण बहुतांश स्त्रियांची आजही वय झालं तरी या ड्युटीतून सुटका नसते. त्या कधी सैपाकघरातून रिटायर्ड होतच नाहीत ही वास्तविकता आहे.
लॉकडाऊनच्या या काळात स्त्रिया अधिक डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या डिप्रेशनकडे कधी आजवर गांभीर्याने बघितलंच गेलेलं नाही. त्यांच्या डिप्रेशनला नेहमी बायकांची बडबड, बायकांचे आजार, बायकांचा स्वभाव अशी लेबलं लावून त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय. अनेकदा तर आपण डिप्रेशनमध्ये आहोत हे स्त्रियांना स्वतःलाही कळत नाही. आपणच कुठे तरी घरच्यांच्या अपेक्षांना कमी पडतोय असा गिल्टही त्या बाळगून राहतात. आणि स्वतःकडे दुर्लक्ष करत त्याही तसंच रेटत राहतात. त्यामुळे आताही काही सांगितलं, तर कोरोनाची परिस्थिती काय फक्त स्त्रियाच सहन करतायत का? असे प्रश्न विचारले जातील. अपवाद सगळीकडे आहेत. सगळ्याच स्त्रियांची ही स्थिती नसेल, पण बहुतांश गृहिणींची सध्या हीच परिस्थिती आहे.
पुरुषही सहन करतायत. मात्र दोघांच्या समस्या वेगळ्या आहेत. यात पुरुषांना दोष देण्याचा अजिबात हेतू नाही माझा. निदान या पोस्टमध्ये तरी नाही. आणि ही परिस्थितीही आज ना उद्या बदलेल. मात्र सध्यातरी स्त्रियांच्या या समस्यांकडे गांभीर्याने बघून त्यांना काहीतरी चेंज देणं/मिळणं आवश्यक आहे. कारण आता सहनशक्तीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्या. येत्या काळात अशा परिस्थिती पुन्हा पुन्हा उद्भवू शकतात. तेव्हा त्याची मानसिक आणि व्यावहारिक तयारी आतापासून करायला हवी नि काही बदल घडवायला हवेत. - अलका गांधी-असेरकर
Like
Comment

Jun 20, 2020

योगाला पर्याय नाही - २

योगपरिचय -

योग आणि व्यायाम यात फरक -

योग असो वा व्यायाम, आधी तर तुम्हाला फिटनेसची आवड हवी. आपलं स्वतःवर प्रेम हवं. prevention is better than cure या उक्तीवर विश्वास हवा. हे जात्याच नसेल, तर जबरदस्तीने किंवा तात्पुरतं यातील काहीही केल्याने एक परसेंटही फायदा होणार नाही. 
तहान लागली म्हणून विहीर खणायला घेत नसतात, तद्वतच काहीतरी आजार झाला, समस्या झाली म्हणून लगेच योग किंवा व्यायाम यापैकी काहीही केल्याने लगेच फायदा मिळणार नसतो. तरीदेखील काही किरकोळ आजार, उदा. गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादींवर योगाने त्वरीत आराम मिळतोही अनेकदा. 
परंतु योग असो वा व्यायाम यांना आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या आन्हीकांप्रमाणे किंवा दिनचर्येप्रमाणे स्थान दिले तरच तुम्हाला त्याचा सर्वांगीण फायदा मिळू शकतो. 
थोडक्यात 'तुरंत दान महापुण्य' असे हे प्रकार नाहीत. 

दोन्हीतला फरक जाणून घेण्याआधी आपण दोन्हीचे महत्त्व पाहू या. 
योग आणि व्यायाम या दोन्ही संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. मात्र त्यातील साम्य बघितलं तर ते एकच आहे ते म्हणजे दोन्हींची आपल्या जीवनात नितांत गरज आहे. योग केला म्हणजे व्यायामाची गरज नाही असं नाही, आणि व्यायाम केला म्हणजे योग करण्याची गरज नाही असंही नाही. दोन्ही आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या पण आरोग्यासाठीच फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टी आहेत. 

योग, व्यायाम, चालणं आणि प्राणायाम या चारी गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि चारी आपापल्या जागी महत्त्वाच्या आणि फायदेशीर आहेत. त्यामुळे या चारी गोष्टींचा आपल्या दिनचर्येत सहभाग हवा. यासाठी दिवसभरातून आपल्या सोयीने कमीत कमी एक ते सव्वा तास काढला तरी पुरेसा ठरतो. मात्र ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळात करू नये. सकाळी योग आणि प्राणायाम तर संध्याकाळी चालणँ आणि व्यायाम असं अर्धा अर्धा तास विभागणी करू शकतो. 

योग आणि व्यायाम यातील फरक -

१. योग केल्याने शरीरातील स्नायू लवचिक होतात. तर व्यायामाने ते स्नायू मजबूत होतात. 

२. योगाने चपळता वाढते, तर व्यायामाने स्टॅमिना वाढतो. 

३. योग शरीराबरोबरच मनस्वास्थ्यही देते. किंबहुना योग मनस्वास्थ्यावरच अधिक भर देतो. तर व्यायामाचा आणि मनस्वास्थ्याचा तसा काही थेट संबंध नसतो. 

४. योग करत असताना मन एकाग्र करण्यावर अधिक भर असतो. तर व्यायाम करताना आपलं शरीर सगळ्या हालचाली करत असतं, पण तेव्हा मन स्थिर असेलच असं नाही. व्यायाम शिकवणारे देखील तुम्हाला मन केंद्रित करा असं सांगत नाहीत सहसा. त्यामुळे तुम्ही एका बाजूला वेट ट्रेनिंग करत असाल मात्र मन तेव्हा सैरभैर इकडे तिकडे फिरत असेल. त्यामुळे तुमचे ताणतणाव, अस्वस्थता हे तसेच राहतील.

५. योग हा संथ, सावकाश आणि स्थिर प्रकार आहे. तर व्यायाम हा जलदगती आणि न थांबता करण्याचा प्रकार आहे. 

६. योग करताना मध्ये मध्ये विश्रांती आवश्यक असते. शरीराला पूर्ण विश्रांती देऊनच दुसरं, पुढचं योगासन केलं जातं. व्यायामात मात्र मध्ये अशी विश्रांती फारशी घेतली जात नाही. एकदा का शरीर वॉर्म अप झालं की एका मागोमाग एक व्यायाम जलदगतीने केले जातात.

७. संथ आणि स्थिर गतीने केल्यामुळे योग हा प्रकार दुर्बल, वृद्ध, आजारी, स्त्रिया अशा सगळ्या व्यक्ती करू शकतात. नव्याने शिकू शकतात. मात्र व्यायाम करताना दुर्बल, वृद्ध, स्त्रिया, आजारी यांच्यावर बंधनं येतात. त्यांना सगळ्यांना व्यायाम झेपेलच असं नाही. योग मात्र लहान मुलं सोडल्यास कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. अगदी ऐंशीच्या घरातील व्यक्तीही योग शिकू शकतात. अर्थात त्यांनी करण्याचे वा नव्याने शिकण्याचे प्रकार वेगळे आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असतात.

योगदर्शनात श्लोकच आहे - 
युवावृद्धोतीवृद्धो वा, व्याधितो दुर्बलोsपि वा |
अभ्यासात्सिदधिमाप्नोती सर्वयोगेष्वतंद्रितः || 

म्हणजेच, तरुण, वृद्ध, अतीवृद्ध, व्याधीग्रस्त, दुर्बल असे सर्व लोक प्रयत्नांनी योग साध्य करू शकतात असे 'हठप्रदिपिका' या योगसंबंधी असलेल्या महत्त्वाच्या ग्रंथात स्पष्ट सांगितलेले आहे. 

८. योग हा शब्द 'युज्' या धातूपासून आलेला आहे. युज् म्हणजे जोडणे. योग जोडण्याचे काम करतो. हे मूळ जोडणे आत्म्याशी परमात्म्याला स्वरुपातले आहे. अर्थात त्यासाठी आधी माणसाने माणसाशी जोडून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे योग माणसामाणसाला जवळ आणतो. व्यायामात तसा काही हेतू नसतो. उलट स्नायू बलवान झाले की अहंकार आणि इतरांवर ताकदीचे प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते. 

९. व्यायाम केल्यानंतर थकवा येतो. आरामाची गरज भासते. तर योग केल्यानंतर थकवा न येता अजून ताजेतवाने वाटते. योग केल्यानंतर आरामाची गरज नसते. तुम्ही लगेच आपल्या कामाला लागू शकता.

वरील फरकातून व्यायामाला कमी लेखण्याचा अजिबात हेतू नाही. मी वरती आधीच सांगितलेले आहे, की व्यायामही शरीराला तितकाच गरजेचा आहे. मात्र व्यायाम आणि योग हे दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत, दोन्हीचे फायदे वेगळे आहेत. हे समजून घ्यायला हवे. 

अर्थात योग असो वा व्यायाम, या दोन्ही गोष्टी दैनंदिन जीवनात जीवनावश्यक गोष्टी म्हणून त्यांचा कायमसाठी स्वीकार केल्यासच निरामय जीवनाचा आनंद मिळू शकतो. या कधीतरी सवडीने करण्याच्या गोष्टी नव्हेत.

तरीदेखील मनुष्यस्वभाव म्हटल्यावर आपल्याला या गोष्टींचा आळस येतोच. कंटाळा येतो. आज नको उद्या करू असेही होते. मानवी प्रवृत्ती पाहता ही गोष्ट अशी नाहीच, की एकदम उत्साह येईल आणि आपण ती करायला सदैव तयार असू. त्यासाठी मानसिक तयारी करत राहावी लागते. मनाला बजावत राहावं लागतं. हे नाही केलं तर शरीर लवकर साथ सोडू लागेल हे चित्र डोळयासमोर येत राहायला हवं. आज उठता बसताना त्रास होतोय, उद्या चालायला होईल, परवा अंथरुण धरून बसावं लागेल. असे चित्र (ज्यात बऱ्यापैकी वास्तवही आहेच) डोळ्यासमोर आणले की लगेच आपण मॅट टाकून तयारी करतो हा माझा स्वानुभव आहे. आज तर चाळीशीतच लोकांना अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. 
त्यामुळे या आळसावर आणि नकारात्मकतेवर प्रत्येकाने आपापल्या परीने उपाय शोधून काढायचा आहे.

काही गोष्टी मी सुचवते. त्या केल्यास बऱ्यापैकी खंड न पडता या गोष्टी केल्या जातात.

उदा. 
  • सकाळी उठल्यापासूनच मनाला एकदोनदा बजावून ठेवायचे की सकाळी (किंवा संध्याकाळी, सोयीनुसार) व्यायाम/योग करायचा आहे. 
  • दोन तीन वेळा जाता येता घरातल्यांशी बोलायचे, 'अजून योग/व्यायाम राहिलाय. करायचाय.'
  • योग मॅट/सतरंजी जे असेल ते टाकून ठेवायचे. ते जाता येता दिसल्याने सवड झाली की लगेच करण्याची इच्छा होते. 
  • एखाद दिवस खंड पडल्यास दुसऱ्या दिवशी मनाला बजावायचे. काल राहिलं, आज चालणार नाही. करायलाच हवं.
  • कधी वेळ कमी असेल, तर रोजची सगळी आसने किंवा प्रकार न करता मोजकेच काही प्रकार का होईना पण करून घ्यायचे. संपूर्ण सुट्टी मारायची नाही. 
अशाप्रकारे मानसिक तयारी केली तर आठवड्यातून चार दिवस तरी व्यायाम/योग हे केले जातातच. ते केले नाही तर अस्वस्थ वाटेल त्या दिवशी आपण जिंकलो असं समजायचं. योग/व्यायाम यांच्यावर प्रेम बसलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रेमाची व्यक्ती क्षणभरही आपल्या मनातून दूर होत नाही, तसंच हे प्रकार आपल्या मनात ठाण मांडून बसले पाहिजेत. किंवा ज्याप्रमाणे बीपीची गोळी एकदा लागली की आयुष्यभर नाईलाजाने, आठवणीने घेत राहावी लागते. सोडून चालत नाही, त्याचप्रमाणे एकदा योग स्वीकारला की तो सोडायचा नाही असे ठरवून टाकले की होतेच. बाय द वे, योगसाधनेने बीपी शंभर टक्के बरा होतो आणि बीपीची गोळी सुटते. डायबेटीस कंट्रोल मध्ये राहतो. दम्याच्या विकारात आराम मिळतो, थायरॉईड बरा होतो. थायरॉईडची गोळीही सुटते. हे सत्य आहे. 
त्यामुळे स्वतः योग करा आणि स्वतः त्याची प्रचिती घ्या. 

हे बिनपैशाचे औषध आहे. सुखी निरामय जीवनासाठी. व्यायामासाठी तरी जिम लागते, जिमचे पैसे भरावे लागतात मात्र योगसाधनेसाठी लागते ती फक्त एक मॅट किंवा सतरंजी आणि थोडा आपला वेळ. बाकी पाच पैसेही लागत नाहीत.

जिस को खुद से हो प्यार... वो योग से कैसे करे इन्कार...?


Jun 19, 2020

योगाला पर्याय नाही.


योगपरिचय - थोडक्यात.

आपण भारतीयांना योग हा शब्द सुपरिचित असतो. साधारण गेल्या वीसेक वर्षांपासून तर योग हा शब्द अगदी सर्वसामान्यांनाही माहीत झालेला आहे. आणि त्याला कारणीभूत म्हणजे रामदेवबाबांसारखे काही योगप्रचारक.
रामदेवबाबांच्या कार्याबाबत मतभेद असले, तरी त्यांनी योग हा घरोघरी पोचवला हे त्यांचे मोठे कार्य  आहे यात दुमत नाही. 
तोपर्यंत योगसाधना म्हणजे कुणी ऋषीमुनी, साधक, तापसी यांनीच करायची गोष्ट अशी समजूत असायची. 
आजही आणि अजूनही योग म्हणजे फार कठीण गोष्ट, ते आपलं काम नव्हे असे म्हणून हात झटकणारे लोकच अधिक पहावयास मिळतात.
 
त्याला कारणही तसेच होते. पूर्वी योग म्हणजे साधक, तपस्वी, ऋषी-मुनी यांनी करण्याचीच गोष्ट होती. 
याला कारण म्हणजे, योग हा मोक्षप्राप्तीकडे नेणारा मार्ग म्हणूनच त्याची आध्यात्मिक ओळख होती. त्याच हेतूने योग शिकला जायचा. आणि त्यासाठी संसाराकडे दुर्लक्ष करणे किंवा संसाराच्या भानगडीतच न पडणे, दूर हिमालयात किंवा जंगलात कुठेतरी एकांतवासात जाऊन गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करणे आणि त्यातून खडतर तपश्चर्या करत मोक्षाची आस लावून बसणे हाच योगाचा हेतू असायचा. त्यामुळे अजूनही लोकांचा तसा ग्रह असल्यास नवल नाही. 
मात्र आता विज्ञानयुगात तसे फारसे राहिलेले नाही. म्हणजे हिमालयात योगसाधना, तपश्चर्या करणारे साधूमुनी अजूनही बरेच आहेत. पण याचा अर्थ असा नाही की योग ही फक्त मोक्षाच्याच हेतूने करण्याची साधना आहे.
उलट आता विज्ञानयुगात योगविद्येकडे वेगळ्या, आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जात आहे. आणि या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांना रोजचे आयुष्य सुखकारक करण्यासाठी केला जात आहे.  लोक अधिकाधिक योगविद्येकडे वळू लागले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर याचा प्रसार आणि अंगीकार मोठ्या जोरात चालू आहे. 

-----

मोक्ष, अध्यात्म, साधना इत्यादी जडजंबाल हेतूकडून योग सर्वसामान्यांकडे कसा आला?

वर सांगितल्याप्रमाणे हे खरंच आहे, की योगमार्ग हा मोक्षाचा, आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रवास करणारा मार्ग म्हणून भारतीय दर्शनशास्त्रात महत्त्वाचा होता. मात्र या प्रवासात योगाचा मधला टप्पा जो येतो, तो मानवी शरीराला निरोगी, सुडौल, चपळ, तरतरीत ठेवणारा आहे. एवढेच नव्हे, तर शरीराच्या जोडीला मनालाही स्वास्थ्य़ मिळवून देणारा आहे. मोक्षाच्या दिशेने वाटचाल ही मनावर नियंत्रण ठेवण्यापासून सुरू होते. आणि मोक्ष हा जरी हेतू नाही ठेवला तरी आताच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या, स्पर्धेच्या युगात मनावर नियंत्रण हेच अधिक महत्त्वाचे झालेले आहे. 
आपण पाहतोय, की आज मानसोपचारतज्ज्ञांची गरज समाजात किती निर्माण झाली आहे ते? आणि हा मार्गही माणसाला पूर्ण मानसिक शांतता देऊ शकत नाही. गोळ्या औषधे, काऊन्सिलिंग इत्यादींनी तात्पुरते बरे वाटते. मात्र मनाचे स्वास्थ्य पूर्ण मिळत नाहीच. 
म्हणूनच योग आणि प्राणायाम हे शिकून घेऊन प्रत्येक व्यक्ती आपली आपण मनावर नियंत्रण ठेवायला आपोआप शिकू लागते. आणि ताणतणावांपासून मुक्त होते इतकंच नव्हे, तर चांगलं सुदृढ आयुष्य जगू लागते. आपल्याला ठाऊकच आहे, की बहुतेक शारीरिक व्याधी या आपल्या मनस्वास्थ्याशी निगडीत असतात. उदा. नव्या युगातील डायबेटीस, बीपी, कॉलेस्ट्रोल, थायरॉईड, कॅन्सर इत्यादीसारखे अनेक जीवघेणे आजार हे थेट आपल्या मनाशी, मानसिक ताणतणावांशी निगडीत आहेत. आधुनिक औषधांनीही ते नियंत्रणात राहतात मात्र पूर्ण बरे होत नाहीत. अशावेळी योग हाच एकमेव मार्ग तुम्हाला यातून सुटका मिळवून देऊ शकतो. अर्थात हे आजार होण्याआधीच ते होऊ नयेत म्हणून वेळीच योगमार्ग स्वीकारा आणि अशा आजारांना दूर ठेवा.

योगाचा हा शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळवून देणारा टप्पाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण तेवढ्यापुरताच त्याचा विचार करायचा आहे. म्हणूनच यात देव, धर्म, श्रद्धा, आस्तिकता इत्यादी काहीही मध्ये न आणता सर्व जातीधर्मातल्या लोकांनी योगविद्येची कास धरायला हवी. 

----

योगाबद्दलचे गैरसमज -
आपण योगासने बघतो, ती तज्ज्ञांनी केलेली. यु ट्यूब, इतर कार्यक्रम यांतून आपण अवघड अवघड आसनं करणाऱ्या व्यक्ती पाहतो आणि आपण घाबरतो. हे आपल्याला जमणार नाही असे आपण मनाशीच ठरवतो. आणि योगविद्येबद्दल अनेक गैरसमज मनाशी बाळगून बसतो.

१. योग म्हटले की काहीतरी अवघड काम, शरीराला त्रास, शरीराला वेडेवाकडे वळवणे असा समज अनेकांचा असतो.
 (योग हे सोप्याकडून अवघडाकडे नेणारे शास्त्र आहे. सुरूवातीला अगदी सोपी सोपी आसने शिकवली जातात. ज्याप्रमाणे लहान बालकाला आधी पहिलीत घातले जाते. मग हळू हळू अभ्यास, मेहनत, परीक्षा याने तो पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पोचतो. तसंच यातही आहे. आणि आपल्याला योग्य तेवढेच, आणि तितकेच यातून हवं ते घेऊ शकतो. ज्याप्रमाणे सगळे विद्यार्थी सायन्स, कॉमर्स आर्ट्स ह्या सगळ्या शाखातले ज्ञान घेत नाहीत. आणि सगळेच उच्चशिक्षणापर्यंत पोचत नाहीत. गरजेपुरतंच घेतात. तसंच यातही आपल्या गरजेपुरती आसनं शिकून त्याचाच सराव करू शकतो आणि स्वतःला फिट ठेवू शकतो. योग हा एक मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. सागर आहे. त्यातच मास्टरी करायची म्हटली तरी एक जन्म पुरणार नाही. पण म्हणून आपल्याला ते सगळंच करायचं आहे असं नाही. आपल्याला फक्त आपल्या गरजेपुरतं पाणी त्यातून शेंदून घ्यायचं आहे.)

२. योग म्हटलं की बारीक, तरुण, सडसडीत लोकांचे काम, आपल्यासारख्या जाड्या लोकांचे, वय झालेल्यांचे ते काम नाही असे वाटणे.
 (कोणत्याही वयातली व्यक्ती आणि कितीही वजन असलेली व्यक्ती योग करू शकते. अगदी लहान मुले आणि गरोदर स्त्रिया, नुकतेच ऑपरेशन झालेल्या, आजारातून उठलेल्या व्यक्ती या सोडून बाकी अगदी ८० वर्षांची व्यक्तीही नव्याने योग शिकायला सुरूवात करू शकते.)

३. योग म्हणजे संसार सोडून, विरागी भाव अंगीकारणे असा एक गैरसमज. 
(आज तर संसारी माणसालाच योगविद्येची गरज अधिक आहे.)

४. योग म्हणजे खाण्यापिण्यावर बंधने, चमचमीत खाणंपिणं सोडून द्यावं लागणार असा एक गैरसमज.
(योग खाण्यापिण्यावर बंधने घालत नाही. तुम्हाला जर काही आजार नसतील, आणि त्या आजाराची पथ्य नसतील, तर योग हे खाऊ नका, ते खाऊ नका असलं काहीही सांगत नाही. अर्थात तुम्ही स्वतः होऊनच जर योग्य आहारविहार जपलात तर योगाचे फायदे अधिक मिळतील एवढंच.)

५. योग म्हणजे दूर कुठेतरी एकांतात राहून साधना करणे हा एक गैरसमज.
 (एक रुमच्या घरातही तुम्ही नित्यनेमाने योग करू शकता. 

६. योग म्हणजे खूप वेळ दयायला हवा, नोकरी व्यवसाय करणाऱ्या, मुलंबाळात व्यस्त असणाऱ्या गृहस्थी लोकांना वेळ कसा मिळणार असा एक गैरसमज बाळगणे.
(असा विचार केला तर आंघोळ, ब्रश करणे, आन्हिके उरकणे, घरातली साफसफाई करणे, शांतपणे बसून जेवणे ह्यातलेही काही करायला नको. हे सगळं जितकं महत्त्वाचं आणि दैनंदिन आहे तितका नि तेवढाच वेळ दैनंदिन योगाला दिला की झालं. त्यासाठी तासंतास काढायची गरज नाही.)

७. योगासाठी अमुकच प्रकारचे कपडे घालावे लागणार असं वाटणे.
 (अगदी साडीतही योग केला जाऊ शकतो.)

८. योग म्हणजे वजन कमी करण्याचा मार्ग - ( हा त्याचा एक परिणाम असू शकतो. मात्र वजन कमी करण्यासाठी योगविद्येचा उपयोग थेट आणि त्वरीत होत नाही.)

आज एवढं पुरे. पुढच्या लेखात भारतातील योगविद्येचा इतिहास, मागोवा, त्यांचे कर्ते, ग्रंथ इत्यादींचा थोडक्यात आढावा घेऊ. 
आणि त्याच्या पुढच्या लेखात योग आणि व्यायाम यातील फरक समजावून घेऊ.
आणि त्यापुढील लेखात भारतात योगविद्या शिकवणाऱ्या संस्था आणि वर्ग यांच्याबद्दल जुजबी माहीत घेऊ.

अलका गांधी-असेरकर.


Jun 17, 2020

तांदळाच्या भाकरी -

भाकरी नि मी.. तांदुळाच्या भाकरी.. फुटबॉल सारखी फुगली नाही तर ती भाकरीच नाही..
आठवीत असताना मी भाकरी करायला शिकले. म्हणजे 13 व्या वर्षी.
कोकणातल्या माझ्या गावी घरोघरी उरलेले पुरुष सकलशीच तांदलाच्या भाकरी नी कोरड्यास खाऊन निघायचे. उरलेले एवढ्यासाठी म्हणायचे की गावात बहुसंख्येने मुस्लिम. त्यातले घरोघरचे बहुतेक पुरुष बोटीवर, नाहीतर गल्फ कंट्रीजमध्ये कामाला. बाकी बायकांचंच राज्य. घरी इक्का-दुक्का पुरुष उरलेले असायचे. तेही आळीपाळीने काम मिळालं की बोटीवर जायचेच. मग हे उरलेले भैरव सकलच्या येष्टीनी तालुक्याच्या गावी निघायचे तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी खाऊन. अर्थात ते भाकरी न म्हणता, रोटी म्हणत. हे जवळपास रोजचच नैमित्तिक कर्तव्य होतं त्यांचं जणू. असलेली नसलेली कामं काढून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावी फेरफटका मारून यायाचा. त्याने ते अपडेटही राहत त्या काळात. तिथं कोर्ट कचेऱ्या नी 12 भानगडी काय असतील त्या उरकून दीरच्या येस्टीन परत यायाचा नी मंग भात नी म्हावऱ्याचा कालवण खाऊनशान झोपायचा संध्याकाल पर्यंत.
काही थोडे बहुत भाकर खाऊन शेतावर जायचे. शेतं म्हणजे काय छोटी छोटी भाताची खाचरं. तिथं काय देशावरच्या शेतासारखी ट्रॅक्टर्स फिरत नव्हती. पण बैलं असायची. त्यांना चारायला, पाणी पाजायला, नांगरटणीला अशी कामं असायचीच थोडी फार.
तांदळाच्या भाकरी जिला एकदम पातळ, फुगलेल्या नि एकही काळा डाग नसलेल्या पांढऱ्या शुभ्र करता येतील ती सुगरण. लग्न कार्यात त्यांच्याकडे टोपले भरभरून भाकऱ्या थापल्या जायच्या नि एका बाजूला निवडायला बाई बसलेली असायची. जराही काळा डाग असलेली भाकरी बाजूला काढून ठेवायची. पुरुषांना, महत्त्वाच्या पाहुण्यांना त्या डागवाल्या रोट्या नाही वाढायच्या.
आमच्या घरी काही ही पद्धत नव्हती. आम्ही इतकी वर्ष राहूनही सकाळचा नाश्ता गुजराती थेपल्यांचाच करत होतो. या बाबतीत गुजराती लोक मुस्लिम लोकांहून कट्टर. पण तरीही संध्याकाळच्या जेवणात तांदळाच्या भाकरी नि कडधान्यांची आमटी खात असू. रोजच. नाईलाज होता. गहू फार मिळत नव्हते नि हिरव्या भाज्यांची वानवा होती म्हणून केवळ.
आठवीत तालुक्याच्या गावी मामांकडे राहायला आले. शिक्षणासाठी. मामी तर खूपच चांगल्या होत्या. तरी त्या आईसारखे लाड थोड्याच करणार होत्या. सातवीपर्यंत सकाळी नऊ वाजता उठल्यावर इथं आई हातावर मंजन आणून द्यायची. मग आम्ही दात घासण्याचे उपकार तिच्यावर करत असू.
आणि आठवीत थेट भाकरीच भाजायला शिकले मामीच्या हाताखाली. या अशा टम्म भाकरी कशा फुगवायच्या. तेही कोळशाच्या शेगडीवर हे मामींनी शिकवले. आणि आई करत असतानाचं निरीक्षण होतंच. मी पहिल्याच प्रयत्नात भाकरी मस्त फुगवली ते केवळ निरीक्षणाच्या जोरावर. आणि मामी पण आश्चर्यचकीत झाल्या. त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं.
- तेव्हापासून आजवर भाकरी थापण्याशिवाय दुसरं काहीही उत्तम करता आलं नाही. गृहिणीपद चिकटलं ते आजतागायत.
पुढच्या जन्मी मात्र अजिबात सैपाकघरात जायचं नाहीय मला. पुढच्या जन्मी मला उद्योगपती व्हायचंय नि भरपूर पैसा कमवायचाय. स्वतःच्या जोरावर.
- अलका गांधी-असेरकर



Jun 16, 2020

Marathi Poems by Alka gandhi-Aserkar




दोन कविता -

१. फरक
२. धर्मसंस्थापक

Jun 13, 2020

प्रेमप्रकरणांतून खुनाची दुसरी महत्त्वाची बाजू -

विराज जगतापचा खून जातीयवादातून झाला. आज या घटनेकडे जातीभेदाच्या चष्म्यातूनच बघितले जाते. ते मान्यही आहे. जातप्रश्न उग्र आहेच. तरी देखील..
नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष होतंय.
ती बाजू आहे मुलींची...
आपल्या घरातील मुलींनी कोणाशी लग्न करायचं, कोणावर प्रेम करायचं, कोणाशी मैत्री ठेवायची, कोणाशी नाही... हे अजूनही हा पितृप्रधान समाजच ठरवतोय.
आणि हा एकच किस्सा नाही.
अशा बातम्या दर दोन पाच महिन्यांनी येतच असतात.
शिवाय या उघडकीला येणाऱ्या बातम्या. न उघडकीला येणारे असे अनेक किस्से घडत असतील भारताच्या कानाकोपऱ्यात.
चारच दिवसांपूर्वी मी याच विषयावर एक पोस्ट लिहिली होती फेसबूकवर. की मुलींच्या किंवा स्त्रियांच्या बाबतीत जात, धर्म हेच केवळ महत्त्वाचे नाही ठरत. किंवा मुलींनी केवळ दुसऱ्या जातीत किंवा धर्मात लग्न करायचं म्हटलं तरच विरोध होतो असं नाही. तर अजूनही मुलींनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे म्हटले की घरच्यांना, कुटुंबियांना, समाजाला चालत नाही. अगदी स्वजातीत, स्वधर्मातही आपल्या मर्जीने लग्नं ठरवलेली घरच्यांना आणि विशेषतः घरातल्या पुरुषांना पसंत पडत नाहीत. हीच बहुसंख्य ठिकाणी वृत्ती दिसून येत असते.
तेव्हा त्या पोस्टवर अपेक्षेप्रमाणेच 'आता असं कुठं राहिलंय, तू कुठलं लिहितेस, कुठल्या काळातलं लिहितेस हे ठराविक आपल्या शहरी, सुखासीन कॉर्पोरेट जगात डोळे मिटून दूध पिण्याचं सुख घेणाऱ्या अनेक लोकांना वाटलं होतंच.
अर्थात झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवून दुनिया दाखवता येत नाहीच.
त्यामुळे हे मी त्यांच्यासाठी लिहित नाहीच...
पण जेव्हा जेव्हा प्रेमप्रकरणात एखाद्या मुलाचा खून होतो, किंवा एखादा मुलगा मार खातो, तेव्हा तेव्हा त्यामागे एकेका मुलीचा दडपून टाकलेला निर्णय आणि दडपलेले निर्णयस्वातंत्र्यही असतं. त्यावर फारच कमी बोलले जाते.
म्हणजे अजूनही जात धर्म याच गोष्टी चर्चेसाठी महत्त्वाच्या ठरतात. स्त्रियांचे निर्णयस्वातंत्र्य ही चर्चेची गोष्टच नसते.
जर मुलाला मारता आले नाही, तर अशावेळी मुलींनाच मारून टाकले जाते. अगदी पोटच्या मुलीलाही. तर परक्या मुलाला मारणं त्यांना सहज असणार त्यात नवल ते काय? आता डिसेंबर २०१९ मधलीच कल्याणची तिवारी केस याचे उदाहरण आहे. बापाने मुलीचे प्रेमप्रकरण न पटल्याने तिला मारून तिचे तीन तुकडे करून ते बॅगेत भरून फेकून दिले होते...
आणि सख्ख्या भावाने, बापाने अशा प्रकरणात मुलींना मारून टाकल्याच्या अशा बातम्याही चार सहा महिन्याच्या अंतराने येतच असतात.. तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात. तर इतर यूपी, बिहार, राजस्थान, हरयाणा सारख्या राज्यांतून काय काय घडत असेल? त्यांच्या तर बातम्याही होत नाहीत. अशा बातम्या या केवळ हिमनगाचे एक टोक असते.
पितृप्रधान समाजाला स्त्रियांचे स्वयंनिर्णयच मान्य नाहीत कुठले... यात जाती धर्माचा काही संबंधच नाही. मुलींनी यांच्या दाव्याला, खुंट्याला बांधून राहायचे. ते सांगतील तिथं जायचे ही वर्चस्ववादी वृत्ती समाजात अजूनही जैसे थे आहे. आणि त्याला कोणतीही जात नि कोणताही धर्म अपवाद नाही, अपवाद वगळता.
आमच्या लहानपणी तर, 'मारून टाकायला हवे अशा पोरींना' असं सहज बोलले जायचे. आमच्या समोरच. त्यामुळे मुलींवर एक धाक, एक दहशत आपोआप बसायची. लग्न तर आईबाबा म्हणतील तिथंच करायचे. ते सांगतील तेव्हाच घराबाहेर जायचे, नि ते सांगतील तसेच कपडे नेसायचे हेच मुलींचे संस्कार. तीच खरी आदर्श मुलगी. हे अगदी धातूवर कोरीव काम केल्याप्रमाणे ठसवले जायचे.
इतकंच कशाला, फेसबूकसारख्या सोशल माध्यमांवरून स्त्रीवादावरच्या चर्चेत देखील पुरुषच आक्रमकपणे निर्णय घेतात. कशाला स्त्रीवाद म्हणायचे नि कशाला नाही ते. स्त्रियांना काय हवे, त्यांच्यासाठी काय योग्य काय अयोग्य तेही पुरुषच ठरवू लागतात. आणि अनेक स्त्रियाही त्यांच्या होला हो करताना दिसतात. वरवर हे दिसायला सौम्य वाटते. परंतु यामागे पितृप्रधानतेची वर्चस्ववादी वृत्तीच असते, जी वेळ पडली की असे गंभीर स्वरूप धारण करते.
आजही, आणि अगदी मुंबई-पुणेसारख्या शहरातही, कित्येक मुलींनाआपल्या मर्जींनी लग्नं ठरवू दिली जात नाहीत. प्रेमात पडलेल्या मुलींना कधी धाकदपटशा, कधी मारहाण, कधी इमोशनल ब्लॅकमेलिंग करून निर्णयापासून परावृत्त केले जाते.
प्रेमप्रकरणात कित्येक वेळा मुली आत्महत्या करायच्या. अवतीभवती बरेच किस्से असे पाहतच मी मोठी झालेय. अशा प्रत्येकवेळी समाज हेच म्हणायचा, 'बरं झालं मेली.. आईबाबांची ईज्जत घालवण्यापेक्षा.'
या अशा यांच्या इज्जतीच्या व्याख्या.
ज्या लोकांना विराजचा खून दिसतो, त्या लोकांना समोर एक मुलीचा निर्णय दडपला गेलाय, कुणाशी मैत्री करायची नि कुणाशी नाही, इतके साधे निर्णय देखील ती घेऊ शकत नाही. जातीभेदाच्या बेड्या तोडू पाहणाऱ्या अशा स्त्रियांना दडपून ठेवले जातेय, तिच्या स्वातंत्र्याचाच बळी पडलाय ते दिसतच नाही. त्यावर चर्चाच नाही?
- अलका गांधी-असेरकर
Like
Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...