Aug 17, 2020

श्रावण, सोमवार आणि त्यानिमित्ताने बरंच काही...

 श्रावण, सोमवार आणि बरंच काही...

माझं माहेर वैष्णव. तिथं फक्त श्रीकृष्ण भजला जात होता. देवी, शंकर, इतकंच कशाला विष्णूची इतर रुपं पण वर्ज्य होती. राम बिम कुछ नही. श्रीकृष्ण एके श्रीकृष्ण. 'जय श्रीकृष्ण' हे आजही भेटल्यावर बोलायचं गुजराती वैष्णवांचं परवलीचं वाक्य. पण आता ते माझ्या तोंडून येत नाही. कारण मी मराठी झालेय आता.
त्यामुळे घरात बाकी उपास तापास, व्रतं, वैकल्यं, पुजा, कर्मकांडं काही करता काही नव्हतं. एकादशी तीही फक्त घरातले म्हातारे कोतारे करायचे. तेही खाऊन पिऊन. वर म्हणायचं, देहाला कष्ट द्यायचे नाहीत, असं कृष्णाने सांगितलंय.
अर्थातच श्रावण बिवण नव्हता, नि त्यातले कोणते वारही नव्हतेच.
पण कोकणात राहात होतो. त्यामुळे वाण नाही पण गुण लागला होता. गाव तर जवळपास मुस्लिमांचं. एकेकाळी ते हिंदूबहुल असेल कदाचित. कारण गावात तीन मंदिरं होती. एक वरच्या अंगाला मारूतीचं. दुसरं खालच्या अंगाला काळभैरवाचं. नि तिसरं गावच्या कोंडावर. तिथूनही पुढे गावाच्या बाहेर. एक छोट्याशा टेकडीवर शंकराचं.
तिन्ही मंदीरं निवांत होती. कोणी भक्त अकारण सकारण तिन्ही देवांच्या वाटेला जात नव्हते. मारुतीला फक्त चैत्रात जत्रा भरायची त्याच्या नावे म्हणून. काळभैरवाच्या मंदिरात श्रावणात भागवत सप्ताह वाचला जायचा. तेही रात्री. दिवसा कोणी रिकामटेकडे नव्हते. नि शंकराला श्रावणात कदाचित जात असतील लोक. कदाचित एवढ्यासाठी की मी तरी पाहिलं नव्हतं कुणाला जाताना.
मात्र शंकराच्या मंदिराभवती स्मशान होतं. अगदी त्याच्या पायरीला लागूनही पुरलेल्या माणसांच्या समाध्या होत्या.
पुरलेल्या?
बहुधा होच. त्यावेळी त्या गावातले हिंदू सगळे गरीब होते. कुणी मेलं तर जाळायला तेवढी लाकडं नसायची. विकत मिळायला सोय नव्हती. त्यामुळे शंकराच्या टेकडीवर पुरून मोकळं व्हायचं. ज्यांना शक्य होत असेल ते जाळतही असतील कदाचित. देव जाणे. गाव फार लहान. पाचेकशे घरांचं असेल फारतर. मुस्लिम लोकांचं कब्रस्तान लांब होतं फार. हिंदू तर गिनेचुनेच उरले होते.
त्यात आम्हा गुजरात्यांची सात-आठ घरं. श्रीमंत नव्हती. तीही गरीबच होती. पण खाऊन पिऊन होती. आणि गुजरात्यांच्या आवारात मागल्या दारी लाकडांची सोय करून ठेवलेली असायची. घरात म्हातारी कोतारी माणसं असायची. ऐनवेळी लाकडं कुठून आणणार म्हणून. मोठाली लाकडं राखीव ठेवून दिलेली असायची.
आज मागे वळून पाहता वाटतं, किती प्रॅक्टीकल होते तेव्हाचे लोक. आपला क्रूस आपल्यासोबत म्हणतात ते हेच का? अशा त्या खेड्यावर आम्ही एक दोन वर्ष नव्हे, तर पाच पिढ्या राहिलो.
तर विषय होता श्रावणी सोमवारचा. घरात शंकराचं प्रस्थ नव्हतं. पण ज्येष्ठात पाऊस बसला की कंपलसरी लॉकडाऊन असायचा सगळ्यांना. फक्त शेतावर काम करणारे लोक सोडून. म्हणून श्रावणात जरा पाऊस कमी झाला की घरातल्या बायकांना बाहेर पडण्यासाठी एक निमित्त असायचं. चला शंकराच्या मंदिरात जाऊ सोमवारी. मग एका सोमवारी सगळ्या गुजराती बायका निघायच्या. दुपारी चारच्या सुमारास.
सोबत दुकानातलाच नारळ घ्यायचा एक फक्त. बास.
आधी कोंडावर जायचं. कोंडावर ब्राम्हणाचं एक घर. जोशीबुवा, त्यांची बायको आणि एकुलता एक मुलगा.
तेही त्या गावातले नव्हतेच.
लोक आता म्हणतात ब्राम्हणांनी यंव केलं नि त्यंव केलं.
मागे वळून पाहता मला आठवतंय तोपर्यंत मी ब्राम्हणांची घरं फार कमी पाहिलीत माझ्या लहानपणी. त्या खेड्यावर तर पंचक्रोशात एकही ब्राम्हण नाही. एकाच छोट्या खेड्यावर डांगे म्हणून खोत होते. त्यांना गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत पळवून लावलेलं. आणि तेही धार्मिक कार्य करणारे ब्राम्हण नव्हतेच. पळाले, तेही घरात तरुण मुलगी होती तिच्या इज्जतीच्या भीतीने पळाले. पण पुन्हा त्या गावात परतलेच नाहीत कधी. त्यांचं मनच उठलं. विटलं. जिथे सोबत राहिलो अशी चार घरंच उलटली, त्या गावात काय जायचं पुन्हा? त्यांची घरं, केळीच्या छोट्या बागा तशाच सोडून गेले.
पंचक्रोशीत ब्राम्हण नव्हते, तर मग धार्मिक कार्य करणार कोण? मुळात धार्मिक कार्य करतच कोण होतं? कुणीच नाही. आमच्या खेड्यावर मी कोणतेच सणवार पाहिले नाहीत तेव्हा. एक जत्रा भरायची नि एक दहीहंडी बारकीशी खेळली जायची. आणि हां, एक होळी. तिन्ही देवळात पुजारी बिजारी नव्हते. गावात जंगमांची घरं होती. त्यातील कुणीतरी संध्याकाळी देवळात दिवा लावून यायचं. बाकी पुजा अभिषेक ... ते काय असतं? अशी स्थिती होती.
पण लग्नकार्य असायचं. त्यात सत्यनारायण असायचा. कुणी गेलं तर दिवसकार्य असायचे थोडे फार. त्यासाठी ब्राम्हण कुठून आणायचा आता?
म्हणून तळा या तालुक्याच्या गावाहून या जोशीबुवांना आमच्या गावच्या कोंडावरच्या ग्रामस्थांनी आग्रहाने आणून ठेवलं होतं. त्यांना रहायला एक रिकामं, मोठं फुकट घर दिलं होतं. शेतात काही भात बित पिकेल, तेही त्यांना दिलं जायचं थोडंफार. ते जोशीबुवा आणि त्यांची बायको अत्यंत सालस, गरीब, अगदी गोष्टीतल्या गरीब ब्राम्हणांसारखे कुटुंब होते. त्या कोंडावर पाच पंचवीस सगळी घरं हिंदू मराठांची होती. तिथे मुस्लिम नव्हते अजून तेव्हा.
तर वर टेकडीवरच्या शंकराला जाताना किंवा येताना त्या जोशीबुवांकडे या सगळ्या बाया (सोबत मी..) थांबायच्या. त्यांना भेटायला. त्यांनाही आनंद व्हायचा. गुजर बाया त्यांना भेटायला आल्या. काकू चहा करायच्या. काहीतरी गोड वडी बिडी सगळ्यांच्या हातावर द्यायच्या. सगळ्यांना कौतुक होतं ते त्यांच्या परसदारात त्यांनी लावलेल्या विविध फुलझाडांचं. वर सगळ्या म्हणायच्या, "ही सगळी ब्राम्हण बायांचीच कामं हो. रांगोळी, फुलं वगैरे..."
शिवाय आमच्या सगळ्यांच्या घरात सोवळं असायचं. कारण गाव सगळं मांसाहारी. त्यात पुन्हा मुस्लिमबहुल. मग विचारायलाच नको. आम्ही पडलो कांदालसूणही वर्ज्यवाले. त्यामुळे कोणाकडेच काही खायचा प्यायचा अनुभव नाही. एकच हे घर होतं जोशीबुवांचं. जिथे या सगळ्या बायका बिन्धास्त चहा प्यायच्या. बसायच्या. काही थोडं खाऊ शकायच्या.
तिथून मग स्वाऱ्या शंकराच्या मंदिराकडे. तिथे जाताना कोंडावरच्या एखाद्या माणसाला सोबत घ्यायचं. मंदिरात गेल्यावर कुणी नारळ फोडायला हवं म्हणून. बायकांनी नारळ फोडायचा नसतो म्हणून.
शंकराची टेकडी चढतानाच भीती वाटायची. सगळीकडे समाध्याच समाध्या. अगदी त्या चुकवत चुकवत पाय ठेवावा लागायचा. भकास मंदिर. प्रसन्न वाटण्यासारखं काही नाही. पिंडी, बाहेर दोन पाच कसकसल्या मुर्त्या. सगळं वातावरण रामसे बंधुंच्या सिनेमाला पुरक असं अगदी...
कधी एकदा या बायांचं आटोपतंय आणि घरी जातोय असं व्हायचं.
त्या दिवशी रात्री लवकर झोप यायची नाही. परसातले रातकिडे, बेडकं यांचा आवाज भयप्रद वाटायचा. काय या बायांना त्या भणंग मंदिरात जायचा सोस तो महादेवच जाणे.
पण त्या आनंदात असायच्या. त्यांची श्रावणी पिकनिक झालेली असायची. आता त्या वाट पाहायच्या कृष्णाष्टमीची. तेवढाच एक उपास आणि थोडा सोहळा असायचा. पुन्हा सगळ्या जमायला. दोन चार भजनं म्हणायला नि कृष्णाचा पाळणा सजवायला. आम्हाला कौतुक असायचं ते रात्री बारा वाजता थेपले आणि तळलेल्या मिरच्या खाऊन उपास साोडण्याचं...
यात प्रश्न एकच पडतो की या सगळ्यात ब्राम्हण कुठून आले शिव्या खायला मध्येच? बिचारे पंचक्रोशीतही नसायचे नावाला.
आणि अचानक देव, धर्म, उपास तापास कुठून वाढले? मंदिरांची प्रस्थं कशी वाढली?
गावात हिंदू देखील बिचारे देवाच्या वाटेला जात नव्हते... तू शांत तिथे तुझ्या देवळात बस. आम्ही आमच्या घरी. दोघंही एकमेकांना त्रास देत नव्हते. कारण दोघांपाशीही एकमेकांना द्यायला काही नव्हतं. दोघेही भणंग.
- अलका असेरकर
Like
Comment

No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...