Aug 5, 2020

लॉकडाऊन मुलाखत

स्त्रीउवाचसाठी एक लॉकडाऊन मुलाखत.-

नाव- सीमा आनंद म्हस्के
शिक्षण – दहावी पास. (गावाकडे शिक्षण, पुढे लांब आणि चालत जावं लागत होतं म्हणून पुढचं शिक्षण घेतलं नाही. पण या कारणापेक्षाही तिच्याशी बोलताना अवेअरनेस कमी असल्याने शिक्षण पुढचं अपूर्ण राहिल्याचं अधिक जाणवत होतं.)
जात – नवबौद्ध.
सावळी, तरतरीत, हेल्दी दिसते बऱ्यापैकी. हुशारही आहे.
काम – सोसायटीतला कचरा गोळा करून म्युन्सिपाल्टीच्या गाडीत नेऊन टाकणं
मुळ गाव – जालना जिल्ह्यातलं सिद्धेश्वर पिंपळगाव
सध्या- डोंबिवलीत. तेलकोसवाडीतल्या झोपडपट्टीसदृश्य जागी वास्तव्य.

तिथे आजुबाजूला याच लोकांची वस्ती असावी. कारण वेचलेल्या कचऱ्यांची बाचकी मोठ्या संख्येत बाजूला रेल्वे रुळाजवळ टाकून ठेवलेली दिसतात.

वय – ३०

१९-२० व्या वर्षी लग्न

तीन बाळंतपणे

पैकी दोन मुलं जिवंत
नवरा – बिगारी कामगार, सध्या लॉकडाऊनमुळे घरी. काम नाही.
माहेरी आई-बाबा, चार बहिणी, एक भाऊ, बाबा बिगारी कामगार. बांधकाम व्यवसाय ठिकाणी. आई कचऱ्याचंच काम करते.

हिच्याजवळही आमच्या एकाच सोसायटीचे काम आहे. त्याचा पगार मिळतो – २०००/- महिना.

आई-बाबा बाजूलाच राहतात. आईला  कोरोना झाला होता. आता बरी झालेय. सरकारी दवाखान्यात राहून. अजूनही नातेवाईक असतील आजुबाजूला कदाचित.

लॉकडाऊन मधील बदल -
दिनचर्येत फारसा बदल नाही.

नवरा घरात काडीचीही मदत करत नाही.

मुलांचेही आवरत नाही.

उलट पसारा करून ठेवतो.

सध्या त्याला काम नाही. तंबाखूचं व्यसन आहे. दारूचं अजून तरी नाही.
नवरा काम करायचा तेव्हा पैसे घरात द्यायचा.

आर्थिक परिस्थितीत बदल – लॉकडाऊनमध्ये खराब. नवऱ्याचंही काम नसल्याने.

कामात बदल – सकाळी एका सोसायटीतलं कचरा, झाडूचं काम आटोपून मग दिवसभर घरातली कामं, पोरांची उस्तवार असते. बाकी कामात बदल नाही. आधीही तसंच होतं.

आराम मिळतो का? – हो, दुपारचा तास दीड तास मिळतो. झोपते. टिव्ही बघते. टिव्हीवर सावधान इंडिया, बातम्या, मराठी सिनेमा बघते.

 

मैत्रिणी आहेत का? – इथे नाहीत. गावाकडच्या आहेत गावाकडे. त्यांच्याशी फोनवर बोलते.
सुख-दुःख कुणाशी शेअर करते का? – नाही. कुणाला दुःख सांगत नाही. अगदी आईबाबानाही नाही. आतल्या आत घुसमटते.

 

आवडीचं खाणं करून खाते का? – होय.

फळं बिळं? – नाही फारसं. तेवढं परवडत नाही. मुलांनाही नाही. बिस्कीटं, टोस्ट इत्यादीही नाही फारसं.

 

नवऱ्याचं प्रेम आहे का? – आहे.

 

सध्या भांडणं वाढलीत का? – होय. कारण मदत करत नाही. हिच्या श्रमाची किंमत नाही असं हिला वाटतं.

मारतो का? – हात उचलतो कधी कधी असं म्हणाली.

कितीदा रडली? – नाही रडत असं म्हणता म्हणता माझ्यासमोरच रडली. मग म्हणाली, हो रडते. पण कोणाशीही शेअर करत नाही. आईशीही नाही.

 

मदत कोण करतं? एरव्ही आई करते थोडी फार. सध्या सोसायटीकडून अपेक्षा होती. पण सोसायटीने अजून तरी जास्तीचा काही पैसा दिला नाहीए.

(मी तिला दोनदा पाच पाचशे रुपये आणि एकदा दोनशे रुपयाचे गहू भरून दिले.)

 

नवरा गावाकडे जायचं म्हणतोय सगळं सोडून. तिथे काही काम आहे का म्हटलं तर नाही म्हणाली. तिथे जाऊन शोधायचं. शेती बिती नाही. तिला म्हटलं, नको जाऊस. इतके दिवस काढलेस. तिथेही अनिश्चित आहे तर इथेच राहा. तिला इथेच राहायचंय. पण नवरा ऐकत नाही. जायचं जायचं म्हणतोय.

नवऱ्याला दुसरी कामं शोध म्हटलं, तर म्हणतो सवय नाही दुसऱ्या कामाची. अजून तरूण आहे तरी. मी सांगितलं आपला गुरखा नुसत्या गाड्या धूवून आणि सोसायट्यांचे पाणी सोडून दहा पंधरा हजार कमवतोय. आजुबाजूच्या सोसायटीतून गाड्या धुण्याचे काम मिळव विनंती करून. तर म्हणाली त्याला सवय नाही दुसऱ्या कामांची.

दहावी पास आहे आणि जातीचे आरक्षण, सुविधा आहेत तर खरंतर सरकारी नोकरी मिळू शकली असती. अजूनही मिळू शकते. पण सोर्सेस ठाऊक नाहीत. कुठे कसा प्रयत्न करायचा माहीत नाही. नवरा बहुधा दहावी पास नाही.

 

भविष्याबद्दल आशादायी आहे का? – तर हो म्हणाली.

पण भविष्य बदलणार कसं याचे उत्तर तिच्यापाशी नाही. तिला म्हटलं, हुशार, तरतरीत आहेस तर हे काम सोडून पोळी भाजी इत्यादीची कामं शोध. घरकाम शोध. पण कोण देणार असं तिला वाटतं? कारण कचरा कामं करणाऱ्यांना लोक सैपाकघरातल्या कामासाठी घेत नाहीत सहसा.

---------

बाई म्हणून मला तरी तिच्या परिस्थितीत इतर बायांपेक्षा काही फार वेगळी परिस्थिती वाटली नाही. एक आर्थिक परिस्थिती सोडता.
मध्ये मिळून साऱ्याजणींचे ऑनलाईन शिबीर होते. त्यातही बायकांनी हिंसाचार होत नाही असे म्हटले होते. त्या मध्यमवर्गीय बायका होत्या. नवऱ्याने मारलं तरी बाहेर सांगायचं नाही हा आपल्याकडे रिवाज आहे. ही सीमा सुद्धा खोदून विचारल्यावर हात उचलतो म्हणाली, रडते म्हणाली. अन्यथा नाहीच म्हणत होती आधी. तर इतर बायका काय म्हणणार? मध्यमवर्गीय संस्कार तर अजून कडक असतात. त्या काय शेअर करणार आपल्या व्यथा जाहीरपणे?

निष्कर्षया वर्गात निदान अवेअरनेस जागृत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. जात, शिक्षण, आरक्षण प्रमाणे नोकऱ्या मिळतात, मिळू शकतात. त्यासाठी काय करायला हवं याची माहिती देणारं कुणीतरी हवं. शिक्षणासाठी आग्रह धरणारे कार्यकर्ते हवेत. कुटुंब नियोजनाचा प्रभावी प्रचार करणारे लोक हवेत. त्यासाठी थोडीफार मामूली मदत मिळवून देणारे हवेत. तशी मिळूही शकते. हे काम त्या त्या जातीनेच अधिक केले तर उत्तम. कारण प्रत्येक जातीत एक शिक्षित, आर्थिक संपन्न, हुशार वर्ग असतोच. जातीच्या संघटना हे काम करू शकतात. मी असं म्हणत नाही, की जातीचं जातीने पाहावं म्हणून. किंवा सरकारकडून काही अपेक्षा ठेवूच नयेत असं. परंतु मी माझ्या आजुबाजूला बघते. उच्चवर्णियांच्या जात संघटना अशा प्रकारची कामं करत असतात. आपल्या समाजातील प्रमाणात गरीबांना, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, मिळवून देत असतात. फंड गोळा करत असतात. यात काही चुकीचं वाटत नाही. मग या तळागाळातल्या लोकांच्या जातसमाजानीही हे करायला हवे. तशा त्या करतात की नाही ते मला माहीत नाही.  
सहसा मी अशा लोकांना सरकारकडे रडताना अधिक पाहते. सरकारने करावे, त्यासाठी मोर्चे, आंदोलने, धरणे, संप, इत्यादींसाठी कार्यकर्ते गोळा करून त्यांच्या रिकामटेकडेपणात अधिक भर घातली जाते. त्याऐवजी अशी सकारात्मकता ठेवून जातबांधवांसाठी काही अशी मदत केली प्रत्येक प्रगती केलेल्या व्यक्तीने तर ते अधिक चांगले.

हेच शेतकरी वर्गातही व्हायला हवं. मोठ्या शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी थोडी झीज सोसणे, त्यांच्यात प्रबोधन करणे, त्यांना जागरूक करणे, मदत मिळवून देणे ही कामे केली तरी जखमांवर बराच ईलाज होईल. जगण्याची, आधार असल्याची भावना निर्माण होईल. तसे होत आहे की नाही मला माहीत नाही.

- अलका गांधी-असेरकर

 

 




 

 



 


No comments:

Post a Comment

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...