Jun 19, 2020

योगाला पर्याय नाही.


योगपरिचय - थोडक्यात.

आपण भारतीयांना योग हा शब्द सुपरिचित असतो. साधारण गेल्या वीसेक वर्षांपासून तर योग हा शब्द अगदी सर्वसामान्यांनाही माहीत झालेला आहे. आणि त्याला कारणीभूत म्हणजे रामदेवबाबांसारखे काही योगप्रचारक.
रामदेवबाबांच्या कार्याबाबत मतभेद असले, तरी त्यांनी योग हा घरोघरी पोचवला हे त्यांचे मोठे कार्य  आहे यात दुमत नाही. 
तोपर्यंत योगसाधना म्हणजे कुणी ऋषीमुनी, साधक, तापसी यांनीच करायची गोष्ट अशी समजूत असायची. 
आजही आणि अजूनही योग म्हणजे फार कठीण गोष्ट, ते आपलं काम नव्हे असे म्हणून हात झटकणारे लोकच अधिक पहावयास मिळतात.
 
त्याला कारणही तसेच होते. पूर्वी योग म्हणजे साधक, तपस्वी, ऋषी-मुनी यांनी करण्याचीच गोष्ट होती. 
याला कारण म्हणजे, योग हा मोक्षप्राप्तीकडे नेणारा मार्ग म्हणूनच त्याची आध्यात्मिक ओळख होती. त्याच हेतूने योग शिकला जायचा. आणि त्यासाठी संसाराकडे दुर्लक्ष करणे किंवा संसाराच्या भानगडीतच न पडणे, दूर हिमालयात किंवा जंगलात कुठेतरी एकांतवासात जाऊन गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास करणे आणि त्यातून खडतर तपश्चर्या करत मोक्षाची आस लावून बसणे हाच योगाचा हेतू असायचा. त्यामुळे अजूनही लोकांचा तसा ग्रह असल्यास नवल नाही. 
मात्र आता विज्ञानयुगात तसे फारसे राहिलेले नाही. म्हणजे हिमालयात योगसाधना, तपश्चर्या करणारे साधूमुनी अजूनही बरेच आहेत. पण याचा अर्थ असा नाही की योग ही फक्त मोक्षाच्याच हेतूने करण्याची साधना आहे.
उलट आता विज्ञानयुगात योगविद्येकडे वेगळ्या, आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जात आहे. आणि या विद्येचा उपयोग सर्वसामान्यांना रोजचे आयुष्य सुखकारक करण्यासाठी केला जात आहे.  लोक अधिकाधिक योगविद्येकडे वळू लागले आहेत. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर याचा प्रसार आणि अंगीकार मोठ्या जोरात चालू आहे. 

-----

मोक्ष, अध्यात्म, साधना इत्यादी जडजंबाल हेतूकडून योग सर्वसामान्यांकडे कसा आला?

वर सांगितल्याप्रमाणे हे खरंच आहे, की योगमार्ग हा मोक्षाचा, आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रवास करणारा मार्ग म्हणून भारतीय दर्शनशास्त्रात महत्त्वाचा होता. मात्र या प्रवासात योगाचा मधला टप्पा जो येतो, तो मानवी शरीराला निरोगी, सुडौल, चपळ, तरतरीत ठेवणारा आहे. एवढेच नव्हे, तर शरीराच्या जोडीला मनालाही स्वास्थ्य़ मिळवून देणारा आहे. मोक्षाच्या दिशेने वाटचाल ही मनावर नियंत्रण ठेवण्यापासून सुरू होते. आणि मोक्ष हा जरी हेतू नाही ठेवला तरी आताच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या, स्पर्धेच्या युगात मनावर नियंत्रण हेच अधिक महत्त्वाचे झालेले आहे. 
आपण पाहतोय, की आज मानसोपचारतज्ज्ञांची गरज समाजात किती निर्माण झाली आहे ते? आणि हा मार्गही माणसाला पूर्ण मानसिक शांतता देऊ शकत नाही. गोळ्या औषधे, काऊन्सिलिंग इत्यादींनी तात्पुरते बरे वाटते. मात्र मनाचे स्वास्थ्य पूर्ण मिळत नाहीच. 
म्हणूनच योग आणि प्राणायाम हे शिकून घेऊन प्रत्येक व्यक्ती आपली आपण मनावर नियंत्रण ठेवायला आपोआप शिकू लागते. आणि ताणतणावांपासून मुक्त होते इतकंच नव्हे, तर चांगलं सुदृढ आयुष्य जगू लागते. आपल्याला ठाऊकच आहे, की बहुतेक शारीरिक व्याधी या आपल्या मनस्वास्थ्याशी निगडीत असतात. उदा. नव्या युगातील डायबेटीस, बीपी, कॉलेस्ट्रोल, थायरॉईड, कॅन्सर इत्यादीसारखे अनेक जीवघेणे आजार हे थेट आपल्या मनाशी, मानसिक ताणतणावांशी निगडीत आहेत. आधुनिक औषधांनीही ते नियंत्रणात राहतात मात्र पूर्ण बरे होत नाहीत. अशावेळी योग हाच एकमेव मार्ग तुम्हाला यातून सुटका मिळवून देऊ शकतो. अर्थात हे आजार होण्याआधीच ते होऊ नयेत म्हणून वेळीच योगमार्ग स्वीकारा आणि अशा आजारांना दूर ठेवा.

योगाचा हा शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळवून देणारा टप्पाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण तेवढ्यापुरताच त्याचा विचार करायचा आहे. म्हणूनच यात देव, धर्म, श्रद्धा, आस्तिकता इत्यादी काहीही मध्ये न आणता सर्व जातीधर्मातल्या लोकांनी योगविद्येची कास धरायला हवी. 

----

योगाबद्दलचे गैरसमज -
आपण योगासने बघतो, ती तज्ज्ञांनी केलेली. यु ट्यूब, इतर कार्यक्रम यांतून आपण अवघड अवघड आसनं करणाऱ्या व्यक्ती पाहतो आणि आपण घाबरतो. हे आपल्याला जमणार नाही असे आपण मनाशीच ठरवतो. आणि योगविद्येबद्दल अनेक गैरसमज मनाशी बाळगून बसतो.

१. योग म्हटले की काहीतरी अवघड काम, शरीराला त्रास, शरीराला वेडेवाकडे वळवणे असा समज अनेकांचा असतो.
 (योग हे सोप्याकडून अवघडाकडे नेणारे शास्त्र आहे. सुरूवातीला अगदी सोपी सोपी आसने शिकवली जातात. ज्याप्रमाणे लहान बालकाला आधी पहिलीत घातले जाते. मग हळू हळू अभ्यास, मेहनत, परीक्षा याने तो पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पोचतो. तसंच यातही आहे. आणि आपल्याला योग्य तेवढेच, आणि तितकेच यातून हवं ते घेऊ शकतो. ज्याप्रमाणे सगळे विद्यार्थी सायन्स, कॉमर्स आर्ट्स ह्या सगळ्या शाखातले ज्ञान घेत नाहीत. आणि सगळेच उच्चशिक्षणापर्यंत पोचत नाहीत. गरजेपुरतंच घेतात. तसंच यातही आपल्या गरजेपुरती आसनं शिकून त्याचाच सराव करू शकतो आणि स्वतःला फिट ठेवू शकतो. योग हा एक मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. सागर आहे. त्यातच मास्टरी करायची म्हटली तरी एक जन्म पुरणार नाही. पण म्हणून आपल्याला ते सगळंच करायचं आहे असं नाही. आपल्याला फक्त आपल्या गरजेपुरतं पाणी त्यातून शेंदून घ्यायचं आहे.)

२. योग म्हटलं की बारीक, तरुण, सडसडीत लोकांचे काम, आपल्यासारख्या जाड्या लोकांचे, वय झालेल्यांचे ते काम नाही असे वाटणे.
 (कोणत्याही वयातली व्यक्ती आणि कितीही वजन असलेली व्यक्ती योग करू शकते. अगदी लहान मुले आणि गरोदर स्त्रिया, नुकतेच ऑपरेशन झालेल्या, आजारातून उठलेल्या व्यक्ती या सोडून बाकी अगदी ८० वर्षांची व्यक्तीही नव्याने योग शिकायला सुरूवात करू शकते.)

३. योग म्हणजे संसार सोडून, विरागी भाव अंगीकारणे असा एक गैरसमज. 
(आज तर संसारी माणसालाच योगविद्येची गरज अधिक आहे.)

४. योग म्हणजे खाण्यापिण्यावर बंधने, चमचमीत खाणंपिणं सोडून द्यावं लागणार असा एक गैरसमज.
(योग खाण्यापिण्यावर बंधने घालत नाही. तुम्हाला जर काही आजार नसतील, आणि त्या आजाराची पथ्य नसतील, तर योग हे खाऊ नका, ते खाऊ नका असलं काहीही सांगत नाही. अर्थात तुम्ही स्वतः होऊनच जर योग्य आहारविहार जपलात तर योगाचे फायदे अधिक मिळतील एवढंच.)

५. योग म्हणजे दूर कुठेतरी एकांतात राहून साधना करणे हा एक गैरसमज.
 (एक रुमच्या घरातही तुम्ही नित्यनेमाने योग करू शकता. 

६. योग म्हणजे खूप वेळ दयायला हवा, नोकरी व्यवसाय करणाऱ्या, मुलंबाळात व्यस्त असणाऱ्या गृहस्थी लोकांना वेळ कसा मिळणार असा एक गैरसमज बाळगणे.
(असा विचार केला तर आंघोळ, ब्रश करणे, आन्हिके उरकणे, घरातली साफसफाई करणे, शांतपणे बसून जेवणे ह्यातलेही काही करायला नको. हे सगळं जितकं महत्त्वाचं आणि दैनंदिन आहे तितका नि तेवढाच वेळ दैनंदिन योगाला दिला की झालं. त्यासाठी तासंतास काढायची गरज नाही.)

७. योगासाठी अमुकच प्रकारचे कपडे घालावे लागणार असं वाटणे.
 (अगदी साडीतही योग केला जाऊ शकतो.)

८. योग म्हणजे वजन कमी करण्याचा मार्ग - ( हा त्याचा एक परिणाम असू शकतो. मात्र वजन कमी करण्यासाठी योगविद्येचा उपयोग थेट आणि त्वरीत होत नाही.)

आज एवढं पुरे. पुढच्या लेखात भारतातील योगविद्येचा इतिहास, मागोवा, त्यांचे कर्ते, ग्रंथ इत्यादींचा थोडक्यात आढावा घेऊ. 
आणि त्याच्या पुढच्या लेखात योग आणि व्यायाम यातील फरक समजावून घेऊ.
आणि त्यापुढील लेखात भारतात योगविद्या शिकवणाऱ्या संस्था आणि वर्ग यांच्याबद्दल जुजबी माहीत घेऊ.

अलका गांधी-असेरकर.


Jun 17, 2020

तांदळाच्या भाकरी -

भाकरी नि मी.. तांदुळाच्या भाकरी.. फुटबॉल सारखी फुगली नाही तर ती भाकरीच नाही..
आठवीत असताना मी भाकरी करायला शिकले. म्हणजे 13 व्या वर्षी.
कोकणातल्या माझ्या गावी घरोघरी उरलेले पुरुष सकलशीच तांदलाच्या भाकरी नी कोरड्यास खाऊन निघायचे. उरलेले एवढ्यासाठी म्हणायचे की गावात बहुसंख्येने मुस्लिम. त्यातले घरोघरचे बहुतेक पुरुष बोटीवर, नाहीतर गल्फ कंट्रीजमध्ये कामाला. बाकी बायकांचंच राज्य. घरी इक्का-दुक्का पुरुष उरलेले असायचे. तेही आळीपाळीने काम मिळालं की बोटीवर जायचेच. मग हे उरलेले भैरव सकलच्या येष्टीनी तालुक्याच्या गावी निघायचे तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी खाऊन. अर्थात ते भाकरी न म्हणता, रोटी म्हणत. हे जवळपास रोजचच नैमित्तिक कर्तव्य होतं त्यांचं जणू. असलेली नसलेली कामं काढून तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावी फेरफटका मारून यायाचा. त्याने ते अपडेटही राहत त्या काळात. तिथं कोर्ट कचेऱ्या नी 12 भानगडी काय असतील त्या उरकून दीरच्या येस्टीन परत यायाचा नी मंग भात नी म्हावऱ्याचा कालवण खाऊनशान झोपायचा संध्याकाल पर्यंत.
काही थोडे बहुत भाकर खाऊन शेतावर जायचे. शेतं म्हणजे काय छोटी छोटी भाताची खाचरं. तिथं काय देशावरच्या शेतासारखी ट्रॅक्टर्स फिरत नव्हती. पण बैलं असायची. त्यांना चारायला, पाणी पाजायला, नांगरटणीला अशी कामं असायचीच थोडी फार.
तांदळाच्या भाकरी जिला एकदम पातळ, फुगलेल्या नि एकही काळा डाग नसलेल्या पांढऱ्या शुभ्र करता येतील ती सुगरण. लग्न कार्यात त्यांच्याकडे टोपले भरभरून भाकऱ्या थापल्या जायच्या नि एका बाजूला निवडायला बाई बसलेली असायची. जराही काळा डाग असलेली भाकरी बाजूला काढून ठेवायची. पुरुषांना, महत्त्वाच्या पाहुण्यांना त्या डागवाल्या रोट्या नाही वाढायच्या.
आमच्या घरी काही ही पद्धत नव्हती. आम्ही इतकी वर्ष राहूनही सकाळचा नाश्ता गुजराती थेपल्यांचाच करत होतो. या बाबतीत गुजराती लोक मुस्लिम लोकांहून कट्टर. पण तरीही संध्याकाळच्या जेवणात तांदळाच्या भाकरी नि कडधान्यांची आमटी खात असू. रोजच. नाईलाज होता. गहू फार मिळत नव्हते नि हिरव्या भाज्यांची वानवा होती म्हणून केवळ.
आठवीत तालुक्याच्या गावी मामांकडे राहायला आले. शिक्षणासाठी. मामी तर खूपच चांगल्या होत्या. तरी त्या आईसारखे लाड थोड्याच करणार होत्या. सातवीपर्यंत सकाळी नऊ वाजता उठल्यावर इथं आई हातावर मंजन आणून द्यायची. मग आम्ही दात घासण्याचे उपकार तिच्यावर करत असू.
आणि आठवीत थेट भाकरीच भाजायला शिकले मामीच्या हाताखाली. या अशा टम्म भाकरी कशा फुगवायच्या. तेही कोळशाच्या शेगडीवर हे मामींनी शिकवले. आणि आई करत असतानाचं निरीक्षण होतंच. मी पहिल्याच प्रयत्नात भाकरी मस्त फुगवली ते केवळ निरीक्षणाच्या जोरावर. आणि मामी पण आश्चर्यचकीत झाल्या. त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं.
- तेव्हापासून आजवर भाकरी थापण्याशिवाय दुसरं काहीही उत्तम करता आलं नाही. गृहिणीपद चिकटलं ते आजतागायत.
पुढच्या जन्मी मात्र अजिबात सैपाकघरात जायचं नाहीय मला. पुढच्या जन्मी मला उद्योगपती व्हायचंय नि भरपूर पैसा कमवायचाय. स्वतःच्या जोरावर.
- अलका गांधी-असेरकर



Jun 16, 2020

Marathi Poems by Alka gandhi-Aserkar




दोन कविता -

१. फरक
२. धर्मसंस्थापक

Jun 13, 2020

प्रेमप्रकरणांतून खुनाची दुसरी महत्त्वाची बाजू -

विराज जगतापचा खून जातीयवादातून झाला. आज या घटनेकडे जातीभेदाच्या चष्म्यातूनच बघितले जाते. ते मान्यही आहे. जातप्रश्न उग्र आहेच. तरी देखील..
नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष होतंय.
ती बाजू आहे मुलींची...
आपल्या घरातील मुलींनी कोणाशी लग्न करायचं, कोणावर प्रेम करायचं, कोणाशी मैत्री ठेवायची, कोणाशी नाही... हे अजूनही हा पितृप्रधान समाजच ठरवतोय.
आणि हा एकच किस्सा नाही.
अशा बातम्या दर दोन पाच महिन्यांनी येतच असतात.
शिवाय या उघडकीला येणाऱ्या बातम्या. न उघडकीला येणारे असे अनेक किस्से घडत असतील भारताच्या कानाकोपऱ्यात.
चारच दिवसांपूर्वी मी याच विषयावर एक पोस्ट लिहिली होती फेसबूकवर. की मुलींच्या किंवा स्त्रियांच्या बाबतीत जात, धर्म हेच केवळ महत्त्वाचे नाही ठरत. किंवा मुलींनी केवळ दुसऱ्या जातीत किंवा धर्मात लग्न करायचं म्हटलं तरच विरोध होतो असं नाही. तर अजूनही मुलींनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे म्हटले की घरच्यांना, कुटुंबियांना, समाजाला चालत नाही. अगदी स्वजातीत, स्वधर्मातही आपल्या मर्जीने लग्नं ठरवलेली घरच्यांना आणि विशेषतः घरातल्या पुरुषांना पसंत पडत नाहीत. हीच बहुसंख्य ठिकाणी वृत्ती दिसून येत असते.
तेव्हा त्या पोस्टवर अपेक्षेप्रमाणेच 'आता असं कुठं राहिलंय, तू कुठलं लिहितेस, कुठल्या काळातलं लिहितेस हे ठराविक आपल्या शहरी, सुखासीन कॉर्पोरेट जगात डोळे मिटून दूध पिण्याचं सुख घेणाऱ्या अनेक लोकांना वाटलं होतंच.
अर्थात झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवून दुनिया दाखवता येत नाहीच.
त्यामुळे हे मी त्यांच्यासाठी लिहित नाहीच...
पण जेव्हा जेव्हा प्रेमप्रकरणात एखाद्या मुलाचा खून होतो, किंवा एखादा मुलगा मार खातो, तेव्हा तेव्हा त्यामागे एकेका मुलीचा दडपून टाकलेला निर्णय आणि दडपलेले निर्णयस्वातंत्र्यही असतं. त्यावर फारच कमी बोलले जाते.
म्हणजे अजूनही जात धर्म याच गोष्टी चर्चेसाठी महत्त्वाच्या ठरतात. स्त्रियांचे निर्णयस्वातंत्र्य ही चर्चेची गोष्टच नसते.
जर मुलाला मारता आले नाही, तर अशावेळी मुलींनाच मारून टाकले जाते. अगदी पोटच्या मुलीलाही. तर परक्या मुलाला मारणं त्यांना सहज असणार त्यात नवल ते काय? आता डिसेंबर २०१९ मधलीच कल्याणची तिवारी केस याचे उदाहरण आहे. बापाने मुलीचे प्रेमप्रकरण न पटल्याने तिला मारून तिचे तीन तुकडे करून ते बॅगेत भरून फेकून दिले होते...
आणि सख्ख्या भावाने, बापाने अशा प्रकरणात मुलींना मारून टाकल्याच्या अशा बातम्याही चार सहा महिन्याच्या अंतराने येतच असतात.. तेही महाराष्ट्रासारख्या राज्यात. तर इतर यूपी, बिहार, राजस्थान, हरयाणा सारख्या राज्यांतून काय काय घडत असेल? त्यांच्या तर बातम्याही होत नाहीत. अशा बातम्या या केवळ हिमनगाचे एक टोक असते.
पितृप्रधान समाजाला स्त्रियांचे स्वयंनिर्णयच मान्य नाहीत कुठले... यात जाती धर्माचा काही संबंधच नाही. मुलींनी यांच्या दाव्याला, खुंट्याला बांधून राहायचे. ते सांगतील तिथं जायचे ही वर्चस्ववादी वृत्ती समाजात अजूनही जैसे थे आहे. आणि त्याला कोणतीही जात नि कोणताही धर्म अपवाद नाही, अपवाद वगळता.
आमच्या लहानपणी तर, 'मारून टाकायला हवे अशा पोरींना' असं सहज बोलले जायचे. आमच्या समोरच. त्यामुळे मुलींवर एक धाक, एक दहशत आपोआप बसायची. लग्न तर आईबाबा म्हणतील तिथंच करायचे. ते सांगतील तेव्हाच घराबाहेर जायचे, नि ते सांगतील तसेच कपडे नेसायचे हेच मुलींचे संस्कार. तीच खरी आदर्श मुलगी. हे अगदी धातूवर कोरीव काम केल्याप्रमाणे ठसवले जायचे.
इतकंच कशाला, फेसबूकसारख्या सोशल माध्यमांवरून स्त्रीवादावरच्या चर्चेत देखील पुरुषच आक्रमकपणे निर्णय घेतात. कशाला स्त्रीवाद म्हणायचे नि कशाला नाही ते. स्त्रियांना काय हवे, त्यांच्यासाठी काय योग्य काय अयोग्य तेही पुरुषच ठरवू लागतात. आणि अनेक स्त्रियाही त्यांच्या होला हो करताना दिसतात. वरवर हे दिसायला सौम्य वाटते. परंतु यामागे पितृप्रधानतेची वर्चस्ववादी वृत्तीच असते, जी वेळ पडली की असे गंभीर स्वरूप धारण करते.
आजही, आणि अगदी मुंबई-पुणेसारख्या शहरातही, कित्येक मुलींनाआपल्या मर्जींनी लग्नं ठरवू दिली जात नाहीत. प्रेमात पडलेल्या मुलींना कधी धाकदपटशा, कधी मारहाण, कधी इमोशनल ब्लॅकमेलिंग करून निर्णयापासून परावृत्त केले जाते.
प्रेमप्रकरणात कित्येक वेळा मुली आत्महत्या करायच्या. अवतीभवती बरेच किस्से असे पाहतच मी मोठी झालेय. अशा प्रत्येकवेळी समाज हेच म्हणायचा, 'बरं झालं मेली.. आईबाबांची ईज्जत घालवण्यापेक्षा.'
या अशा यांच्या इज्जतीच्या व्याख्या.
ज्या लोकांना विराजचा खून दिसतो, त्या लोकांना समोर एक मुलीचा निर्णय दडपला गेलाय, कुणाशी मैत्री करायची नि कुणाशी नाही, इतके साधे निर्णय देखील ती घेऊ शकत नाही. जातीभेदाच्या बेड्या तोडू पाहणाऱ्या अशा स्त्रियांना दडपून ठेवले जातेय, तिच्या स्वातंत्र्याचाच बळी पडलाय ते दिसतच नाही. त्यावर चर्चाच नाही?
- अलका गांधी-असेरकर
Like
Comment

लॉकडाऊन आणि जनरल प्रॅक्टीशनर-

लॉकडाऊन परिस्थिती आणि जनरल प्रॅक्टीशनर-
डोंबिवलीतले सारे ऍलोपथी एमबीबीएस फिजिशियन्स आपापले दवाखाने बंद करून बसलेत.
याऊलट, होमिओपॅथ, आयुर्वेदाचार्य यांनी आपले दवाखाने एकही दिवस बंद ठेवले नाहीत.
हे माझ्या परीसरातलं, माझ्या अनुभवातलं सांगतेय. दहा लाखाच्या डोंबिवली वस्तीत इतरत्र वेगळी परिस्थिती असेलही. मला माहीत नाही. परंतु माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या एक कीमी परीघातील परिस्थिती ही आहे.
त्यामुळे परिस्थिती खूप बिकट आहे. इतर कोणत्याही छोट्या मोठ्या आजारांसाठी नेहमीचे डॉक्टर्स अव्हेलेबल नाहीत.
अशावेळी होमिओपॅथ, आयुर्वेद हेच लोकांना धीर आणि औषध दोन्ही देणारे देवदूत वाटताहेत मला.
एरव्ही हे ऍलोपथी छोटे-मोठे सारे दवाखाने भरून, ओसंडून वाहात असतात. पण खऱ्या आणीबाणीतच ते बंद आहेत.
माझ्या परीसरातील हे सारे एमबीबीएस डॉक्टर्स साठीच्या वरचे आहेत. तेही कारण असू शकेल. मी त्यांना दोष अजिबातच देत नाही.
पण होमिओपॅथ डॉ्क्टरही त्याच वयाचे आहेत माझे. त्यांचा त्यांच्या औषधांवर इतका विश्वास आहे. मात्र ऍलोपॅथचा स्वतःवरच विश्वास नाही असं समजायचं का...?
मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथले एम.डी, एम.एस. डॉक्टरही म्हणे आपल्या स्वतःच्या घरातून व्हिडिओवर संवाद साधतात पेशंटशी. प्रत्यक्ष येऊन तपासत नाहीत. बघत नाहीत.
परिस्थिती खूप बेकार आहे. या अशा पावसाच्या सुरुवातीच्या वातावरणात नेहमीचे आजार, ताप, संसर्ग इत्यादी उचल खातात आणि कोरोनाची भीती अधिक वाटते. अशावेळी त्या पेशंट्सनी जायचं कुठं? एरव्ही हा सिझन म्हणजे डॉक्टरांच्या कमाईचा सिझन. त्यांना आता आपल्या पेशंट्सविषयी आस्था नसेल का?
-अलका गांधी-असेरकर
-

Jun 9, 2020

भीती -

भीती - 

भीती -
तीन महिने कड्क नियम पाळूनही परवा माझ्या मुलाला थंडी, ताप आणि सर्दी, अंगदुखी जोरदार झाली. नि आमच्या तोंडचे पाणी पळाले. खात्री होती की साधा, ऋतुबदलाचा ताप आहे, आणि वर्ष-दोन वर्षांतून त्याला एकदा येऊन जातो. तरीही मन चिंती ते वैरी न चिंतीप्रमाणे मन फणा काढतच होतं.
माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं तर केवळ सोशल मिडियामुळे आणि मिलिंद पद्कीसारख्या लोकांच्या पोस्ट्स सुरुवातीपासून फॉलो केल्यामुळे नेमकी काळजी कशी आणि कुठे घ्यायला हवी ते कळले होते. बऱ्यापैकी काळजी अगदी सुरुवातीपासून घेत होते. आणि अजूनही घेतोच.
त्यामुळे गरम पाणी, सुंठ, हळद, काळी मिरी, तुळस इत्यादीचा काढा, ग्रीन टी हे त्याला सतत देत राहिले.गुळवेल पावडर दिली. हे सगळं करताना मी त्याला सारखं, 'तोंडाला चव आहे ना? जाणवते ना?" हे विचारत होते. तर तो म्हणायचा, "ह्या एवढ्या पावडरी खाल्ल्यावर काय तोंडाला चव राहणार आहे?" दोन तीन वेळा व्हिक्स आणि कोबीच्या पानांची वाफ दिली. आणि आमचे होमिओपॅथीचे फॅमिली डॉक्टर यांना फोन करून सल्ला घेतला. नि कुठल्याही डॉक्टरकडे न जाता घरीच त्याला तीन तीन तासांनी अर्सेनिक अल्ब.२०० नि ऱ्हस टॉक्स २०० च्या चार चार गोळ्या देत राहिलो.
डॉक्टरांनी सांगितलं होतं (नेहमीप्रमाणेच) की उद्या सकाळी ताप उतरेल. मला सारखं सारखं फोन करू नका आणि त्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी ताप उतरला.
व्हिटॅमिन सी आणि इतर गोळ्या तर गेले तीन महिन्यापासून तिघेही घेतोय.
पण त्याच्यासाठी सतत नाचानाच करून आणि खड्या पायावर उभं राहून मला थकवा आला. नि काल मला सटासट शिंका सुरू झाल्या. नि पुन्हा भीतीने ये रे माझ्या मागल्या करत ग्रासले. पण मला तर बारा महिने तेरा काळ सर्दीचे विविध प्रकार सतत होत असतात. त्यामुळे गपगुमान राहून मीही अर्सेनिकचा एक डोस घेतला. वाफ घेतली. व्हिक्स चोपडले. आता बरे आहे.
एक महत्त्वाचे. घरच्यांना, जिवलगांना काही झाले तर आपण डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. काय व्हायचे ते होवो. मुलाला दिवसभर जवळपास एक ताप राहिला. त्यामुळे त्याची कंबर नि डोके दुखत होते. ते चेपून देत मी त्याच्याजवळच बसून होते. तोंडाला मास्क लावून.. :D
या सगळ्यात नवऱ्याची साथ आणि धीर भक्कम आहे. घरात हे काम माझं, हे तुझं असं आधीही नव्हतं. आता तर बिचारा माझ्याहून दुप्पट कामं करतो. कारण त्याला माझ्यासारखा फेसबूकला वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे ते साहजिकच आहे. नाही का?🏃‍♀️🏃‍♀️
हे आता हसतेय, पण परवा माझंच तोंड बारीक झालं होतं. सर्वेपि सुखिनः सन्तु,
सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखभाग भवेत्||
ओम शांतीः शांतीः शांतीः

Jun 6, 2020

सावित्रीची क्षमता -

सावित्रीची क्षमता -

सावित्रीची क्षमता -
सत्यवानाची सावित्री वटपौर्णिमा करत नव्हती, वड पुजत नव्हती नी उपास करत नव्हती.
ती यमाच्या मागे गेली होती, एकटी.. नि त्याच्याशी तर्कबद्ध वाद घालून त्याला परत घेऊन आली होती.. अगदी कथेप्रमाणे शब्दशः विचार केला तरी...
ही महत्त्वाची गोष्ट लोक विचारांतच घेत नाहीत..
बायकांना तर्कशुद्ध वाद घालायला शिकवा. पण ते तर समाजाला चालत नाही आता.. स्त्रियांनी वाद घातलेला. स्त्रियांनी वाद घातला तर तिला भांडकुदळ, आक्रस्ताळी अशी लेबलं लावायची. हो ला हो करणाऱ्या स्त्रियांना मेडलं द्यायची ही सामाजिक रीत आहे. त्यामुळे तिला वड पुजण्याची अनुमती असते, मात्र वाद घालण्याची नाही.
वटपौर्णिमेची पुजा करणाऱ्या स्त्रियांचे नवरे अर्ध्या रात्री हार्ट अटॅक येऊन पडले तर त्यातील किती स्त्रिया त्याला एकट्या उठून, कोणाचीही मदत न घेता हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतील, दारातली गाडी चालवत किंवा इतर कोणती व्यवस्था तातडीने करून? की सावित्रीचा जप करत बसतील .. याचा सर्वे करायला हवा..
माझा नवरा लॉकडाऊनमध्ये एक महिना परक्या गावात परक्या ठिकाणी अडकून पडला होता. दिड महिन्यापूर्वीच, जेव्हा लॉकडाऊनचे नियम कडक होते तेव्हा, मी पोलिस स्टेशनला तीन चकरा मारून, चौकशा करून ऑनलाईन ईपास मिळवला आणि स्वतः गाडी चालवत एकटी जाऊन त्याला घेऊन आले. जर मी हे केलं नसतं, तर अजूनही तो तिथेच अडकून पडला असता. हे माझं कौतुक नाही. मला तर ही गोष्ट अगदीच सामान्य वाटते. पण माझ्या एका मैत्रिणीला ते फार कौतुकास्पद वाटलं. तिचं म्हणणं, की असे गट्स किती स्त्रियांमध्ये असतात...
मला स्वतःला यात काहीच कौतुक वाटत नाही. ही सामान्य बाब आहे आणि प्रत्येक मुलीला लहानपणापासून असं एकटं वावरायची, संकटं, अडचणी कोणत्याही पुरुषाच्या मदतीशिवाय अंगावर घेण्याची संधी आणि सवय मिळायला हव्यात.
मी वयाच्या सोळा- सतराव्या वर्षांपासून कोकणातून निघून मुंबई, अहमदाबाद करत एकटी गुजरातेतल्या खेड्यावर पोचायचे. काहीही मोबाईल इत्यादी साधने नसताना त्या काळात. मुख्य म्हणजे माझ्या घरचे मला तशी पाठवायचे. मुलगी एकटी कशी जाईल हा प्रश्न त्यांना पडला नव्हता. आणि लग्नानंतर बाळंतपणानंतर माहेरून माझ्या अडीच महिन्याच्या मुलालाही कोकणातून एसटीने घेऊन एकटी डोंबिवलीला आले होते. लहान मूल आहे तर माझ्या सोबतीला कुणी असावे असे ना माझ्या घरच्यांना वाटले होते, ना मला..तेवढा विश्वास त्यांचा माझ्या क्षमतेवर होता, आणि माझा माझ्यावर. (त्या प्रवासात अडचणी खूप आल्या होत्या, त्यावरही मी एकदा लिहिले होते.)
मी आज डोंबिवलीसारख्या बिग सिटीत राहते. आणि माझ्या अवतीभवती, ओळखीत आजही अशा अनेक स्त्रिया, मुली आहेत, ज्यांना बँकेत जाऊन साधे पैसे कसे भरायचे, काढायचे हे माहीत नाही. त्या जात नाहीत. त्यांना जावंसं वाटत नाही. घरचे पुरुषच जातात. अजूनही लांबचा प्रवास कुणा पुरुषाच्या सोबतीशिवाय एकट्याने करू शकत नाहीत. त्यामुळे आता असं काही राहीलं नाही नि तुम्हीच एकट्या काही कौतुकाच्या नाही असं मला म्हणू नका. आजही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आत्मनिर्भर स्त्रिया फार म्हणजे फारच कमी सापडतील.
गेल्याच महिन्यात हैदराबादची एक मुस्लिम महिला लॉकडाऊनमध्ये सहाशे किमी दूर अडकलेल्या आपल्या तरूण मुलाला घ्यायला ई-पास वगैरे व्यवस्थित काढून आपल्या छोट्याशा स्कूटीवर गेली आणि जाऊन येऊन जवळपास १२ -१४शे किमी प्रवास करून त्याला घेऊन आली. ही खरी सावित्री. त्यासाठी तिला वड पुजायची गरज नव्हती. नि नाही.
अर्थात हे सगळ्या स्त्रिया करू शकतात. सर्वच स्त्रियांमध्ये या क्षमता असतात. प्रश्न हा आहे की त्यांनी हे करावं, असं स्वतंत्र वावरावं अशी संधी आणि सूट त्यांना कितीशी दिली जाते. तिथे मात्र तिला परावलंबीच ठेवले जाते. मुलग्यांना मात्र लहानपणापासूनच असं एकटं वावरायची संधी आणि उत्तेजन दोन्ही दिलं जातं. त्याने उपास तापास करत बसावं अशा अपेक्षा त्याच्याकडून ठेवल्या जात नाहीत. जे लोक अशा व्रतांमागची (नसलेली) शास्त्रीय कारणं सांगून, मग ही व्रतं केली तर काय बिघडलं असा प्रश्न विचारतात, त्यांना मग पुरुष, मुलगे असं एकही व्रत का करत नाहीत? त्यांच्यासाठी अशी कोणतीच व्रतं का नाहीत असे प्रश्न पडत नाहीत नि ते यावरअजिबातच विचार करताना दिसत नाहीत.
बहुतेक मुलींना लहानपणापासून नको तितकं जपून ती अधिकाधिक घरातच कशी राहील अशीच व्यवस्था केली जाते. नोकऱ्या बिकऱ्या देखील सुरक्षित आणि घर सांभाळून वगैरे सोयीच्या असतील तितक्याच करू दिल्या जातात. मात्र वडपौर्णिमा, करवा चौथ, हरतालिका नि काय काय अशी निर्बुद्ध व्रतं करायला मात्र जोरशोरसे उत्तेजनं दिली जातात. मग, बघा आमच्या मुली, बायका उच्चशिक्षित असूनही कशा संस्कृती सांभाळतात म्हणून गौरवं केली जातात. कारण त्यात पितृप्रधान समाजाचा इगो सुखावत असतो. आपल्या बायकोला आपणच सात जन्म हवे आहोत. अशी योनिशुद्ध बायको आपल्याला मिळालीय याचा इगो आज २१ व्या शतकातही काही कमी तीव्र नसतो.


किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...