Aug 5, 2020

लॉकडाऊन मुलाखत

स्त्रीउवाचसाठी एक लॉकडाऊन मुलाखत.-

नाव- सीमा आनंद म्हस्के
शिक्षण – दहावी पास. (गावाकडे शिक्षण, पुढे लांब आणि चालत जावं लागत होतं म्हणून पुढचं शिक्षण घेतलं नाही. पण या कारणापेक्षाही तिच्याशी बोलताना अवेअरनेस कमी असल्याने शिक्षण पुढचं अपूर्ण राहिल्याचं अधिक जाणवत होतं.)
जात – नवबौद्ध.
सावळी, तरतरीत, हेल्दी दिसते बऱ्यापैकी. हुशारही आहे.
काम – सोसायटीतला कचरा गोळा करून म्युन्सिपाल्टीच्या गाडीत नेऊन टाकणं
मुळ गाव – जालना जिल्ह्यातलं सिद्धेश्वर पिंपळगाव
सध्या- डोंबिवलीत. तेलकोसवाडीतल्या झोपडपट्टीसदृश्य जागी वास्तव्य.

तिथे आजुबाजूला याच लोकांची वस्ती असावी. कारण वेचलेल्या कचऱ्यांची बाचकी मोठ्या संख्येत बाजूला रेल्वे रुळाजवळ टाकून ठेवलेली दिसतात.

वय – ३०

१९-२० व्या वर्षी लग्न

तीन बाळंतपणे

पैकी दोन मुलं जिवंत
नवरा – बिगारी कामगार, सध्या लॉकडाऊनमुळे घरी. काम नाही.
माहेरी आई-बाबा, चार बहिणी, एक भाऊ, बाबा बिगारी कामगार. बांधकाम व्यवसाय ठिकाणी. आई कचऱ्याचंच काम करते.

हिच्याजवळही आमच्या एकाच सोसायटीचे काम आहे. त्याचा पगार मिळतो – २०००/- महिना.

आई-बाबा बाजूलाच राहतात. आईला  कोरोना झाला होता. आता बरी झालेय. सरकारी दवाखान्यात राहून. अजूनही नातेवाईक असतील आजुबाजूला कदाचित.

लॉकडाऊन मधील बदल -
दिनचर्येत फारसा बदल नाही.

नवरा घरात काडीचीही मदत करत नाही.

मुलांचेही आवरत नाही.

उलट पसारा करून ठेवतो.

सध्या त्याला काम नाही. तंबाखूचं व्यसन आहे. दारूचं अजून तरी नाही.
नवरा काम करायचा तेव्हा पैसे घरात द्यायचा.

आर्थिक परिस्थितीत बदल – लॉकडाऊनमध्ये खराब. नवऱ्याचंही काम नसल्याने.

कामात बदल – सकाळी एका सोसायटीतलं कचरा, झाडूचं काम आटोपून मग दिवसभर घरातली कामं, पोरांची उस्तवार असते. बाकी कामात बदल नाही. आधीही तसंच होतं.

आराम मिळतो का? – हो, दुपारचा तास दीड तास मिळतो. झोपते. टिव्ही बघते. टिव्हीवर सावधान इंडिया, बातम्या, मराठी सिनेमा बघते.

 

मैत्रिणी आहेत का? – इथे नाहीत. गावाकडच्या आहेत गावाकडे. त्यांच्याशी फोनवर बोलते.
सुख-दुःख कुणाशी शेअर करते का? – नाही. कुणाला दुःख सांगत नाही. अगदी आईबाबानाही नाही. आतल्या आत घुसमटते.

 

आवडीचं खाणं करून खाते का? – होय.

फळं बिळं? – नाही फारसं. तेवढं परवडत नाही. मुलांनाही नाही. बिस्कीटं, टोस्ट इत्यादीही नाही फारसं.

 

नवऱ्याचं प्रेम आहे का? – आहे.

 

सध्या भांडणं वाढलीत का? – होय. कारण मदत करत नाही. हिच्या श्रमाची किंमत नाही असं हिला वाटतं.

मारतो का? – हात उचलतो कधी कधी असं म्हणाली.

कितीदा रडली? – नाही रडत असं म्हणता म्हणता माझ्यासमोरच रडली. मग म्हणाली, हो रडते. पण कोणाशीही शेअर करत नाही. आईशीही नाही.

 

मदत कोण करतं? एरव्ही आई करते थोडी फार. सध्या सोसायटीकडून अपेक्षा होती. पण सोसायटीने अजून तरी जास्तीचा काही पैसा दिला नाहीए.

(मी तिला दोनदा पाच पाचशे रुपये आणि एकदा दोनशे रुपयाचे गहू भरून दिले.)

 

नवरा गावाकडे जायचं म्हणतोय सगळं सोडून. तिथे काही काम आहे का म्हटलं तर नाही म्हणाली. तिथे जाऊन शोधायचं. शेती बिती नाही. तिला म्हटलं, नको जाऊस. इतके दिवस काढलेस. तिथेही अनिश्चित आहे तर इथेच राहा. तिला इथेच राहायचंय. पण नवरा ऐकत नाही. जायचं जायचं म्हणतोय.

नवऱ्याला दुसरी कामं शोध म्हटलं, तर म्हणतो सवय नाही दुसऱ्या कामाची. अजून तरूण आहे तरी. मी सांगितलं आपला गुरखा नुसत्या गाड्या धूवून आणि सोसायट्यांचे पाणी सोडून दहा पंधरा हजार कमवतोय. आजुबाजूच्या सोसायटीतून गाड्या धुण्याचे काम मिळव विनंती करून. तर म्हणाली त्याला सवय नाही दुसऱ्या कामांची.

दहावी पास आहे आणि जातीचे आरक्षण, सुविधा आहेत तर खरंतर सरकारी नोकरी मिळू शकली असती. अजूनही मिळू शकते. पण सोर्सेस ठाऊक नाहीत. कुठे कसा प्रयत्न करायचा माहीत नाही. नवरा बहुधा दहावी पास नाही.

 

भविष्याबद्दल आशादायी आहे का? – तर हो म्हणाली.

पण भविष्य बदलणार कसं याचे उत्तर तिच्यापाशी नाही. तिला म्हटलं, हुशार, तरतरीत आहेस तर हे काम सोडून पोळी भाजी इत्यादीची कामं शोध. घरकाम शोध. पण कोण देणार असं तिला वाटतं? कारण कचरा कामं करणाऱ्यांना लोक सैपाकघरातल्या कामासाठी घेत नाहीत सहसा.

---------

बाई म्हणून मला तरी तिच्या परिस्थितीत इतर बायांपेक्षा काही फार वेगळी परिस्थिती वाटली नाही. एक आर्थिक परिस्थिती सोडता.
मध्ये मिळून साऱ्याजणींचे ऑनलाईन शिबीर होते. त्यातही बायकांनी हिंसाचार होत नाही असे म्हटले होते. त्या मध्यमवर्गीय बायका होत्या. नवऱ्याने मारलं तरी बाहेर सांगायचं नाही हा आपल्याकडे रिवाज आहे. ही सीमा सुद्धा खोदून विचारल्यावर हात उचलतो म्हणाली, रडते म्हणाली. अन्यथा नाहीच म्हणत होती आधी. तर इतर बायका काय म्हणणार? मध्यमवर्गीय संस्कार तर अजून कडक असतात. त्या काय शेअर करणार आपल्या व्यथा जाहीरपणे?

निष्कर्षया वर्गात निदान अवेअरनेस जागृत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. जात, शिक्षण, आरक्षण प्रमाणे नोकऱ्या मिळतात, मिळू शकतात. त्यासाठी काय करायला हवं याची माहिती देणारं कुणीतरी हवं. शिक्षणासाठी आग्रह धरणारे कार्यकर्ते हवेत. कुटुंब नियोजनाचा प्रभावी प्रचार करणारे लोक हवेत. त्यासाठी थोडीफार मामूली मदत मिळवून देणारे हवेत. तशी मिळूही शकते. हे काम त्या त्या जातीनेच अधिक केले तर उत्तम. कारण प्रत्येक जातीत एक शिक्षित, आर्थिक संपन्न, हुशार वर्ग असतोच. जातीच्या संघटना हे काम करू शकतात. मी असं म्हणत नाही, की जातीचं जातीने पाहावं म्हणून. किंवा सरकारकडून काही अपेक्षा ठेवूच नयेत असं. परंतु मी माझ्या आजुबाजूला बघते. उच्चवर्णियांच्या जात संघटना अशा प्रकारची कामं करत असतात. आपल्या समाजातील प्रमाणात गरीबांना, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, मिळवून देत असतात. फंड गोळा करत असतात. यात काही चुकीचं वाटत नाही. मग या तळागाळातल्या लोकांच्या जातसमाजानीही हे करायला हवे. तशा त्या करतात की नाही ते मला माहीत नाही.  
सहसा मी अशा लोकांना सरकारकडे रडताना अधिक पाहते. सरकारने करावे, त्यासाठी मोर्चे, आंदोलने, धरणे, संप, इत्यादींसाठी कार्यकर्ते गोळा करून त्यांच्या रिकामटेकडेपणात अधिक भर घातली जाते. त्याऐवजी अशी सकारात्मकता ठेवून जातबांधवांसाठी काही अशी मदत केली प्रत्येक प्रगती केलेल्या व्यक्तीने तर ते अधिक चांगले.

हेच शेतकरी वर्गातही व्हायला हवं. मोठ्या शेतकऱ्यांनी लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी थोडी झीज सोसणे, त्यांच्यात प्रबोधन करणे, त्यांना जागरूक करणे, मदत मिळवून देणे ही कामे केली तरी जखमांवर बराच ईलाज होईल. जगण्याची, आधार असल्याची भावना निर्माण होईल. तसे होत आहे की नाही मला माहीत नाही.

- अलका गांधी-असेरकर

 

 




 

 



 


Aug 2, 2020

दोन स्त्रियांमधील उत्तम मैत्री - आणि कुसुमाग्रजांची कविता.

दोन स्त्रियांमध्ये उत्तम मैत्री असू शकते का? -
साधारण मैत्रीचे दाखले, उदाहरणं दिली जातात ती पुरुषांच्याच मैत्रीची. मघा डॉ. सचीन लांडगे यांनी देखील ते लिहिलेय.
सहसा स्त्रियांच्या मैत्रीची उदाहरणे दिली जात नाहीत.
उलट स्त्रीच स्त्रीची कशी शत्रू असते वगैरे मीठमसाला लावून पसरवले जाते.
त्यावरून ...
परवा एका मैत्रिणीशी कुसुमाग्रजांच्या 'उषास्वप्न' या कवितेवर बोलणं चाललं होतं. मला खूप आवडते ती कविता. एकेकाळी तोंडपाठ होती मला ती मोठीच्या मोठी कविता. आताही बरीचशी आठवते म्हणताना..
त्यावर बोलत असताना तिला त्या उषा-अनिरुद्धच्या कहाणीत अधिक प्रकर्षाने जाणवला तो उषा आणि चित्रलेखा या दोघींच्यातला मैत्रीसंबंध. म्हणजे तिला उषा-अनिरुद्धच्या प्रेमापेक्षाही या दोघींच्या मैत्रीने अधिक भुरळ घातली.
आणि खरंही आहे
सहसा स्त्रिया आपल्या प्रियकराबद्दल मैत्रिणींशीही बोलत नाहीत. स्त्रियांमध्ये गुपितं राखली जात नाहीत, म्हणून त्या कुणाला सांगत नाहीत म्हणतात. शिवाय स्त्रिया जेलसही असतात. मैत्रिणीला एवढा चांगला बॉयफ्रेन्ड मिळाला तर त्या जळणार कदाचित. काड्या करतील कदाचित. अशीही भीती असते की काय कोण जाणे...
पण इथे ती आपल्या मैत्रिणीला, चित्रलेखाला आपल्या स्वप्नांत आलेल्या अनोळखी राजकुमाराबद्दल सांगते. तो आपल्याला हवाय हे सांगते. त्याच्याशिवाय मला सगळं उदास वाटतंय हेही सांगते. आणि चित्रलेखा एकेका राजकुमाराची चित्रं काढत जाते. ती उत्तम चित्रकार असते आणि ती पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांतील सगळ्या राजकुमारांना ओळखत असते. (म्हणजे त्या काळात ती किती फिरत असणार हे बघा..)
जेव्हा अनिरुद्धचं चित्र ती काढते, तेव्हा उषा म्हणते की हाच तो. पण उषा-अनिरुद्ध यांच्या बापांचं वैर असतं. अनिरुद्ध हा कृष्णाचा नातू. आणि कृष्ण आणि बाणासूर हे तर शत्रू. हे लग्न कसं होणार?
मग चित्रलेखा आपल्या साथीदारांसह रात्रीची चोरमार्गाने अनिरुद्धच्या महालात शिरते. तिथे तो मंचकावर झोपलेला असतो. त्याला तसाच झोपलेला मंचकासह उचलून त्याला किडनॅप करून ती उषेच्या महालात आणून ठेवते.
अर्थात उषेला बघताक्षणी तोही तिच्या प्रेमात पडतो. दोघे तिथे गांधर्व विवाह करतात. आणि तो अनेक दिवस उषेच्या महालीच राहतो. आणि नंतर कृष्ण-बाणासूराचं युद्धं बिद्ध...
पण दोन स्त्रियांमध्येही अशी मैत्री असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुराणातल्याच श्रीकृष्ण-अर्जून, श्रीकृष्ण- द्रौपदी, दुर्योधन-कर्ण इत्यादींच्या मैत्रीची उदाहरणे उत्तम मैत्रीची म्हणून दिली जाताना, दोन स्त्रियांमधील या मैत्रीचं, उषा आणि चित्रलेखाचं उदाहरण का दिलं जात नाही?
कारण मग स्त्रियांना बदनाम कसं करता येईल ना?
-
-
-
'उषास्वप्न' या कुसुमाग्रजांच्या कवितेत ही पूर्ण कथा नाहीच. एवढ्या मोठ्या कवितेत उषा केवळ आपल्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल, त्या स्वप्नातील राजकुमाराबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगते एवढंच वर्णन आहे. (चित्रलेखाचंही नाव नाही त्यात) पण ते कुसुमाग्रजांच्या शब्दसंपदेचं विलक्षण दर्शन घडवणारं आहे. वाचकांना उषा-अनिरुद्धची प्रेमकहाणी ठाऊक असल्याचं गृहीत धरून ते लिहितात.
पृथ्वी वृत्तातली ही कविता मस्त चालीत म्हणता येते. आणि तेव्हाचे कवी वृत्तात लिहित असूनही किती सहज लिहीत, कुठेही ओढूनताणून शब्द बसवल्याचे किंवा काढल्याचे वाटत नाही. प्रत्येक ओळ चपखल. शब्द चपखल.
सर्वात महत्त्वाचे कवीने कुठे थांबायचे, हे त्यांना चांगलंच उमजलेलं असतं. सकाळी उठल्यावर सूर्याला कोसत चढत्या क्रमाने कविता उषेच्या रात्रीच्या स्वप्नांत पुढे पुढे सरकते, तेव्हा उषा-अनिरुद्धचा प्रणयही आता कवी शब्दात चितारणार असे वाटत असतानाच तिथे ते विवेकी चतुराईने थांबतात. त्या शेवटच्या ओळी -
गळून विनयापरी वसन गे पडे रेशमी
तशीच सरुनी पुढे विझविला सखे दिप मी
सखे विझविला दिवा विझविलेच सारे दिवे
भये मजसी जाग ये, सकळ लोपली वैभवे
कुठे न अनिरुद्ध तो, प्रणय ते कुठे मंदीर
कठोर पडला कळे किरण मात्र नेत्रांवर......
आणि इथे कविता संपते.
- अलका गांधी-असेरकर

Jul 31, 2020

ईमरोज - थोडा माझ्याही वाट्याला.

रमा नाडगौडाची फेसबूक पोस्ट वाचल्यावर आठवण म्हणून कमेंट केली तिथे.. तीच इथं देते.
पोस्ट होती, एका आईने मुलाबरोबरच दहावीची परीक्षा दिल्याबद्दल..
त्यावरून सहज आठवणी आल्या..
मी देखील मुलगा शाळेत जायला लागल्यावर म्हणजे साधारण ३१ व्या वर्षी बीए फर्स्ट ईयरला प्रवेश घेतला. त्यानंतर बी.ए. एम.ए. सेट इत्यादी होईपर्यंतची सात आठ वर्षे मुलगा आणि मी सोबतच शिकत होतो, परीक्षा देत होतो.
दोघांच्या परीक्षा सोबत यायच्या. नि बाबाची तारांबळ उडायची.
माझी परीक्षा आली की मी घरातल्या कामांकडे अजिबात बघायची नाही आठ पंधरा दिवस.
दिवसभर हातात पुस्तक. अगदी टॉयलेटला जातानाही. तेवढा वेळही वाया घालवायचा नाही.
म्हणजे फार अभ्यासू होते असं नाही. पण पहिल्यापासून आयत्यावेळच्या अभ्यासावर अवलंबून. परत मुलाचाही अभ्यास मीच घेत असे. त्यातही वेळ जायचा.
बाबा मग रजा घ्यायचा. आठ दिवसांची. सैपाकपाणी सांभाळायचा.
सेटची परीक्षा होती. कलिना विद्यापीठात. तशी तेव्हा मुंबईत थोडीशी नवीन होते. पण एवढीही नाही. तरी मी नको म्हणतानाही तो माझ्या सोबत आला.
मुलाला मैत्रिणीकडे सोडले. मुलगा तेव्हा दहाबारा वर्षांचा होता.
परीक्षेचे तीन पेपर होते. एक एक तासाचे. आणि दोन पेपरच्या मध्ये एक तासाची गॅप. असे पाच तास म्हणजे जवळपास दिवस मोडणार होता तिथे. मोबाईल वगैरे नव्हते तेव्हा काही.
इतका वेळ तो बाहेर बसून राहिला. मधल्या वेळेत खायला सोबत डबा घेतला होता. पण तो माझा पेपर चालू असताना विद्यापीठाच्या बाहेर जाऊन (जे बरंच अंतर होतं तसं.) डब्यासोबत खायला वडे, सामोसे, चहा, पाणी इत्यादी घेऊन यायचा.
मधल्या सुट्टीत मी पुढच्या पेपरचा अभ्यास करत बसायचे. बाबाने आणलेलं आयतं खात.
यातला बाबा म्हणजे माझ्या मुलाचा बाबा..
That way my hubby is very much caring husband. मी भरपूर काही काही शिकत राहिले. बारीक सारीक क्लासेस करत राहिले. छंद जोपासत राहिले. ते सगळे त्याच्याच जीवावर.
ईमरोजशी तुलना नाही. ईमरोजच्या कथाही नंतर उशीराने वाचण्यात आल्या. पण हा बराचसा तसाच नवरा मिळाला मला. तुलना यासाठी नाही, की त्याच्या काही गोष्टींचा, सवयींचा मला त्रासही झाला बराच. पण तरीही तो इतर टिपिकल नवऱ्यांहून फार वेगळा आहे. हेही तितकंच खरं.
- अलका गांधी-असेरकर

Jul 21, 2020

हर्डीकर

हर्डीकर गेला..
घराजवळचा किराणा दुकानदार मला म्हणाला.
वाईट वाटलं. 
या परिसरात राहायला येऊन तीसच्या वर वर्ष झाली. त्या दिवसापासून त्याची ओळख झाली. 
परिसरातील सर्वांच्या घरातील छोटी मोठी प्लबिंगची कामं, इलेक्ट्रिकल कामे, घराची दिवाळीची स्वच्छता ते सोसायटींमधली तुंबलेली गटारे साफ करणे इथपर्यंत सगळी कामं करणे हा त्याचा व्यवसाय. पैसे तुम्ही द्याल तेवढे. फार झिगझिग नाही. अगदीच कमी दिले तर बोलणार. अन्यथा ठिक आहे म्हणून जाणार.
माझ्या घराला लागून असलेल्या एका चाळवजा ईमारतीत तो राहत होता जिन्याच्या खालच्या खोलीत. पहिली बायको वारली. त्यानंतर बरीच वर्षे एकटाच राहत होता. मुलबाळ नव्हतं. 
आता गेला तेव्हा त्याचं वय साठीच्या आसपास असेल फारतर. आतच. बाहेर शक्यता कमी. 
दहा एक वर्षापूर्वी त्याने दुसरं लग्न केलं. आणि तो इथून बदलापूरला राहायला गेला. तिथे त्याच्या सासऱ्याची छोटी चार रुमची चाळ होती. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना त्यानेच सांभाळलं. तिथून तो डोंबिवलीला कामासाठी येत असे. 

त्याची परिस्थिती मात्र आम्ही राहायला आलो, तेव्हा होती तशीच राहिली. ना त्याहून वाईट झाली. ना चांगली झाली.

अर्थात आमची तरी काय फारशी बदलली नाही परिस्थिती या तीस वर्षात.
उत्पन्न आणि खर्च यांचा रेशो तोच राहिला. 
हर्डीकर, हर्डीकर...
हर्डीकरला डिमान्ड खूप होती. लोक त्याला शोधत असायचे. हर्डीकर दिसला का? कुणी म्हणायचं आत्ता होता इथं, त्या गल्लीतल्या इमारतीत गेलाय काही कामासाठी. अजून आलाच नाही आज. इत्यादी उत्तरं मिळायची. कोपऱ्यावरच्या पानवाल्याकडे त्याच्यासाठी निरोप ठेवून द्यायचा. फोन नव्हते तेव्हा. की अमुक एका सोसायटीत बोलावलंय म्हणून सांगा. पानवाला त्याला बरोबर निरोप द्यायचा. नंतर त्याने मोबाईल घेतला. आणि तो सतत वाजत राहिला. कामाला कमी नव्हती. पण कामं ही अशीच फुटकळ पाच पन्नास रुपये मिळवून देणारी. तो सगळी कामं करत असला, तरी तो त्यातील एकाही कामात एक्सपर्ट नव्हता. तात्पुरती गरज भागायची इतकंच. कुठे फ्यूज उडालाय, कुठे नळ गळतोय, कुठे बल्ब बदलून हवाय. कुठे गटार तुंबलंय... 

हर्डीकर जातीने ब्राम्हण होता. कानडी ब्राम्हण. तरी देखील संडासच्या टाक्या साफ करण्यापासून, गटारं उपसण्यापासून सगळी कामं करत होता. ती कामं करताना त्याचा अवतारही तसाच असे. कपडेही तसेच मळके, घाणेरडे असत. कधी जोडीला रस्त्यावरील गटार साफ करणाऱ्यांना घेऊन येत असे मदतीला. या कामात तो ब्राम्हण होता म्हणून काही लोक त्याला वेगळी वागणूक देत नव्हते. लोक जेव्हा म्हणत एक तरी ब्राम्हण दाखवा गटार साफ करणारा असतो का? तेव्हा हे माझ्या समोरच असलेलं उदाहरण मी त्यांना देत होते. जर माझ्यासमोर एक उदाहरण होतं तर अन्यत्रही असणारच ना? कामाला जात नसते. कामाला मेहनत असते फक्त.

एका सोसायटीत लाकडी फळकुटावर बसून दुसऱ्या मजल्यावरच्या भींतीचं काहीतरी दुरुस्तीचं काम करत असताना पडला. पाय मोडला. महिना दोन महिने घरी बसला. पण पुन्हा कामं सुरू केली. घरी बसून चालणार नव्हतं. 

बरेच दिवसात दिसला नव्हता. घरातही त्याचं फारसं काम पडलं नव्हतं. त्यात गेले चार सहा महिने तर लॉकडाऊनच्या गोंधळाने कुणालाच बोलावता येत नव्हतं. त्यामुळे हर्डीकरची आठवण नव्हती. 

आज बातमी कळली की तो आजारी होता नि त्यातच गेला. काल की परवा काहीतरी. त्याच्या घरच्यांशी काहीच संबंध नाही. अशी बरीच माणसं आपल्या अवती भवती असतात. कधी त्यांच्यावाचून खूप अडतं. त्यांना शोधत फिरावं लागतं. पण ती वेळ निभावली की मग आपण विसरतो त्यांना. 
हर्डीकर पण तसाच. लोकांत असून नसलेला. परिसरात असून नसलेला. बहुधा आपण सगळेच असेच असतो. समोर दिसतो तोपर्यंत लोकांच्या आठवणीत असतो. बाजूला झालो की विस्मरणात होतो. अगदी मोठा साहेब देखील खुर्चीत असेपर्यंत त्याची जी हुजुरी करणारे लोक असतात. तो एकदा का रिटायर्ड झाला की नंतर लोकांच्या खिजगणतीत राहत नाही. 
हर्डीकर आमच्या सोबतच म्हातारा होत गेला इथं. पण अजून तितकाही म्हातारा नव्हता. अजून म्हातारपणाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला होता नि तो गेला. 
थोडं मनात येतं की संपर्कात असता, तर काही मदत हवी का विचारता आलं असतं. मदतीची गरज होती का त्याला हे देखील कळले नाही. त्यांचं वाईट वाटतं. आजुबाजूला दिसणाऱ्या लोकांना विचारत राहते, काही मदत हवीय का? यात कचरेवाली, कामवाली, पोळीवाली, समोरचा भाजीवाला, गुरखा इत्यादी येतात. पण हा आता जवळ राहत नव्हता. समोर दिसत नव्हता. तर त्याची आठवणच नाही राहिली. याची खंत वाटतेय.

- अलका गांधी-असेरकर

Jul 12, 2020

संसार आणि कामाची विभागणी -

कामाची विभागणी-
अजूनही घरातलं काम कुणी करायचं, सैपाक कुणी करायचा, साफसफाई कुणी करायची याच्या चर्चा माध्यमांमधून जोरशोरसे झडत असतात.
लॉकडाऊन काळ सोडून द्या.
माझं लग्न होऊन तीस वर्ष उलटली.
आमच्या घरात कधीही हे काम बाईचं नि हे काम पुरुषाचं अशी विभागणी नव्हती. अशी भावना नव्हती.
अर्थात हे कदाचित आम्हीच दोघं आणि नंतर मुलगा असं स्वतंत्र कुटुंब असल्याने शक्य झालं असेल. एकत्र, अगदी सासू सासरे जरी असते फक्त सोबत, तरी तेव्हा हे कितपत शक्य झालं असतं ते सांगू शकत नाही.
लग्नानंतर मी जवळपास पूर्णवेळ गृहीणी राहण्याचे ठरवले. अधुनमधून पार्ट टाईम नोकऱ्या केल्या. पण त्या पॉकेटमनी मिळवून देण्यापुरत्याच होत्या.
त्यावेळी नवरा मात्र पूर्णवेळ नोकरी करत होता.
आणि तरीही तो घरची कामं सगळी माझ्या बरोबरीने करत होता. अगदी सैपाकासह. मला रात्री जागता येत होतं, तर त्याला सकाळी लवकर उठता येत होतं. साहजिकच सकाळी उठल्यावर पाणी भरून घेण्यापासून दूध, चहा, मुलाला आंघोळ घालून शाळेसाठी सोडून येणं हे त्याने वर्षानुवर्ष केलं. सहजपणे केलं. त्यानंतर मी उठायचे, आठ साडेआठ वाजता. नंतरची कामं मी करत असे आणि तो ऑफिसला निघत असे.
मुलाचा अभ्यास नेहमी मीच घेतला. त्याने क्वचितच गणित वगैरे शिकवलं असेल. मुलाच्या आजारपणात रात्री मी जागले. कारण त्याला रात्री जागवत नसे.
तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघंही बाहेर सोफ्यावर लोळत टाईमपास करत असू, तरी मी बिनधास्त, 'अरे, जरा पाणी आण ना मला प्यायला', ते ग्रीन टी दे ना करून, औषधं दे ना आणून असं काहीही म्हणू शकते आणि तोही उठून आणून देऊ शकतो. देतो. वैतागला असेल, कंटाळला असेल, तर नाही देत, तुझी तू घे उठूनही म्हणू शकतो. आणि हे व्हाईस वर्साही असू शकतं.
सैपाकघरातली कामं अर्धवट सोडून मी मोबाईलवर टाईमपास करू शकते, माझी अनुवादाची कामं हातात घेऊ शकते. कविता वगैरे खरडत बसू शकते, आणि मी बराच वेळ उठत नाही हे पाहून तो सैपाकघरातील उर्वरीत कामं उरकून घेतो. सहजपणे. अगदी रात्री दही विरजण्यापर्यंत. मात्र त्याची त्याला आठवण करून द्यावी लागते. तो पूर्णवेळ नोकरी करत असल्याने अर्थात सगळी कामं करत असला तरी प्रामुख्याने सैपाकघर आणि त्यातली कामे याचे आयोजन, नियोजन माझ्याकडेच होते आणि अधिकतर सैपाकघरातली कामंही माझ्याकडेच असतात.
मी कोणत्याही दिवशी, कोणत्याही क्षणी माझे बाहेरचे कार्यक्रम ठरवते, ठरवू शकते. हवा तितका वेळ किंवा तितके दिवस बाहेर राहू शकते. अगदी मुलगा लहान होता तेव्हाही. आणि प्रत्येकवेळी हे बाहेरचे कार्यक्रम कामाचेच असतात असं नाही, तर मौजमजेसाठी जाणे, मित्रमैत्रिणींबरोबर फिरणे, माहेरच्या अडीअडचणींना धावणे, नातेवाईकांच्या समारंभांना हजर राहणे, नाटकसिनेमा पाहायला जाणे, असे कोणतेही असू शकतात. विशेष म्हणजे या काळात नवरा कधीही फोन करून हैराण करत नाही. 'कुठे आहेस, कधी येतेस' असे लाडानेही किंवा काळजीनेही कधी विचारत नाही. अगदीच अपवाद काही काम असलं तरच तो असे फोन करतो.
मी बाहेरगावाहून येणार असेल, तर जेवणाच्या वेळी वरणभात वांगीबटाटा भाजी (ही ठरलेली अशावेळी.) आणि विकतच्या पोळ्या आणून ठेवतो. मला कधीच आठवत नाही की तो घरी आहे आणि मी बाहेरून येऊन सैपाक केल्यावर तो जेवलाय. तो जेवणासाठी माझ्यावर अवलंबून नसतो. (इथेही कधी कधी बायका मुद्दाम पुरुषांना आपल्यावर डिपेन्डन्ट ठेवतात. त्यात त्यांना कुणीतरी आपल्यावर अवलंबून आहे याचाही एक आनंद मिळत असतो असं पाहिलंय.)
आजही मुलाचे लाड माझ्यापेक्षा तो जास्त करतो. त्याने काही खाण्याची फर्माईश केली आणि मी नाही म्हटले तर तो पुरी करतो. करण्याचा प्रयत्न करतो.
थोडक्यात एखादी स्त्री घर सांभाळून नोकरीही करते, तद्वतच माझ्या घरातील या सद्गृहस्थाने घरची बाहेरची कामं सांभाळून नोकरी केली. त्याची नोकरीही बैठी नव्हती. फिरायला, साईटवर जायला लागत असे. नोकरीच्या वेळा फिक्स नव्हत्या. तरीही.
विशेष म्हणजे जवळपास हेच वातावरण मला माहेरी मिळाले होते. याबद्दल मी यापूर्वीही लिहिलेले आहे वेळोवेळी. सुदैवाने तेच वातावरण मला लग्नानंतरही नवऱ्याने दिले.
कधी कधी तो माझ्या मित्रांच्या बाबतीत पझेसिव्ह झाला थोडा, नाही असं नाही. परंतु त्याचे स्वरुप फार टोकाचे झाले नाही. किंवा मला रोखण्याकडेही गेले नाही.

हे सगळं सांगायचे कारण म्हणजे, हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटतंय. वर सुरूवातीलाच सांगितलंय त्याप्रमाणे आजही हे पुरुषाचं काम, हे स्त्रीचं अशा चर्चा आणि त्यामागच्या व्यथा, वेदना, त्रास व्यक्त केल्या जातात, तेव्हा असे पुरुषही असतात हे सांगणं मला गरजेचं वाटतं. आणि नवऱ्याचा अभिमानही वाटतो. खरंतर यात अभिमानाची काही गोष्टच नाही. पण तो जर अपवादाने असेल असा, तर त्या अपवादाचा आणि त्यामुळे मला कंफर्टेबल आयुष्य लाभलं याचा आनंद नक्कीच आहे. कारण त्याने सोयी सोयीने, किंवा मला मदत म्हणून ही कामं केली नाही. किंवा मी स्त्रीवादी आहे आणि मी त्याला तसं करायला भाग पाडलंय म्हणून केलीत असंही नाही. तर घर माझंही आहे, आणि ही जबाबदारी माझीही आहे या भावनेतून त्याने ती केली.
सर्वसाधारणपणे लग्नाआधी जे पुरुष एकटे राहिलेले असतात कोणत्याही कारणाने, मग ते शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, असे पुरुष बरेचसे स्वावलंबी असतात. तसा माझा नवराही नोकरीनिमित्ताने बरीच वर्षे एकटा राहिलेला असल्याने लग्नाआधीच त्याला सगळं घरकाम करण्याची सवय होती. सैपाकासह. सुरुवातीच्या बेसिक सैपाकातील अनेक टिप्स तर त्यानेच मला दिल्या होत्या.
मात्र जे पुरुष आईच्या हाताखाली लाडोबाच राहिलेले असतात लग्न होईपर्यंत त्यांची रवानगी आता आईकडून बायकोकडे होते आणि ते इकडची काडी तिकडे करत नाहीत असा अनुभव आहे. तोही अनुभव माझ्या घरातच आहे. माझ्या मुलाच्या रुपाने.
लहानपणापासून बाबाला सगळी कामं घरात करताना पाहूनही तो मात्र इकडची काडी तिकडे करत नाही. आणि मी त्याच्यापुढे हात टेकलेत. दोन्ही टोकाची उदाहरणे माझ्या घरातच आहेत. त्यामुळे इथं माझं कौतुक सांगत नाहीए.
मात्र याचा अर्थ आमचा संसार अगदी आदर्श झाला, आणि आमच्यात भांडणं झाली नाहीत असं अजिबातच नाही. अगदी कडाक्याची झाली नि होतात. डिव्होर्स मागण्यापर्यंत जातात. तीस वर्षात ३० वेळा डिव्होर्स मागितला गेला असेल आजवर. पण त्याची कारणं वेगळी होती. वेगळी आहेत. इथं आत्ता आपण फक्त घरकामाबद्दल बोलत असल्याने त्या कारणांची चर्चा करण्याचं कारण नाही इतकंच.
मला सांगायला आवडेल, की माझ्या धाकट्या बहिणीला देखील असाच नवरा मिळाला. तो तर श्रीमंत आणि पारंपरिक घरातला मुलगा होता. परंतु घरकाम आणि मुलाचे संगोपन त्याने अनेकदा तिच्या बरोबरीने केले.
आणि हे मी तीस वर्ष पूर्वीपासून बघत, अनुभवत आले असल्याने मला ते सहज वाटतंय आणि सगळीकडे असंच असेल, किंवा असावं असंही वाटतं. परंतु तसं ते सगळीकडे आजही नाही ही वस्तुस्थिती आहे.
अनेकदा जेव्हा मी कट्टर स्त्रीवादी मतं मांडते, लेखन करते, तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की हिला घरातच असा त्रास झाला असणार, होत असणार. परंतु रुढार्थाने मला तेवढा त्रास झालाच नाही माझ्या स्वतःच्या घरात. आणि रुढार्थाने माझा नवरा स्त्रीवादी नाही. स्त्रीवादाबदद्ल तो काहीही सांगू शकणार नाही. तरीही तो वागला ते समानतेनेच.
तरीही पितृसत्ताक समाजरचनेच्या टोचण्या सासरी माहेरी मलाही कमी अधिक प्रमाणात टोचलेल्या आहेतच.
अर्धांगी नावाचा एक फेसबूक ग्रुप मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी मिळून २०११ ते २०१६ पर्यंत जोमाने चालवत होतो. लोकांना खूप आवडतही होता तो ग्रुप. तिथं फक्त स्त्रिया नसून पुरुषही होते. अनेक पुरुषांनी तेव्हा तिथे आम्हाला नव्यानेच नाण्याची दुसरी बाजू समजतेय असं सांगितलं होतं. अनेक पुरुषांनी 'आम्ही आजवर देत असलेल्या स्त्रीवाचक शिव्या बंद केल्या आहेत आवर्जून' असंही येऊन सांगितलं होतं. आम्हा तिघी ग्रुप चालवणाऱ्या मैत्रिणींपैकी रुढार्थाने कुणालाच वर्चस्ववादी नवरा भेटलेला नव्हता. कोणती बंधने नव्हती. तिघींनाही मुलगेच होते. मुलगी असण्याच्या कथित समस्याही नव्हत्या. तरी आम्ही या विषयावर लिहित होतो. कारण या समस्या कुणा एकीच्या वैयक्तिक नसून त्या सामाजिक आहेत. कमी अधिक प्रमाणात. म्हणून त्या अनुभवावरून मला वाटतंय की सतत हा विषय चर्चिला गेला पाहिजे या उद्देशाने ही पोस्ट आहे. ही माझ्या नवऱ्याच्या कौतुकाची पोस्ट तर अजिबात नाही. तशा प्रतिक्रियाही मला अपेक्षित नाहीत. फक्त इतक्या सहजपणे घरकामाची विभागणी असायला हवी. आणि असते. असे पुरुषही असतात. त्यांना समाजासमोर आणायला हवे. जेणेकरून इतरांना त्यातून काही बोध मिळू शकेल. तिथे स्त्री-पुरुष असा भेद नसावा. दोघांनाही स्पेस असावी. आपले छंद, करीअर करण्याची. कधी संसार बिनधास्तपणे दुसऱ्याच्या भरोशावर टाकून हिंडण्याफिरण्याची, भटकण्याचीही मुभा मिळावी. तेव्हाच लग्न हे खऱ्या अर्थाने सहजीवन होते. नवरा बायको खऱ्या अर्थाने एकमेकांचे मित्र मैत्रिण होतात. पण आपल्याकडे खेकड्यासारखे एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना एकाच जागी जकडून ठेवण्याला, हे काम माझे, हे तुझे असे करण्याला दुर्दैवाने संसार म्हटलं जातं नि त्या खेकड्यांना नवरा बायको म्हटलं जातं. ना मी मुक्त राहणार, ना तुला राहू देणार. एकमेकांचं शेपूट बनून, ते सदैव धरून ठेवून एकमेकांना ओढत राहायचं. फरपटत राहायचं. व्यक्ती म्हणून एकमेकांचं स्वातंत्र्य दडपून टाकून नवरा म्हणजे पैसे कमवणारा भारवाही हमाल नि बायको म्हणजे घरातली मोलकरीण अशा तऱ्हेनेच बहुतांश संसार रेटले जाताना दिसत असतात. सुदैवाने मला वेगळे, स्वतंत्र आयुष्य लाभले.
- अलका गांधी-असेरकर

Jul 9, 2020

मर्द असाही असतो

turkish wedding dance
तो डान्स करतो तेव्हा निव्वळ मोहक दिसतो
बाथरूम मध्ये मोठ मोठ्याने गातो तेव्हा सेक्सी वाटतो
तो सैपाक करत असतो
तेव्हा सुंदर दिसतो
भाजी चिरताना लाजवाब दिसतो
तो मुलाला आंघोळ घालत असतो तेव्हा निर्मळ दिसतो
मुलीच्या केसांना रिबिनी बांधून देताना प्रेमळ दिसतो
तो घर आवरताना जबाबदार असतो
दुरुस्तीची कामे चटकन करताना जादूगार वाटतो
तो खेळताना कमाल असतो
आणि रडताना निष्पाप दिसतो
त्याचं घरात असणंही आश्वासक असतं
तो बाहेर असला की घर वाट पहात असतं
पुरुष आक्रमक होऊन
तलवार हातात घेऊन
फक्त लढताना मर्द असतो ही भ्रामक कल्पना आहे...
नि तो फक्त पैसे कमवणारा
भारवाही हमाल असतो ही बिचाऱ्यावर
लादलेली संकल्पना आहे.... त्याच्यावर मर्दपणा लादला नाही,
तर तो खरंच मर्द असतो........
- अलका गांधी-असेरकरwedding dance
Like
Comment

Jul 8, 2020

लॉकडाऊन कविता -

बा. सी. मर्ढेकरांची क्षमा मागून.. त्यांच्या 'कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो' कवितेवर आधारित.. 

कितीतरी दिवसांत 
नाही मॉल मध्ये गेलो 
कितीतरी दिवसांत 
नाही गर्दीत घुसलो 

भरल्या बाजाराची ओढ 
आहे माझी ही जुनीच 
आणि धावत्या लोकलची
शीळ ओळखीची तीच 

केव्हातरी बाजारात 
पुन्हा जाऊन निर्भय 
लोकलच्या गर्दीत 
धक्के खाईन निर्मय 

आज अंतरात भीती 
खुल्या बाजाराची भारी 
आणि लोकलची गर्दी 
अंगावर काटा काढी 

बरा म्हणून हा इथे
एकांत या बिळातला 
बरी होम डिलिव्हरी 
आणि आधार गुगल पेचा 

- अलका असेरकर

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...