मामी -
मामा मोठा तालेवार.....या ओळीला साजेसा तो मामा होता. व्यापारी परंतु प्रामाणिक. कोणाच्या अध्यात ना मध्यात. मात्र देखणा आणि शैौकीन.. सिनेमांचा, रहस्यकथांचा, नवीन नवीन वस्तू खरेदी करण्याचा..1974 सालीच त्याने इम्पोर्टेड टीव्ही घेतलेला. 6000 रुपयात. तेव्हा सहा हजार काय पण सहा रुपयेही खिशात असणं म्हणजे भारी वाटण्याचा काळ. प्रिया स्कूटर घेतली. तेव्हा गावात पहिला टिव्ही आणि पहिली स्कूटर मामाकडे होती.
मामी सुंदर, हुशार,...
पण मुलबाळ नाही..
मामाचा भाऊ याच्या विरुद्ध. त्याला चार मुलं. दोन मुली, दोन मुलगे. सगळी मुलं लहान लहान असतानाच त्याची बायको वारली.
बायको वारल्यावर भावाच्या चारही मुलांना हा तालेवार मामा आपल्या घरी घेऊन आला. त्यातल्या सर्वात लहान मुलाला आपलं नाव लावलं. त्याचे खूप लाड केले.
मामामामीला मुलबाळ नाही. पण घर मुलंबाळं असलेल्या कुटुंबापेक्षा भरलेलं. नेहमीच.
मामा अगदी तरूण असतानाच त्याच्या मामाला, जो एकटा राहत होता, बायको सोडून गेली होती, आणि आता वय झालं होतं अशा त्याच्या मामालाही आपल्या घरी कायमचं घेऊन आला होता. कारण मामाची आईही त्याच्या लहानपणीच वारलेली. आणि सारी भावंडं आजोळी वाढलेली. तेव्हा त्याच्या या एकट्या पडलेल्या मामानेच सा-यांना आईप्रमाणे सांभाळलेलं.
तर अशा या मामाला तो आपल्या घरी घेऊन आलेला आणि मरेपर्यंत त्याला सांभाळलेलं.
नंतर ही चार मुलं आणून ठेवली.
त्याचवेळी दोन बहिणी खेड्यावर दिलेल्या. त्यांच्या मुलांना तिथं आठवी नंतर शाळा नाही म्हणून एक एक करत मॅट्रिक होईपर्यंत सगळ्यांना आपल्या घरी चार चार वर्ष ठेवून घेतलेलं.
त्यातच एक मीही होते तीन वर्ष. 8 वी ते 10 वी.
दुसरी बहीण गुजरातेत. विधवा झालेली. एकच मुलगा. त्याला शिक्षणासाठी मनीऑर्डर पाठवायचा.
-आता मी शीर्षक दिलंय 'मामी'.. आणि सांगतेय सगळं मामाबद्दल. परंतु खरी कहाणी मामीचीच आहे.
मुलबाळ नसतानाही मामीच्या घरात रोज पंधरा माणसं कमीत कमी जेवत असत.
व्यापार मोठा. त्यात एक मुनीमजी (हाही मामींचा लांबचा भाऊ. म्हणजे घरच्यासारखाच. तिथेच राहायचा.) दोन नोकर, दोन गडी, एक मोलकरीण यांच्यासह आम्ही पाच, आणि आलेला गेलेला सततचा. हे रोजचे जेवणारे.
या सर्वांचा सैपाक मामी एकटी करत असे.
कपाळावर एकही आठी नाही. मामाशी कधीच भांडण नाही. दोघांचं प्रेम होतं एकमेकांवर. त्या काळात बायकोला लाडाच्या नावाने बोलवायचा मामा. सगळ्यांच्या समोर. मुंबईहून झुळझुळीत साड्या आणायचा. बाकीच्यांशी वागताना तो कडक असायचा. पण कधी तिच्याशी मोठ्या आवाजात बोलायचा नाही. रागवायचा नाही.
हा सैपाक म्हणजे गडी नोकरांना लागणा-या रोज जाड भाकरी, मुलांसाठी चपात्या, आणि मामाला आवडतात म्हणून फुलके. हे सगळं रोज करावं लागायचं. सकाळ संध्याकाळ. सैपाकाला बाई वगैरे ठेवण्याची पद्धत नव्हती.
एकच होतं. मामीचं सतत डोकं दुखायचं. सतत कपाळाला करकचून आवळून बांधलेली पट्टी असायची. तिला रात्री झोप लागायची नाही. रोज झोपेची गोळी ठरलेली होती. कधी कधी तर दोन गोळ्या.
आणि आम्ही लहान. आईला असं हे दुखतंय ते दुखतंय करताना कधीच पाहिलेलं नव्हतं. आणि मामीचं दुःख समजून घेण्याएवढी अक्कल यायला तर मला पुढे अजून तिसेक वर्ष लागली. त्यामुळे तेव्हा मामीचा राग यायचा. सारखं डोकं धरून पडून राहते. झोपून राहते म्हणून. तरी बरं की आम्हाला काही फार काम करावं लागायचं नाही. मात्र वरकाम, थोडी मदत याची तिला अपेक्षा असायची.
असंही आम्ही घरात असायचोच कुठे. दिवसभर तर शाळा, ट्युशन्स. ती फार फार तर ओटा धुऊन घे. कूकर लावून दे एवढीच कामं आम्हाला सांगायची. तरी ते जीवावर यायचं.
आणखी एक होतं. मामीला देवदेव करण्याचं वेड लागलं होतं. अर्थात घरच्या घरीच. पण सकाळी दोन दोन तास तिला देवपुजेला लागत. तेही सोवळ्यात. मोठमोठ्याने भजनं म्हणत. साग्रसंगीत पुजा. नैवेद्य. देवपुजेची भांडी घासण्याचं काम सकाळी ते मुनिमजी करून देत. मामीचा सख्खा मामेभाऊच होता तो. त्याआधी मामाचे मामा करून देत. हे दोघेही तिला दुकानातून वेळ मिळाला की कामात मदत करत.
आणि मामीच्या नणंदा म्हणत, "ही त्या दोघांकडून कामं करून घेते."
मामा आपल्याला कापडचोपड करत नाही याचाही या दोघी बहिणींना राग यायचा. पण आपल्या मुलांना चार चार वर्ष सांभाळतोय याची मात्र त्यांना कदर दिसायची नाही.
तरी बरं, धाकट्या मामाची बायको वारल्यानंतर त्याच्या चार मुलांचं ही मामीच करत होती. सुरुवातीला त्यातल्या दोघांना मामीची एक एक नणंद आपल्या घरी घेऊन गेली होती. पण दोघींनी त्यांना जेमतेम वर्षभर रडतखडत सांभाळलं आणि नंतर ती मुलं सुट्टीत मामीकडे आली ती परत यांच्याकडे गेलीच नाहीत. नेहमी तिथेच राहिली.
यातली एक मुलगी थोडी मंदबुद्धी होती. ती मामींना मदत करायची. तिचं पुढे लग्नंही झालं नाही. की तिच्यावर फारसे उपचारही झाले नाहीत.
मामाचं दुकान तालेवार दिसायचं. पण काळाच्या ओघात उतरती कळा लागली. याचं कारण मामाची तब्येत खालावली. बीपी, हार्ट यांची दुखणी सुरु झाली. त्यात लाचखोर भेसळप्रतिबंधक खात्यातील अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे विनाकारणच त्याच्यावर भेसळीचा खटला भरला.
- मामाला आशा होती की भावाची सांभाळलेली मुलं आपला धंदा सांभाळतील. परंतु त्यांच्या कोणातच ती क्षमता नव्हती. पोरं शिकलीही नाहीत फार. एक मंदबुद्धी. एक मुलगा व्यसनी, चंगीभंगी झाला. मोठी मुलगी चांगली होती. तिचं मामीनेच तिच्यायोग्य मुलगा बघून गुजरातेत लग्नं करून दिलं.
दुकान मंद झालं. नोकर-चाकर उरले नाही. पैसा उरला नाही. त्या काळात बचतीची सवयच नव्हती लोकांना फारशी. मोठ्ठं घर मात्र बांधलेलं होतं. शेवटी मामीने दुकान ताब्यात घेतलं. जमेल तसं तीच चालवू लागली. जिथे मुंबई, पुणा, सांगली, सातारा इथून मालाचे ट्रक्स भरभरून येत. आणि आजूबाजूचे व्यापारी मामाचा हेवा, मत्सर करीत तिथे त्याच व्यापाऱ्यांकडून पाच पाच दहा दहा किलो माल विकत घेऊन मामी आपल्या दुकानात थोडं मार्जिन ठेवून विकू लागली. परंतु मामीने या गोष्टींचा कधी इगो बाळगला नाही. आपला काळ पडता आहे बघून त्याच व्यापाऱ्यांची मदत घेतली जे व्यापारी कधीकाळी मामांचा राग करीत असत.
मामाचं चांगलं चाललेलं असताना तो बँकेत कुणाच्या तरी कर्जाला जामीन राहिला होता. आणि त्या माणसाने कर्ज बुडवलं. वसूलीसाठी बँक मामाच्या मागे लागली. अशावेळी त्या कर्जबुडव्या माणसाच्या पाच किमी दूर असलेल्या घरी जमेल तसे खेटे मारून मामीने थोडीफार उधारी वसूल केली. मामी खमकी होती. अशा परिस्थितीतही चीडताना, भांडताना दिसली नाही. हसत म्हणायची,
"आज माझ्यावर वेळ आलेय म्हणून, नाहीतर या व्यापाऱ्यांच्या दारात तरी पाय़ ठेवला असता का मी कधी? आज तुझा मामा हतबल झालाय म्हणून, पण त्यांच्या राज्यात त्यांनी मला किती सुखात ठेवलं."
आज आश्चर्य वाटतंय, मामी कशात सुख बघत होती कोण जाणे. सतत दुखणारं डोकं, न येणारी झोप हे तिच्या स्वतःचं मुलबाळ नसल्याचंच लक्षण होतं का? मामाचं तिच्यावर असलेलं खूप प्रेम हेच तिला सुख वाटत होतं का?
मामाचा स्वाभिमान तिने नेहमी जपला.
मामा शेजारणीशी हसून खेळून बोलत असे, तिच्याशी चेष्टामस्करी करत असे. तर त्याच्या बहिणींना त्याचं तिच्याशी प्रकरण असल्याचं वाटायचं. तसं ते होतं की नव्हतं ते देवच जाणे. परंतु मामीने त्याबद्दल कधीच एका शब्दानेही आक्षेप घेतला नव्हता.
पण याचा अर्थ ती मामाच्या होला हो करणारी बाई होती आणि मामाच्या पुरुषी सत्तेपुढे वाकलेली होती असं अजिबातच नव्हतं. त्याचे सगळे निर्णय ती डोळे झाकून मान्य करत नव्हती. जेव्हा मामाने आपल्या धाकट्या विधुर भावाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा तिने ठामपणे त्या गोष्टीला विरोध केला. एकतर तो भाऊ इतका सक्षम नव्हता. तिने म्हटलं, जर त्यांचं लग्न करायचं असेल, तर आपल्या मुलांना पण त्यांनी घेऊन जावं लागेल त्यांच्याजवळ. मग मी करणार नाही या मुलांचं काही. यावर दोन्ही मामा गप्प बसले होते. कारण चार मुलांचं करणारी बायको त्याला भेटणं कठीण होतं.
ती सगळी कामं कर्तव्य समजून कर्तृत्वाने पेलत होती. नाईलाज म्हणून करत नव्हती ती. आम्हा मुलांना तिचा धाक असे माफक. शिस्त होती. शिवाय तिचं सोवळं ओवळंही होतं थोडं. ते आम्हाला पाळावं लागे.
गावातल्या इतर समवयीन स्त्रियांशी तिचे संंबंध माफक पण आदराचे होते. असंही श्रीमंत घरातली म्हणून तिला आदर होताच गावात. त्यात ती सुंदर, खंबीर, प्रभावी व्यक्तिमत्व असलेली. आवश्यक तिथे आणि तेवढ्यापुरतीच ती त्यांच्यात मिसळत असे.
मामीचं माहेरही तालेवार होतं. तिला पाठिंबा देणारं होतं. सर्व धबडग्याला कंटाळली की तीही आठ आठ दिवस माहेरी जाऊन राहायची. खरंतर जाताना ती सैपाकाला बाई ठेवून जायची. तरी आम्हाला ती सारखी माहेरी जाते याचा मनातून राग यायचा. पण तिलाही आरामाची, बदलाची गरज आहे हे कळण्याचं आमचं वय नव्हतं.
शेवटी अशाने दुकानही चालणारं नव्हतं. मामीने निर्णय घेतला. हे मोठ्ठं घर विकलं तर दहाएक लाख मिळणार होते. त्यातून बँकेची जामीन रक्कम भरता येईल. आणि उरलेले पैसे व्याजावर ठेवून भाड्याने राहता येईल. मोठ्या घरातून मामी समोरच व्यापाऱ्याने बांधलेल्या एका चाळीत तीन रुममध्ये भाड्याने राहायला गेली. चेहऱ्यावर कोणताही गिल्ट, दुःख, अपमानाची भावना नव्हती. परंतु व्यसनी मुलगा, जो दिराचा सांभाळलेला होता, ज्याला आपलं नाव लावलं होतं. तो काही न करता त्रास मात्र करत असे. आता हा त्रास कसा सोडवायचा. त्यात मामाचे आजार. तिने पुन्हा निर्णय घेतला. गुजरातला एका खेड्यावर पिढीजाद जुनं घर रिकामं पडलेलं होतं. ती म्हणाली,
"इथं भाड्याने राहाण्यापेक्षा मी तिथं चालली जाते यांना घेऊन."
आणि मामी ज्या परिसरात जन्मापासून वाढली तो सोडून गुजरातला निघून गेली. तेव्हा तिचं वय होतं सत्तरीच्या घरात. मुलाला सांगितलं तू कुठे तरी नोकरी बघ. माझ्यासोबत येऊ नकोस.
मामी आजही त्या खेड्यावर राहतेय. वयाची पंच्याऐंशी वर्ष उलटलेयत. ती राहते ते खेडं अगदीच खेडं आहे. गावातले अर्धे लोक घरं बंद करून शहरात निघून गेलेली आहेत. खेड्यावर दवाखाना पण नाही. बाजूच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं. अशा खेड्यावर मामी मामाला घेऊन राहिली. सोबत त्या मंदबुद्धी पुतणीला घेतलं. ती खूप बडबड करते, पण मामीची काळजी घेते. चारेक हजार व्याज येतं. त्यात तिचं भागतं.
तिला मी विचारलं,
"मामी, भीती नाही वाटत इतक्या अशा आडगावी राहायला?"
"छे, भीती कसली! आणि आता या वयात बरंवाईट व्हायचंच आमचं. डॉक्टर काय करणार आहे, वेळ आल्यावर? माझा देव आहे की माझ्या पाठीशी. इथं शांत वाटतंय उलट."
आणि मामाची वेळ आली. मामीने दोन तासाच्या अंतरावर राहणाऱ्या पुतणीला, जावयाला बोलावून घेतले. त्यांनी येऊन मग मामाला तालुक्याच्या दवाखान्यात हलवले. चार दिवसांत मामा गेला.
मामा जाऊनही चार वर्षे झाली. मामी आपल्या छोट्या पुतणीसह तिथेच राहतेय. गावातल्या छोट्याशा मंदिरात दर्शनाला जाते. तब्येत नरमगरम राहते. पण मामीला भीती, कुढत राहणं ह्या गोष्टी ठाऊकच नाहीत. मोठ्या पुतणीकडे जाऊन राहण्याचा, तिची मदत घेण्याचा विचारही करत नाही.
मामीला सांगितलं, "या मंदबुद्धी पुतणीला कशाला जवळ ठेवताय? तिच्या मोठ्या बहिणीचंही कर्तव्य नाही का तिच्याप्रती? तिच्याकडे द्या पाठवून तिला."
तेव्हा मामी म्हणते, "त्या बिचारीचा संसार का खराब करू हिला तिच्याकडे पाठवून? मी मुलीसारखं वाढवलं तर ती माझीच जबाबदारी आहे. माझ्या पश्चात ती बघेल तिचं काय करायचं ते. मलाही सोबत होतेय तिची, त्रास असला तरी."
कुठून आलं असेल हे बळ मामीला..
आयुष्यात एवढी स्थित्यंतरं आली तरी कधी कशाबद्दल तक्रार, रडगाणी गायली नाहीत तिने. ती स्थित्यंतर खंबीरपणे पेलली.
मामी 'इदं न मम' या तत्वावरच जगली आयुष्यभर...
सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ....हे तत्व नुसतं सुविचार म्हणून नव्हते तिच्यासाठी. तो तिचा स्वभावच होता. अडचणी आल्या की मी मामींना आठवते. मग मला माझ्या डोंगराएवढ्या अडचणी मोहरीएवढ्या वाटू लागतात. जगण्याचं बळ मिळतं.
-Alka Aserkar
छान!
ReplyDeleteनिःशब्द
ReplyDelete