Jul 12, 2020

संसार आणि कामाची विभागणी -

कामाची विभागणी-
अजूनही घरातलं काम कुणी करायचं, सैपाक कुणी करायचा, साफसफाई कुणी करायची याच्या चर्चा माध्यमांमधून जोरशोरसे झडत असतात.
लॉकडाऊन काळ सोडून द्या.
माझं लग्न होऊन तीस वर्ष उलटली.
आमच्या घरात कधीही हे काम बाईचं नि हे काम पुरुषाचं अशी विभागणी नव्हती. अशी भावना नव्हती.
अर्थात हे कदाचित आम्हीच दोघं आणि नंतर मुलगा असं स्वतंत्र कुटुंब असल्याने शक्य झालं असेल. एकत्र, अगदी सासू सासरे जरी असते फक्त सोबत, तरी तेव्हा हे कितपत शक्य झालं असतं ते सांगू शकत नाही.
लग्नानंतर मी जवळपास पूर्णवेळ गृहीणी राहण्याचे ठरवले. अधुनमधून पार्ट टाईम नोकऱ्या केल्या. पण त्या पॉकेटमनी मिळवून देण्यापुरत्याच होत्या.
त्यावेळी नवरा मात्र पूर्णवेळ नोकरी करत होता.
आणि तरीही तो घरची कामं सगळी माझ्या बरोबरीने करत होता. अगदी सैपाकासह. मला रात्री जागता येत होतं, तर त्याला सकाळी लवकर उठता येत होतं. साहजिकच सकाळी उठल्यावर पाणी भरून घेण्यापासून दूध, चहा, मुलाला आंघोळ घालून शाळेसाठी सोडून येणं हे त्याने वर्षानुवर्ष केलं. सहजपणे केलं. त्यानंतर मी उठायचे, आठ साडेआठ वाजता. नंतरची कामं मी करत असे आणि तो ऑफिसला निघत असे.
मुलाचा अभ्यास नेहमी मीच घेतला. त्याने क्वचितच गणित वगैरे शिकवलं असेल. मुलाच्या आजारपणात रात्री मी जागले. कारण त्याला रात्री जागवत नसे.
तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघंही बाहेर सोफ्यावर लोळत टाईमपास करत असू, तरी मी बिनधास्त, 'अरे, जरा पाणी आण ना मला प्यायला', ते ग्रीन टी दे ना करून, औषधं दे ना आणून असं काहीही म्हणू शकते आणि तोही उठून आणून देऊ शकतो. देतो. वैतागला असेल, कंटाळला असेल, तर नाही देत, तुझी तू घे उठूनही म्हणू शकतो. आणि हे व्हाईस वर्साही असू शकतं.
सैपाकघरातली कामं अर्धवट सोडून मी मोबाईलवर टाईमपास करू शकते, माझी अनुवादाची कामं हातात घेऊ शकते. कविता वगैरे खरडत बसू शकते, आणि मी बराच वेळ उठत नाही हे पाहून तो सैपाकघरातील उर्वरीत कामं उरकून घेतो. सहजपणे. अगदी रात्री दही विरजण्यापर्यंत. मात्र त्याची त्याला आठवण करून द्यावी लागते. तो पूर्णवेळ नोकरी करत असल्याने अर्थात सगळी कामं करत असला तरी प्रामुख्याने सैपाकघर आणि त्यातली कामे याचे आयोजन, नियोजन माझ्याकडेच होते आणि अधिकतर सैपाकघरातली कामंही माझ्याकडेच असतात.
मी कोणत्याही दिवशी, कोणत्याही क्षणी माझे बाहेरचे कार्यक्रम ठरवते, ठरवू शकते. हवा तितका वेळ किंवा तितके दिवस बाहेर राहू शकते. अगदी मुलगा लहान होता तेव्हाही. आणि प्रत्येकवेळी हे बाहेरचे कार्यक्रम कामाचेच असतात असं नाही, तर मौजमजेसाठी जाणे, मित्रमैत्रिणींबरोबर फिरणे, माहेरच्या अडीअडचणींना धावणे, नातेवाईकांच्या समारंभांना हजर राहणे, नाटकसिनेमा पाहायला जाणे, असे कोणतेही असू शकतात. विशेष म्हणजे या काळात नवरा कधीही फोन करून हैराण करत नाही. 'कुठे आहेस, कधी येतेस' असे लाडानेही किंवा काळजीनेही कधी विचारत नाही. अगदीच अपवाद काही काम असलं तरच तो असे फोन करतो.
मी बाहेरगावाहून येणार असेल, तर जेवणाच्या वेळी वरणभात वांगीबटाटा भाजी (ही ठरलेली अशावेळी.) आणि विकतच्या पोळ्या आणून ठेवतो. मला कधीच आठवत नाही की तो घरी आहे आणि मी बाहेरून येऊन सैपाक केल्यावर तो जेवलाय. तो जेवणासाठी माझ्यावर अवलंबून नसतो. (इथेही कधी कधी बायका मुद्दाम पुरुषांना आपल्यावर डिपेन्डन्ट ठेवतात. त्यात त्यांना कुणीतरी आपल्यावर अवलंबून आहे याचाही एक आनंद मिळत असतो असं पाहिलंय.)
आजही मुलाचे लाड माझ्यापेक्षा तो जास्त करतो. त्याने काही खाण्याची फर्माईश केली आणि मी नाही म्हटले तर तो पुरी करतो. करण्याचा प्रयत्न करतो.
थोडक्यात एखादी स्त्री घर सांभाळून नोकरीही करते, तद्वतच माझ्या घरातील या सद्गृहस्थाने घरची बाहेरची कामं सांभाळून नोकरी केली. त्याची नोकरीही बैठी नव्हती. फिरायला, साईटवर जायला लागत असे. नोकरीच्या वेळा फिक्स नव्हत्या. तरीही.
विशेष म्हणजे जवळपास हेच वातावरण मला माहेरी मिळाले होते. याबद्दल मी यापूर्वीही लिहिलेले आहे वेळोवेळी. सुदैवाने तेच वातावरण मला लग्नानंतरही नवऱ्याने दिले.
कधी कधी तो माझ्या मित्रांच्या बाबतीत पझेसिव्ह झाला थोडा, नाही असं नाही. परंतु त्याचे स्वरुप फार टोकाचे झाले नाही. किंवा मला रोखण्याकडेही गेले नाही.

हे सगळं सांगायचे कारण म्हणजे, हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटतंय. वर सुरूवातीलाच सांगितलंय त्याप्रमाणे आजही हे पुरुषाचं काम, हे स्त्रीचं अशा चर्चा आणि त्यामागच्या व्यथा, वेदना, त्रास व्यक्त केल्या जातात, तेव्हा असे पुरुषही असतात हे सांगणं मला गरजेचं वाटतं. आणि नवऱ्याचा अभिमानही वाटतो. खरंतर यात अभिमानाची काही गोष्टच नाही. पण तो जर अपवादाने असेल असा, तर त्या अपवादाचा आणि त्यामुळे मला कंफर्टेबल आयुष्य लाभलं याचा आनंद नक्कीच आहे. कारण त्याने सोयी सोयीने, किंवा मला मदत म्हणून ही कामं केली नाही. किंवा मी स्त्रीवादी आहे आणि मी त्याला तसं करायला भाग पाडलंय म्हणून केलीत असंही नाही. तर घर माझंही आहे, आणि ही जबाबदारी माझीही आहे या भावनेतून त्याने ती केली.
सर्वसाधारणपणे लग्नाआधी जे पुरुष एकटे राहिलेले असतात कोणत्याही कारणाने, मग ते शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, असे पुरुष बरेचसे स्वावलंबी असतात. तसा माझा नवराही नोकरीनिमित्ताने बरीच वर्षे एकटा राहिलेला असल्याने लग्नाआधीच त्याला सगळं घरकाम करण्याची सवय होती. सैपाकासह. सुरुवातीच्या बेसिक सैपाकातील अनेक टिप्स तर त्यानेच मला दिल्या होत्या.
मात्र जे पुरुष आईच्या हाताखाली लाडोबाच राहिलेले असतात लग्न होईपर्यंत त्यांची रवानगी आता आईकडून बायकोकडे होते आणि ते इकडची काडी तिकडे करत नाहीत असा अनुभव आहे. तोही अनुभव माझ्या घरातच आहे. माझ्या मुलाच्या रुपाने.
लहानपणापासून बाबाला सगळी कामं घरात करताना पाहूनही तो मात्र इकडची काडी तिकडे करत नाही. आणि मी त्याच्यापुढे हात टेकलेत. दोन्ही टोकाची उदाहरणे माझ्या घरातच आहेत. त्यामुळे इथं माझं कौतुक सांगत नाहीए.
मात्र याचा अर्थ आमचा संसार अगदी आदर्श झाला, आणि आमच्यात भांडणं झाली नाहीत असं अजिबातच नाही. अगदी कडाक्याची झाली नि होतात. डिव्होर्स मागण्यापर्यंत जातात. तीस वर्षात ३० वेळा डिव्होर्स मागितला गेला असेल आजवर. पण त्याची कारणं वेगळी होती. वेगळी आहेत. इथं आत्ता आपण फक्त घरकामाबद्दल बोलत असल्याने त्या कारणांची चर्चा करण्याचं कारण नाही इतकंच.
मला सांगायला आवडेल, की माझ्या धाकट्या बहिणीला देखील असाच नवरा मिळाला. तो तर श्रीमंत आणि पारंपरिक घरातला मुलगा होता. परंतु घरकाम आणि मुलाचे संगोपन त्याने अनेकदा तिच्या बरोबरीने केले.
आणि हे मी तीस वर्ष पूर्वीपासून बघत, अनुभवत आले असल्याने मला ते सहज वाटतंय आणि सगळीकडे असंच असेल, किंवा असावं असंही वाटतं. परंतु तसं ते सगळीकडे आजही नाही ही वस्तुस्थिती आहे.
अनेकदा जेव्हा मी कट्टर स्त्रीवादी मतं मांडते, लेखन करते, तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की हिला घरातच असा त्रास झाला असणार, होत असणार. परंतु रुढार्थाने मला तेवढा त्रास झालाच नाही माझ्या स्वतःच्या घरात. आणि रुढार्थाने माझा नवरा स्त्रीवादी नाही. स्त्रीवादाबदद्ल तो काहीही सांगू शकणार नाही. तरीही तो वागला ते समानतेनेच.
तरीही पितृसत्ताक समाजरचनेच्या टोचण्या सासरी माहेरी मलाही कमी अधिक प्रमाणात टोचलेल्या आहेतच.
अर्धांगी नावाचा एक फेसबूक ग्रुप मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी मिळून २०११ ते २०१६ पर्यंत जोमाने चालवत होतो. लोकांना खूप आवडतही होता तो ग्रुप. तिथं फक्त स्त्रिया नसून पुरुषही होते. अनेक पुरुषांनी तेव्हा तिथे आम्हाला नव्यानेच नाण्याची दुसरी बाजू समजतेय असं सांगितलं होतं. अनेक पुरुषांनी 'आम्ही आजवर देत असलेल्या स्त्रीवाचक शिव्या बंद केल्या आहेत आवर्जून' असंही येऊन सांगितलं होतं. आम्हा तिघी ग्रुप चालवणाऱ्या मैत्रिणींपैकी रुढार्थाने कुणालाच वर्चस्ववादी नवरा भेटलेला नव्हता. कोणती बंधने नव्हती. तिघींनाही मुलगेच होते. मुलगी असण्याच्या कथित समस्याही नव्हत्या. तरी आम्ही या विषयावर लिहित होतो. कारण या समस्या कुणा एकीच्या वैयक्तिक नसून त्या सामाजिक आहेत. कमी अधिक प्रमाणात. म्हणून त्या अनुभवावरून मला वाटतंय की सतत हा विषय चर्चिला गेला पाहिजे या उद्देशाने ही पोस्ट आहे. ही माझ्या नवऱ्याच्या कौतुकाची पोस्ट तर अजिबात नाही. तशा प्रतिक्रियाही मला अपेक्षित नाहीत. फक्त इतक्या सहजपणे घरकामाची विभागणी असायला हवी. आणि असते. असे पुरुषही असतात. त्यांना समाजासमोर आणायला हवे. जेणेकरून इतरांना त्यातून काही बोध मिळू शकेल. तिथे स्त्री-पुरुष असा भेद नसावा. दोघांनाही स्पेस असावी. आपले छंद, करीअर करण्याची. कधी संसार बिनधास्तपणे दुसऱ्याच्या भरोशावर टाकून हिंडण्याफिरण्याची, भटकण्याचीही मुभा मिळावी. तेव्हाच लग्न हे खऱ्या अर्थाने सहजीवन होते. नवरा बायको खऱ्या अर्थाने एकमेकांचे मित्र मैत्रिण होतात. पण आपल्याकडे खेकड्यासारखे एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना एकाच जागी जकडून ठेवण्याला, हे काम माझे, हे तुझे असे करण्याला दुर्दैवाने संसार म्हटलं जातं नि त्या खेकड्यांना नवरा बायको म्हटलं जातं. ना मी मुक्त राहणार, ना तुला राहू देणार. एकमेकांचं शेपूट बनून, ते सदैव धरून ठेवून एकमेकांना ओढत राहायचं. फरपटत राहायचं. व्यक्ती म्हणून एकमेकांचं स्वातंत्र्य दडपून टाकून नवरा म्हणजे पैसे कमवणारा भारवाही हमाल नि बायको म्हणजे घरातली मोलकरीण अशा तऱ्हेनेच बहुतांश संसार रेटले जाताना दिसत असतात. सुदैवाने मला वेगळे, स्वतंत्र आयुष्य लाभले.
- अलका गांधी-असेरकर

3 comments:

  1. मस्तच लेख आहे. मनापासून आवडला. छान छान !

    ReplyDelete
  2. मस्तच लेख!मनापासून आवडला. छान छान.

    ReplyDelete

किसी पिछले जनम की बात...

मुगले आजम हा सिनेमा पन्नास वर्षानंतर रंगीत झाला, त्यालाही आता जवळपास 20 एक वर्ष लोटली. 🤦काळ किती भराभर चाललाय...    तेव्हा टीव्हीवर दिलीप क...